ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०१

 

साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा, शारीरिक प्रामाणिकपणा असा काही फरक असतो का?

श्रीमाताजी : प्रामाणिकपणाचे तत्त्व साहजिकपणे सर्वत्र समान असते, पण व्यक्तीच्या अवस्थेनुसार प्रामाणिकपणाच्या कार्यपद्धतीमध्ये फरक पडतो. ‘संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का?’ या तुमच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल ‘नाही’ असे म्हणावे लागेल. मनुष्य आत्ता जसा आहे तसाच राहिला तर त्याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. मात्र, संपूर्णतया प्रामाणिक होण्यासाठी आवश्यक असणारी, स्वतःमध्ये रूपांतरण घडविण्याची पुरेशी शक्यता मनुष्यामध्ये आहे.

प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की, प्रामाणिकपणा उत्तरोत्तर वाढत जाणारा असतो. ज्याप्रमाणे व्यक्तीचा विकास होतो व तिची प्रगती होते, तसेच, ज्याप्रमाणे विश्व हे त्याच्या निर्मिती-प्रक्रियेदरम्यान उलगडत जाते त्याप्रमाणे प्रामाणिकपणाने देखील स्वत:ला निरंतर परिपूर्ण करत नेले पाहिजे. या विकासातील प्रत्येक थांब्यामुळे, मुक्कामामुळे कालचा प्रामाणिकपणा हा अपरिहार्यपणे उद्याचा अप्रामाणिकपणा ठरतो.

संपूर्णतया प्रामाणिक राहायचे झाले तर, पसंती-नापसंती, वासना, आकर्षण-प्रतिकर्षण, सहानुभूती किंवा द्वेषभावना, आसक्ती वा तिटकारा नसणे ही अत्यावश्यक गोष्ट आहे. व्यक्तीने वस्तुंविषयी समग्र दृष्टिकोन बाळगला पाहिजे, त्या दृष्टिकोनामध्ये प्रत्येक गोष्ट आपापल्या योग्य स्थानी असते आणि सर्व गोष्टींकडे पाहण्याचा व्यक्तीचा दृष्टिकोन समानच म्हणजे, सत्यदर्शनाचा असतो. वर सांगितलेली गोष्ट अंमलात आणणे मनुष्याकरता अत्यंत अवघड आहे हे तर उघडच आहे. एखाद्या व्यक्तीने स्वतःला दिव्यत्वामध्ये रूपांतरित करण्याचा निश्चय केल्याशिवाय, सर्व प्रकारच्या आंतरिक द्वंद्वांपासून मुक्त होणे ही बाब जवळजवळ अशक्यप्राय असते आणि जोपर्यंत मनुष्यामध्ये अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत, तो संपूर्णतया प्रामाणिक होऊ शकत नाही. परिणामतः त्याचे मानसिक, प्राणिक आणि शारीरिक कार्य अप्रामाणिकपणाचे होऊन जाते. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 08 : 397-398)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

विजयाची खात्री

जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…

9 hours ago

सकारात्मक वृत्तीचा परिणाम

  (लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…

1 day ago

स्वप्नांवर विश्वास ठेवा

उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…

2 days ago

उपयुक्ततावादाचा आजार

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…

3 days ago

शिक्षण आणि संस्कृती

व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…

4 days ago

शिक्षणाचे ध्येय

(‘श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन’ या श्रीअरविंद आश्रमाच्या शाळेमध्ये मुलांच्या आंतरात्मिक आणि आध्यात्मिक विकासाला पोषक…

5 days ago