ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

रामायण – राष्ट्रीय चारित्र्याची घडण (भाग ०२)

भारत – एक दर्शन २४

महाभारताप्रमाणेच रामायणाच्या कवीनेसुद्धा त्याचा काव्यविषय म्हणून एक इतिहास, प्राचीन भारतीय वंशाशी संबंधित अशी एक प्राचीन कथा किंवा आख्यान हाती घेतले होते आणि त्याने त्यामध्ये आख्यायिकांमधील आणि लोकसाहित्यामधील तपशिलांची भर घातली. एवढेच नव्हे तर, त्यांचे जे उदात्त प्रयोजन होते, जो उदात्त अर्थ होता तो अर्थ त्या काव्याला स्वतःमध्ये अधिक सुयोग्यरीतीने धारण करता यावा यासाठी त्या कवीने त्यांना महाकाव्याच्या एका भव्योदात्त स्तरावर नेले. पार्थिव जीवनामध्ये आसुरी शक्तींबरोबर ईश्वरी शक्तीचा जो लढा चालू असतो तो लढा हाच महाभारताप्रमाणेच रामायणाचाही विषय आहे, परंतु रामायणामध्ये तो महाभारतापेक्षा अधिक शुद्ध आदर्शवादी रूपामध्ये मांडला आहे, तसेच त्याला अलौकिक परिणाम देण्यात आले आहेत आणि येथे मानवी व्यक्तिमत्त्वांमधील चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टी काल्पनिकरित्या अधिक फुलवून सांगण्यात आलेल्या आहेत. एका बाजूला त्यामध्ये आदर्श मानवतेचे चित्रण आहे, सद्गुणांचे, नीतिमान व्यवस्थेचे दिव्य सौंदर्य दर्शविले आहे, धर्मावर आधारित सभ्यतेचे (civilization) दर्शन येथे घडविले आहे आणि या सभ्यतेमध्ये उदात्त नैतिक आदर्श दाखविले आहेत. त्यातील सौंदर्यपूर्ण सुडौलता, सुसंवाद आणि माधुर्य यांचे अनन्य आकर्षण वाटावे इतक्या प्रभावीपणे त्यांचे सादरीकरण करण्यात आले आहे; तर दुसऱ्या बाजूला अमानुष अहंकार, स्वार्थमूलक इच्छा आणि उन्मादपूर्ण हिंसा यांच्या रानटी, अराजकतापूर्ण आणि जवळजवळ आकारहीन शक्तींचे सादरीकरण करण्यात आले आहे. मानसिक प्रकृतीच्या या दोन संकल्पना आणि शक्ती येथे जिवंत आणि मूर्तरूप धारण करतात आणि त्यांच्यात संघर्ष होतो, आणि राक्षस आणि दिव्य मानव यांच्या निर्णायक संघर्षामध्ये, राक्षसावर दिव्य मानवाचा विजय होण्यामध्ये त्याची परिणती होते.

संकल्पनेची एकेरी विशुद्धता ज्यामुळे कमी होईल, पात्रांच्या रूपरेषांमधील प्रातिनिधिक शक्ती, आणि पात्रांच्या स्वभाववैशिष्ट्यांची अर्थवत्ता ज्यामुळे क्षीण होईल अशा सर्व छटा आणि अशी सर्व जटिलता रामायणामधून वगळण्यात आलेली आहे, आणि त्याचे आवाहन आणि त्यांचे महत्त्व मानवी हृदयापर्यंत जाऊन पोहोचेल इतपतच त्या गोष्टींना येथे स्थान देण्यात आले आहे. (क्रमश: …)

– श्रीअरविंद [CWSA 20 : 349-350]

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १८

“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…

2 hours ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७

(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य‌’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…

1 day ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६

पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…

2 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १५

हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…

3 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १४

तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…

4 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १३

आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना‌, परम संकल्पशक्ती‌ हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…

5 days ago