Tag Archive for: तत्त्वज्ञान

बालकाची वाढ स्वाभाविकपणे होत राहते; ते स्वतःच्या वाढीची काळजी करत बसत नाही.
*
बालकाच्या साध्यासुध्या विश्वासामध्ये महान शक्ती सामावलेली असते.
*
विश्वास, बालकसदृश विश्वास असणे ही पूर्णयोगामध्ये सर्वात महत्त्वाची अट आहे. बालकाच्या ठिकाणी अशी एक साधीसरळ भावना असते की, जे जे काही आवश्यक आहे, गरजेचे आहे ते त्याला मिळेलच. त्याबाबतीत त्याच्या मनात कोणतीही शंका नसते. एखाद्या बालकाला जेव्हा एखाद्या गोष्टीची गरज असते तेव्हा त्याला ही खात्री असते की, ती गोष्ट त्याला नक्की मिळेल. अशा प्रकारचा, बालकसदृश साधासरळ विश्वास किंवा भरवसा ही पूर्णयोगामधील सर्वात महत्त्वाची अट आहे.
*
एखादे बालक जेव्हा स्वाभाविक (normal) स्थितीमध्ये जीवन जगत असते तेव्हा त्याच्या सर्व गरजा पुरविल्या जातील असा त्याला एक दृढ विश्वास असतो. हा विश्वास आयुष्यभर तसाच अविचल टिकून राहिला पाहिजे. बालकाची त्याच्या स्वतःच्या गरजांविषयीची जी कल्पना असते ती मर्यादित, अजाणतेपणाची आणि अगदी वरवरची असते; ती कल्पना हळूहळू अधिक विशाल, अधिक सखोल आणि अधिक खऱ्या संकल्पनेने युक्त झाली पाहिजे. तसे झाले म्हणजे त्याच्या कल्पनेची परिणती एका परिपूर्ण संकल्पनेमध्ये होते. परमप्रज्ञेची (supreme wisdom) गरजेविषयी असणारी संकल्पना म्हणजे परिपूर्ण संकल्पना. आपल्या खऱ्या गरजा या केवळ ईश्वरालाच माहीत असतात, हे आपल्या लक्षात येईपर्यंत आणि प्रत्येक गोष्टीसाठी ईश्वरावरच विसंबून राहायचे ही अवस्था येईपर्यंत ही परिणती होत राहिली पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 12 : 124-125)

(प्राचीन काळातील वर्णाश्रमव्यवस्थेतील वानप्रस्थाश्रमाचा विचार कालच्या भागात आपण केला. आज ‘संन्यासाश्रम’ ही संकल्पना जाणून घेऊ.)

संन्यासाश्रम

जीवनाच्या अखेरच्या टप्प्यावर व्यक्ती उरलेसुरले बंध टाकून देण्यास आणि सामाजिक जीवनाच्या सर्व प्रकारांपासून पराकोटीच्या आध्यात्मिक निर्लिप्ततेने, अनासक्तीने या जगामध्ये वावरण्यास मोकळी असे. या टप्प्यावर ती व्यक्ती जीवनाच्या अगदी किमान गरजांची पूर्ती करत असे आणि विश्वात्म्याशी संवाद साधून, अनंताच्या प्राप्तीसाठी स्वत:च्या जिवाची तयारी करून घेत असे.

हे जीवनचक्र सर्वांना बंधनकारक होते असे मात्र नाही. त्यातील बहुसंख्य लोक हे पहिल्या दोन टप्प्यांच्या पुढे कधीच जात नसत. बरेच जण वानप्रस्थाश्रमामध्ये किंवा अरण्यवासामध्ये असतानाच निधन पावत असत. अगदी थोडेच जण अंतिम पराकोटीचे धाडस करून, परिव्राजकाचे जीवन स्वीकारत असत.

मानवी जिवाची संपूर्ण वाटचाल डोळ्यांसमोर ठेवून, त्यानुसार या जीवनचक्राची गांभीर्यपूर्वक आखणी करण्यात आलेली असल्यामुळे, प्रत्येक जिवाची खरोखरच जेवढी प्रगती झालेली असेल त्यानुसार प्रत्येक व्यक्ती या प्रणालीचा लाभ घेऊ शकत असे. हे जीवनचक्र पूर्ण करण्याइतपत ज्यांची विद्यमान जन्मामध्येच पुरेशी प्रगती झालेली असे ते, या प्रणालीचा पूर्णपणे लाभ घेऊ शकत असत.

• श्रीअरविंद (CWSA 20 : 175-176)

 

(प्राचीन काळातील वर्णाश्रमव्यवस्थेतील गृहस्थाश्रमाचा अल्पसा विचार कालच्या भागात आपण केला. आज ‘वानप्रस्थाश्रम’ ही संकल्पना जाणून घेऊ.)

वानप्रस्थाश्रम

जीवनाच्या तिसऱ्या टप्प्यावर व्यक्ती अरण्यामध्ये जाऊन राहत असे आणि तेथे एका विशिष्ट एकांतवासात आत्म्याच्या सत्यशोधार्थ साधना करत असे. व्यक्ती तेव्हा कठोर सामाजिक बंधनापासून काहीशी मुक्त होऊन, अधिक मोकळ्या वातावरणात जीवन जगत असे. परंतु तिची इच्छा असेल तर ती व्यक्ती आपल्या अवतीभोवती तरुणांना एकत्र करून त्यांना किंवा चौकस व जिज्ञासू व्यक्तींना, स्वतःच्या ज्ञानाच्या आधारे मार्गदर्शन करू शकत असे आणि अशा रितीने ती व्यक्ती नवोदित पिढीचा शिक्षक किंवा आध्यात्मिक गुरू होऊ शकत असे. (क्रमश:)

• श्रीअरविंद (CWSA 20 : 175)

(प्राचीन काळातील वर्णाश्रमव्यवस्थेतील ब्रह्मचर्याश्रमाचा विचार कालच्या भागात आपण केला. आज ‘गृहस्थाश्रम’ ही संकल्पना जाणून घेऊ.)

गृहस्थाश्रम

ब्रह्मचर्याश्रमामध्ये संपादन केलेले ज्ञान प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरविण्याच्या दृष्टीने आर्य मनुष्य गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करत असे आणि त्याद्वारे त्याला मानवी जीवनाची (अर्थ, काम व धर्म ही) पहिली तीन उद्दिष्टे साध्य करणे शक्य होत असे. गृहस्थाश्रमामध्ये असताना त्याला त्याच्या स्वाभाविक अस्तित्वाची, त्याच्या आवडीनिवडींची, जीवनानंद घेण्याच्या इच्छेची पूर्ती करता येत असे; तो समाजऋण फेडत असे; समाजाच्या गरजा पुरवत असे आणि अशा रितीने स्वतःच्या जीवनातील सर्व जबाबदाऱ्यांची परिपूर्ती करून, तो जीवनाच्या अंतिम आणि सर्वाधिक महत्त्वाच्या प्रयोजनासाठी स्वतःची तयारी करत असे. (क्रमश:)

• श्रीअरविंद (CWSA 20 : 175)

(श्रीअरविंद येथे भारतीय परंपरेतील वर्णाश्रम व्यवस्थेविषयी तपशील आणि त्या पाठीमागे असलेला विचार समजावून सांगत आहेत. व्यक्तीने या समाजव्यवस्थेमध्ये राहून, समाजऋण फेडून स्वतःचा विकास करून घेत, अध्यात्मप्रांतांत मार्गक्रमण करायचे असते; प्राचीन काळी असलेल्या या व्यवस्थेविषयी ते लिहितात…)

भारतीय प्रणालीने व्यक्तीला एक चौकट आखून दिली आहे. या प्रणालीने व्यक्तीला तिच्या जीवनासाठी एक श्रेणीबद्ध रचना आखून दिली आहे आणि व्यक्तीला उन्नती करण्यासाठी एक प्रकारच्या शिडीसारखा या प्रणालीचा उपयोग होऊ शकतो. अशा प्रकारची विलक्षण सोय हे ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या चार आश्रमांचे उद्दिष्ट होते. जीवनाचे हे विभाजन स्वाभाविक अशा चार कालावधींमध्ये करण्यात आले होते आणि जीवनविषयक ही जी सांस्कृतिक कल्पना होती ती प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने यातील प्रत्येक टप्प्याची आखणी करण्यात आली होती. विद्यार्थिदशेचा एक कालावधी असे, गृहस्थजीवनाचा एक कालावधी असे, एकांतवासात राहण्याचा किंवा अरण्यवास स्वीकारून राहण्याचा एक कालावधी असे आणि नंतर सामाजिक जीवनापासून मुक्त होऊन राहण्याचा, परिव्राजकावस्थेचा असा एक कालावधी असे.

ब्रह्मचर्याश्रम

मनुष्याने जीवनामध्ये जे जाणून घेणे आवश्यक आहे, जे करणे आणि जे बनणे आवश्यक आहे त्या गोष्टी करण्यासाठी आवश्यक अशी पायाभरणी विद्यार्थिजीवनात केली जात असे. आवश्यक असणाऱ्या कला, शास्त्रं, ज्ञानशाखा यांचे तपशिलवार ज्ञान त्याला दिले जात असे. आणि त्याच वेळी मनुष्याच्या नैतिक प्रकृतीला वळण लावण्यावर अधिक भर दिला जात असे. आध्यात्मिक ज्ञानाची जी वैदिक सूत्रं होती त्यामध्ये व्यक्तीने पारंगत असावे, हा प्रारंभिक काळामध्ये एक अनिवार्य घटक असे.

प्राचीन काळामध्ये हे सर्व शिक्षण शहरी जीवनाच्या धकाधकीपासून दूर आणि त्या शिक्षणाला अनुकूल असणाऱ्या वातावरणामध्ये दिले जात असे. जी व्यक्ती या जीवनचक्रातून यशस्वीरित्या पार झाली आहे अशी व्यक्ती शिक्षक म्हणून कार्यरत असे. ज्या व्यक्तीला काही लक्षणीय आध्यात्मिक ज्ञानाचा साक्षात्कार झाला आहे, अशी व्यक्तीच बरेचदा शिक्षकपदी कार्यरत असे. परंतु कालांतराने शिक्षण हे अधिकाधिक बौद्धिक व ऐहिक स्वरूपाचे होत गेले. ते शहरांमध्ये व विद्यापीठांमध्ये दिले जाऊ लागले. हळूहळू चारित्र्याच्या आंतरिक तयारीपेक्षा व ज्ञानापेक्षा, बुद्धीच्या प्रशिक्षणावर आणि शिक्षणावर भर देण्यात येऊ लागला. प्राचीन काळी आर्यांची अर्थ, काम, धर्म व मोक्ष या जीवनाच्या चारही महान उद्दिष्टांबाबत तयारी झालेली असे. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 20 : 174-175)

 

अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही आजवर नेहमीच आध्यात्मिक जीवनासाठी अतिशय सुयोग्य मानण्यात आली आहे. तसेच सात्त्विकतेमुळे आध्यात्मिक जीवनाची पूर्वतयारी होते, असेही मानले जाते. तर राजसिक प्रकृती इच्छाआकांक्षाच्या आणि आवेगांच्या भाराखाली दबून गेलेली असते.

त्याच बरोबर हेही खरे आहे की, आध्यात्मिकता ही द्वंद्वातीत असते आणि त्यासाठी ऊर्ध्वमुख असणाऱ्या अभीप्सेची सर्वाधिक आवश्यकता असते. आणि ही अभीप्सा सात्त्विक प्रवृत्तीच्या व्यक्तीइतकीच राजसिक प्रवृत्तीच्या व्यक्तीमध्येही निर्माण होऊ शकते. एखादी सात्त्विक प्रवृत्तीची व्यक्ती जशी तिच्या सद्गुणांच्या अतीत जाऊ शकते तशीच, राजसिक प्रवृत्तीची व्यक्तीही तिच्या अवगुणांच्या, इच्छाआकांक्षांच्या अतीत होऊन, दिव्य शुद्धता, दिव्य प्रकाश आणि दिव्य प्रेमाकडे वळू शकते.

अर्थात, अशी राजसिक प्रवृत्तीची व्यक्ती जेव्हा स्वतःच्या कनिष्ठ प्रकृतीवर विजय मिळवेल आणि स्वतःमधून ती कनिष्ठ वृत्ती काढून टाकेल तेव्हाच ही गोष्ट घडून येईल. कारण अशी व्यक्ती जर पुन्हा एकदा त्याच कनिष्ठ प्रकृतीमध्ये जाऊन पडली, तर ती मार्गभ्रष्ट होण्याची शक्यता असते किंवा अगदीच काही नाही तर, जोपर्यंत ती व्यक्ती त्या कनिष्ठ प्रकृतीमध्ये रमलेली असते तोपर्यंत तरी तिची आंतरिक प्रगती खुंटते.

परंतु धार्मिक आणि आध्यात्मिक इतिहास पाहिला तर त्यामध्ये, मोठमोठ्या गुन्हेगारांचे महान संतांमध्ये किंवा अवगुणी किंवा कमी गुणवान व्यक्तींचे आध्यात्मिक साधकांमध्ये आणि भक्तांमध्ये रूपांतर झाल्याची उदाहरणे वारंवार आढळून आली आहेत. उदाहरणार्थ युरोपमध्ये सेंट ऑगस्टिन, भारतामध्ये (चैतन्य महाप्रभुंचे अनुयायी झालेले) जगाई आणि मधाई, बिल्वमंगल यासारखी अनेक उदाहरणे आहेत.

भलेही एखाद्या माणसाच्या हातून गतकाळात अनेक चुका झालेल्या असतील किंवा त्याला अनेक ठोकरा बसल्या असतील, पण त्यानेसुद्धा जर ईश्वराच्या निवासाचे दरवाजे अगदी प्रामाणिकपणे ठोठावले तर, ते त्याच्यासाठी कधीच बंद नसतात. (किंबहुना) जो जो कोणी ईश्वराच्या निवासाचे दरवाजे अगदी प्रामाणिकपणे ठोठावतो, त्याच्यासाठी ते कधीच बंद नसतात.

मानवी गुण आणि मानवी दोष म्हणजे अंतरंगात असणाऱ्या ईश्वरी तत्त्वावरील अनुक्रमे तेजस्वी व अंधकारमय आवरणे असतात. पण आत्म्याच्या उंचीप्रत जाताना, जेव्हा ती दोन्ही आवरणे भेदली जातात तेव्हा, ती जळून जाऊ शकतात. (म्हणजेच द्वंद्वातीत असणाऱ्या आत्मतत्त्वाच्या दिशेने चाललेल्या प्रवासात साधकाचे गुण व दोष दोन्ही गळून पडतात.)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 42)

 

तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही केली पाहिजे आणि ती म्हणजे तो आवेग पुन्हा येऊ नये अशी इच्छा बाळगली पाहिजे. मात्र, तो आवेग नाहीसाच होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल, तर तो आवेग तसाच ठेवा, पण असे असेल तर मग योगसाधना करण्याचा प्रयत्नही करू नका.

योगमार्गाचे अनुसरण करायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही सर्व अडीअडचणींवर मात करण्याचा संकल्प केला पाहिजे. तसा संकल्प जर तुम्ही केला नसेल तर, योगमार्गाचा अवलंबच करू नका. योगमार्गाचे अनुसरण करण्याचा तुमचा निर्णय अगदी प्रामाणिक आणि समग्र असला पाहिजे.

• श्रीमाताजी (CWM 04 : 77)

साधक : आपल्या पूर्णयोगाच्या दृष्टीने प्रामाणिकपणा याचा अर्थ कृपया सांगाल का?

श्रीअरविंद : ईश्वराप्रत असलेल्या अत्युच्च अभीप्सेशी विसंगत होण्यास, अस्तित्वाच्या कोणत्याही घटकाला अनुमती न देणे म्हणजे प्रामाणिकपणा.

(Guidance from Sri Aurobindo to Nagin Doshi, Vol 01 : 110)

*

प्रामाणिक असण्यासाठी, व्यक्तीच्या अस्तित्वाच्या सर्व घटकांनी ईश्वराप्रत असलेल्या त्यांच्या अभीप्सेमध्ये संघटित असणेच आवश्यक असते. म्हणजे असे की, एखाद्या घटकाला ईश्वर हवासा वाटतो आणि दुसरे घटक मात्र त्याला नकार देतात किंवा बंड करतात, असे असता कामा नये.

प्रसिद्धी किंवा नावलौकिक किंवा प्रतिष्ठा किंवा शक्ती मिळविण्यासाठी नव्हे अथवा फुशारकी मारण्याच्या समाधानासाठीदेखील नव्हे, तर ईश्वरासाठीच ईश्वर हवा असणे, म्हणजे अभीप्सेमध्ये प्रामाणिकपणा असणे.

– श्रीमाताजी (CWM 14 : 65)

 

तुम्ही जर अप्रामाणिक असाल तर काय होते? तर, तुमची चेतना झाकली जाते. उदाहरणार्थ, जो माणूस खोटं बोलतो त्याची चेतना झाकली जाते आणि कालांतराने त्याला सत्य आणि मिथ्यत्व यातील फरकच कळेनासा होतो. तो कल्पनाचित्रे पाहतो आणि त्यांना तो सत्य मानतो. दुष्ट प्रवृत्तीचा मनुष्य स्वतःची अभीप्सा गमावून बसतो, तो साक्षात्काराची क्षमता गमावून बसतो. ज्ञान, संवेदना आणि साक्षात्‌‍ अनुभूतीच्या सर्व क्षमता तो गमावून बसतो. ही त्याला मिळालेली शिक्षा असते. तो स्वत:मध्ये आणि ईश्वरामध्ये आवरणे निर्माण करतो, अडथळे निर्माण करतो आणि अशा प्रकारे तो स्वतःच स्वत:ला शिक्षा करून घेतो. ईश्वर त्याच्यापासून दूर जात नाही तर, तो मनुष्य ईश्वराचे स्वागत करण्यास स्वत:ला अक्षम बनवितो. म्हणजे, ईश्वर हा काही कोणाला बक्षिसाचे वितरण करत बसत नाही किंवा शिक्षाही देत नाही; शिक्षा, बक्षिस हे असे मुळातच काही नसते.

जी व्यक्ती अप्रामाणिक असते, जी दुरिच्छा बाळगत असते, जी विश्वासघातकी असते ती व्यक्ती स्वत:हून स्वत:वर शिक्षा ओढवून घेत असते. अप्रामाणिक माणसांकडे जी थोडीफार चेतना शिल्लक असते आणि जिच्यामुळे त्यांना ते दुष्ट आहेत, हे कळू शकले असते, ती चेतनादेखील ते गमावून बसतात. इतके की जणू काही ते अचेतन असल्यासारखेच होऊन जातात. शेवटी त्यांना (सत्य-मिथ्या, खरे-खोटे इ.) काहीच समजेनासे होते.

– श्रीमाताजी (CWM 05 : 21-22)

 

साधक : माताजी, पारदर्शक प्रामाणिकपणा म्हणजे काय ?

श्रीमाताजी : प्रामाणिकपणाची तुलना वातावरणाशी किंवा एखाद्या काचेच्या तावदानाशी केली गेली आहे. यांपैकी कोणतीही गोष्ट जर पूर्णपणे पारदर्शक असेल तर, कोणताही विपर्यास न होता, त्यामधून प्रकाश जसा आरपार जातो, त्याचप्रमाणे प्रामाणिक चेतना, दिव्य स्पंदनांमध्ये कोणताही विपर्यास न होऊ देता, त्याचे आरपार संक्रमण करते.

– श्रीमाताजी (CWM 16 : 382)