साधना, योग आणि रूपांतरण – १७ (भाग ०१)
(श्रीअरविंद आश्रमामध्ये श्रीमाताजी साधकांसमवेत ध्यानाला बसत असत. त्यांचा हा उपक्रम अनेक वर्षे चालू होता. तेथे आणि इतरत्र जो अनुभव त्यांनी घेतलेला होता, त्या अनुभवाच्या आधारे श्रीमाताजी येथे काही निरीक्षणे नोंदवत आहेत. श्रीमाताजींची ही निरीक्षणे पाच भागांमध्ये देत आहोत.)
साधक : “असे काही जण असतात की, जे ध्यानाला बसले असता, त्यांना जी स्थिती अतिशय उत्तम आणि आनंदी वाटते अशा एका स्थितीमध्ये जातात,” असे तुम्ही मागे एकदा सांगितले होते. ही स्थिती नेमकी कशी असते?
श्रीमाताजी : ती स्थिती कोणती का असेना, त्यांची ती स्थिती त्यांना आनंदमय आणि विलक्षण वाटते. आपण कोणीतरी विशेष आहोत असे त्यांचे स्वतःविषयी मत असते. ते स्वतःला असामान्य समजत असतात कारण ते अजिबात हालचाल न करता, शांतपणे एका जागी स्थिर बसू शकतात आणि त्यातून जर एकही विचार त्यांच्या मनात आला नाही तर, मग ते त्यांना फारच विलक्षण वाटते. परंतु सहसा त्यांच्या डोक्यामध्ये एक प्रकारच्या शोभादर्शक यंत्रासारखी (kaleidoscope) स्थिती असते (त्यांच्या डोक्यात अगदी क्षणाक्षणाला वेगवेगळे विचार येत राहतात), पण त्यांना त्याची जाणीवदेखील नसते. असो. तर जे क्षणभरासाठी अगदी अविचल, काहीही न बोलता, विचार न करता राहू शकतात, त्यांचे स्वतःविषयीचे मत निश्चितपणे खूप चांगले असते.
फक्त एवढेच की, मी म्हटले त्याप्रमाणे, जर त्यांना त्या ध्यानावस्थेतून कोणी बाहेर काढले, — कोणीतरी आले आणि त्यांनी दारावर थाप दिली आणि म्हटले की, “अमुक एक जण तुमची वाट पाहत आहे,” किंवा “अहो ताई, तुमचे बाळ रडत आहे,” तर मग ते ताबडतोब संतप्त होतात आणि म्हणतात, “काय हे! तुम्ही माझे ध्यान बिघडवलेत, पूर्णपणे बिघडवलेत.” अशा ज्या गोष्टी मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत त्याच मी तुम्हाला सांगत आहे. हे लोक त्यांच्या ध्यानाबाबत अतिशय काटेकोर असायचे आणि त्यांच्या ध्यानामध्ये कोणी अडथळा आणला की ते प्रचंड क्रोधित व्हायचे. …अर्थातच हे काही महान आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण नाही. मग ते आल्यागेल्या प्रत्येकावरच चिडचिड करत राहायचे कारण कोणीतरी त्यांना त्यांच्या अतिशय आनंदमय अशा ध्यानमग्न स्थितीमधून बाहेर काढलेले असायचे. (क्रमशः)
– श्रीमाताजी (CWM 05 : 41)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…