ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

महायोगी श्रीअरविंद – ०८

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

श्रीअरविंदांनी सुरुवातीला स्वतःला (दुसऱ्या) महायुद्धाशी सक्रियपणे जोडून घेतलेले नव्हते. पण हिटलर जेव्हा त्याच्या विरोधात असणाऱ्या सर्व शक्तींना चिरडून टाकणार आणि या जगावर नाझींचे वर्चस्व प्रस्थापित होणार, असे दिसू लागले तेव्हा मग, त्यांनी हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली.

त्यांनी जाहीरपणे मित्रराष्ट्रांची (चीन, रशिया, इंग्लंड व अमेरिका) (Allies) बाजू घेतली, निधी गोळा करण्यासाठी जे आवाहन करण्यात आले होते त्याला प्रतिसाद म्हणून त्यांनी काही आर्थिक साहाय्यही देऊ केले होते तसेच सैन्यामध्ये प्रवेश करण्यासंबंधी किंवा युद्धासाठी जे प्रयत्न केले जात होते त्यामध्ये सहभागी होण्यासंबंधी त्यांचा सल्ला मागायला जी मंडळी त्यांच्याकडे येत असत त्यांना ते प्रोत्साहन देत असत.

येथे ही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की, श्रीअरविंदांनी जेव्हा जाहीरपणे मित्रराष्ट्रांची बाजू घेतली तेव्हा संपूर्ण भारत हा अगदी ठळकपणे विरोधी पक्षाला म्हणजे अक्ष (Axis) शक्तींना (जर्मनी, इटली, जपान) साहाय्य पुरविण्याच्या पक्षाचा होता. त्या काळी भारतीयांची ब्रिटिशविरोधी राष्ट्रीय भावना एवढी कडवी होती की, हिटलरचा प्रत्येक विजय हा आपला विजय आहे, असे त्यांना वाटत असे.

‘वंदे मातरम्’च्या दिवसांमध्ये भारताच्या स्वातंत्र्याविषयी जी धारणा श्रीअरविंदांच्या मनात होती ती १९४२ सालीसुद्धा तशीच कायम होती; परंतु त्यामुळे नाझी आक्रमणाच्या खऱ्या स्वरूपाकडे कानाडोळा करण्याइतके ते अंध झाले नव्हते.

हिटलर आणि नाझी यांच्या पाठीशी काळोख्या आसुरी शक्ती आहेत हे त्यांना दिसले आणि त्यांचा विजय म्हणजे अनिष्ट शक्तींच्या सत्तेची मानववंशाला करावी लागणारी गुलामी आणि परिणामतः उत्क्रांतिक्रमाची परागती, विशेषतः मानववंशाच्या आध्यात्मिक उत्क्रांतीला बसणारी खीळ! यातून केवळ युरोपच नाही तर आशियासुद्धा गुलामगिरीकडे ओढला गेला असता आणि भारताबाबत तर ही गुलामगिरी अधिकच भयावह ठरली असती, भारताने या पूर्वी कधीच अशी गुलामी अनुभवली नसेल अशी ती गुलामगिरी ठरली असती आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी आजवर जे प्रयत्न झाले होते ते सगळे विफल ठरले असते.

श्रीअरविंदांच्या सेवेमध्ये असणारे श्री. ए. बी. पुराणी यांनी लिहून ठेवले आहे की, ”नाझीवादाच्या धोकादायक राजवटीपासून मानवतेला वाचविण्याच्या कार्यासाठी श्रीअरविंद स्वतःची ऊर्जा कशी पणाला लावत होते, हे पाहणे हा एक अनमोल अनुभव होता. कोणत्याही फलाच्या किंवा बक्षिसाच्या अपेक्षेविना, किंबहुना आपण काय करत आहोत याची यत्किंचितही कल्पना दुसऱ्यांना येऊ न देता, मानवतेसाठी ठोस कार्य कसे करता येते, याचा तो एक आदर्श वस्तुपाठ होता. श्रीअरविंद जणू ईश्वरच बनून, ईश्वर या जगाची काळजी कशी घेतो, आणि तो खाली उतरून, मानवासाठी कसे कार्य करतो, हे स्वतःच्या उदाहरणाने प्रत्यक्ष दाखवून देत होते.

श्रीअरविंदांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर, – जे एकेकाळी, “केवळ अ-सहकार पुकारणारेच नव्हते तर ते ब्रिटिश साम्राज्यवादाचे कट्टर शत्रू होते,” असे – श्रीअरविंद आता, विन्स्टन चर्चिल यांच्या प्रकृतीसंबंधीचे वार्तापत्र कसे काळजीपूर्वक ऐकत असत आणि चर्चिल यांच्या तब्येतीची काळजी ते कसे वाहत असत, ही गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही. ते ईश्वरी कार्य होते, ईश्वराने या जगासाठी केलेले ते कार्य होते.

युद्धाच्या बातम्या सातत्याने ऐकणे किंवा काही आर्थिक हातभार लावणे किंवा काही जाहीर विधाने करणे एवढ्यापुरताच श्रीअरविंदांचा सहभाग मर्यादित नव्हता. जेव्हा प्रत्येकजण इंग्लंडच्या तत्काळ पराभवाची आणि हिटलरच्या निश्चित विजयाची अपेक्षा बाळगून होते अशा वेळी, डंकर्कच्या क्षणापासून (मे १९४०) श्रीअरविंदांनी आपली आध्यात्मिक शक्ती आंतरिक रीतीने युद्धामध्ये लावली होती आणि तेव्हा त्यांना जर्मनीच्या वेगाने चाललेल्या विजयवारूला रोख लागल्याचे दिसून आले आणि युद्धाची लाट ही विरोधी दिशेने वळायला लागली असल्याचे दिसल्यावर त्यांना समाधान लाभले होते.

श्रीअरविंद त्यांची शक्ती त्यांच्या साधकांसाठी, त्यांचे आजारपण दूर करण्यासाठी, किंवा त्यांच्या साधनेमध्ये त्यांना साहाय्य करण्यासाठी बऱ्याच काळापासून उपयोगात आणत असत, हे आम्ही पाहिले आहे. परंतु आध्यात्मिक शक्तीची श्रेणी ही भौतिक अंतरावरून ठरविता येत नाही. श्रीअरविंद यांनी एकदा एका पत्रामध्ये लिहिले होते, ‘निश्चितच, माझी शक्ती ही केवळ आश्रम आणि आश्रमातील परिस्थिती एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. युद्धाची योग्य प्रगती होण्यासाठी आणि मानवी जगतामध्ये बदल घडून येण्यासाठी साहाय्य व्हावे यासाठी ती शक्ती मोठ्या प्रमाणात उपयोगात आणली जात आहे, हे तुम्हाला माहीत आहे.’ योगसाधनेव्यतिरिक्त आश्रमाच्या कक्षाच्या पलीकडे ती वैयक्तिक कारणासाठीसुद्धा उपयोगात येत असे पण अर्थातच हे सारे कार्य शांतपणे आणि आध्यात्मिक कृतीच्या द्वारे केले जात असे.” (क्रमश:)

अभीप्सा मराठी मासिक

या संकेतस्थळावरील बहुतांश सर्व मजकूर हा श्रीअरविंद व श्रीमाताजी लिखित आहे, त्याचा मराठी अनुवाद अभीप्सा मासिकाने केला आहे. तसेच या मासिकातर्फेच, आकलनाच्या सोयीसाठी काही ठिकाणी चित्रे, तक्ते, आकृत्या यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Recent Posts

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १८

“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…

6 hours ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७

(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य‌’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…

1 day ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६

पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…

2 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १५

हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…

3 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १४

तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…

4 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १३

आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना‌, परम संकल्पशक्ती‌ हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…

5 days ago