आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा असुरसुद्धा ईश्वराला फसवू शकत नाही. पण हे सारे समजत असूनदेखील, आपण पाहतो की, बरेचदा दिवसाच्या धावपळीत व्यक्ती स्वत:लाच फसवत असते आणि तिला त्याची जाणीवसुद्धा नसते. अगदी सहजपणे, अगदी अभावितपणे व्यक्ती अशी फसवणूक करत असते. ती नेहमीच स्वत:च्या शब्दांचे आणि कृतींचे समर्थन करत असते. सुरुवाती-सुरुवातीला नेहमी हेच घडत असते. ”चूक दुसऱ्याचीच आहे,” असे भांडणामध्ये व्यक्ती म्हणत असते, पण यांसारख्या अगदी उघड गोष्टींविषयी मी सांगत नाहीये, तर मी दैनंदिन जीवनातील लहान-सहान गोष्टींविषयी सांगत आहे.
मी एकदा असा एक छोटा मुलगा पाहिला होता की जो खेळता-खेळता अनवधानामुळे एका दारावर धडकला पण (स्वत:च्या चुकीकडे लक्ष देण्याऐवजी तो त्या दारावरच चिडला आणि) त्याने दारालाच जोरात लाथ मारली. ही गोष्टही अशीच आहे. नेहमी दुसरी व्यक्तीच चुकीची असते, तीच चूक करत राहते, असे व्यक्तीला वाटत असते. बाल्यावस्था पार केल्यावर पुरेशी समज आल्यानंतरसुद्धा तुम्ही स्वत:चे समर्थन करताना अगदी असाच मूर्खपणा करत असता आणि म्हणता, “त्याने जर तसे केले नसते तर मी पण मग असा वागलो नसतो.’’ वास्तविक, हे याच्या अगदी उलट असले पाहिजे.
समजा तुमच्या सोबत कोणीतरी आहे; तुमच्या सोबतची ती व्यक्ती भलेही प्रामाणिकपणे वागो किंवा न वागो, पण तुम्ही जर प्रामाणिक असाल, तर तुमची सहज-स्वाभाविक प्रतिक्रिया जे योग्य आहे तेच करण्याची असेल तर, त्यालाच मी ‘प्रामाणिक असणे’ असे म्हणते.
एक अगदी साधेसे उदाहरण घेऊ या. समजा एखाद्याला तुमचा राग आला आहे. अशा वेळी, उलटून परत त्याला दुखावणाऱ्या, बोचणाऱ्या गोष्टी न बोलता, तुम्ही काहीच न बोलता, शांत राहिलात तर तुम्हाला त्याच्या रागाचा संसर्ग होत नाही. अशा वेळी तुम्ही स्वतःचेच निरीक्षण करून पाहिलेत तर, तुमच्या लक्षात येईल की, असे करणे किती अवघड आहे. खरंतर, ही गोष्ट तशी अगदी प्राथमिक स्वरूपाची आहे. आपण प्रामाणिक आहोत किंवा नाही हे जाणण्यासाठीची ही एक छोटीशी सुरुवात आहे. तुम्ही सर्वसाधारणपणे कितीही प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केलात तरीसुद्धा, तुम्ही भेदक नजरेने स्वतःचे निरीक्षण केलेत तर, शेकडो वेळा तरी तुम्हाला स्वतःमधील अप्रामाणिकपणा आढळून येईल. आणि मग प्रामाणिकपणे वागणे किती अवघड असते, हे तुमच्या लक्षात येईल.
– श्रीमाताजी (CWM 05 : 06)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…