Tag Archive for: तत्त्वज्ञान

व्यक्तीमधील ‘आत्मा’ आणि वैश्विक ‘आत्मा’ हे एकच आहेत; प्रत्येक विश्वामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक वस्तुमध्ये, प्रत्येक कणामध्ये दिव्य अस्तित्व आहे आणि त्याचे आविष्करण करणे हे माणसाचे जीवितकार्य आहे. ते कार्य करण्यासाठी व्यक्तीला आधी त्याच्या अंतरंगात असणाऱ्या या ‘ईश्वरी अस्तित्वा’ची जाणीव झाली पाहिजे. …एकदा का ही सखोल चेतना प्राप्त करून घेतली की मग मात्र आपली भूमिकाच बदलून जाते. त्यामुळे आपले आकलन व्यापक होते, आपल्यामध्ये करूणेचा उदय होतो.

– श्रीमाताजी [CWM 02 : 41-42]

स्वत:ला समजून घेतल्याने आणि स्वत:ला कसे जाणून घ्यायचे हे शिकल्यामुळे माणूस परमशोध लावू शकतो. जेव्हा भौतिकाच्या प्रत्येक कणाकणामध्ये माणसाला ‘ईश्वरा’च्या या अधिवासाची जाणीव होईल, प्रत्येक प्राणिमात्रामध्ये त्याला ‘ईश्वरा’च्या अस्तित्वाची काही झलक मिळू शकेल, जेव्हा प्रत्येक माणूस त्याच्या बांधवांमध्ये ‘ईश्वरा’ला पाहू शकेल तेव्हा अरुणोदय होईल, तेव्हा या समग्र प्रकृतीला भारभूत झालेले अज्ञान, मिथ्यत्व, दोष, दुःखभोग, अंधकार भेदले जातील. कारण “समग्र प्रकृती सहन करत आहे आणि शोक करत आहे, ती ‘ईश्वरपुत्रांना’ (मनुष्याला) साक्षात्कार कधी होणार याची वाट पाहत थांबली आहे.” हा एक असा मध्यवर्ती विचार आहे की जो इतर सर्व विचारांचे प्रतिनिधित्व करतो; सूर्य ज्याप्रमाणे सर्व जीवन उजळवून टाकतो तसा हा विचार कायम आपल्या स्मरणात असला पाहिजे. एखाद्या दुर्मिळ रत्नाप्रमाणे, खूप मौल्यवान खजिना असल्याप्रमाणे आपण आपल्या हृदयात या विचाराची जपणूक करून, त्यानुसार मार्गक्रमण केले आणि त्या मध्यवर्ती विचाराला त्याचे ज्योतिर्मय करण्याचे व रूपांतरण करण्याचे कार्य आपल्यामध्ये करू देण्याची मुभा दिली तर आपल्याला हे कळू शकेल की, सर्व वस्तुमात्रांच्या आणि प्राणिमात्रांच्या अंतर्यामी ‘तो’च राहतो आणि ‘त्या’च्या मध्येच या विश्वाचे अद्भुत एकत्व आपण अनुभवू शकतो. तेव्हा मग आपल्याला आपली मूर्ख भांडणे, आपल्या छोट्याछोट्या इच्छावासना, आपले अंध रोष, किरकोळ समाधानांमधील बालीशपणा आणि फोलपणा लक्षात येईल. आपल्यातील छोटेछोटे दोष विरघळून जात आहेत, आपल्या संकुचित व्यक्तिमत्त्वाची तटबंदी आणि आपला आडमुठा अहंकार कोसळून पडत आहे असे आपल्याला दिसेल. आपल्या संकुचित मर्यादा आणि बंध यांनी बांधलेल्या अस्तित्वापासून आपली सुटका करत, खऱ्याखुऱ्या आध्यात्मिकतेच्या या उदात्त प्रवाहामध्ये आपले अस्तित्व प्रवाहित होत आहे असे आपल्याला जाणवेल.

– श्रीमाताजी [CWM 02 : 40-41]

भौतिक संभावनांच्या वर उठून, पुरेसे उन्नत कसे व्हायचे हे जर व्यक्तीला माहीत असेल तर, तिला या पार्थिव जीवनाकडे समग्रपणाने पाहता येते. त्या क्षणापासून हे लक्षात घेणे सोपे जाते की, आजवरचे मानवजातीचे सारे प्रयत्न हे एकाच ध्येयाच्या दिशेने चाललेले आहेत. सामूहिक रीतीने असू देत वा वैयक्तिक रीतीने असू देत, माणसं तेथपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात हे खरे आहे. त्यातील काही मार्ग हे इतके वेड्यावाकड्या वळणांचे असतात की, कधीकधी प्रथमदर्शनी ते त्या ध्येयाच्या दिशेने जाण्याऐवजी, त्या ध्येयापासून दूर गेल्यासारखेच दिसतात. परंतु सारे मार्ग जाणते वा अजाणतेपणी, कमीअधिक वेगाने एकाच दिशेने चाललेले असतात. तर मग हे ध्येय आहे तरी कोणते? तेच मानवी जीवनाचे प्रयोजन आणि या विश्वातील मानवाचे जीवितकार्य असते. हे ध्येय म्हणजे, मग तुम्ही ‘त्या’ला कोणत्याही नावाने आवाहन करा, कारण प्रज्ञावंतासाठी तो सर्वच नावांचा धारणकर्ता असतो. चिनी लोकांचा ‘ताओ’, हिंदुंचे ‘ब्रह्म’, बौद्धांचा ‘नियम’, हर्मीस लोकांच्या दृष्टीने ‘शुभ’, प्राचीन ज्यू लोकांच्या परंपरेनुसार ‘अनाम’, ख्रिश्चन लोकांचा ‘प्रभु’, मुसलमानांचा ‘अल्ला’, भौतिकतावादी दृष्टिकोन असलेल्या लोकांच्या दृष्टीने ‘न्याय, सत्य’. (अशी ध्येयाची कितीही विविध नावे असली तरी) ‘त्या’च्याबद्दल सचेत होणे हे मानवी जीवनाचे प्रयोजन आहे. ‘त्या’चे आविष्करण करणे हे मानवाचे जीवितकार्य आहे.

– श्रीमाताजी [CWM 02 : 129]

समत्व म्हणजे नवे अज्ञान किंवा आंधळेपण नव्हे; समत्व हे दृष्टीमध्ये धूसरता आणण्याची तसेच सर्व रंगामधील भिन्नता पुसून टाकण्याची अपेक्षा बाळगत नाही किंवा त्याची आवश्यकताही नसते. विभिन्नता असणारच आहे, अभिव्यक्तीमध्ये वैविध्यही असणार आहे आणि त्याची आपण कदर केली पाहिजे. आपली दृष्टी जेव्हा आंशिक तसेच चुकीच्या प्रेमाने व द्वेषाने, प्रशंसेने व तिरस्काराने, सहानुभूती व विरोधी भावनेने आणि अनुकूल व प्रतिकूल भावनेने मलीन झालेली होती त्यापेक्षा, आपण आता (समत्व दृष्टीच्या साहाय्याने) त्या विविधतेची अधिक न्याय्य प्रकारे कदर करू शकू. मात्र या विविधतेच्या पाठीमागे असलेल्या आणि जो त्या विविधतेमध्ये निवास करतो त्या ‘परिपूर्ण’ आणि ‘अपरिवर्तनीय’ ईश्वरास आपल्याला नेहमीच पाहता आले पाहिजे आणि आपल्याला त्याची जाणीव व्हावयास हवी, आपल्याला त्याचे ज्ञान व्हावयास हवे. किंवा जर तो ईश्वर आपल्यापासून गुप्त असेल तर किमान – आपल्या मानवी मापदंडांना विशिष्ट आविष्कार हा सुसंवादी व परिपूर्ण वाटतो की ओबडधोबड आणि अपूर्ण की अगदी मिथ्या व अनिष्ट वाटतो, यास महत्त्व न देता – त्या विशिष्ट आविष्काराची ईश्वरी आवश्यकता आणि त्या पाठीमागे असणाऱ्या सुबुद्ध प्रयोजनावर तरी आपण विश्वास ठेवला पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 224-225)

‘ईश्वर’ सर्वांमध्ये समानतेने आहे; आपण आपल्यामध्ये आणि इतरांमध्ये, ज्ञानी व अज्ञानी यांच्यामध्ये, मित्र आणि शत्रू यांच्यामध्ये, मानव आणि पशु यांच्यामध्ये, संत आणि पापी यांच्यामध्ये सारभूत भेद करता कामा नये. आपण कोणाचाही द्वेष करता कामा नये, कोणालाही तुच्छ लेखता कामा नये, कोणाचीही घृणा करता कामा नये; कारण सगळ्यांमध्येच, प्रछन्न स्वरूपात (concealed) असो वा प्रकट स्वरूपात असो, तो एकच ईश्वर त्याच्या आनंदासाठी अभिव्यक्त झाला आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. व्यक्तींमध्ये तो कोणते रूप धारण करू इच्छितो आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये तो कोणते कार्य करू इच्छितो, यासाठी जे सर्वोत्तम असेल त्यानुसार, ईश्वर स्वतःच्या इच्छेने व स्वतःच्या ज्ञानानुसार, एखाद्यामध्ये थोड्या प्रमाणात तर दुसऱ्या एखाद्यामध्ये काहीसा अधिक प्रकट झालेला असतो किंवा एखाद्यामध्ये तो झाकलेला असतो, तर अन्य कोणामध्ये तो अगदी विपरित रूपातही व्यक्त झालेला असतो. सर्व काही म्हणजे आपण स्वतःच आहोत, एकाच आत्म्याने विविध आकार धारण केले आहेत. आपल्यामधील द्वेष आणि नापसंती, तिरस्कार आणि घृणा, अनुरक्ती आणि आसक्ती आणि पसंती या गोष्टी स्वाभाविक असतात, आवश्यक असतात, एका विशिष्ट अवस्थेत अनिवार्यदेखील असतात. ‘प्रकृती’ने आपल्यामध्ये जे निवडलेले असते ते तयार करण्यासाठी आणि ते टिकवून ठेवण्यासाठी त्या अस्तित्वात असतात आणि त्या गोष्टी प्रकृतीला साहाय्यकारीदेखील होतात.

परंतु कर्मयोग्याच्या दृष्टीने या गोष्टी अवशेषांसारख्या असतात, एखाद्या अडथळ्यासारख्या असतात, त्याच्या दृष्टीने या गोष्टी म्हणजे अज्ञानाची प्रक्रिया असते आणि जसजसा तो प्रगत होत जातो तसतशा या गोष्टी त्याच्या प्रकृतीमधून गळून पडतात. बाल्यावस्थेतील आत्म्याला त्याच्या वाढीसाठी या गोष्टींची आवश्यकता असते; परंतु दिव्य संस्कृतीमधील प्रौढ आत्म्यामधून या गोष्टी गळून पडतात. ज्या ‘ईश्वरी’ प्रकृतीप्रत आपल्याला उन्नती करावयाची आहे त्या प्रकृतीमध्ये वज्रकठोरता असू शकेल, त्यामध्ये अगदी विध्वंसक कठोरतादेखील असू शकेल पण द्वेष असणार नाही; त्या व्यक्तीमध्ये दिव्य उपरोध असेल पण तिरस्कार असणार नाही; एक शांत, सुस्पष्ट आणि जोरदार नकार असू शकतो पण घृणा किंवा नावड असू शकणार नाही. अगदी आपल्याला ज्याचा विनाश करावयाचा आहे, त्याचा सुद्धा आपण तिरस्कार करता कामा नये किंवा त्या ‘शाश्वत ईश्वरा’ने तात्पुरता धारण केलेला हा गुप्तवेष आहे, हे ओळखण्यामध्ये आपण चूक करता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 223-225)

सर्व वस्तुमात्रांमध्ये तो एकमेव आत्माच आविष्कृत झालेला असल्याने, कोणी कुरुप असो किंवा सुंदर, अपंग असो वा धडधाकट, कोणी थोर असो वा अशिष्ट, कोणी सुखद असो वा असुखद, कोणी चांगला असो वा वाईट, आपण या सर्वांबाबत आत्म्याचे समत्व बाळगले पाहिजे. येथेसुद्धा द्वेष, तिरस्कार किंवा घृणा असणार नाही, तर प्रत्येक वस्तू ही तिच्या खऱ्या वृत्तीनुसार आणि तिच्या नियोजित स्थानी आहे, हे पाहण्याची समत्व दृष्टी असली पाहिजे.

आपण हे जाणले पाहिजे की, सर्व गोष्टी अभिव्यक्त झालेल्या असो किंवा गुप्त, प्रछन्न (disguise) असोत, विकसित असोत किंवा विपर्यस्त, त्या त्यांच्यासाठी योजलेल्या परिस्थितीमध्ये त्यांच्यामध्ये तसे दोष असणेच आवश्यक आहे किंवा त्या त्या परिस्थितीत त्यांच्या त्यांच्या परीने सर्वोत्तमरीतीने अभिव्यक्त करत आहेत. त्यांच्या नजीकच्या स्थितीमध्ये किंवा कार्यामध्ये किंवा त्यांच्या प्रकृतीच्या उत्क्रांतीमध्ये जे शक्य आहे त्या मार्गाने त्या त्यांचे कार्य करत आहेत.

‘ईश्वरा’च्या क्रमवार आविष्करणामध्ये, आजच्या वस्तुसमूहाच्या समग्रतेच्या दृष्टीने आणि अंतिम परिणामाच्या पूर्णत्वाच्या दृष्टीने देखील, ईश्वरविषयक विशिष्ट सत्याची किंवा घटनेची किंवा काही ऊर्जेची किंवा क्षमतेची उपस्थिती आवश्यक असते. तात्कालिक अभिव्यक्तीच्या पाठीमागे असणाऱ्या ‘त्या’ सत्याचा शोध लावण्यासाठी आपण धडपडले पाहिजे. तसे केले असता, त्यांच्या बाह्य देखाव्याला न भुलता, त्याच्या अभिव्यक्तीचे कितीही विरूपीकरण झालेले असो वा त्यामध्ये कितीही अपूर्णता असो, तरीदेखील त्यांच्या मुखवट्यांच्या पलीकडे जात, त्या निष्कलंक, शुद्ध, सुंदर आणि परिपूर्ण अशा ‘ईश्वरा’ची आपण पूजा करू शकू. अर्थात, कुरूपता स्वीकारायची असा त्याचा अर्थ नाही, तर ईश्वरी सौंदर्यच स्वीकारायचे आहे; अपूर्णता पाहून स्वस्थ न बसता, आपण पूर्णतेसाठी प्रयत्न केले पाहिजेत; आपले विश्वव्यापक उद्दिष्ट सर्वश्रेष्ठ कल्याण हेच असले पाहिजे, दुर्जनता नव्हे.

खरोखरच, हे सारे बदलायलाच हवे. परंतु हे सारे जे आपल्याला करावयाचे आहे ते आध्यात्मिक समज आणि ज्ञान यांच्या साहाय्याने केले पाहिजे. आपण दिव्य कल्याण, सौंदर्य, परिपूर्णता, आनंद यांच्या मानवी प्रमाणकांच्या पाठीमागे न जाता, त्याचे अनुसरण केले पाहिजे; आपल्यापाशी समत्व नसेल तर अज्ञान अजूनही आपला पिच्छा पुरवीत आहे, याची ती खूण आहे; आपल्यापाशी समत्व नसेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने काहीही समजणार नाही; आपल्यापाशी समत्व नसेल तर मग आपण जी जुनी अपूर्णता नष्ट करू, ती जणु दुसरी एक अपूर्णता निर्माण करण्यासाठीच असेल, कारण आपण दिव्य मूल्यांच्या जागी पर्याय म्हणून, आपल्या मानवी मनाच्या आणि आपल्या वासनात्म्याच्या (desire-soul) पसंतीच्या गोष्टी ठेवण्याचीच शक्यता अधिक आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 223-225)

आपण सर्व घटनांच्या बाबतीत मनाचे आणि आत्म्याचे समत्व राखले पाहिजे; मग त्या घटना दुःखद असोत वा सुखद, आपला पराभव होवो वा जय, आपल्याला मानसन्मान मिळो वा आपला अवमान होवो, आपली सत्कीर्ती होवो किंवा अपकीर्ती, आपल्याला सद्भाग्य लाभो वा दुर्भाग्य. कारण या सर्व घटनांमध्ये, सर्व कर्मांच्या आणि कर्मफलांच्या ‘स्वामी’ची म्हणजे ईश्वराची इच्छा कार्यरत आहे, तसेच प्रत्येक घटना ही त्या ईश्वराच्या विकसनशील आविष्कारातील एक पाऊल आहे, हे आपल्याला पाहता आले पाहिजे.

सर्व शक्तींमध्ये, त्यांच्या लीलेमध्ये, त्यांच्या परिणामांमध्येही तसेच सर्व वस्तुमात्रांमध्ये आणि प्राणिमात्रांमध्येही त्या ईश्वराचे दर्शन घेण्याची अंतर्दृष्टी ज्यांच्याकडे आहे, त्यांच्यासमोर तो ईश्वर स्वतःला आविष्कृत करतो. प्रत्येक अनुभव, दुःखभोग, आदी सर्व गोष्टी एका दिव्य घटनेकडे वाटचाल करत असतात; आणि आनंद व समाधान यांपेक्षा त्यांना काहीही उणे नको असते; वैश्विक वाटचाल चालू राहाण्यामधील हा एक आवश्यक दुवा आहे; ही वाटचाल समजावून घेणे आणि त्याला साहाय्य करणे, हे आपले काम आहे.

त्यांच्या विरोधात बंड करणे, त्यांचा धिक्कार करणे, त्यांच्या विरोधात ओरडणे या सर्व गोष्टी म्हणजे आपल्या अप्रशिक्षित आणि अज्ञानी प्रेरणांचे आवेग असतात. अगदी इतर सर्व गोष्टींप्रमाणेच या बंडाचेही ईश्वरी लीलेमध्ये काही उपयोग असतात आणि एवढेच काय पण अशी बंडे आवश्यकही असतात, साहाय्यभूतही ठरतात, दिव्य विकासाला त्या त्या योग्य वेळी व योग्य दशेमध्ये त्यांची आवश्यकताही असते आणि तशीच त्यांची योजनाही केलेली असते; परंतु अज्ञानी बंडखोरीचे आंदोलन हे आत्म्याच्या बाल्यावस्थेशी किंवा त्याच्या अर्ध्या-कच्च्या पौगंडावस्थेशी निगडित असते.

प्रौढ आत्मा मात्र त्यांचा धिक्कार करत नाही, तर त्या गोष्टी जाणून घेण्याचा आणि त्यांच्यावर प्रभुत्व मिळविण्याचा प्रयत्न करतो; तो आरडाओरडा करत नाही, तर त्या गोष्टी स्वीकारतो किंवा त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी, त्या परिपूर्ण करण्यासाठी अपार परिश्रम करतो; तो आतल्या आत बंड करत राहत नाही तर मिळालेला आदेश पाळण्याचा, त्याची परिपूर्ती करण्याचा आणि त्यात रूपांतरण घडविण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. त्यामुळे आपण आपल्या स्वामीकडून, त्याच्याकडून आलेल्या सर्वच गोष्टी समत्वबुद्धीने ग्रहण केल्या पाहिजेत.

दिव्य विजयाची घटिका जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत यशअपयश या दोन्ही गोष्टी त्या दिव्य विजयाच्या मार्गावरील आवश्यक टप्पे म्हणून सारख्याच शांतपणे स्वीकारले पाहिजेत. ईश्वरी संकेतानुसार जर वेदना, दुःखभोग, अगदी तीव्र दुःख आपल्या वाट्याला आले असेल तर त्यावेळी आणि अत्यानंद आणि सुख अनुभवाला आले तरी त्यानेही हुरळून न जाता, आपले आत्मे, आपली मने, आपली शरीरे तशीच अविचल राहतील; अशा रीतीने उत्तम समतोल राखत, आपण धिमेपणाने आपला मार्ग चालत राहू; जोपर्यंत परमोच्च आणि वैश्विक आनंदामध्ये प्रवेश करण्याची पात्रता आपल्यामध्ये येत नाही आणि त्या अतिशय उन्नत, श्रेष्ठ अवस्थेसाठी आपली तयारी होत नाही तोवर, मार्गावर भेटणाऱ्या सर्व गोष्टींना सारख्याच स्थिरपणाने सामोरे जाऊ.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 225)

माणसांना स्वतःच्या क्षुद्र अशा वैयक्तिक अहंकारावर मात करण्यास भाग पाडावे आणि त्याकरता साहाय्य व प्रकाश मिळविण्यासाठी, माणसं पूर्णतः केवळ ईश्वराकडेच वळावीत म्हणून पृथ्वीवर ‘कठीण समय’ येतो. माणसांची दृष्टी ही अज्ञानी असते; केवळ ईश्वरच सर्वकाही जाणतो.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 425)

पृथ्वीवर जडद्रव्याची जी विशिष्ट परिस्थिती होती त्यामुळे ‘मृत्यू’ अपरिहार्य झाला. अचेतनतेच्या (unconsciousness) प्राथमिक पायरीपासून उत्तरोत्तर चेतनेकडे विकसित होत जाणे हाच जडतत्त्वाच्या उत्क्रांतीचा अर्थ आहे. आणि जेव्हा ही विकासाची प्रक्रिया प्रत्यक्ष घडू लागली तेव्हा या प्रक्रियेत, आकारबंधांचा विलय, विघटन ही एक अटळ अशी आवश्यकता ठरली. सुसंघटित व्यक्ति-चेतनेला एक स्थिर असा आधार मिळावा म्हणून एका निश्चित बांधीव आकाराची गरज होती. आणि असे असूनसुद्धा या आकारबंधाच्या स्थिरतेमुळेच मृत्यू अटळ बनला. जडद्रव्य आकारबद्ध होणेच भाग होते; अन्यथा वैयक्तिकीकरण (पृथकीकरण) (individualisation) होणे आणि प्राणशक्तीला वा चेतनाशक्तीला सघन असे मूर्तरूप येणे अशक्य होते. आणि त्यांच्याविना पार्थिव, जडतत्त्वाच्या पातळीवर पुढे सुसंघटित अस्तित्व निर्माण होण्यास आवश्यक अशा पायाभूत परिस्थितीची उणीव भासली असती. पण निश्चित, घनीभूत अशी घडण होताच एकाएकी त्याच्या ठिकाणी अलवचिकता, कठीणता आणि पाषाणवतता येण्याची प्रवृत्ती आढळून आली. हा पृथक आकारबंध अतिशय बंधनकारक असा साचा बनला; तो शक्तींच्या गतीचे अनुसरण करू शकत नाही; या वैश्विक गतिमानतेशी सुमेळ राखत तो स्वत:मध्ये क्रमश: बदल घडवू शकत नाही; तो प्रकृतीच्या अपेक्षा अखंडपणे भागवू शकत नाही किंवा तिची गती देखील पकडू शकत नाही; तो प्रवाहाबाहेर फेकला जातो. मात्र एका विशिष्ट क्षणी, आकारबंध आणि त्याला चालना देणारी शक्ति या दोहोंमधील वरील प्रकारच्या वाढत्या असमानतेमुळे व विसंवादामुळे त्या आकारबंधाचे संपूर्णत: विलयन, विघटन अटळ होऊन बसते. एक नवीन आकारबंध निर्माण करावयास हवा ज्यामुळे एक नवीन (आकारबंध व त्याला चालना देणारी शक्ती यांमध्ये) सुमेळ आणि समानता शक्य होईल.

हा आहे मृत्युचा खरा अर्थ आणि ही आहे मृत्यूची प्रकृतीमधील उपयुक्तता! पण हा आकारबंध जर का अधिक वेगवान व अधिक लवचिक झाला आणि बदलत्या चेतनेनुरुप स्वत:मध्ये बदल घडविण्याविषयी शरीरातील पेशींना जागृत करता आले तर मूलगामी विघटनाची गरजच उरणार नाही, आणि मृत्यू ही अटळ गोष्ट राहणार नाही.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 37)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

आमच्या auromarathi.org या वेबसाईटला आणि AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.

**

अमर्त्यत्वासंबंधी गीतेची शिकवण

मानवी अस्तित्वाचे वास्तविक सत्य कोणते? सर्वोच्च ध्येय कोणते ? विश्वाच्या या महान चक्रांमध्ये युगानुयुगे माणसाचा जन्म आणि मृत्यू पुन्हापुन्हा होत राहतो ती म्हणजे एक प्रदीर्घ प्रगती असते; या प्रगतीद्वारे तो स्वतःची तयारी करत असतो आणि अमर्त्यत्वासाठी स्वतःला सुयोग्य बनवत असतो. आणि तो स्वतःला कशा प्रकारे तयार करेल? त्यासाठी योग्य माणूस कोण? मी म्हणजे प्राण आहे आणि मी म्हणजे शरीर आहे या संकल्पनेच्या जो अतीत झाला आहे; जो या जगाचे भौतिक आणि संवेदनात्मक स्पर्श त्यांच्या त्यांच्या मूल्यानुसार स्वीकारत नाही किंवा भौतिक मनुष्याला (Physical man) ते स्पर्श ज्या मोलाचे वाटतात त्या मोलाने जो हे स्पर्श स्वीकारत नाही; जो मी स्वतः आत्मा आहे आणि सर्वजण देखील आत्मे आहेत हे जाणतो, जो स्वतः स्वतःच्या शरीरामध्ये नाही तर, आत्म्यामध्ये राहायला शिकलेला आहे आणि इतरांशी व्यवहार करत असतानादेखील जो त्यांच्याशी भौतिक अस्तित्व म्हणून केवळ व्यवहार करत नाही तर, इतरांबरोबर देखील जो आत्मवत व्यवहार करतो, तो मनुष्य अमर्त्यत्वासाठी योग्य असतो. मृत्युचे अस्तित्व नसणे म्हणजे अमर्त्यत्व असा त्याचा अर्थ नाही. — ज्याला जन्मतः मन मिळालेले आहे अशा प्रत्येक प्राणिमात्राला ही गोष्ट आधीच मिळालेली असते, — परंतु अमर्त्यत्व म्हणजे जन्म आणि मृत्युच्या अतीत असणे. अमर्त्यत्व हे असे एक आरोहण असते की, ज्या आरोहणामुळे मनुष्य, मनो-मार्गदर्शित शरीर (mind-informed body) म्हणून जगणे सोडून देतो आणि अंततः आत्मा म्हणून, परम आत्म्याच्या ठिकाणी जीवन जगतो.

जो कोणी दुःख आणि शोकाच्या अधीन असतो, संवेदना आणि भावना यांचा गुलाम असतो, क्षणभंगुर गोष्टींच्या स्पर्शाने व्याप्त असतो असा कोणीही अमर्त्यत्वासाठी सुयोग्य बनू शकत नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 19 : 61-62)