साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा, शारीरिक प्रामाणिकपणा असा काही फरक असतो का?
श्रीमाताजी : प्रामाणिकपणाचे तत्त्व साहजिकपणे सर्वत्र समान असते, पण व्यक्तीच्या अवस्थेनुसार प्रामाणिकपणाच्या कार्यपद्धतीमध्ये फरक पडतो. ‘संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का?’ या तुमच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल ‘नाही’ असे म्हणावे लागेल. मनुष्य आत्ता जसा आहे तसाच राहिला तर त्याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. मात्र, संपूर्णतया प्रामाणिक होण्यासाठी आवश्यक असणारी, स्वतःमध्ये रूपांतरण घडविण्याची पुरेशी शक्यता मनुष्यामध्ये आहे.
प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की, प्रामाणिकपणा उत्तरोत्तर वाढत जाणारा असतो. ज्याप्रमाणे व्यक्तीचा विकास होतो व तिची प्रगती होते, तसेच, ज्याप्रमाणे विश्व हे त्याच्या निर्मिती-प्रक्रियेदरम्यान उलगडत जाते त्याप्रमाणे प्रामाणिकपणाने देखील स्वत:ला निरंतर परिपूर्ण करत नेले पाहिजे. या विकासातील प्रत्येक थांब्यामुळे, मुक्कामामुळे कालचा प्रामाणिकपणा हा अपरिहार्यपणे उद्याचा अप्रामाणिकपणा ठरतो.
संपूर्णतया प्रामाणिक राहायचे झाले तर, पसंती-नापसंती, वासना, आकर्षण-प्रतिकर्षण, सहानुभूती किंवा द्वेषभावना, आसक्ती वा तिटकारा नसणे ही अत्यावश्यक गोष्ट आहे. व्यक्तीने वस्तुंविषयी समग्र दृष्टिकोन बाळगला पाहिजे, त्या दृष्टिकोनामध्ये प्रत्येक गोष्ट आपापल्या योग्य स्थानी असते आणि सर्व गोष्टींकडे पाहण्याचा व्यक्तीचा दृष्टिकोन समानच म्हणजे, सत्यदर्शनाचा असतो. वर सांगितलेली गोष्ट अंमलात आणणे मनुष्याकरता अत्यंत अवघड आहे हे तर उघडच आहे. एखाद्या व्यक्तीने स्वतःला दिव्यत्वामध्ये रूपांतरित करण्याचा निश्चय केल्याशिवाय, सर्व प्रकारच्या आंतरिक द्वंद्वांपासून मुक्त होणे ही बाब जवळजवळ अशक्यप्राय असते आणि जोपर्यंत मनुष्यामध्ये अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत, तो संपूर्णतया प्रामाणिक होऊ शकत नाही. परिणामतः त्याचे मानसिक, प्राणिक आणि शारीरिक कार्य अप्रामाणिकपणाचे होऊन जाते. (क्रमश:)
– श्रीमाताजी (CWM 08 : 397-398)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…