Tag Archive for: तत्त्वज्ञान

साधक : माताजी, “उत्क्रांत होणाऱ्या ‘प्रकृती’च्या सुरुवातीच्या टप्प्यांवर आपली गाठ तिच्या अचेतनेच्या मुग्ध गोपनीयतेशी (dumb secrecy) पडते.” मला (श्रीअरविंदांच्या ‘दिव्य जीवन’मधील) या विधानाचा अर्थ समजला नाही. ही गोपनीयता म्हणजे काय ते सांगाल का?

श्रीमाताजी : …श्रीअरविंद अगदी सुरुवातीपासून हेच सांगत आहेत की, जडभौतिकाच्या अगदी गाभ्यामध्ये, आतमध्ये खोलवर ‘ईश्वरी उपस्थिती’ (Divine Presence) दडलेली असते. आणि सर्व वस्तुमात्रांच्याच केंद्रस्थानी असलेल्या या ‘ईश्वरी उपस्थिती’कडे म्हणजे तिच्या उगमाकडे सृष्टी परत वळावी, यासाठी तिची तयारी करणे हे समग्र पार्थिव उत्क्रांतीकडून अपेक्षित आहे. आणि हाच ‘प्रकृती’चा मनोदय आहे.

हे विश्व म्हणजे त्या ‘परमेश्वरा’चे वस्तुनिष्ठीकरण (objectivisation) आहे, जणू त्याने स्वतःच स्वतःला न्याहाळता यावे, स्वतःला स्वतःचे जीवन जगता यावे, स्वतःच स्वतःला जाणून घ्यावे या हेतुने, स्वतःला स्वतःपासून वेगळे काढून, वस्तुनिष्ठ रूपात आणले असावे. आणि म्हणून तेथे असे एक अस्तित्व असेल, अशी एक चेतना असेल की जी त्या ‘परमेश्वरा’ला स्वतःचा उगमस्रोत म्हणून ओळखू शकेल आणि संभूतीमध्ये (Becoming) त्याचे आविष्करण घडून यावे म्हणून त्याच्याशी सचेतनपणे एकत्व पावेल. याव्यतिरिक्त या विश्वाचे अन्य कोणतेच प्रयोजन नाही. ही पृथ्वी म्हणजे या वैश्विक जीवनाचे स्फटिकीभवन (crystallization) झालेले एक प्रातिनिधिक रूप आहे, एककेंद्रीकरण झालेली, ती एक छोटी प्रतिकृती आहे; ज्यामुळे, उत्क्रांतीचे कार्य करणे आणि त्याचे अनुसरण करणे सोपे जाण्याची शक्यता आहे. आपण पृथ्वीचा इतिहास समजावून घेतला की, या विश्वाची निर्मिती का झाली असावी, हे आपल्या लक्षात येते. शाश्वत ‘संभूती’मध्ये (eternal Becoming) ‘परमेश्वर’ स्वतःविषयीच अधिकाधिक जागृत होत आहे आणि निर्मितीचे ‘निर्माणकर्त्या’शी ऐक्य व्हावे हे त्यामधील उद्दिष्ट आहे; ‘आविष्करणा’मध्ये घडून येणारे हे ऐक्य सजग, ऐच्छिक आणि मुक्त असणार आहे.

हे ‘प्रकृती’चे गुपित आहे. ‘प्रकृती’ ही कार्यकारी शक्ती आहे, तीच हे सारे कार्य करत असते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 321)

एखादा भूकंप होतो, किंवा एखाद्या ज्वालामुखीचा उद्रेक होतो, तेव्हा जर त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशात माणसं राहत असतील तर या घटनांमुळे त्यांचा मृत्यू होतो, आणि अर्थातच त्यांच्यासाठी ती एक आपत्ती ठरते, ‘निसर्गा’साठी मात्र ती एक गंमत असते. आपण म्हणतो, “काय भयंकर वारा सुटला आहे?” साहजिकच आहे, माणसांसाठी तो “भयंकर” असतो, पण ‘निसर्गा’साठी मात्र तो तसा नसतो. हा प्रमाणाचा प्रश्न असतो, नाही का? एखादी उच्चतर शक्ती आविष्कृत होण्याची इच्छा बाळगत आहे आणि ‘प्रकृती’कडून तिला प्रतिरोध होत आहे, असे घडणे शक्य आहे, पण हे आवश्यक मात्र नाही.

ही गोष्ट अगदी सहज समजण्यासारखी आहे की, महाकाय शक्तींबरोबर ‘प्रकृती’चा चाललेला हा खेळ असतो आणि तिच्यासाठी ती केवळ एक लीला असते; तिच्या दृष्टीने त्यात कोणत्याही प्रकारे आपत्तीजनक असे काहीही नसते. ‘प्रकृती’-चेतनेच्या किंवा जडभौतिक चेतनेच्या दृष्टीने, पृथ्वीवरील भौतिक आकार आणि मानवजात या गोष्टी म्हणजे जणू काही मुंग्यांसारख्याच असतात. तुम्ही स्वतःदेखील जेव्हा चालत असता तेव्हा, तुम्ही तुमच्या पायाखाली मुंग्या चिरडू नयेत म्हणून तुमचा मार्ग बदलणे आवश्यक समजत नाही. (अर्थात तुम्ही कट्टर ‘अहिंसक’ असलात तर बाब निराळी!) तुम्ही चालत असता आणि तुमच्या पायांखाली शेकडो मुंग्या आल्या तरी काही इलाज नसतो. ‘प्रकृती’चेही अगदी असेच असते. ती वाटचाल करत असते आणि तिच्या त्या वाटचालीत तिच्या पायदळी तिने हजारो माणसं जरी नष्ट केली तरी ती बाब तिच्यासाठी इतकी महत्त्वाची नसते कारण ती अशी लाखो माणसे पुन्हा निर्माण करू शकते. तिच्यासाठी ते अवघड नसते.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 175)

पृथ्वी ही जडभौतिक विश्वाचे केंद्र आहे. ज्या शक्तीद्वारे ‘जडभौतिका’चे रूपांतरण घडून येणार आहे त्या शक्तीच्या एककेंद्रीकरणासाठी पृथ्वीची निर्मिती झालेली आहे. ‘जडभौतिका’मधील ईश्वरी क्षमतेचे ती प्रतीक आहे. …‘ईश्वरी चेतने’च्या थेट हस्तक्षेपामुळे या पृथ्वीची निर्मिती झाली आहे आणि त्यामुळे फक्त या पृथ्वीवरच ‘ईश्वरा’शी थेट संपर्क होऊ शकतो आणि तसा तो होतो देखील. पृथ्वी दिव्य प्रकाश शोषून घेते, विकसित करते आणि त्याचा किरणोत्सर्ग करते. हा किरणोत्सर्ग स्थलाच्या कक्षा ओलांडून पलीकडे जातो आणि जेथे जेथे ‘जडभौतिकता’ आहे तेथे तेथे तो पसरतो. ‘ईश्वरी चेतने’ची सुसंवादिता आणि प्रकाशाची जी देणगी पृथ्वी घेऊन येते ती देणगी, हे जडभौतिक विश्व काही प्रमाणात वाटून घेते. परंतु त्या चेतनेचे परिपूर्ण आणि अंतिम विकसन हे या ‘पृथ्वी’वरच शक्य असते. चैत्य पुरुष (Psychic being) हा फक्त या पृथ्वीवरच आढळून येतो, कारण तो पृथ्वीचीच निर्मिती आहे. तो ‘जडभौतिका’ ला झालेला ‘ईश्वरी’ स्पर्श आहे. चैत्य पुरुष हा ‘पृथ्वी’ चे अपत्य असते; तो या ‘पृथ्वी’वरच जन्माला येतो आणि येथेच विकसित होतो. तो ‘पृथ्वी’खेरीज अन्य कोणत्याच ठिकाणचा रहिवासी नाही.

– श्रीअरविंद
(The Yoga of Sri Aurobindo : Part 06 by Nolini Kant Gupta : 23)

व्यक्तीला जर ‘प्रकृती’शी संवाद साधता आला, तर व्यक्ती जीवनातील थोडीफार रहस्ये शिकू शकते, ती रहस्ये तिला खूप उपयोगी ठरू शकतात. व्यक्तीला त्यामुळे केवळ आजारपणाची पूर्वसूचनाच मिळते असे नाही तर, व्यक्ती त्यावर नियंत्रणसुद्धा मिळवू शकते, किंवा येणारी आपत्ती टाळू शकते आणि ‘प्रकृती’चा विनाश टाळू शकते. अशा प्रकारे, त्याचे अनेक फायदे आहेत. संवाद साधायचा म्हणजे काय? तर सर्व अस्तित्वाला व्यापून असणाऱ्या ‘सुसंवादाच्या आनंदा’तील ज्ञान शोधून काढणे आणि त्याच्या चेतनेने स्पंदित होणे. ही गोष्ट खरोखरच शोध घेण्यायोग्य आहे. हे आयुष्यभर करण्याचे कार्य आहे. या चेतनेचा शोध घ्या आणि या सूक्ष्म जगताशी सुसंवाद साधण्याचा आनंद प्राप्त करून घ्या. व्यक्ती शांततेमध्येच सुसंवाद साधू शकते आणि एक प्रकारच्या सूक्ष्म देवाणघेवाणीने स्वतःला अभिव्यक्त करते. ती अगदी पूर्णतया स्वतंत्र अशी भाषा आहे की जी शब्दांमध्ये व्यक्त करता येणे शक्य नाही, कारण आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण शब्दांचा वापर करत असतो. तर ती स्वतंत्र भाषा म्हणजे एक लघु आणि अचूक अभिव्यक्ती असते आणि आपल्या भाषेपेक्षा ती कितीतरी अधिक प्रमाणात आकलन होण्यायोग्य असते.

– श्रीमाताजी
(Throb of Nature : 04)

‘परिपूर्णता’ ही अजूनही एक विकसनशील संकल्पना आहे. निर्मिती जेव्हा तिच्या सर्वोच्च शक्यतांप्रत पोहोचते, तेव्हा ती परिपूर्णता असते, असे नेहमीच म्हटले जाते; पण हे असे नसते. आणि नेमक्या याच संकल्पनेला माझा विरोध आहे. या गोष्टी म्हणजे प्रगतीची केवळ एक पायरी असते. म्हणजे असे की, ‘प्रकृती’ तिच्या शक्यतांच्या अगदी अंतिम मर्यादेपर्यंत जाते आणि जेव्हा तिच्या असे लक्षात येते की, आता पुढे जाता येत नाहीये, मार्ग खुंटला आहे, तेव्हा ती सारेकाही नष्ट करून टाकते आणि पुन्हा नव्याने प्रारंभ करते. याला काही परिपूर्णता म्हणता येणार नाही, कारण परिपूर्णता असेल तर गोष्टी नष्ट कराव्या लागता कामा नयेत. ‘प्रकृती’ने जे काही घडवायला सुरुवात केली होती, ते तिला नष्टवत करावे लागता कामा नये, तेव्हाच परिपूर्णता येईल. ‘प्रकृती’ने जे घडवायला सुरुवात केली होती ते पुरेसे नाहीये किंवा तिला स्वतःला जे घडवायचे होते ते काहीतरी वेगळेच होते, असे जाणवल्यावर तिने ते नष्ट केले नाही, असे आत्ताच्या घडीला तरी एकही उदाहरण दिसत नाही. त्यामुळे ‘प्रकृती’ने आपल्या निर्मितीमध्ये परिपूर्णता संपादन केली आहे, असे म्हणता येणार नाही.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 15)

‘प्रकृती’पाशी पुरेसे द्रष्टेपण असते; ती प्रत्येक वातावरणामध्ये त्या वातावरणाला अनुसरून सुयोग्य अशी गोष्ट निर्माण करत असते. अर्थातच, एखाद्याने माणसाला केंद्रस्थानी ठेवता कामा नये, त्याने असे म्हणता कामा नये की, अमुक अमुक गोष्ट ‘निसर्गा’ने माणसाच्या भल्यासाठी केली आहे. परंतु असे असेल असे काही मला वाटत नाही, कारण या पृथ्वीवर माणसाचा उदय होण्यापूर्वी कितीतरी आधीपासूनच ‘प्रकृती’ने या साऱ्या गोष्टींची निर्मिती केलेली होती.

एखाद्या देशाची पर्यावरणीय परिस्थिती आणि त्या देशामध्ये तयार होणारे उत्पादन यांच्यामध्ये एक प्रकारची सुसंवादिता विकसित झालेली आढळते; जसे की, प्राण्यांचा अधिवास ज्या देशांमध्ये असतो त्या देशाची विशालता आणि तेथील प्राण्यांचा आकार या दोहोंमध्ये एक प्रकारची सुसंवादिता आढळते. उदाहरणार्थ, भारतातील हत्ती हे आफ्रिकेमधील हत्तींपेक्षा आकाराने कितीतरी लहान असतात. आणि असे म्हटले जाते की, आफ्रिकेमध्ये प्रचंड मोकळी जागा आहे आणि त्यामुळे तेथील प्राणीदेखील आकाराने मोठे असतात.

सृष्टीनिर्मितीमध्येच ही एक प्रकारची सुसंवादिता प्रस्थापित झालेली आहे आणि पुढे देश जसजसे आकाराने लहान होत गेले, प्रांत जसजसे आकुंचित होत गेले तसतसे, त्या प्रांतामध्ये राहणारे प्राणीदेखील आकाराने लहानलहान होत गेले. आणि मोकळी जागा आणि त्या प्राण्यांचे आकारमान यांच्यामध्ये सुयोग्य प्रमाण उरले नाही तेव्हा ते प्राणी नष्ट झाले. तुम्ही जर बेसुमार घरं बांधलीत, तर मग तेथे अस्वलं, लांडगे यांसारखे प्राणी शिल्लक राहणार नाहीत, साहजिकच, सर्वात आधी वाघ आणि सिंह नामशेष होतील; आणि मला वाटते यामध्ये माणसांचा हात आहे…

भीती माणसांना अत्यंत विघातक बनवते. पण जसजसे माणसांचे जथेच्या जथे संख्येने वाढत जातील आणि रिकाम्या जागा कमी कमी होत जातील तसतसे प्राणिमात्रांचे आकार कमीकमी होत जातील. मग आपण या सगळ्यांसाठी नियम तरी कसे बनवणार?

– श्रीमाताजी
(CWM 07 : 53-54)

व्यक्तीकडे जेव्हा अशी अंतर्दृष्टी असते, की जी आपल्या अस्तित्वाची आतली द्वारे उघडून देते आणि ज्यामुळे व्यक्ती वस्तुमागील सत्य काय आहे ते पाहायला सुरुवात करते तेव्हा, व्यक्तीला हे उमगू लागते की, अगदी या भौतिक विश्वामध्येसुद्धा अशा अनेक गोष्टी आहेत की, ज्या आपल्या सामान्य नजरेतून निसटून जातात. व्यक्तीने अगदी सूक्ष्मदर्शक यंत्राखाली किंवा अगदी दुर्बिणीतून पाहिले तरी, किंवा आधुनिक छायाचित्रणाच्या साधनांद्वारे त्याचे पुनरुत्पादन करण्यात व्यक्ती सक्षम ठरली तरी, या साऱ्या गोष्टी म्हणजे केवळ वर्गीकरण असते, ‘निसर्गा’ची रहस्यं शोधण्याच्या दिशेने टाकलेली ती पहिलीवहिली पावले असतात. ‘निसर्गा’च्या कार्यप्रणाली मागे काय दडलेले आहे, याचे वर्णन कोणतेही मानवनिर्मित यंत्र करू शकणार नाही. ती कार्यप्रणाली इतकी सुंदर, इतकी बहुविध, इतकी सूक्ष्म आणि तिच्या अचूकतेबाबतीत, तिच्या बारकाव्यानिशी केलेल्या कार्याच्या परिपूर्णतेबाबत इतकी उत्कृष्ट आहे, की या छोट्याशा मेंदूने त्याचे वर्णन कधीच करता येणे शक्य नाही. आणि मनुष्याला मात्र असे वाटत असते की, ‘निसर्गा’च्या या कार्यप्रणालीमध्ये यंत्रांच्या मदतीने आणि त्याने लावलेल्या शोधांच्या माध्यमातून तो सुधारणा घडवून आणू शकतो; भौतिक क्षेत्रात त्याने ज्या क्षमता संपादन केलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून ‘निसर्गा’च्या या कार्यप्रणाली तो शास्त्रीय पद्धतीने बदलवून टाकू शकतो, अशी त्याची समजूत असते. मनुष्य त्याच्या सूत्रांद्वारे, त्याच्या अनुभवाच्या पद्धतीद्वारे आणि ‘निसर्गा’च्या कार्यप्रणालीवर विजय मिळविण्याच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या शोधांच्या साहाय्याने ‘निसर्गा’वर प्रभुत्व मिळवू शकतो असा त्याचा उद्दाम विश्वास असतो. केवढी ही मूर्खता, केवढा हा वेडेपणा!… कसली ही तुलना !

अनंताला कवळणाऱ्या ‘निसर्गा’च्या क्षमतेच्या परिघालासुद्धा मनुष्य आजवर स्पर्श करू शकलेला नाही आणि तो ‘निसर्गा’वर सत्ता गाजविण्याचा दावा करत आहे. – हा मनुष्याचा फाजील गर्व आणि त्याचा अहंकार आहे; असाध्य रोगाच्या तावडीत सापडलेल्या आणि ज्याचे आयुष्य गिळंकृत केले जात आहे अशा एखाद्या प्राण्याने व्यर्थ फुशारक्या माराव्यात तसे हे आहे.

आणि तरीही, मनुष्य विजय मिळविण्याची इच्छा बाळगून आहे, त्यावर ठाम आहे, आणि तो अतिशय उत्सुक आहे. परंतु त्यासाठी ज्या मार्गाचा तो अवलंब करत आहे त्यामुळे त्याला प्रदीर्घ काळ लागू शकतो. आणि आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला बरीच वेडीवाकडी वळणं पार करावी लागू शकतात.

– श्रीमाताजी
(Blessings of the Grace : 77-78)

‘निसर्गा’मध्ये वनस्पती ज्याप्रमाणे वाढतात त्याप्रमाणे, व्यक्तीने गोष्टींना सहजस्वाभाविकपणे विकसित होऊ द्यावे. त्यांच्या त्यांच्या वेळेपूर्वीच आपण जर त्यांच्यावर अत्यंत काटेकोर आकार किंवा मर्यादा लादण्याचा प्रयत्न केला तर, त्या गोष्टी त्यांचा नैसर्गिक विकास गमावून बसतील आणि आज ना उद्या त्या नष्ट कराव्याच लागतील.

‘निसर्गां’तर्गत ‘ईश्वर’ अंतिम असे काहीच निर्माण करत नाही, प्रत्येक गोष्टच तात्पुरती असते आणि त्याच वेळी ती त्या कालमान-परिस्थितीला अनुसरून जितकी शक्य आहे तितकी परिपूर्ण देखील असते.

*

आपल्या कार्यप्रणालीमध्ये आपण ‘प्रकृती’चे गुलाम असता कामा नये : प्रयत्न करण्याच्या, बदलण्याच्या, काहीतरी करण्याच्या, नाहीसे करण्याच्या, पुन्हापुन्हा करत राहण्याच्या सवयी तसेच, ऊर्जा, श्रम, साधनसंपदा आणि संपत्तीचा अपव्यय करण्याच्या साऱ्या सवयी हा ‘प्रकृती’च्या कार्याचा मार्ग आहे, हा ‘ईश्वरा’चा मार्ग नव्हे. ‘दिव्य-चेतना’ आधी त्या कार्याचे सत्य काय आहे हे पाहते, दिलेल्या परिस्थितीत ते कार्य करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता तेही ती ‘चेतना’ पाहते. आणि जेव्हा ती कार्य करते तेव्हा ते अंतिम असते; एकदा केलेल्या गोष्टीकडे ती कधीच पुन्हा परतून येत नाही, ती पुढे पुढे वाटचाल करते, यश असो की अपयश त्यास ती आपल्या ध्येयाप्रत जाण्याच्या दिशेने प्रगत होण्याचे एक पाऊल म्हणून उपयोगात आणते.

‘प्रकृती’ प्रगती करण्यासाठी विनाश घडविते, तर ‘दिव्य-चेतना’ विकासाला उत्तेजन देते आणि सरतेशेवटी रूपांतरण घडविते.

*

तुम्हाला तुमची जबाबदारी उमगली नाही आणि तुम्ही सदैव सतर्क आणि उद्यमी राहिला नाहीत तर, ‘प्रकृती’ तुमची थट्टा करेल. तुम्हाला ‘प्रकृती’ करते ती थट्टा थांबवायची असेल तर, तुम्ही अगदी अचूकतेने आणि जबाबदारीने तुमचे कर्म केले पाहिजे. काहीतरी करायचेच राहून गेले आहे, असे होता कामा नये. तुम्ही नेहमीच सावधानता बाळगली पाहिजे, सतर्क राहिला पाहिजेत म्हणजे मग तुम्ही सुरक्षित असाल.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 12)

विचार शलाका – ३३

 

“खरोखर, ‘ईश्वर’च साऱ्या करुणेचा मूळस्रोत असतो, जर तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका करत राहिला नाहीत तर, तुमच्या साऱ्या चुका नाहीशा करण्याचे सामर्थ्य त्याच्यापाशीच असते; खऱ्या साक्षात्काराचा मार्ग खुला करणारा ‘ईश्वर’च असतो.”

 

श्रीमाताजींचे हे विधान इ. स. १९६१ मध्ये जेव्हा प्रथम प्रकाशित झाले तेव्हा, या विधानावर भाष्य करताना श्रीमाताजी म्हणाल्या की, ”व्यक्ती जोवर त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा करत राहते तोपर्यंत त्या चुका नाहीशा होऊ शकत नाहीत, कारण व्यक्ती प्रत्येक क्षणाला त्या चुका नव्याने करत असते. जेव्हा एखादी व्यक्ती चूक करते, मग ती गंभीर असो किंवा नसो, त्या चुकीचे तिच्या जीवनात काही परिणाम होतातच, ते ‘कर्म’ संपुष्टात आणावेच लागते, पण व्यक्ती जर त्या ‘ईश्वरी कृपे’ कडे वळेल तर त्या ‘कृपे’मध्ये, ते परिणाम नष्ट करण्याची शक्ती असते; पण यासाठी व्यक्तीने त्याच त्या चुकीची पुनरावृत्ती करता कामा नये. व्यक्ती त्याच त्याच मूर्खपणाच्या गोष्टी अनंत काळ करत राहील आणि ‘ईश्वरी कृपा’देखील त्याच्या परिणामांचा निरास अनंत काळ करत राहील, असे व्यक्तीने कदापिही समजता कामा नये, कारण हे असे घडत नसते.

 

भूतकाळ पूर्णपणे स्वच्छ केला जाऊ शकतो; त्याचा भविष्यावर कोणताही परिणाम होणार नाही इतका तो विशुद्ध केला जाऊ शकतो; परंतु व्यक्तीने तिची भूतकालीन अवस्था पुन्हा कायमस्वरूपी वर्तमानात ओढता कामा नये, या एकाच अटीवर हे होऊ शकते; तुम्ही स्वत: तुमच्यातील वाईट स्पंदनांना थांबविले पाहिजे, तुम्ही तेच ते स्पंदन पुन्हा पुन्हा अनंत काळ निर्माण करत राहता कामा नये.”

 

– श्रीमाताजी

(CWM 09 : 58)

विचार शलाका – ३२

 

प्राथमिक स्तरावर, दुःखभोग म्हणजे आपण कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे आपल्याला कळावे म्हणून ‘प्रकृती’ने केलेली सूचना असते; आणि सुखोपभोग म्हणजे, आपण ज्या गोष्टींचा पाठपुरावा केला पाहिजे त्यासाठी ‘प्रकृती’ने ठेवलेले प्रलोभन असते.

 

– श्रीअरविंद

(CWSA 13 : 373)