साधना, योग आणि रूपांतरण – ९८
‘अधिमानस’ (overmind) किंवा ‘अतिमानसा’च्या (supermind) विकसनाच्या कितीतरी आधी ‘चैतन्या’चा साक्षात्कार होतो. प्रत्येक काळातल्या शेकडो साधकांना आजवर उच्चतर मानसिक पातळ्यांवर (बुद्धेः परत:) ‘आत्म’साक्षात्कार झालेला आहे पण त्यांना अतिमानसिक साक्षात्कार झालेला नाही. व्यक्तीला ‘आत्म्या’चा किंवा ‘चैतन्याचा किंवा ‘ईश्वरा’चा मानसिक, प्राणिक किंवा अगदी शारीरिक पातळीवरही ‘आंशिक’ साक्षात्कार होऊ शकतो आणि व्यक्ती जेव्हा मनुष्याच्या सामान्य मानसिक पातळीच्या वर उच्चतर आणि विशालतर मनामध्ये उन्नत होते तेव्हा, ‘आत्मा’ त्याच्या सर्व सचेत व्यापकतेनिशी प्रकट होऊ लागतो.
‘आत्म्या’च्या या व्यापकतेमध्ये संपूर्णतया प्रवेश केल्यामुळे मानसिक कृतींचा निरास होणे शक्य होते आणि व्यक्तीला आंतरिक ‘निश्चल-नीरवता’ लाभते. आणि मग त्यानंतर, व्यक्ती कोणत्याही प्रकारची कृती करत असली तरी तिच्यामधील ही आंतरिक ‘निश्चल-नीरवता’ तशीच टिकून राहते; व्यक्ती अंतरंगांतून निश्चलच राहते, साधनभूत अस्तित्वामध्ये कृती चालू राहते आणि मग भलेही ती कृती मानसिक असो, प्राणिक असो किंवा शारीरिक असो, या कृतीच्या अंमलबजावणीसाठी, आवश्यक असणाऱ्या सर्व चालना, प्रेरणा ‘आत्म्या’च्या या मूलभूत शांतीला आणि स्थिरतेला बाधा न आणता, उच्चतर स्त्रोताकडून व्यक्तीला मिळत राहतात.
‘अधिमानसिक’ आणि ‘अतिमानसिक’ अवस्था वर वर्णन केलेल्या अवस्थांपेक्षाही अधिक उच्च स्तरावरील असतात. परंतु तुम्हाला त्यांचे आकलन व्हायला हवे असेल तर, तुम्हाला आधी आत्म-साक्षात्कार झालेला असला पाहिजे, आध्यात्मिकीकरण झालेल्या मनाची आणि हृदयाची पूर्ण कृती तुमच्याकडून होत असली पाहिजे; चैत्य जागृती, बंदिस्त असलेल्या चेतनेची मुक्ती, आधाराचे शुद्धीकरण आणि त्याचे संपूर्ण उन्मीलन झालेले असले पाहिजे.
‘अधिमानस’, ‘अतिमानस’ या उच्चकोटीच्या गोष्टींचा आत्ताच विचार करू नका. तर मुक्त झालेल्या प्रकृतीमध्ये उपरोक्त अधिष्ठान निर्माण करण्याचा प्रयत्न करा.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 413)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…