Posts

साधना, योग आणि रूपांतरण – २९०

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

इच्छावासना, लालसा या शरीराच्या जुन्या सवयी असतात, त्या वैश्विक प्रकृतीकडून शरीराकडे आलेल्या असतात आणि शरीराने त्या स्वीकारलेल्या असतात आणि त्यांना जणू काही स्वतःचा आणि स्वतःच्या जीवनाचा एक भाग बनवून टाकलेले असते.

जागृतावस्थेतील चेतनेकडून जेव्हा या गोष्टींना नकार दिला जातो तेव्हा त्या अवचेतनामध्ये (subconscient) किंवा ज्याला ‘परिसरीय चेतना’ (environmental consciousness) असे म्हणता येईल, त्यामध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न करतात आणि तेथून त्या काही काळपर्यंत पुन्हा पुन्हा येत राहतात किंवा तेथून ताबा मिळविण्याचा प्रयत्न करत, चेतनेवर दबाव टाकतात.

त्या (इच्छावासना) परिसरीय चेतनेमधून येत असतील तर त्या विचार-सूचनांचे किंवा आवेगांचे रूप घेतात किंवा मग त्यांचा अस्वस्थ करणारा एक अंधुकसा दबाव व्यक्तीला जाणवतो. त्या जर अवचेतनामध्ये गेल्या असतील तर तेथून त्या बरेचदा स्वप्नांद्वारे पृष्ठभागावर येतात, परंतु त्या जागृतावस्थेत सुद्धा पृष्ठभागावर येऊ शकतात.

जेव्हा शरीर नव-चेतनामय झालेले असते आणि त्याच वेळी त्याच्या ठायी ‘दिव्य शांती’ आणि ‘दिव्य शक्ती’ असते तेव्हा, व्यक्तीला बाह्यवर्ती दबावाची जाणीव होते परंतु त्यामुळे व्यक्ती अस्वस्थ होत नाही आणि मग (शारीर-मनावर किंवा शरीरावर तत्काळ दबाव न टाकता) तो दबाव सरतेशेवटी (व्यक्तीपासून) दूर निघून जातो किंवा मग तो हळूहळू किंवा त्वरेने नाहीसा होतो.

मी ज्याला ‘परिसरीय चेतना’ असे संबोधतो ती चेतना प्रत्येक मनुष्य, त्याच्या नकळत, स्वतःच्या शरीराच्या बाहेरच्या बाजूस, सभोवार वागवत असतो आणि या परिसरीय चेतनेच्या माध्यमातून तो इतरांच्या आणि वैश्विक शक्तींच्या संपर्कात असतो. या चेतनेद्वारेच इतरांच्या भावना, विचार इत्यादी गोष्टी व्यक्तीमध्ये प्रवेश करतात. याच चेतनेद्वारे वैश्विक शक्तींच्या लहरी म्हणजे इच्छावासना, लैंगिकता इत्यादी गोष्टी व्यक्तीमध्ये प्रवेश करतात. आणि व्यक्तीच्या मन, प्राण व शरीराचा ताबा घेतात.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 601)

साधना, योग आणि रूपांतरण – २८९

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्हाला जे स्वप्न पडलं होतं ते म्हणजे खरंतर, तुमच्या (subconscient) अवचेतनामधून वर आलेल्या गतकालीन रचना होत्या किंवा त्यांचे ठसे होते. आपण जीवनामध्ये जे जे काही करतो, आपल्याला जे जाणवते किंवा ज्याचा आपण अनुभव घेतो, त्या सगळ्यांचा काही एक ठसा, एक प्रकारची मूलभूत स्मृती अवचेतनामध्ये जाऊन बसते आणि आपल्या सचेत अस्तित्वामधून त्या (जुन्या) भावना, वृत्तीप्रवृत्ती किंवा ते अनुभव पुसले गेले तरी त्यानंतरही दीर्घ काळपर्यंत ते स्वप्नांद्वारे पृष्ठभागावर येतात. अनुभव जेव्हा नुकतेच घडून गेलेले असतात किंवा मन वा प्राणामधून ते अगदी नुकतेच फेकले गेलेले असतात, त्यांच्यापेक्षाही या जुन्या गोष्टी आधिक्याने पृष्ठभागावर येतात.

आपण आपल्या जुन्या परिचितांविषयी किंवा नातेवाईकांविषयी विचार करणे थांबविल्यानंतरसुद्धा दीर्घ काळ त्यांच्याबद्दलची स्वप्नं ही अवचेतनामधून पृष्ठभागावर येत राहतात. त्याचप्रमाणे, सचेत प्राणाला जरी आता, लैंगिकतेचा किंवा रागाचा त्रास होत नसला तरीसुद्धा लैंगिकतेबद्दलची किंवा राग आणि भांडणतंट्यांची स्वप्नं पडू शकतात.

अवचेतन शुद्ध झाल्यानंतरच ती स्वप्नं पडायची थांबतात. परंतु तोपर्यंत म्हणजे व्यक्ती त्या जुन्या गतिप्रवृत्ती जागृतावस्थेमध्ये टिकून राहण्यास किंवा जागृतावस्थेमध्ये पुन्हापुन्हा घडण्यास संमती देत नसेल (त्या स्वप्नांचे स्वरूप काय हे व्यक्तीला समजत असेल आणि त्यामुळे तिच्यावर त्यांचा परिणाम होत नसेल तर) ती स्वप्नं तितकीशी महत्त्वाची ठरत नाहीत.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 606)

साधना, योग आणि रूपांतरण – २८८

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

(श्रीअरविंद आणि श्रीमाताजी अवचेतनावर कार्य करत होते. त्याचा संदर्भ येथे आहे.)

अवचेतनामधील (subconscient) साधनेचे हे कार्य व्यक्तिगत स्वरूपाचे नसून, ते सार्वत्रिक स्वरूपाचे असते. पण निश्चितच त्याचा येथील (श्रीअरविंद-आश्रमातील) प्रत्येकावर काही ना काही प्रमाणात परिणाम होत आहे. अवचेतनामध्ये चेतना व प्रकाश उतरविला नाही तर त्यामध्ये काहीही परिवर्तन होऊ शकणार नाही. कारण या अवचेतनामध्येच सर्व जुन्या कनिष्ठ प्राणिक उपजत प्रेरणांची आणि वृत्तीप्रवृत्तींची बीजे दडलेली असतात. आणि कनिष्ठ प्राणामधून या उपजत प्रेरणा व वृत्तीप्रवृत्ती काढून टाकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्या प्रवृत्ती खालून (अवचेतनामधून) पुन्हा डोकं वर काढतात.

तसेच अवचेतना हीच शारीर-चेतनेचा गुप्त आधार देखील असतो. अवचेतनाने स्वतःमध्ये उच्चतर चेतनेला आणि सत्य-प्रकाशाला प्रवेश करू देणे आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 611-612)

साधना, योग आणि रूपांतरण – २८६

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

अवचेतनाचा प्रांत (subconscient) हा अंधकारमय आणि अज्ञानमय प्रांत असतो आणि त्यामुळे तेथे प्रकृतीच्या अंधकारमय गतिप्रवृत्तींची ताकद अधिक प्रबळ असणे, हे स्वाभाविक आहे. कनिष्ठ प्राणापासून (lower vital) खाली असणाऱ्या प्रकृतीच्या इतर सर्व कनिष्ठ भागांच्या बाबतीतही हे तितकेच खरं आहे. परंतु अगदी क्वचितच, या भागाकडून चांगल्या गोष्टीसुद्धा पृष्ठभागावर पाठविल्या जातात.

अवचेतनाचा प्रांत हा (सद्यस्थितीत) कनिष्ठ उपजत गतिप्रवृत्तींचा पाया आहे, मात्र साधनेच्या वाटचालीमध्ये (साधकाने) त्यास प्रकाशित करणे आणि शारीर- प्रकृतीमध्ये त्यास उच्चतर चेतनेचा आधार बनविणे आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 611)

साधना, योग आणि रूपांतरण – २८५

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

आपल्या शरीरामध्ये उच्चतर चेतना जेथून उतरते, तो अतिचेतनाचा (superconscient) प्रांत आपल्या डोक्याच्या वर (आपल्या वर्तमान चेतनेच्या वर) असतो, त्याचप्रमाणे (आपल्या वर्तमान चेतनेच्या खाली) आपल्या पावलांच्या खाली अवचेतनाचा (subconscient) प्रांत असतो.

जडभौतिकाची (Matter) निर्मिती ही अवचेतनामधून झालेली असल्यामुळे, जडभौतिक हे या शक्तीच्या नियंत्रणाखाली असते. आणि असे असल्यामुळे आपल्याला जडभौतिक हे काहीसे अचेतन, चेतनाविहीन (unconscious) असल्यासारखे वाटते. याच कारणामुळे जडभौतिक शरीर (material body) हे अवचेतनाच्या शक्तीच्या प्रभावाखाली असते. आणि म्हणूनच, आपल्या शरीरामध्ये काय चाललेले असते याविषयी आपण बहुतांशी प्रमाणात सचेत (conscious) नसतो.

आपण जेव्हा झोपी जातो तेव्हा आपली बाह्यवर्ती चेतना या अवचेतनामध्ये उतरते आणि म्हणून आपण झोपलेलो असताना आपल्यामध्ये काय चाललेले असते याची आपल्याला, काही थोड्या स्वप्नांचा अपवाद वगळता, जाणीव नसते. त्यापैकी बरीचशी स्वप्नं या अवचेतनामधून पृष्ठभागी येतात. जुन्या स्मृती, आपल्या मनावर उमटलेले ठसे इत्यादी गोष्टी असंबद्ध रीतीने एकत्र येऊन ही स्वप्नं तयार होतात. आपण आपल्या जीवनामध्ये जे जे काही करतो किंवा जे काही अनुभवतो त्याचे प्रभाव अवचेतनाकडून ग्रहण केले जातात आणि त्यामध्ये ते साठवून ठेवले जातात. झोपेमध्ये त्यातील काही अंशभाग बरेचदा पृष्ठभागावर पाठविले जातात.

अवचेतन हा व्यक्तित्वाचा एक अगदी महत्त्वाचा भाग असतो परंतु आपल्या सचेत संकल्पशक्तीद्वारे आपण त्यामध्ये फार काही करू शकत नाही. आपल्यामध्ये कार्यकारी असणारी उच्चतर ‘शक्ती’ ही तिच्या स्वाभाविक क्रमानुसार अवचेतनास स्वतःप्रति खुले करेल आणि त्यामध्ये स्वतःचा प्रकाश पोहोचवेल आणि नियंत्रण प्रस्थापित करेल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 599-600)

साधना, योग आणि रूपांतरण – २७३

शरीराचे रूपांतरण

हट्टीपणा हा शारीर-मनाचा (physical mind) स्वभावधर्म असतो. एकाच गोष्टीची सातत्याने पुनरावृत्ती करत राहण्यामुळे ही शारीर-प्रकृती टिकून राहते. एवढेच की, त्या गोष्टीचे विविध रूपांद्वारे सातत्याने सादरीकरण, प्रस्तुती होत राहते. जेव्हा शारीर-प्रकृती कार्यरत असते तेव्हा, ही हटवादी पुनरावृत्ती हा तिच्या प्रकृतीचा एक भाग असतो, पण ती जेव्हा कार्यरत नसते तेव्हा ती सुस्त, जड असते. आणि म्हणून जेव्हा आपल्याला शारीर-प्रकृतीच्या जुन्या वृत्तीप्रवृत्तींपासून सुटका करून घ्यायची असते तेव्हा त्या प्रवृत्ती अशा प्रकारच्या हटवादी पुनरावृत्तीने प्रतिकार करतात. त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी व्यक्तीने नकार देण्याच्या बाबतीत खूप चिकाटी बाळगली पाहिजे.

सर्व प्रकारच्या ‘प्रकृती’ प्रमाणे शारीर-‘प्रकृती’चेही व्यक्तिगत आणि वैश्विक असे दोन पैलू असतात. व्यक्तीमध्ये सर्व गोष्टी वैश्विक प्रकृतीकडून येतात. परंतु व्यक्तिगत शारीर-प्रकृती त्यांच्यापैकी काही गोष्टींचेच जतन करते व इतर गोष्टी नाकारते आणि ती ज्या गोष्टी जतन करून ठेवते त्यांना ती वैयक्तिक रूप देते… परंतु व्यक्तीला जेव्हा त्यांच्यापासून स्वतःची सुटका करून घ्यायची असते तेव्हा व्यक्ती अंतरंगामध्ये (साचलेले) जे काही असते ते आधी सभोवतालच्या ‘प्रकृती’ मध्ये फेकून देते. आणि तेथून मग वैश्विक ‘प्रकृती’ त्या गोष्टी परत आत आणण्याचा प्रयत्न करते किंवा त्यांच्या जागी तिच्या स्वतःच्या अशा काही नवीन किंवा तत्सम गोष्टी आणते. व्यक्तीला या आक्रमणास सातत्याने थोपवून धरावे लागते, नकार द्यावा लागतो. सतत दिलेल्या नकारामुळे, सरतेशेवटी पुनरावृत्तीची शक्ती क्षीण होते आणि मग व्यक्ती मुक्त होते आणि उच्चतर चेतना व तिच्या गतिप्रवृत्ती शारीरिक अस्तित्वामध्ये उतरवू शकते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 361)

साधना, योग आणि रूपांतरण – २७२

शरीराचे रूपांतरण

व्यक्तीला जेव्हा भौतिक जीवनामध्ये काही परिवर्तन करण्याची इच्छा असते, म्हणजे तिला स्वतःच्या व्यक्तिमत्त्वामध्ये बदल करायचा असो किंवा स्वतःच्या अवयवांच्या कार्यपद्धतीमध्ये किंवा सवयींमध्ये बदल करायचा असो, व्यक्तीकडे अविचल अशी चिकाटी असणे आवश्यक असते. अमुक एखादी गोष्ट तुम्ही पहिल्यांदा ज्या उत्कटतेने केली होती त्याच तीव्रतेने तीच गोष्ट शंभर वेळा पुन्हा पुन्हा सुरू करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. आणि ती गोष्ट यापूर्वी तुम्ही जणू कधी केलेलीच नव्हती अशा प्रकारे ती पुन्हा पुन्हा करत राहण्याची तयारी ठेवली पाहिजे. जी माणसं लवकर अस्वस्थ, विचलित होतात त्यांना हे जमत नाही. परंतु तुम्हाला जर हे करता आले नाही तर तुम्ही योगसाधना करू शकणार नाही. किमान ‘पूर्णयोग’ तर नाहीच नाही. म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये परिवर्तन करता येणार नाही.

व्यक्तीला स्वतःच्या शरीरामध्ये परिवर्तन करायचे असेल तर तीच तीच गोष्ट लाखो वेळा करता आली पाहिजे, कारण शरीर हे सवयी आणि नित्यक्रमाच्या (routine) कृतींनी बनलेले असते आणि हा नित्यक्रम नाहीसा करायचा असेल तर त्यासाठी अनेक वर्षे चिकाटी बाळगावी लागते.

– श्रीमाताजी (CWM 07 : 104)

साधना, योग आणि रूपांतरण – २७१

शरीराचे रूपांतरण

शारीर-चेतना (physical consciousness) ही नेहमीच तिच्या अज्ञानासहित येत असते. आणि ही चेतना मूढ आणि अंधकारयुक्त असते. म्हणजे ज्यांचे विचारी मन सुबुद्ध असते किंवा किमान थोडेतरी बुद्धिमान असते अशा व्यक्तींमध्येदेखील ही चेतना अशीच असते. वरून येणाऱ्या ‘दिव्य प्रकाशा’द्वारेच ती चेतना प्रकाशित होऊ शकते. अधिकाधिक प्रमाणात हा प्रकाश घेऊन येणाऱ्या ‘दिव्य शांती’मध्ये आणि ‘दिव्य शक्ती’ मध्येच तुम्ही आश्रय घेतला पाहिजे.

*

शारीर-चेतनेमध्ये (अभीप्सेचा) अग्नी तेवत ठेवणे अवघड असते. या शारीर चेतनेला सातत्याने नित्यक्रमाचे (routine) पालन करणे सोपे असते पण तिला नित्य सक्रिय प्रयत्नांचे जतन करणे तितके सोपे नसते. असे असले तरीदेखील, कालांतराने तिची या गोष्टीसाठीसुद्धा तयारी करून घेता येते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 369, 369)

साधना, योग आणि रूपांतरण – २७०

शरीराचे रूपांतरण

अविचलतापूर्वक चिकाटी बाळगा आणि कशामुळेही नाउमेद होऊ नका. आत्ता जरी (तुमच्यामध्ये) अविचलता आणि उल्हसितपणा या गोष्टी सातत्याने टिकून राहत नसल्या तरी तशा त्या टिकून राहणे अपेक्षित आहे. जेव्हा शारीर-चेतना (physical consciousness) आणि तिच्यामधील अडथळ्यांवर कार्य चालू असते तेव्हा सुरुवातीला नेहमीच हे असे होत असते. तुम्ही जर चिकाटीने प्रयत्न करत राहिलात तर अविचलता आणि उल्हसितपणा या गोष्टी तुमच्यामध्ये – जोपर्यंत शांती आणि आनंदाचा पाया तयार होत नाही तोपर्यंत – वारंवार येऊ लागतील आणि त्या अधिक काळासाठी टिकून राहू शकतील. आणि पृष्ठभागावर ज्या कोणत्या अडचणी, अडथळे येतील ते आता आतपर्यंत जाऊ शकणार नाहीत किंवा तुमचा (शांती आणि आनंदाचा) हा पाया डळमळीत करू शकणार नाहीत किंवा त्यास त्या एखाद्या क्षणाचा अपवाद वगळता, झाकोळूनदेखील टाकू शकणार नाहीत.

मनोवस्थेमध्ये (mood) सातत्याने बदल होत राहणे हीसुद्धा सार्वत्रिक आढळणारी गोष्ट आहे. कारण शारीर-चेतनेप्रमाणेच सध्या शारीर-प्राणावरसुद्धा (physical-vital) कार्य चालू आहे आणि ही अस्थिरता हा शारीर-प्राणाच्या प्रकृतीचा एक गुणधर्म आहे. परंतु त्यामुळे तुम्ही निराश होऊ नका. जेव्हा हा पाया अधिक भरभक्कम होईल तेवढ्या प्रमाणात ती अस्थिरता क्षीण होत जाईल आणि प्राण अधिक स्थायी व समतोल होत जाईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 370-371)

साधना, योग आणि रूपांतरण – २६९

शरीराचे रूपांतरण

(श्रीअरविंद एका साधकाला लिहीत आहेत…)

तुम्ही स्वतःला पूर्णपणे बाह्यवर्ती शारीर-चेतनेमध्ये (physical consciousness) ठेवले आहे. आणि फक्त बाह्यवर्ती गोष्टी तेवढ्याच खऱ्या असतात आणि आध्यात्मिक व आंतरिक सर्व गोष्टी खऱ्या नसतात असे म्हणत, आणि आपण अपात्र आहोत या सबबीखाली स्वतःला खुले करण्यास ती शारीर-चेतना नकार देत आहे. तुम्ही जर तिचे म्हणणे मनावर घेऊ लागलात तर ती नेहमीच असे करत असते. परंतु अपात्रतेची ही सबब खरी नाही आणि दुसरी सबब देखील खरी नाही. जेव्हा तुम्ही आंतरिक, आध्यात्मिक चेतनेला खुले होता तेव्हा बाह्यवर्ती किंवा शारीरिक चेतनेसाररखीच आंतरिक, आध्यात्मिक चेतना हीदेखील तुमच्यासाठी संपूर्णपणे वास्तव आणि खरी असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 370)