ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

महाकाव्यांचे कार्य

भारत – एक दर्शन २२

महाभारत हा ‘पाचवा वेद’ आहे, असे म्हटले जाते. रामायण आणि महाभारत ही दोन्ही काव्यं म्हणजे फक्त महाकाव्यंच आहेत असे नाही तर, ती धर्मशास्त्रं आहेत; ती धार्मिक, नैतिक, सामाजिक आणि राजकीय शिकवणुकीचा एक मोठा भाग आहेत, असेही म्हटले जाते. आणि या महाकाव्यांचा लोकांच्या जीवनावर आणि त्यांच्या मनावर इतका प्रभाव आहे, या महाकाव्यांची लोकांवर एवढी पकड आहे की, ही महाकाव्यं म्हणजे भारतीय लोकांचे बायबलच (धर्मग्रंथ) जणू, असे त्यांचे वर्णन केले जाते. परंतु ही उपमा तितकीशी बरोबर नाही, कारण भारतीय लोकांच्या धर्मग्रंथांमध्ये वेद आणि उपनिषदांचा, तसेच पुराणे आणि तंत्रग्रंथांचा आणि धर्मशास्त्रांचादेखील समावेश होतो, या व्यतिरिक्त विविध प्रादेशिक भाषांमध्ये असलेल्या विपुल धार्मिक काव्यसंपदेची तर गोष्टच निराळी, येथे तर त्यांचा विचारच केलेला नाही. उच्च तात्त्विक आणि नैतिक संकल्पना आणि सांस्कृतिक आचारविचार लोकप्रिय करणे हे या महाकाव्यांचे कार्य होते; अंतर्यामी आणि विचारांमध्ये जे जे काही सर्वोत्तम होते, किंवा जीवनाशी जे निष्ठा बाळगणारे होते, किंवा सर्जनशील कल्पनाशक्तीला आणि आदर्श मनाला जे वास्तव वाटत होते किंवा जे भारतीय सामाजिक, नैतिक, राजकीय आणि धार्मिक संस्कृतीवर प्रकाश टाकणारे, वैशिष्ट्यपूर्ण असे होते, ते ते सारे अगदी उठावदारपणे, प्रभावीपणे, ठाशीवपणे बाहेर आणायचे हे या महाकाव्यांचे कार्य होते. त्याची काव्यात्मक कथेच्या पार्श्वभूमीवर, महान काव्याच्या चौकटीमध्ये बसवून, आणि ज्या थोर व्यक्तिमत्त्वांनी जनमानसाच्या राष्ट्रीय स्मृतींमध्ये घर केले होते, जी व्यक्तिमत्त्वे ही एकप्रकारे प्रातिनिधिक व्यक्तिमत्त्वेच बनली होती अशा थोर व्यक्तिमत्त्वांभोवती त्यांची गुंफण करून ते कार्य करण्यात आले होते.

या सर्व गोष्टी या महाकाव्यांमध्ये मोठ्या कलात्मक शक्तीने आणि परंपरांना काहीसे पौराणिक, काहीसे ऐतिहासिक रूप देत, काव्यरूपी देहामध्ये कथात्मक परिणाम देत, एकत्रित करण्यात आल्या होत्या, परंतु येथील जनतेकडून त्यांच्या धर्माचा एक भाग म्हणून आणि अत्यंत सखोल आणि एक जिवंत सत्य या भूमिकेतून या महाकाव्यांचा परिपोष करण्यात आला.

अशा प्रकारे रचण्यात आलेली महाभारत आणि रामायण ही महाकाव्यं, मग ती मूळ संस्कृतामध्ये असोत की प्रादेशिक बोलीभाषांमध्ये पुनर्रचना केलेली असोत, ती महाकाव्यं कथेकऱ्यांनी, भाटगायन करणाऱ्यांनी, पठण करणाऱ्या मंडळींनी, कीर्तनकारांनी जनसामान्यांपर्यंत पोहोचवली; ती लोकशिक्षणाची आणि लोकसंस्कृतीची प्रमुख साधने बनली, टिकून राहिली; त्या महाकाव्यांनी जनसामान्यांच्या सौंदर्यात्मक आणि धार्मिक मनांची, विचारांची, चारित्र्याची जडणघडण केली आणि एवढेच नव्हे तर त्यांनी, अगदी अशिक्षित, अडाणी लोकांनादेखील तत्त्वज्ञान, नीती, सामाजिक आणि राजकीय संकल्पना, सौंदर्यात्मक भावना, काव्य, कादंबरी आणि प्रणयरम्य साहित्य यांचे पुरेसे बाळकडू दिले.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 346]

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

स्वत:ला न फसविणे अवघड

  व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…

7 hours ago

प्रामाणिकपणा आणि स्व-समर्थन

  आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…

1 day ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०४

  (भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…

2 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०३

  (भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…

3 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०२

  भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…

4 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०१

  साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…

5 days ago