ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

अंतरात्म्यापर्यंत जाण्याचा मार्ग

साधना, योग आणि रूपांतरण – ३१

साधक : माताजी, इथे श्रीअरविंदांनी असे लिहिले आहे की, “जोपर्यंत तुमची चेतना उन्नत होत नाही तोपर्यंत पूर्णयोगामध्ये एकाग्रतेचे मुख्य केंद्र हे हृदय-केंद्रच असले पाहिजे.” परंतु प्रत्येकाची चेतना ही वेगवेगळ्या स्तरावर असते ना?

श्रीमाताजी : हो, ती व्यक्तिगणिक भिन्नभिन्न स्तरावर असते. मात्र असे नेहमीच सांगितले जाते की, “येथे हृदय-केंद्रावर, छातीच्या मध्यभागी लक्ष एकाग्र करा. कारण याच ठिकाणी सर्वाधिक सहजतेने तुम्हाला अंतरात्म्याचा किंवा चैत्य अस्तित्वाचा (psychic) शोध लागू शकतो. येथेच तुम्ही अंतरात्म्याच्या संपर्कात येऊ शकता.” आणि म्हणूनच तसे म्हटले आहे.

साधक : चेतना उन्नत झाली तर व्यक्तीला ती कोठे आढळते ?

श्रीमाताजी : मस्तकाच्या वर, मनाच्या वर. श्रीअरविंदांच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, व्यक्ती जोपर्यंत मनाच्या पलीकडे, आणि सर्वस्वी उच्चतर प्रांतांमध्ये गेलेली नसते, तसेच जोपर्यंत ती मानवी चेतनेमध्ये, म्हणजे मानसिक, प्राणिक, शारीरिक चेतनेमध्येच असते तोपर्यंत व्यक्तीने अंतरात्म्याचाच शोध घेण्याच्या दृष्टीने एकाग्रता केली पाहिजे. फक्त जर तुम्ही मानवी चेतनेपासून उन्नत झाला असाल आणि मनाच्या वर असणाऱ्या, खूप वर असणाऱ्या उच्चतर प्रांतांमध्ये जाणीवपूर्वकपणे प्रवेश केला असेल तर तुम्हाला अंतरात्म्यावर लक्ष एकाग्र करण्याची आवश्यकता नसते; कारण तुम्हाला त्याचा शोध स्वाभाविकपणेच लागेल.

परंतु मानसिक चेतनेच्या वर उन्नत होणे, म्हणजे उच्चतर तार्किक, कल्पनाशील मनामध्ये उन्नत होणे असे नाही तर, सर्व मानसिक गतिविधींच्या अतीत होणे, (आणि) ही काही साधी सोपी गोष्ट नाही. त्याची सुरुवात करायची झाली तर, मन हे पूर्णपणे शांत, स्थिर असले पाहिजे, अन्यथा व्यक्ती तसे करू शकणार नाही. मन जेव्हा संपूर्ण शांतीमध्ये, परिपूर्ण अचंचलतेमध्ये प्रवेश करते, तसेच जेव्हा मन हे, वर जे काही आहे त्याचे प्रतिबिंब दाखविणारे जणू एक आरसाच बनते; तेव्हा व्यक्ती (मनाच्या वर) उन्नत होऊ शकते. परंतु जोपर्यंत मनाची चंचलता चालू असते तोपर्यंत मनाच्या अतीत जाण्याची अजिबातच आशा नसते.

पण भावभावना आणि अंतरात्मिक गोष्टी यांची तुम्ही गल्लत करता कामा नये. या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लोकांना नेहमी असे वाटते की त्यांच्यामध्ये भावभावना जागृत होत आहेत म्हणजे ते आता अंतरात्मिक प्रांतामध्ये प्रवेश करत आहेत. परंतु भावभावनांचा अंतरात्मिक गोष्टींशी काही संबंध नसतो, भावभावना या निव्वळ प्राणिक असतात. तुम्हाला म्हणायचे असेल तर फार फार तर असे म्हणता येईल की, भावभावना हा प्राणशक्तीचा सर्वात सूक्ष्म भाग असतो; पण तरीसुद्धा त्या प्राणिकच असतात. तुम्ही भावभावनांच्या माध्यमातून अंतरात्म्यापर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही. तर अत्यंत उत्कट अभीप्सेद्वारे आणि ‘स्व’पासून अलिप्त झाल्यावर तुम्ही अंतरात्म्यापर्यंत जाऊन पोहोचू शकता.

– श्रीमाताजी (CWM 07 : 248-249)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

मुलांचे संगोपन

(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…

15 hours ago

विजयाची खात्री

जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…

2 days ago

सकारात्मक वृत्तीचा परिणाम

  (लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…

3 days ago

स्वप्नांवर विश्वास ठेवा

उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…

4 days ago

उपयुक्ततावादाचा आजार

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…

5 days ago

शिक्षण आणि संस्कृती

व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…

6 days ago