मानव जे जे काही साध्य करू शकतो ते सर्व काही ज्यांनी साध्य केले आहे, पण तरीही जे समाधानी नाहीत कारण, या जीवनात कधीच गवसू शकणार नाहीत अशा उच्चतर गोष्टींची ते या जीवनाकडून अपेक्षा करतात; अशाच लोकांसाठी ‘पूर्णयोग’ आहे.
ज्यांनी अज्ञाताचा ध्यास घेतलेला आहे आणि जे पूर्णत्वाची आस बाळगतात, भंडावून सोडणारे प्रश्न जे स्वत:ला विचारत राहतात आणि तरीही ज्यांच्या प्रश्नांची तड लागत नाही, कोणतीही निश्चित अशी उत्तरे त्यांना गवसत नाहीत, अशा लोकांचीच ‘पूर्णयोगा’साठी तयारी झालेली असते.
मानवजातीच्या भवितव्याची ज्यांना काळजी आहे आणि विद्यमान व्यवस्थेबाबत जे समाधानी नाहीत अशा लोकांना हमखासपणे जे प्रश्न पडत राहतात, अशा मूलगामी प्रश्नांची एक मालिकाच असते. ते प्रश्न साधारणपणे असे असतात :
मरायचेच असेल तर व्यक्ती जन्मालाच का येते?
दु:खभोग सहन करण्यासाठीच का व्यक्ती जीवन जगत असते?
जर वियोग होणारच असेल तर व्यक्ती प्रेमच का करते?
चुका करण्यासाठीच व्यक्ती विचार करते का?
चुका करण्यासाठीच का व्यक्ती कृती करते?
याचे स्वीकारार्ह असे एकमेव उत्तर आहे की, गोष्टी जशा असायला हव्यात तशा त्या नाहीत. मात्र हे विरोधाभास अटळ आहेत असे नाही, तर ते सुधारता येण्यासारखे आहेत आणि एक ना एक दिवस ते विरोधाभास नाहीसे होतीलच. जग आज जसे आहे त्यावर काही उपायच नाही असेही नाही.
ही पृथ्वी अशा एका संक्रमणकाळात आहे की, जो काळ मानवाच्या तोकड्या चेतनेला खूप दीर्घ भासतो पण शाश्वत चेतनेच्या दृष्टीने तो एखाद्या परमाणु इतका अल्प असतो. एवढेच नव्हे तर, अतिमानसिक चेतनेच्या अवतरणाबरोबर हा संक्रमणकाळसुद्धा संपुष्टात येईल. त्यावेळी विरोधाभास सुसंवादामध्ये आणि विरोध हा समन्वयामध्ये परिवर्तित होईल.
– श्रीमाताजी
(CWM 12 : 98-99)
व्यक्ती तरुण असो किंवा वृद्ध असो, तिने जर प्रगती केली नाही तर तिला कंटाळा…
(आपण कालच्या भागात अन्नाव्यतिरिक्त उपलब्ध असणाऱ्या एका ऊर्जास्रोताचा विचार केला. आज आता अविनाशी असणाऱ्या…
(पूर्वार्ध) जोपर्यंत माणसं आणि हे जग आत्ता जसं आहे तसंच राहील तोपर्यंत, ऊर्जा मिळविण्यासाठी…
तारुण्य हे, व्यक्ती किती वयाची आहे यावर अवलंबून नसते, तर ते प्रगती करण्याच्या आणि…
श्रीअरविंद हे भूतकाळाशी किंवा इतिहासाशीदेखील संबंधित नाहीत. श्रीअरविंद म्हणजे प्रत्यक्षात येणारा भविष्यकाळ आहेत. तुम्हाला…
भावी काळ हा तरुणांचा आहे. सद्यस्थितीत, एक नूतन व युवा जग आकाराला येत आहे…