Tag Archive for: तत्त्वज्ञान

 

अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही आजवर नेहमीच आध्यात्मिक जीवनासाठी अतिशय सुयोग्य मानण्यात आली आहे. तसेच सात्त्विकतेमुळे आध्यात्मिक जीवनाची पूर्वतयारी होते, असेही मानले जाते. तर राजसिक प्रकृती इच्छाआकांक्षाच्या आणि आवेगांच्या भाराखाली दबून गेलेली असते.

त्याच बरोबर हेही खरे आहे की, आध्यात्मिकता ही द्वंद्वातीत असते आणि त्यासाठी ऊर्ध्वमुख असणाऱ्या अभीप्सेची सर्वाधिक आवश्यकता असते. आणि ही अभीप्सा सात्त्विक प्रवृत्तीच्या व्यक्तीइतकीच राजसिक प्रवृत्तीच्या व्यक्तीमध्येही निर्माण होऊ शकते. एखादी सात्त्विक प्रवृत्तीची व्यक्ती जशी तिच्या सद्गुणांच्या अतीत जाऊ शकते तशीच, राजसिक प्रवृत्तीची व्यक्तीही तिच्या अवगुणांच्या, इच्छाआकांक्षांच्या अतीत होऊन, दिव्य शुद्धता, दिव्य प्रकाश आणि दिव्य प्रेमाकडे वळू शकते.

अर्थात, अशी राजसिक प्रवृत्तीची व्यक्ती जेव्हा स्वतःच्या कनिष्ठ प्रकृतीवर विजय मिळवेल आणि स्वतःमधून ती कनिष्ठ वृत्ती काढून टाकेल तेव्हाच ही गोष्ट घडून येईल. कारण अशी व्यक्ती जर पुन्हा एकदा त्याच कनिष्ठ प्रकृतीमध्ये जाऊन पडली, तर ती मार्गभ्रष्ट होण्याची शक्यता असते किंवा अगदीच काही नाही तर, जोपर्यंत ती व्यक्ती त्या कनिष्ठ प्रकृतीमध्ये रमलेली असते तोपर्यंत तरी तिची आंतरिक प्रगती खुंटते.

परंतु धार्मिक आणि आध्यात्मिक इतिहास पाहिला तर त्यामध्ये, मोठमोठ्या गुन्हेगारांचे महान संतांमध्ये किंवा अवगुणी किंवा कमी गुणवान व्यक्तींचे आध्यात्मिक साधकांमध्ये आणि भक्तांमध्ये रूपांतर झाल्याची उदाहरणे वारंवार आढळून आली आहेत. उदाहरणार्थ युरोपमध्ये सेंट ऑगस्टिन, भारतामध्ये (चैतन्य महाप्रभुंचे अनुयायी झालेले) जगाई आणि मधाई, बिल्वमंगल यासारखी अनेक उदाहरणे आहेत.

भलेही एखाद्या माणसाच्या हातून गतकाळात अनेक चुका झालेल्या असतील किंवा त्याला अनेक ठोकरा बसल्या असतील, पण त्यानेसुद्धा जर ईश्वराच्या निवासाचे दरवाजे अगदी प्रामाणिकपणे ठोठावले तर, ते त्याच्यासाठी कधीच बंद नसतात. (किंबहुना) जो जो कोणी ईश्वराच्या निवासाचे दरवाजे अगदी प्रामाणिकपणे ठोठावतो, त्याच्यासाठी ते कधीच बंद नसतात.

मानवी गुण आणि मानवी दोष म्हणजे अंतरंगात असणाऱ्या ईश्वरी तत्त्वावरील अनुक्रमे तेजस्वी व अंधकारमय आवरणे असतात. पण आत्म्याच्या उंचीप्रत जाताना, जेव्हा ती दोन्ही आवरणे भेदली जातात तेव्हा, ती जळून जाऊ शकतात. (म्हणजेच द्वंद्वातीत असणाऱ्या आत्मतत्त्वाच्या दिशेने चाललेल्या प्रवासात साधकाचे गुण व दोष दोन्ही गळून पडतात.)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 42)

 

तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही केली पाहिजे आणि ती म्हणजे तो आवेग पुन्हा येऊ नये अशी इच्छा बाळगली पाहिजे. मात्र, तो आवेग नाहीसाच होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल, तर तो आवेग तसाच ठेवा, पण असे असेल तर मग योगसाधना करण्याचा प्रयत्नही करू नका.

योगमार्गाचे अनुसरण करायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही सर्व अडीअडचणींवर मात करण्याचा संकल्प केला पाहिजे. तसा संकल्प जर तुम्ही केला नसेल तर, योगमार्गाचा अवलंबच करू नका. योगमार्गाचे अनुसरण करण्याचा तुमचा निर्णय अगदी प्रामाणिक आणि समग्र असला पाहिजे.

• श्रीमाताजी (CWM 04 : 77)

साधक : आपल्या पूर्णयोगाच्या दृष्टीने प्रामाणिकपणा याचा अर्थ कृपया सांगाल का?

श्रीअरविंद : ईश्वराप्रत असलेल्या अत्युच्च अभीप्सेशी विसंगत होण्यास, अस्तित्वाच्या कोणत्याही घटकाला अनुमती न देणे म्हणजे प्रामाणिकपणा.

(Guidance from Sri Aurobindo to Nagin Doshi, Vol 01 : 110)

*

प्रामाणिक असण्यासाठी, व्यक्तीच्या अस्तित्वाच्या सर्व घटकांनी ईश्वराप्रत असलेल्या त्यांच्या अभीप्सेमध्ये संघटित असणेच आवश्यक असते. म्हणजे असे की, एखाद्या घटकाला ईश्वर हवासा वाटतो आणि दुसरे घटक मात्र त्याला नकार देतात किंवा बंड करतात, असे असता कामा नये.

प्रसिद्धी किंवा नावलौकिक किंवा प्रतिष्ठा किंवा शक्ती मिळविण्यासाठी नव्हे अथवा फुशारकी मारण्याच्या समाधानासाठीदेखील नव्हे, तर ईश्वरासाठीच ईश्वर हवा असणे, म्हणजे अभीप्सेमध्ये प्रामाणिकपणा असणे.

– श्रीमाताजी (CWM 14 : 65)

 

तुम्ही जर अप्रामाणिक असाल तर काय होते? तर, तुमची चेतना झाकली जाते. उदाहरणार्थ, जो माणूस खोटं बोलतो त्याची चेतना झाकली जाते आणि कालांतराने त्याला सत्य आणि मिथ्यत्व यातील फरकच कळेनासा होतो. तो कल्पनाचित्रे पाहतो आणि त्यांना तो सत्य मानतो. दुष्ट प्रवृत्तीचा मनुष्य स्वतःची अभीप्सा गमावून बसतो, तो साक्षात्काराची क्षमता गमावून बसतो. ज्ञान, संवेदना आणि साक्षात्‌‍ अनुभूतीच्या सर्व क्षमता तो गमावून बसतो. ही त्याला मिळालेली शिक्षा असते. तो स्वत:मध्ये आणि ईश्वरामध्ये आवरणे निर्माण करतो, अडथळे निर्माण करतो आणि अशा प्रकारे तो स्वतःच स्वत:ला शिक्षा करून घेतो. ईश्वर त्याच्यापासून दूर जात नाही तर, तो मनुष्य ईश्वराचे स्वागत करण्यास स्वत:ला अक्षम बनवितो. म्हणजे, ईश्वर हा काही कोणाला बक्षिसाचे वितरण करत बसत नाही किंवा शिक्षाही देत नाही; शिक्षा, बक्षिस हे असे मुळातच काही नसते.

जी व्यक्ती अप्रामाणिक असते, जी दुरिच्छा बाळगत असते, जी विश्वासघातकी असते ती व्यक्ती स्वत:हून स्वत:वर शिक्षा ओढवून घेत असते. अप्रामाणिक माणसांकडे जी थोडीफार चेतना शिल्लक असते आणि जिच्यामुळे त्यांना ते दुष्ट आहेत, हे कळू शकले असते, ती चेतनादेखील ते गमावून बसतात. इतके की जणू काही ते अचेतन असल्यासारखेच होऊन जातात. शेवटी त्यांना (सत्य-मिथ्या, खरे-खोटे इ.) काहीच समजेनासे होते.

– श्रीमाताजी (CWM 05 : 21-22)

 

साधक : माताजी, पारदर्शक प्रामाणिकपणा म्हणजे काय ?

श्रीमाताजी : प्रामाणिकपणाची तुलना वातावरणाशी किंवा एखाद्या काचेच्या तावदानाशी केली गेली आहे. यांपैकी कोणतीही गोष्ट जर पूर्णपणे पारदर्शक असेल तर, कोणताही विपर्यास न होता, त्यामधून प्रकाश जसा आरपार जातो, त्याचप्रमाणे प्रामाणिक चेतना, दिव्य स्पंदनांमध्ये कोणताही विपर्यास न होऊ देता, त्याचे आरपार संक्रमण करते.

– श्रीमाताजी (CWM 16 : 382)

 

व्यक्तीकडे संपूर्णपणे पारदर्शी प्रामाणिकपणा असला पाहिजे. प्रामाणिकपणाचा अभाव हेच आज आपल्याला भेडसावत असणाऱ्या सर्व अडचणींचे कारण आहे. सर्व माणसांमध्ये अप्रामाणिकपणा आहे. संपूर्णपणे प्रामाणिक अशी अवघी शंभरच माणसं या पृथ्वीवर असतील. माणसाची प्रकृतीच त्याला अप्रामाणिक बनविते, ती खूप जटिल आहे. मनुष्य सातत्याने स्वत:ला फसवत असतो, स्वत:पासून सत्य लपवत असतो, स्वत:साठी सबबी शोधत असतो.

योग हा सर्वांगाने प्रामाणिक बनण्याचा मार्ग आहे. संपूर्णत: प्रामाणिक असणे अवघड असते पण एखादी व्यक्ती किमान मानसिकरित्या तरी प्रामाणिक होऊ शकते…

दिव्य शक्ती विद्यमान आहे, पूर्वी कधीही नव्हती अशा रितीने ती आज उपस्थित आहे; पण माणसांच्या अप्रामाणिकपणामुळे ती येथे अवतरित होण्यापासून रोखली जात आहे, त्यामुळे तिची अनुभूती येऊ शकत नाही. सर्व जगच खोटेपणामध्ये, असत्यामध्ये जगत आहे. आत्तापर्यंतचे माणसांमाणसांतील सर्व नातेसंबंध हे खोटेपणा व फसवणुकीवर आधारलेले आहेत.

राष्ट्राराष्ट्रांमधील राजनैतिक संबंधही खोटेपणावर आधारलेले आहेत. त्यांना ‘शांती हवी आहे’ असा ते एकीकडे दावा करत असतात आणि त्याचवेळी ते स्वत:ची सामरिक ताकद वाढवीत चालले आहेत. माणसांमधील व राष्ट्राराष्ट्रांमधील पारदर्शी प्रामाणिकपणामुळेच रूपांतरण झालेले जग अस्तित्वात येऊ शकेल.

– श्रीमाताजी (CWM 13 : 268)

सत्त्वगुणाच्या माध्यमातून प्रगत होणे, ही पारंपरिक योगमार्गातील एक सर्वसाधारण संकल्पना आहे. पतंजलीप्रणीत योगामध्ये सांगितल्याप्रमाणे यमनियमाद्वारे असेल, किंवा बौद्धमतातील अष्टांगमार्गाद्वारे असेल किंवा भक्तिपंथातील साधुता यांसारख्या साधनांचा अवलंब करून, त्याद्वारे शुद्धीकरण आणि पूर्वतयारी करणे, या साऱ्या पारंपरिक योगाच्या संकल्पना आहेत.

पूर्णयोगामध्ये सत्त्वाच्या माध्यमातून विकसन होत नाही, तर येथे सत्त्वाची जागा समतेच्या जोपासनेद्वारा आणि आंतरात्मिक रूपांतरणाद्वारे (psychic transformation) घेतली जाते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 424)

(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून…)

तुम्ही आत्ता जशी व्यापकता आणि स्थिरता बाळगली आहे तशी ती नेहमी टिकवून ठेवलीत आणि हृदयामध्ये देखील जर श्रीमाताजींबद्दल सदोदित प्रेम असेल तर मग सारे काही निर्धोक असते. कारण येथे योगाचा दुहेरी पाया रचण्यात आलेला आहे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे येथे उच्चतर चेतना ही तिची ऊर्ध्वस्थित शांती, स्वातंत्र्य आणि सुरक्षितता यांसहित अवतरित होते आणि ज्या चैत्य अस्तित्वामुळे सर्व प्रयत्न आणि सर्व उत्स्फूर्त गतिविधी खऱ्या ध्येयाप्रत वळलेल्या राहतात, ते चैत्य अस्तित्व खुले होते. (हा असतो तो दुहेरी पाया.)

श्रीअरविंद (CWSA 30 : 466)

चेतना जेव्हा संकुचित असते, ती व्यक्तिगत असते किंवा शरीरामध्येच बंदिस्त झालेली असते तेव्हा ईश्वराकडून काही ग्रहण करणे अवघड जाते. ही चेतना जेवढी जास्त व्यापक होते, तेवढी ती अधिक ग्रहण करू शकते. एक वेळ अशी येते की, जेव्हा ती विश्वाएवढी व्यापक झाल्याचा अनुभव येतो. तेव्हा समग्र ईश्वरच स्वतःमध्ये सामावून घेता येऊ शकेल असे तिला जाणवते.

*

व्यापकता (wideness) आणि स्थिरता (calmness) या गोष्टी योग-चेतनेचे अधिष्ठान असतात. आणि अनुभूती येण्यासाठी व आंतरिक विकास होण्यासाठी ती सर्वोत्तम परिस्थिती असते. शारीरिक चेतनेमध्ये जर व्यापक स्थिरता प्रस्थापित करता आली आणि त्या स्थिरतेने जर संपूर्ण शरीर आणि त्याच्या सर्व पेशी भरून गेल्या, तर तो शरीराच्या रूपांतरणाचा (transformation) पाया बनू शकतो. खरे सांगायचे तर, ही व्यापकता किंवा स्थिरता असल्याशिवाय रूपांतरण शक्यच नाही.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 274) & (CWSA 29 : 125)

अचंचलता किंवा अविचलता, स्थिरता, शांती आणि निश्चल-निरवता या प्रत्येक शब्दांना अर्थांच्या त्यांच्यात्यांच्या अशा खास छटा आहेत आणि त्यांची व्याख्या करणे तितकेसे सोपे नाही.

Quiet म्हणजे अचंचलता, अविचलता – ही अशी एक अवस्था असते की, जेथे कोणतीही अस्वस्थता किंवा चलबिचल नसते.

Calm म्हणजे स्थिरता – ही एक अक्षुब्ध, अचल अशी अवस्था असते की, जिच्यावर कोणत्याही क्षोभाचा परिणाम होऊ शकत नाही. अविचलतेच्या तुलनेत स्थिरता ही अधिक सकारात्मक अवस्था असते.

Peace म्हणजे शांती – ही त्याहूनही अधिक सकारात्मक अवस्था असते; शांतीसोबतच एक सुस्थिर व सुसंवादी विश्रामाची आणि मुक्ततेची भावनासुद्धा येते.

Silence म्हणजे निश्चल-निरवता – (ही शांतीहूनही अधिक सकारात्मक अवस्था असते.) ही अशी एक अवस्था असते की, जेथे प्राणाचे किंवा मनाचे कोणतेही तरंग उमटत नाहीत. किंवा तसे नसेल तर, मग तेथे एक प्रगाढ अविचलता असते आणि त्या अविचलतेला कोणतीही पृष्ठवर्ती हालचाल भेदू शकत नाही किंवा त्यात बदल घडवू शकत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 137)