ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

संन्यासवाद आणि आध्यात्मिकता

आध्यात्मिकता १६

 

एक सार्वत्रिक अंधश्रद्धा येथे विचारात घेऊ. ‘संन्यासवाद’ आणि ‘आध्यात्मिकता’ या दोन्ही गोष्टी एकच आहेत, अशी कल्पना जगभरात प्रचलित आहे. तुम्ही एखाद्याचे वर्णन, तो आध्यात्मिक पुरुष आहे किंवा ती आध्यात्मिक स्त्री आहे असे केलेत की, लगेच लोक असा विचार करू लागतात की, तो काही अन्नग्रहण करत नसेल, किंवा तो दिवसभर निश्चलपणे बसून राहत असेल; तो खूप गरीब असून एखाद्या झोपडीत राहत असेल, त्याने सर्वस्वाचा त्याग केला असेल आणि तो स्वत:साठी म्हणून जवळ काही बाळगत नसेल. तुम्ही जेव्हा एखाद्या आध्यात्मिक माणसाबद्दल बोलू लागता तेव्हा, शंभरापैकी नव्व्याणव जणांच्या मनात ताबडतोब अशा प्रकारचे चित्र उभे राहते; गरिबी आणि जे जे सुखावह किंवा आरामदायी आहे त्या सर्व गोष्टींचा त्याग या गोष्टी म्हणजे व्यक्तीच्या ‘आध्यात्मिकते’चा जणू पुरावाच असतो, असे लोकांना वाटते. (परंतु) या मानसिक कल्पना असतात.

आध्यात्मिक ‘सत्य’ जाणून घेण्यासाठी आणि त्याचे अनुसरण करण्यासाठी आपण स्वतंत्र असावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अशा मानसिक कल्पनांपासून मुक्त असले पाहिजे, त्या तुम्ही काढून टाकल्या पाहिजेत. कारण तुम्ही अतिशय प्रामाणिक आस घेऊन आध्यात्मिक जीवनाकडे वळलेले असता, तुम्हाला ‘ईश्वर’ भेटावा, तुमच्या चेतनेमध्ये आणि तुमच्या जीवनामध्ये ‘ईश्वरा’चा साक्षात्कार व्हावा, अशी तुमची इच्छा असते आणि मग काय होते?

(कधीकधी) तुम्ही अशा एका ठिकाणी येऊन पोहोचता की, जिथे कोणती एखादी झोपडी नाहीये. अशा एका ‘ईश्वर’समान व्यक्तीला भेटता, की जी सुखकर जीवन जगत आहे, मोकळेपणाने अन्नसेवन करत आहे, जिच्या अवतीभोवती सौंदर्यपूर्ण किंवा चैनीच्या वस्तू आहेत, तिच्याजवळ जे आहे ते ती गरिबांना देत नाही, तर लोक तिला जे देऊ करत आहेत ते ती स्वीकारत आहे आणि त्याचा उपभोग घेत आहे. दृढमूल झालेल्या तुमच्या मानसिक धारणांनुसार तुम्ही जेव्हा या साऱ्याकडे पाहता तेव्हा तुम्ही भांबावून जाता आणि म्हणता, “हे काय ? मला तर वाटले होते की, मी तर एका आध्यात्मिक व्यक्तीला भेटायला चाललो आहे!”

(‘संन्यासवाद’ आणि ‘आध्यात्मिकता’ या दोन्ही गोष्टी एकच) ही चुकीची संकल्पना मोडून काढली पाहिजे, नाहीशी केली पाहिजे. एकदा का ही चुकीची संकल्पना मनातून निघून गेली की मग, तुम्हाला तुमच्या संकुचित संन्यासवादी नियमापेक्षा अधिक उच्चतर असे काहीतरी गवसेल; व्यक्ती ज्यामुळे मुक्त होईल अशा प्रकारचा एक पूर्ण खुलेपणा तुम्हाला गवसेल. (तेव्हा मग) तुम्हाला जर एखादी गोष्ट प्राप्त होणार असेल तर, तुम्ही ती स्वीकारता आणि तुम्हाला तीच गोष्ट सोडण्यास सांगण्यात आली तर, तितक्याच समत्वाने तुम्ही ती सोडूनही देता. गोष्टी येतात आणि तुम्ही त्या स्वीकारता; गोष्टी जातात आणि तुम्ही त्या जाऊ देता. स्वीकारताना किंवा सोडून देताना, समत्वाचे तेच स्मितहास्य तुमच्या चेहऱ्यावर झळकत असते. (उत्तरार्ध उद्याच्या भागात…)

– श्रीमाताजी [CWM 03 : 53-54]

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

चैत्य पुरुष म्हणजे काय?

अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…

8 hours ago

तुमच्या अंतरीचे ईश्वरत्व

ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…

17 hours ago

चैत्य पुरुष खुला होणे

जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…

2 days ago

दिव्य अस्तित्वाचा शोध

  आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…

3 days ago

आत्मनिरीक्षण कसे करावे?

  (उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…

4 days ago

अंतरात्म्याचा शोध

तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…

5 days ago