आध्यात्मिकता १७
…तुम्ही जेव्हा ‘ईश्वरा’कडे येता तेव्हा तुम्ही तुमच्या सर्व मानसिक संकल्पना टाकून दिल्या पाहिजेत; परंतु तसे करण्याऐवजी, उलट, तुम्ही तुमच्या संकल्पना ‘ईश्वरा’वर लादू पाहता आणि ‘ईश्वरा’ने त्याप्रमाणे वागावे असे तुम्हाला वाटते. ‘योगी’ व्यक्तीचा खरा दृष्टिकोन एकच असतो आणि तो म्हणजे, अशा व्यक्तीने घडणसुलभ (plastic) असले पाहिजे आणि जी काही ‘ईश्वरी आज्ञा’ असेल, तिचे पालन करण्यास सज्ज असले पाहिजे; त्याला कोणतीच गोष्ट अत्यावश्यक वाटता कामा नये, तसेच त्याला कोणत्या गोष्टीचे ओझेही वाटता कामा नये.
ज्यांना ‘आध्यात्मिक जीवन’ जगायची इच्छा असते बहुधा त्यांची पहिली प्रतिक्रिया, त्यांच्यापाशी जे जे काही आहे त्याचा त्याग करायचा हीच असते; परंतु, ‘ईश्वरार्पणा’च्या इच्छेने नव्हे तर, त्यांना ओझ्यापासून सुटका हवी असते, म्हणून ते तसे करतात. ज्या लोकांपाशी संपत्ती असते आणि ज्या गोष्टींमुळे त्यांना ऐशोआराम मिळतो, आनंद मिळतो अशा गोष्टी ज्यांच्या सभोवार असतात अशा व्यक्ती जेव्हा ‘ईश्वरा’कडे वळतात तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया या सगळ्या गोष्टींपासून दूर पळण्याची असते, किंवा, ते म्हणतात त्याप्रमाणे त्यांना, ”या गोष्टींच्या बंधनातून सुटका करून घ्यायची असते.” पण ही गोष्ट चुकीची आहे.
ज्या गोष्टी तुमच्या असतात, त्या ‘तुमच्या’ आहेत असे तुम्ही मानता कामा नये, कारण त्या ‘ईश्वरा’च्या असतात. तुम्ही त्यांचा उपभोग घ्यावा असे ‘ईश्वरा’ला वाटत असेल तर, त्यांचा उपयोग तुम्ही करावा; परंतु दुसऱ्याच क्षणी हसतमुखाने त्यांचा त्याग करण्यासाठीही तुम्ही सज्ज असले पाहिजे.
– श्रीमाताजी [CWM 03 : 54-55]
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…