Posts

साधना, योग आणि रूपांतरण – २२९

इच्छा, राजसिकता आणि अहंकार यांना दिलेल्या नकारामुळे व्यक्तीला अशी अचंचलता आणि शुद्धता प्राप्त होते की, ज्यामध्ये अनिर्वचनीय ‘शांती’ अवतरू शकते. व्यक्तीने स्वतःची इच्छा ‘ईश्वरा’प्रत अर्पण केली, तिने स्वतःची इच्छा ही ‘ईश्वरी ‘संकल्पा’मध्ये मेळविली (merging) तर व्यक्तीच्या अहंकाराचा अंत होतो आणि व्यक्तीला वैश्विक चेतनेमध्ये व्यापकता प्राप्त होते किंवा विश्वातीत असलेल्या गोष्टीमध्ये तिचे उन्नयन होते. व्यक्तीला ‘प्रकृती’पासून ‘पुरुषा’चे विलगीकरण अनुभवास येते आणि बाह्य प्रकृतीच्या बेड्यांपासून व्यक्तीची सुटका होते. व्यक्तीला तिच्या आंतरिक अस्तित्वाची जाणीव होते आणि बाह्यवर्ती अस्तित्व हे साधन असल्याचे जाणवते; ‘विश्वशक्ती’च व्यक्तीचे कार्य करत असल्याची आणि ‘आत्मा’ किंवा ‘पुरुष’ त्याकडे पाहात असल्याची किंवा तो साक्षी असून, मुक्त असल्याचे व्यक्तीला जाणवते. आपले कर्म हाती घेऊन, विश्व‘माता’ किंवा परम‘माता’च ते करत असल्याचे, किंवा हृदयापाठीमागून एक ‘दिव्य शक्ती’ त्या कर्माचे नियंत्रण करत आहे, किंवा ते कर्म करत आहे, असे व्यक्तीला जाणवते.

व्यक्तीने स्वतःची इच्छा आणि कर्म अशा रीतीने सतत ‘ईश्वरा’प्रत निवेदित केली तर, प्रेम आणि भक्ती वृद्धिंगत होते, चैत्य पुरुष पुढे येतो. ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘शक्ती’प्रत निवेदन केल्यामुळे, ती शक्ती आपल्या ऊर्ध्वस्थित असल्याचा अनुभव आपल्याला येऊ शकतो. आणि तिच्या अवतरणाची आणि उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या चेतनेप्रत व ज्ञानाप्रत आपण उन्मुख होत आहोत अशी जाणीव आपल्याला होऊ शकते.

सरतेशेवटी कर्म, भक्ती आणि ज्ञान एकत्रित येतात आणि आत्मपरिपूर्णत्व शक्य होते; त्यालाच आम्ही ‘प्रकृतीचे रूपांतरण’ असे संबोधतो. अर्थातच हे परिणाम काही एकाएकी होत नाहीत, व्यक्तीची परिस्थिती आणि तिचा विकास यांनुसार, ते कमीअधिक धीमेपणाने, कमीअधिक समग्रतेने दिसून येतात.

ईश्वरी साक्षात्कारासाठी कोणताही सोपा राजमार्ग नाही. सर्वंकष आध्यात्मिक जीवनासाठी ‘गीता’प्रणीत ‘कर्मयोग’ मी अशा रीतीने विकसित केला आहे. तो कोणत्याही अनुमानावर आणि तर्कावर आधारलेला नाही तर, तो अनुभूतीवर आधारलेला आहे. त्यामधून ध्यान वगळण्यात आलेले नाही आणि त्यातून भक्तीदेखील नक्कीच वगळण्यात आलेली नाही. कारण ‘ईश्वरा’प्रत आत्मार्पण, ‘ईश्वरा’प्रत स्वतःच्या सर्वस्वाचे निवेदन हा जो ‘कर्मयोगा’चा गाभा आहे, तोच मूलतः भक्तीचा देखील एक मार्ग आहे.

एवढेच की, जीवनापासून पलायन करू पाहणाऱ्या एकांतिक अशा ध्यानाला तसेच, स्वतःच्याच आंतरिक स्वप्नामध्ये बंदिस्त होऊन राहणाऱ्या भावनाप्रधान भक्तीला मात्र पूर्णयोगाची समग्र प्रक्रिया म्हणून स्वीकारण्यात आलेले नाही. एखादी व्यक्ती तास न् तास ध्यानामध्ये पूर्णपणे गढून जात असेल किंवा आंतरिक अविचल आराधना आणि परमानंदामध्ये तास न् तास निमग्न होत असेल, तरीसुद्धा या गोष्टी म्हणजे समग्र पूर्णयोग नव्हे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 216-218)

साधना, योग आणि रूपांतरण – २२८

अज्ञान आणि अहंभावातून केलेल्या कृतीला म्हणजे, जी कृती अहंकाराच्या तुष्टीसाठी आणि राजसिक इच्छेने प्रेरित होऊन केली जाते त्या कृतीला मी ‘कर्म’ मानत नाही.

अज्ञानाचा जणू शिक्काच असणाऱ्या अहंकार, राजसिकता आणि इच्छावासना यांपासून सुटका करून घेण्याचा संकल्प असल्याखेरीज ‘कर्मयोग’ घडूच शकत नाही.

परोपकार किंवा मानवतेची सेवा किंवा नैतिक किंवा आदर्शवादी अशा उर्वरित सर्व गोष्टी, ज्या गोष्टी कार्याच्या गहनतर सत्याला पर्यायी आहेत, असे मानवी मन मानते, त्या सुद्धा माझ्या दृष्टीने ‘कर्म’ या संज्ञेला पात्र ठरत नाहीत.

जी कृती ‘ईश्वरा’साठी केली जाते, जी कृती ‘ईश्वरा’शी अधिकाधिक एकत्व पावून केली जाते आणि अन्य कशासाठीही नाही तर, केवळ ’ईश्वरा’साठीच केली जाते अशा कृतीला मी ’कर्म’ असे संबोधतो.

साहजिकच आहे की, ही गोष्ट सुरुवातीला तितकीशी सोपी नसते; गहन ध्यान आणि दीप्तिमान ज्ञान यांच्यापेक्षा ती काही कमी सोपी नसते, एवढेच काय पण, अगदी खरेखुरे प्रेम आणि भक्ती यांच्याहूनही ती गोष्ट काही कमी सोपी नसते. परंतु इतर गोष्टींप्रमाणेच या गोष्टीची (कर्माची) सुरुवात देखील तुम्ही सुयोग्य वृत्ती आणि दृष्टिकोन बाळगून केली पाहिजे, तुमच्यामधील सुयोग्य संकल्पासहित ही गोष्ट करण्यास तुम्ही सुरुवात केली पाहिजे, अशा वृत्तीने केलेले ‘कर्म’ हे भक्ती किंवा ध्यान यांच्याइतकेच प्रभावी ठरू शकते. अन्य गोष्टी त्यानंतर घडून येतील. (उत्तरार्ध उद्या)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 216-218)

साधना, योग आणि रूपांतरण – २२७

सर्वसाधारणपणे आपण अज्ञानामध्ये जीवन जगत असतो आणि आपल्याला ‘ईश्वर’ काय आहे हे माहीत नसते. सामान्य प्रकृतीच्या शक्ती या अ-दिव्य शक्ती असतात कारण त्या अहंकार, इच्छावासना आणि अचेतनेचा जणू एक पडदाच विणतात की, ज्यामुळे ‘ईश्वर’ आपल्यापासून झाकलेला राहतो. जी चेतना, ‘ईश्वर’ काय आहे ते जाणते आणि त्यामध्ये जाणीवपूर्वक निवास करते, अशा उच्चतर आणि गहन, सखोल चेतनेमध्ये आपला प्रवेश व्हायचा असेल तर, कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तींपासून आपली सुटका झाली पाहिजे आणि ‘दिव्य शक्ती’च्या कृतीसाठी आपण स्वतःला खुले केले पाहिजे; म्हणजे मग ती ‘दिव्य शक्ती’ आपल्या चेतनेचे ‘दिव्य प्रकृती’मध्ये रूपांतरण घडवून आणेल.

‘दिव्यत्वा’च्या या संकल्पनेपासून आपण प्रारंभ केला पाहिजे; त्याच्या सत्याचा साक्षात्कार चेतनेच्या विकसनातून आणि तिच्या परिवर्तनामधूनच होणे शक्य आहे.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 07-08)

साधना, योग आणि रूपांतरण – २२६

व्यक्ती (योगसाधना करून देखील) जर स्वतःच्या प्रकृतीमध्ये कोणतेही परिवर्तन घडवू शकत नसेल तर, तिने योगसाधना करण्याचे कष्ट घेणे उपयुक्त ठरणार नाही; कारण प्रकृतीमध्ये परिवर्तन घडविण्यासाठीच तर योगसाधना केली जाते, अन्यथा त्याला काही अर्थ नाही, असे श्रीअरविंद आपल्याला सांगतात.
*
‘शांती’चे अवतरण, ‘शक्ती’चे अवतरण, ‘प्रकाशा’चे अवतरण आणि ‘आनंदा’चे अवतरण, या चार गोष्टी ‘प्रकृतीचे रूपांतरण’ घडवून आणतात.

– श्रीमाताजी (CWM 04 : 332), – श्रीअरविंद (CWSA 30 : 449)

साधना, योग आणि रूपांतरण – २२५

साधक : फक्त आंतरिक चेतनेमध्ये परिवर्तन झाले तर बाह्य व्यक्तित्वातील अशुद्धता तशाच कायम राहण्याची शक्यता असेल ना?

श्रीमाताजी : हो, अर्थातच. केवळ आंतरिक चेतनेशी संबंधित असणाऱ्या प्राचीन योगपरंपरा आणि आपला पूर्णयोग यामध्ये हाच तर मूलभूत फरक आहे. प्राचीन समजूत अशी होती, आणि काही व्यक्ती भगवद्गीतेचा अर्थ या पद्धतीनेही लावत असत की, ज्याप्रमाणे धुराशिवाय अग्नी नसतो त्याप्रमाणे अज्ञानाशिवाय जीवन नसते. हा सार्वत्रिक अनुभव असतो पण ही काही आपली संकल्पना नाही, हो ना?

आपल्याला अनुभवातून हे माहीत आहे की, आपण जर शारीर-चेतनेपेक्षाही खाली म्हणजे अवचेतनेपर्यंत (subconscient) खाली उतरलो, किंबहुना त्याहूनही खाली म्हणजे अचेतनतेपर्यंत (inconscient) खाली उतरलो तर, आपल्याला आपल्यामध्ये अनुवंशिकतेमधून आलेल्या गोष्टींचे (atavism) मूळ सापडू शकते तसेच आपल्या प्रारंभिक शिक्षणामधून आणि आपण ज्या वातावरणामध्ये जीवन जगत असतो त्यामधून जे काही आलेले असते त्याचे मूळही आपल्याला सापडू शकते. आणि त्यामुळेच व्यक्तीमध्ये, म्हणजे तिच्या बाह्य प्रकृतीमध्ये, एक प्रकारची विशेष वैशिष्ट्यपूर्णता निर्माण होते आणि सर्वसाधारणतः असे समजले जाते की, आपण असेच जन्माला आलेलो आहोत आणि आयुष्यभर आपण असेच राहणार आहोत. परंतु अवचेतनेपर्यंत, अचेतनेपर्यंत खाली उतरून व्यक्ती तेथे जाऊन या घडणीचे मूळ शोधून काढू शकते. आणि जे तयार झाले आहे ते नाहीसे देखील करू शकते. म्हणजे व्यक्ती सामान्य प्रकृतीच्या गतिविधी आणि प्रतिक्रिया यांच्यामध्ये सचेत आणि जाणीवपूर्वक कृतीने परिवर्तन घडवून आणू शकते आणि अशा रीतीने ती खरोखरच स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचे रूपांतरण घडवून आणू शकते. ही काही सामान्य उपलब्धी नाही, परंतु ती करून घेण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे, हे असे करता येणे शक्य असते, एवढेच नव्हे, तर असे करण्यात आलेले आहे हे व्यक्ती ठामपणे म्हणू शकते. समग्र रूपांतरणाच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल असते. परंतु त्यानंतर, मी आधी ज्याचा उल्लेख केला ते पेशींचे रूपांतरण करणे अजूनही बाकी आहे.

अन्नमय पुरुषामध्ये (physical being) पूर्णतः परिवर्तन करणे शक्य आहे परंतु ही गोष्ट आजवर कधीही करण्यात आलेली नाही.

– श्रीमाताजी (CWM 15 : 294-295)

साधना, योग आणि रूपांतरण – २२४

अर्थातच, आत्तापर्यंत, ज्यांनी कोणी हे सचेत रूपांतरण (transformation) साध्य करून घेतले आहे त्यांना स्वतःच्या अंतरंगामध्ये असलेल्या, व्यक्तित्वाच्या अगदी गहनतेमध्ये असलेल्या, शाश्वत आणि अनंत जीवनाची जाणीव झालेली आहे आणि ही चेतना टिकवून ठेवण्यासाठी म्हणून, त्यांना या आंतरिक अनुभवाशी सातत्याने संबंधितच राहावे लागते, यासाठी त्यांना आंतरिक निदिध्यासामध्ये म्हणजे कमीअधिक प्रमाणात सातत्याने ध्यानामध्ये राहणे आवश्यक असते. आणि जेव्हा ते त्या ध्यानावस्थेमधून बाहेर येतात तेव्हा, (जर त्यांनी संपूर्णपणे कर्मव्यवहार करणे सोडून दिले नसेल तर), त्यांची बाह्यवर्ती प्रकृती आधी जशी होती तशीच असते; त्यांची विचारपद्धती, प्रतिक्रिया देण्याची पद्धती यामध्येदेखील फारसा काही फरक झालेला नसतो.

या उदाहरणाबाबत, हा आंतरिक साक्षात्कार, चेतनेचे हे रूपांतरण, ज्या व्यक्तीने ते साध्य करून घेतलेले असते त्या व्यक्तीपुरतेच उपयोगी असते. त्यामुळे जडद्रव्याच्या किंवा पृथ्वीवरील जीवनाच्या परिस्थितीमध्ये यत्किंचितही फरक होत नाही. समग्र रूपांतरण जर यशस्वी व्हायचे असेल तर, सर्व मनुष्यमात्र, किंबहुना सर्व सजीव आणि त्यांचे भौतिक पर्यावरण हेदेखील रूपांतरित करण्याची आवश्यकता असते. अन्यथा गोष्टी जशा आहेत तशाच राहतील. व्यक्तिगत अनुभव पार्थिव जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणू शकत नाही. रूपांतरणाच्या जुन्या संकल्पनेमध्ये चैत्य पुरुषाविषयी आणि आंतरिक जीवनाविषयी सचेत होणे अभिप्रेत असते. परंतु, रूपांतरणाची आमची जी संकल्पना आहे, ज्याविषयी आपण बोलत आहोत, ती संकल्पना आणि रूपांतरणाची जुनी संकल्पना यामध्ये हा मूलभूत फरक आहे.

म्हणजे एखादी व्यक्ती किंवा कोणता एखादा व्यक्तीसमूह किंवा सर्व मनुष्यमात्र एवढेच नव्हे तर, संपूर्ण जीवन, कमीअधिक विकसित झालेली ही एकंदर जड-भौतिक चेतनाच रूपांतरित झाली पाहिजे. हे असे रूपांतरण घडून आले नाही तर या जगातील सर्व दुःख, सर्व संकटं आणि सर्व अत्याचार आत्ताप्रमाणेच कायम राहतील. काही व्यक्ती त्यांच्यामध्ये झालेल्या आंतरात्मिक विकसनामुळे यातून सुटका करून घेऊ शकतील पण सर्वसाधारण समाज मात्र त्याच दुःखपूर्ण स्थितीमध्ये खितपत पडलेला असेल. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 15 : 293-294)

साधना, योग आणि रूपांतरण – २२३

(‘रूपांतरणा’बाबत श्रीमाताजींनी अगोदर केलेल्या विवेचनातील काही भाग वाचून दाखविला गेला आहे. आणि आता श्रीमाताजी त्यावर भाष्य करत आहेत.)

समग्र रूपांतरण आणि ज्या चेतनेच्या रूपांतरणाचा मी आधी उल्लेख केला होता त्या दोन्हीमध्ये मी फरक का करते? चेतना आणि व्यक्तीच्या इतर भागांमध्ये काय संबंध असतो? हे इतर भाग कोणते? जे जे कोणी योगसाधना करतात त्यांच्याबाबतीत हे चेतनेचे रूपांतरण घडून येते आणि ते ‘ईश्वरी उपस्थिती’विषयी किंवा स्वतःच्या अस्तित्वाच्या ‘सत्या’विषयी जागरूक होऊ लागतात. बऱ्याच जणांना याचा अनुभव आहे, असे मी म्हणत नाहीये पण किमान काही जणांना तरी हा अनुभव आलेला असतो. मग हा अनुभव आणि समग्र रूपांतरण यामध्ये काय फरक असतो?

साधक : समग्र रूपांतरणामध्ये बाह्यवर्ती प्रकृती आणि आंतरिक चेतना या दोन्ही रूपांतरित होतात. व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, तिच्या सवयी इत्यादी पूर्णपणे बदलून जातात, तसेच तिचे विचार आणि गोष्टींकडे पाहण्याचा तिचा मानसिक दृष्टिकोनही बदलून जातो.

श्रीमाताजी : हो, बरोबर आहे पण तुम्ही जर पुरेशी काळजी घेतली नाहीत आणि तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवले नाहीत तर, तुमच्यामध्ये असेही काही असते की ज्यामध्ये कोणतेही परिवर्तन न होता ते तसेच राहिलेले असते. ते नेमके काय असते? तर ती शारीर-चेतना (body consciousness) असते. आता ही शारीर-चेतना म्हणजे काय? त्यामध्ये अर्थातच प्राणिक चेतनेचाही समावेश असतो, म्हणजे येथे शारीर-चेतना ही समग्रत्वाने अभिप्रेत आहे. आणि मग या समग्र शारीर-चेतनेमध्ये शारीरिक मनाचाही (physical mind) समावेश होतो. हे असे मन असते की जे तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्या सर्वसामान्य गोष्टींनी व्याप्त असते आणि त्याला प्रतिसाद देत असते. एक प्राणिक चेतनाही (vital consciousness) असते. संवेदना, आवेग, उत्साह आणि इच्छावासना यांबाबतची जाणीव म्हणजे ही चेतना असते. आणि सरतेशेवटी स्वयमेव एक शारीर-चेतना असते, ही भौतिक चेतना असते, ती शरीराची चेतना असते आणि ही चेतना आजवर पूर्णतः कधीच रूपांतरित झालेली नाही.

आजवर सार्वत्रिक, म्हणजे शरीराची एकंदर चेतना रूपांतरित करण्यात आली आहे म्हणजे, व्यक्तीला ज्या गोष्टी अपरिहार्य वाटत नाहीत अशा गोष्टी म्हणजे विचारांची, सवयींची बंधने व्यक्ती झुगारून देऊ शकते. या गोष्टीमध्ये परिवर्तन होऊ शकते, हे परिवर्तन झालेले आहे. परंतु पेशींची जी चेतना आहे त्यामध्ये आजवर कोणतेही परिवर्तन झालेले नाही. पेशींमध्ये एक चेतना असते. त्यालाच आम्ही ‘शारीरिक चेतना’ असे संबोधतो आणि ती चेतना संपूर्णपणे शरीराशी संबद्ध असते.

या चेतनेमध्ये परिवर्तन होणे अतिशय कठीण असते कारण ही चेतना सामूहिक सूचनेच्या प्रभावाखाली असते आणि ही सामूहिक सूचना रूपांतरणाच्या पूर्णपणे विरोधी असते. आणि त्यामुळे व्यक्तीला या सामूहिक सूचनेच्या विरोधात संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष फक्त वर्तमानकालीन सामूहिक सूचनांच्या बाबतीतच करावा लागतो असे नाही तर, संपूर्ण पृथ्वी-चेतनेशी संबंधित असणाऱ्या सामूहिक सूचनेच्या विरोधातही हा संघर्ष करावा लागतो. आणि या पार्थिव मानवी चेतनेचे मूळ मनुष्याची जेव्हा सर्वप्रथम निर्मिती झाली, घडण झाली तेथपर्यंत जाऊन पोहोचते. पेशींना ‘सत्या’ची, जडद्रव्याच्या ‘शाश्वतते’ची उत्स्फूर्तपणे जाणीव होण्यापूर्वी उपरोक्त सामूहिक सूचनांवर मात करावी लागते. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 15 : 292-293)

साधना, योग आणि रूपांतरण – २२२

आपल्याला समग्र रूपांतरण हवे आहे; शरीराचे आणि त्याच्या सर्व क्रियांचे रूपांतरण हवे आहे. पूर्वी जेव्हा ‘रूपांतरणा’विषयी बोलले जात असे तेव्हा तेथे केवळ आंतरिक चेतनेचे रूपांतरणच अभिप्रेत असे. ही सखोल चेतना स्वत:मध्ये शोधण्याचा व्यक्ती प्रयत्न करत असे; हे करत असताना, आंतरिक गतिविधींवरच लक्ष केंद्रित करायचे असल्याने, शरीराला आणि त्याच्या क्रियाकलापांना, ती व्यक्ती एक लोढणं समजत असे; आणि निरुपयोगी गोष्ट म्हणून त्यास ती धुडकावून देत असे.

परंतु, हे पुरेसे नसल्याचे श्रीअरविंदांनी स्पष्ट केले. जडभौतिक जगताने देखील या रूपांतरणामध्ये सहभागी व्हावे आणि त्यानेही या गहनतर ‘सत्या’ची अभिव्यक्ती करावी, अशी त्या ‘सत्या’कडून मागणी होत आहे, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु लोकांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना असे वाटले की, अंतरंगामध्ये काय घडत आहे याची अजिबात काळजी न करतादेखील शरीर आणि त्याच्या क्रिया यांचे रूपांतरण घडविणे शक्य आहे, अर्थात हे खरे नाही.

हे शारीरिक रूपांतरणाचे कार्य हाती घेण्यापूर्वी, म्हणजे जे सर्वात अवघड असे कार्य आहे ते हाती घेण्यापूर्वी, तुमची आंतरिक चेतना ही सत्यामध्ये दृढपणे प्रस्थापित झालेली असली पाहिजे; म्हणजे मग हे रूपांतरण म्हणजे त्या ‘सत्या’चा चरम आविष्कार असेल, किमान आत्ताच्या घडीपुरता तरी तो चरम असेल.

या रूपांतरणाचा प्रारंभबिंदू असतो ग्रहणशीलता! रूपांतरण प्राप्त करून घेण्यासाठीची ही अत्यावश्यक अट आहे. त्यानंतर चेतनेमध्ये परिवर्तन घडून येते. चेतनेचे हे परिवर्तन आणि त्याची पूर्वतयारी यांची तुलना नेहमी अंड्यातील कोंबडीच्या पिलाच्या घडणीशी केली जाते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अंडे जसेच्या तसे दिसत असते, त्यामध्ये काहीही बदल दिसत नाही आणि जेव्हा ते पिल्लू आत पूर्ण विकसित झालेले असते, पूर्णपणे सजीव झालेले असते, तेव्हा ते त्याच्या छोट्याशा चोचीने त्या कवचाला टोचे मारते आणि त्यातून बाहेर पडते. चेतनेच्या परिवर्तनाच्या क्षणीसुद्धा असेच काहीसे घडून येते.

दीर्घ काळपर्यंत काहीच घडत नाही असेच तुम्हाला वाटत असते; तुमची चेतना नेहमीप्रमाणेच आहे, त्यात काहीच बदल झालेला नाही असेच तुम्हाला वाटत असते. तुमच्यापाशी जर का उत्कट अभीप्सा असेल तर तुम्हाला कधीकधी विरोधदेखील जाणवतो; जणूकाही तुम्ही एखाद्या भिंतीवर धडका मारत आहात पण ती काही ढासळत नाही. मात्र जेव्हा तुमची अंतरंगातून तयारी झालेली असते तेव्हा एक शेवटचा प्रयत्न – तुमच्या अस्तित्वाच्या कवचाला धडका मारण्याचा एक प्रयत्न पुरेसा ठरतो आणि मग सर्वकाही खुले होते – आणि तुम्ही एका अन्य चेतनेमध्ये उन्नत झालेले असता.

मी असे म्हटले होते की ही मूलभूत समतोलाची क्रांती आहे. म्हणजे त्यामध्ये चेतनेचे संपूर्णतः प्रत्युत्क्रमण होते. लोलकामधून प्रकाश जेव्हा बाहेर पडतो तेव्हा जसे होते तसेच येथे होते. किंवा असे म्हणता येईल की, जणूकाही तुम्ही एखादा चेंडू आतून बाहेर वळवता (म्हणजे येथे चेंडूची आतली बाजू बाहेर आणि बाहेरची बाजू आतमध्ये जाते.) आणि ही गोष्ट चतुर्थ मितीशिवाय (fourth dimension) शक्य नसते. व्यक्ती येथे सामान्य त्रिमिती चेतनेमधून बाहेर पडून, अधिक उच्च अशा चतुर्थ मितीच्या चेतनेमध्ये प्रवेश करते. व्यक्ती अगणित मिती असलेल्या चेतनेमध्ये प्रवेश करते. हा अनिवार्य असा आरंभबिंदू असतो. जोपर्यंत तुमच्या चेतनेची ही मितीच बदलत नाही तोपर्यंत तुम्हाला वस्तुमात्रांविषयीची जी वरकरणी दृष्टी असते त्याच स्थितीमध्ये तुम्ही कायम राहता आणि त्यामुळे तुम्ही त्यांची अगाधता, गहनता गमावून बसलेले असता.

– श्रीमाताजी (CWM 04 : 18-19)

साधना, योग आणि रूपांतरण – २१९

चेतना ईश्वराप्रत खुली करणे, अधिकाधिकरित्या आंतरिक चेतनेमध्ये राहून, तेथून बाह्य जीवनावर कार्य करणे, आंतरतम असणाऱ्या चैत्य पुरुषाला (psychic) पुढे आणणे आणि त्याच्या शक्तीने अस्तित्वाचे अशा रीतीने शुद्धीकरण आणि परिवर्तन घडविणे की ज्यामुळे ते अस्तित्व रूपांतरणासाठी सज्ज होऊ शकेल आणि ‘दिव्य ज्ञान’, ‘दिव्य संकल्प’ आणि ‘दिव्य प्रेम’ यांच्याशी एकत्व पावू शकेल, हे पूर्णयोगाचे पहिले ध्येय आहे.

योगिक चेतना विकसित करणे म्हणजे, अस्तित्वाचे त्याच्या सर्व स्तरांवर वैश्विकीकरण करणे, ब्रह्मांड-पुरुषाविषयी आणि ब्रह्मांड-शक्तींविषयी (cosmic being and cosmic forces) जागृत होणे, आणि ‘अधिमानसा’पर्यंतच्या (Overmind) सर्व स्तरांवर ‘ईश्वरा’शी एकत्व पावणे, हे पूर्णयोगाचे दुसरे ध्येय आहे.

‘अधिमानसा’च्या पलीकडे असणाऱ्या, अतिमानसिक चेतनेद्वारे (supramental consciousness), परात्पर ‘ईश्वरा’च्या (transcendent Divine) संपर्कात येणे, चेतनेचे व प्रकृतीचे अतिमानसिकीकरण घडविणे आणि गतिशील अशा ‘दिव्य सत्या’च्या साक्षात्कारासाठी तसेच त्या सत्याच्या पार्थिव-प्रकृतीमधील रूपांतरकारी अवतरणासाठी स्वतःला त्याचे एक साधन बनविणे, हे पूर्णयोगाचे तिसरे ध्येय आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 20)

साधना, योग आणि रूपांतरण – १९५

उत्तरार्ध

मनुष्य स्वतःच्या प्रयत्नांनी मनुष्यत्वाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. मनोमय जीव, अन्य शक्तीच्या साहाय्याविना, स्वत:च्या शक्तीद्वारे स्वतःचे अतिमानसिक चैतन्यामध्ये परिवर्तन करू शकत नाही. मानवी धारकपात्राचे (receptacle) दैवीकरण केवळ ‘दिव्य प्रकृती’च्या अवतरणामुळेच होऊ शकते.

कारण आपल्या मन, प्राण आणि शरीर या गोष्टी त्यांच्या स्वत:च्या मर्यादांनी बांधल्या गेलेल्या असतात आणि त्या कितीही उन्नत झाल्या किंवा कितीही विस्तृत झाल्या तरीही त्या त्यांच्या प्राकृतिक सीमा ओलांडून वर जाऊ शकत नाहीत किंवा त्या सीमांच्या पलीकडे त्या विस्तारित देखील होऊ शकत नाहीत. परंतु असे असूनसुद्धा, मनोमय मनुष्य स्वतःच्या पलीकडे असणाऱ्या अतिमानसिक ‘प्रकाश’, ‘सत्य’ आणि ‘शक्ती’ यांच्याप्रत उन्मुख होऊ शकतो. आणि त्यांनी आपल्यामध्ये कार्य करावे आणि मन जे करू शकणार नाही ते त्यांनी करावे यासाठी तो त्यांना आवाहन करू शकतो. मन जरी स्वप्रयत्नाने, मनाच्या अतीत जे आहे ते होऊ शकत नसले तरी, अतिमानस अवतरित होऊन, मनाचे स्वत:च्या द्रव्यामध्ये रूपांतरण घडवू शकते.

मनुष्याने आपल्या विवेकशील सहमतीने आणि जागरूक समर्पणाने, अतिमानसिक ‘शक्ती’ला जर तिच्या स्वतःच्या गहन व सूक्ष्म अंतदृष्टीनुसार आणि लवचीक अंतःशक्तीनुसार कार्य करण्यास मुभा दिली तर, ती अतिमानसिक ‘शक्ती’, संथपणाने किंवा वेगाने, आपल्या सद्यकालीन अर्ध-परिपूर्ण प्रकृतीचे दिव्य ‘रूपांतरण’ घडवून आणेल.

या अवतरणामध्ये, या कार्यामध्ये धोका होण्याची आणि आपत्तीजनक पतन होण्याची शक्यता असते. अवतरित होणाऱ्या शक्तीचा जर मानवी मनाने किंवा प्राणिक इच्छेने ताबा घेतला आणि स्वतःच्या संकुचित व चुकीच्या कल्पनांनी किंवा सदोष व अहंकारी आवेगांनी त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न केला, (आणि हे काही प्रमाणात अटळसुद्धा असते;) तर जोपर्यंत कनिष्ठ मर्त्य प्रकृती ही महत्तर अशा अमर्त्य प्रकृतीच्या मार्गापैकी थोडाफार भाग तरी आत्मसात करत नाही, तोपर्यंत धडपडणे, किंवा विचलित होणे, कठीण आणि वरकरणी पाहता, दुर्लंघ्य वाटणारे अडथळे येणे, आघात होणे, दुःखभोग सहन करावे लागणे यांपासून सुटका नसते; एवढेच नव्हे तर संपूर्ण पतन होणे किंवा मृत्युमुखी पडणे याचीदेखील शक्यता असते. जेव्हा मन, प्राण आणि शरीर ‘ईश्वरा’प्रत जाणीवपूर्वक समर्पित व्हायला शिकतात, तेव्हाच फक्त ‘योगमार्ग’ सोपा, सरळ, जलद आणि सुरक्षित बनू शकतो.

आणि हे समर्पण आणि उन्मुखता ही फक्त ‘ईश्वरा’प्रतच असली पाहिजे, ती अन्य कोणाप्रत असता कामा नये. कारण आपले अंधकारमय मन आणि आपल्यामधील अशुद्ध प्राणशक्ती या गोष्टी, अ-दैवी आणि विरोधी शक्तींना समर्पित होण्याची शक्यता असते. एवढेच काय, पण चुकून त्या विरोधी शक्तींनाच ते ‘दैवी शक्ती’ समजण्याचीदेखील शक्यता असते. अन्य कोणतीच चूक याच्या इतकी घातक असू शकणार नाही. त्यामुळे आपले समर्पण हे अंध असता कामा नये, तसेच ते कोणत्याही प्रभावाप्रत किंवा सर्वच प्रभावांप्रत जडसुस्त निष्क्रियतेने शरणागती पत्करत आहे असेही असता कामा नये; तर ते समर्पण प्रामाणिक, सचेत, दक्ष आणि त्या एकमेवाद्वितीय आणि सर्वोच्चाप्रति एकनिष्ठ असले पाहिजे.

कितीही कठीण असले तरीही, ईश्वराप्रत आणि ‘दिव्य माते’प्रत आत्म-समर्पण, हेच आपले एकमात्र प्रभावशाली साधन असले पाहिजे आणि तेच आपले एकमेव कायमसाठीचे आश्रयस्थान असले पाहिजे. दिव्य मातेप्रति आत्मसमर्पण याचा अर्थ असा की, आपली प्रकृती तिच्या हातामधील एक साधन झाले पाहिजे, आणि आपला आत्मा हा त्या दिव्य मातेच्या कुशीमधील बालक झाले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 170-171)