ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

स्वतःचे आध्यात्मिक वातावरण

आध्यात्मिकता २७

साधक : श्रीअरविंद यांनी असे लिहिले आहे की, “बाह्य परिस्थितीपेक्षा आध्यात्मिक वातावरण अधिक महत्त्वाचे असते; एखाद्या व्यक्तीला जर का ते मिळाले आणि व्यक्ती श्वासोच्छ्वास करण्यासाठी आणि त्यामध्ये जगण्यासाठी जर स्वतःचे आध्यात्मिक वातावरण तयार करू शकली तर, ती प्रगतीसाठी खरी सुयोग्य परिस्थिती असते.” व्यक्तीला असे आध्यात्मिक वातावरण कसे मिळू शकेल आणि व्यक्ती खरे आध्यात्मिक वातावरण कशा रीतीने निर्माण करू शकेल?

श्रीमाताजी : नेमकेपणाने सांगायचे झाले तर, आंतरिक साधनेद्वारे हे वातावरण तयार करणे शक्य असते. तुमचे विचार नियंत्रित करून, त्यांना पूर्णपणे साधनेकडे वळवून; तुमच्या कृती नियंत्रित करून, त्यांना पूर्णपणे साधनेकडे वळवून; सर्व वासना आणि निरूपयोगी, बाह्य, सामान्य गतिविधी संपुष्टात आणून; अधिक उत्कट आंतरिक जीवन जगून आणि सामान्य गोष्टी, सामान्य विचार, सामान्य प्रतिक्रिया, सामान्य कृती यांपासून स्वतःला अलग करून, तुम्ही असे वातावरण निर्माण करू शकता. तुम्ही असे केलेत तर तुम्ही स्वतःभोवती अशा प्रकारचे आध्यात्मिक वातावरण तयार करता.

उदाहरणार्थ, कोणतेतरी सवंग साहित्य वाचणे आणि वायफळ गप्पा मारत बसणे आणि काहीबाही करत बसणे यापेक्षा योगमार्गाचे अनुसरण करण्यासाठी साहाय्यकारी साहित्य तुम्ही वाचलेत, ईश्वरी साक्षात्काराकडे घेऊन जाणाऱ्या गोष्टींशी साजेशा कृती तुम्ही केल्यात, सर्व वासना आणि बाह्य गोष्टींकडे वळलेले सर्व भावनावेग तुम्ही तुमच्यामधून नष्ट केलेत, तुम्ही तुमचे मानसिक अस्तित्व शांत केलेत, तुमच्या प्राणिक अस्तित्वाचे शमन केलेत, बाहेरून येणाऱ्या सूचनांपासून तुम्ही स्वत:ला संरक्षित केलेत आणि तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या माणसांच्या कृतीपासून स्वतःला संरक्षित केलेत, तर ज्याला काहीही स्पर्श करू शकणार नाही असे आध्यात्मिक वातावरण तुम्ही तयार करता. आणि मग ते वातावरण कोणत्याही बाह्य परिस्थितीवर यत्किंचितही अवलंबून नसते किंवा ते वातावरण तुम्ही ज्यांच्यासोबत राहता किंवा ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही राहता त्या परिस्थितीवर यत्किंचितही अवलंबून नसते. कारण तुम्ही आता तुमच्या आध्यात्मिक वातावरणामध्ये सुरक्षित असता.

पण हे स्पष्ट आहे की, जर तुम्ही सर्व दारे उघडलीत, लोक काय सांगतात हे ऐकत राहिलात, अमुक एकाचा सल्ला, आणि तमुक कोणाच्या अंतःसूचनांचे तुम्ही अनुसरण करत राहिलात, आणि बाह्यवर्ती गोष्टींसाठीच्या वासनांनी वखवखलेले राहिलात, तर तुम्ही स्वत:साठी आध्यात्मिक वातावरण निर्माण करू शकणार नाही. तसे वागलात तर, इतर सर्वसामान्यांसारखेच तुमचे वातावरणही सर्वसामान्यच असेल.

– श्रीमाताजी [CWM 06 : 356-357]

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

प्रामाणिकपणा आणि चिकाटी

  (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…

8 hours ago

ईश्वराच्या निवासाचे दरवाजे

  अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…

1 day ago

अप्रामाणिकपणाचा अडथळा

  (एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…

2 days ago

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी…

  पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…

3 days ago

योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय

  तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…

4 days ago

योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल

  तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…

5 days ago