साधनेची मुळाक्षरे – ३८

तुम्ही मानवी प्रकृतीचे रूपांतरण गतिमान दिव्य प्रकृतीमध्ये करू इच्छित असाल तर, कोणतीही कुरकूर न करता, किंवा कोणताही प्रतिकार न करता, स्वत:ला ‘श्रीमाताजीं’च्या व त्यांच्या ‘शक्तीं’च्या हाती सोपवा आणि त्यांना त्यांचे कार्य तुमच्यामध्ये कोणत्याही अडथळ्याविना करू द्या. चेतना, घडणसुलभता (Plasticity) आणि नि:शेष समर्पण ह्या तीन गोष्टी तुमच्याकडे असल्याच पाहिजेत. ‘श्रीमाताजी’ आणि त्यांच्या ‘शक्ती’ व त्यांचे कार्य याविषयी तुमचे मन, आत्मा, हृदय, प्राण इतकेच काय पण, तुमच्या शरीरातील पेशीसुद्धा सजग असल्या पाहिजेत. कारण, ‘श्रीमाताजी’ तुमच्यातील अंधकारामध्ये आणि तुमच्या अजागृत भागांमध्ये, अजागृत क्षणांमध्ये देखील कार्य करू शकतात आणि तशा त्या करतात देखील, परंतु जेव्हा तुम्ही जागृत असता आणि त्यांच्याशी जिवंत संपर्क राखून असता तेव्हाची गोष्ट निराळी असते.

तुमची समग्र प्रकृतीच ‘श्रीमाताजीं’च्या स्पर्शाला घडणसुलभ असली पाहिजे – स्वसंतुष्ट अज्ञानी मन जसे प्रश्न विचारत राहते, शंका घेत राहते, विवाद करत बसते आणि ते जसे प्रबोधनाचे व परिवर्तनाचे शत्रू असते, तशी तुमची प्रकृती असता कामा नये.

माणसातील प्राण ज्याप्रमाणे स्वत:च्याच उर्मींवर भर देत राहतो आणि तो जसा आपल्या हट्टाग्रही इच्छा व दुरिच्छेमुळे, प्रत्येक ईश्वरी प्रभावाला सातत्याने विरोध करत राहतो, तशी तुमची प्रकृती स्वत:च्याच उर्मींवर भर देणारी असता कामा नये.

माणसाची शारीरिक चेतना जशी अडथळा निर्माण करते आणि त्याच्या किरकोळ आणि काळोख्या गोष्टींमधील सुखाला ती जशी चिकटून राहते; शरीराची आत्माविहिन दिनचर्या, आळस किंवा त्याची जी जड निद्रा असते त्याला धक्का पोहोचविणाऱ्या कोणत्याही स्पर्शाने जशी शारीरिक चेतना आक्रंदन करते; तशी तुमची प्रकृती ही अडथळा निर्माण करणारी, स्वत:ची अक्षमता, जडता आणि तामसिकता ह्यांना हटवादीपणे चिकटून राहिलेली असता कामा नये.

नि:शेष समर्पण, तुमच्या आंतरिक व बाह्य अस्तित्वाचे समर्पण तुमच्या प्रकृतीच्या सर्व भागांमध्ये ही घडणसुलभ लवचीकता (Plasticity) आणेल; वरून प्रवाहित होणाऱ्या ‘प्रज्ञा’ आणि ‘प्रकाश’, ‘शक्ती’, ‘सुसंवाद’ आणि ‘सौंदर्य’, ‘परिपूर्णता’ ह्या साऱ्या गोष्टींसाठी सातत्यपूर्ण खुलेपणा राखलात तर, तुमच्यामधील सर्व अंगांमध्ये जाणीव जागृत होईल. इतकेच काय पण तुमचे शरीरसुद्धा जागृत होईल आणि सरतेशेवटी, त्याची चेतना ही अर्धचेतन चेतनेशी संबद्ध न राहता, अतिमानसिक अतिचेतन ‘शक्ती’शी एकत्व पावेल; आणि तिची ऊर्जा ही वरून, खालून, चोहोबाजूंनी शरीराला अनुभवास येईल आणि एका परम ‘प्रेमा’ने व ‘आनंदा’ने ते शरीर पुलकित होऊन जाईल.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 24-25)

साधनेची मुळाक्षरे – ३७

आपले पूर्वीचे सर्व संबंध आणि परिस्थिती यांचा सातत्याने परित्याग करत; येणाऱ्या प्रत्येक नवीन क्षणी, आपण जणू काही जीवनाला नव्यानेच सुरुवात करत आहोत असे समजून जीवन जगण्याकडे वाटचाल करणे म्हणजे ‘आध्यात्मिक पुनर्जन्म’ होय.

आपल्या गतकाळातील कृतींचा जो प्रवाह असतो, ज्याला ‘कर्म’ असे म्हटले जाते, त्यापासून मुक्त होणे म्हणजे ‘आध्यात्मिक पुनर्जन्म’ होय; वेगळ्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर, ‘प्रकृती’च्या कार्यकारणाची जी सामान्य गतिविधी असते त्या बंधनापासून सुटका, मुक्तता म्हणजे ‘आध्यात्मिक पुनर्जन्म’ होय. जाणिवेमधून हे भूतकाळाचे बंध जेव्हा अगदी यशस्वीरीत्या तोडून टाकले जातात तेव्हा आपल्यातील सर्व चुका, सर्व गुन्हे, सर्व दोष आणि मूर्खपणाच्या साऱ्या गोष्टी ज्या आपल्या स्मरणामध्ये अजूनही जाग्या असतात; रक्त शोषणाऱ्या जळवांप्रमाणे ज्या आपल्याला अजूनही चिकटून बसलेल्या असतात, त्या सर्व गोष्टी गळून पडतात आणि आपण अत्यंत आनंददायीरीत्या मुक्त व्हावे म्हणून त्या आपल्याला सोडून जातात.

हे स्वातंत्र्य ही काही केवळ विचारगम्य गोष्ट नाही; तर ते अतिशय सघन, व्यावहारिक आणि भौतिक असे वास्तव आहे. आपण खरोखरच मुक्त असतो, आपल्याला कोणतीच गोष्ट बंधनात टाकू शकत नाही, कोणतीच गोष्ट आपल्यावर परिणाम करू शकत नाही, जबाबदारीच्या जाणिवेने आपण ग्रस्त नसतो.

आपल्याला आपल्या भूतकाळाचा प्रतिकार करायचा असेल, तो पुसून टाकायचा असेल किंवा त्याच्यातून बाहेर पडायचे असेल तर, केवळ पश्चात्ताप किंवा तत्सम गोष्टींद्वारे तसे करता येणार नाही; तर अशा प्रकारचा अरूपांतरित भूतकाळ कधी अस्तित्वात होता हेच आपण विसरून गेले पाहिजे आणि आपल्याला जखडून ठेवणाऱ्या बंधनांना तोडणाऱ्या, चेतनेच्या प्रबुद्ध अवस्थेमध्ये आपण प्रवेश केला पाहिजे.

आध्यात्मिक पुनर्जन्म घ्यायचा म्हणजे जेथे आपण ‘ईश्वरा’शी एकत्व पावलेले असतो आणि ‘कर्मा’च्या प्रतिक्रियांपासून शाश्वतपणे मुक्त असतो अशा चैत्य चेतनेमध्ये आपण प्रथम प्रवेश केला पाहिजे. चैत्य पुरुषाविषयी (psychic being) जाग आल्याखेरीज हे करता येणे शक्य नाही; परंतु आत्मा जो सदासर्वदा ‘ईश्वरा’प्रत समर्पित झालेला असतो, त्या आपल्या अंतर्यामी असणाऱ्या आत्म्याविषयी आपण एकदा का निःशंकपणे जागृत झालो की, सर्व बंधने नाहीशी होतात. मग मात्र भूतकाळ आपल्याला जखडून ठेवत नाही आणि जीवन कायमसाठी पुन्हा एकदा नव्याने सुरू होते. आध्यात्मिक पुनर्जन्माच्या अंतिम उच्चावस्थेची तुम्हाला कल्पना यावी म्हणून सांगते की, ‘अखिल विश्व प्रत्यक्षात प्रत्येक क्षणाला नाहीसे होत असते आणि प्रत्येक क्षणाला ते नव्याने निर्माण होत असते,’ असा सदासर्वकाळ अनुभव येऊ शकतो.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 176-177)

साधनेची मुळाक्षरे – ३६

मनुष्याचे पृष्ठस्तरीय हृदय हे पशुहृदयाप्रमाणेच प्राणसुलभ भावनांचे, विकारांचे असते. पशुहृदयाहून या मानवी हृदयाचा विकास अधिक विविधतेचा असतो, इतकेच. या हृदयाच्या भावनांवर स्वार्थी विकारांचे, आंधळ्या सहज-प्रवृत्तींचे आणि दोषपूर्ण, विकृत, बरेचदा अधोगतीच्या क्षुद्र जीवनप्रेरणांचे वर्चस्व असते. हे हृदय प्राणशक्तीच्या पतित कामनांनी, वासनांनी, क्रोधविकारांनी, क्षुद्र लोभांनी, तीव्र हव्यासांनी, हीन दीन मागण्यांनी वेढलेले आणि अंकित झालेले असते; प्रत्येक लहानमोठ्या ऊर्मीची गुलामगिरी करून ते हिणकस झालेले असते. भावनाशील हृदय आणि भुकेलेला संवेदनाप्रिय प्राण यांच्या भेसळीने मानवामध्ये खोटा वासनात्मा (A false soul of desire) निर्माण होतो; हे जे मानवाचे असंस्कृत व भयंकर अंग आहे, त्यावर बुद्धी विश्वास ठेवू शकत नाही, हे योग्यच आहे आणि त्यामुळे या अंगावर आपले नियंत्रण असावे असे बुद्धीला वाटते. या असंस्कृत, हटवादी अशा प्राणिक प्रकृतीवर बुद्धी जे नियंत्रण आणू शकते, किंबहुना, ते नियमन करण्यात ती यशस्वीदेखील होते, तरीपण ही प्राणिक प्रकृती नेहमीच अनिश्चित आणि फसवी राहते.

मानवाचा खरा आत्मा (The true soul) मात्र या पृष्ठस्तरीय हृदयात नसतो, तो प्रकृतीच्या प्रकाशमय गुहेत लपलेल्या खऱ्या अदृश्य हृदयात असतो. या हृदयामध्ये दिव्य ईश्वरी ‘प्रकाशा’त आपला आत्मा निवास करत असतो; या अगदी खोल असलेल्या शांत आत्म्याची जाणीव फार थोड्यांनाच असते. आत्मा सर्वांच्याच अंतरंगात आहे पण फारच थोड्यांना त्यांचा खरा आत्मा माहीत असतो, फारच थोड्यांना त्याच्याकडून थेट प्रेरणा आल्याचे जाणवते. तेथे, म्हणजे आपल्या खोल हृदयात, आपल्या प्रकृतीच्या अंधकारमय पसाऱ्याला आधार देणारी, ‘ईश्वरा’च्या तेजाची लहानशी ठिणगी असते व तिला केंद्र बनवून, तिच्याभोवती आपला अंतरात्मा, आपले चैत्य अस्तित्व, साकार आत्मा, आपल्यातील खरा ‘पुरुष’ वृद्धिंगत होतो. मानवातील हे चैत्य अस्तित्व वृद्धिंगत होऊ लागले आणि हृदय-स्पंदनांमध्ये त्याची भविष्यवाणी व प्रेरणा प्रतिबिंबित होऊ लागल्या म्हणजे, मानवाला त्याच्या आत्म्याची अधिकाधिक जाणीव होऊ लागते. तेव्हा मग वरच्या दर्जाचा पशू एवढेच त्याचे स्वरूप राहात नाही. स्वत:मधील देवत्वाची झलक प्राप्त झाल्यामुळे तो त्याविषयी सजग होऊ लागतो, सखोल जीवनाकडून व जाणिवांकडून येणाऱ्या अंत:सूचना तो अधिकाधिक मान्य करू लागतो; दिव्य गोष्टींकडील त्याची प्रवृत्तीही वाढीस लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 150)

साधनेची मुळाक्षरे – ३५

पूर्णयोगाचे मूलभूत साक्षात्कार पुढीलप्रमाणे –

१) ज्यामुळे संपूर्ण भक्ती हीच हृदयाची मुख्य प्रेरणा आणि विचारांची स्वामिनी बनेल अशा प्रकारचे चैत्य परिवर्तन (psychic change) घडणे आणि जीवन व कर्म ‘श्रीमाताजीं’च्या आणि त्यांच्या ‘उपस्थिती’च्या नित्य एकत्वात घडत राहणे.

२) ‘उच्चतर चेतने’च्या ‘शांती’, ‘प्रकाश’, ‘शक्ती’ इत्यादी गोष्टींचे मस्तकाद्वारे व हृदयाद्वारे संपूर्ण अस्तित्वामध्ये अवतरण घडणे, ज्यामुळे शरीराच्या अगदी पेशी न् पेशी भारल्या जातील.

३) सर्वत्र अनंतत्वाने वसणाऱ्या ‘एकमेवाद्वितीय’ अशा ‘ईश्वरा’ची व ‘श्रीमाताजीं’ची अनुभूती येणे आणि त्या अनंत अशा चेतनेमध्ये वास्तव्य घडणे.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 319)

साधनेची मुळाक्षरे – ३४

प्रश्न : पूर्णयोग म्हणजे काय?

श्रीअरविंद : संपूर्ण ‘ईश्वरी’-साक्षात्काराचा, संपूर्ण ‘आत्म’-साक्षात्काराचा, आपल्या अस्तित्वाच्या आणि चेतनेच्या संपूर्ण परिपूर्तीचा, आपल्या प्रकृतीच्या संपूर्ण रूपांतरणाचा हा मार्ग आहे. आणि त्यामध्ये अन्यत्र कोठेतरी असणाऱ्या शाश्वत परिपूर्णतेकडे परत जाणे नव्हे तर, येथील जीवनाचे संपूर्ण परिपूर्णत्व अभिप्रेत आहे. हे उद्दिष्ट आहे, आणि त्याच्या कार्यपद्धतीमध्ये सुद्धा तीच परिपूर्णता आहे, कारण कार्यपद्धती परिपूर्ण असल्याखेरीज उद्दिष्टाची समग्रता साध्य होऊ शकत नाही. या पद्धतीमध्ये आपण ज्याचा साक्षात्कार करून घेऊ इच्छितो त्या ईश्वराप्रत आपल्या अस्तित्वाचे, प्रकृतीचे तिच्या सर्व घटकांसहित, मार्गांसहित, गतिविधींसहित आत्मदान, उन्मुखता असणे, आणि त्या ईश्वराकडे पूर्णत्वाने वळणे अंतर्भूत आहे. आपले मन, हृदय, प्राण, शरीर, आपले बाह्य, आंतरिक आणि अंतरतम अस्तित्व, आपल्या सचेतन घटकांप्रमाणेच आपले अतिचेतन आणि अवचेतन घटकदेखील अशा प्रकारे देऊ केले पाहिजेत; हे सारे घटक साक्षात्काराचे आणि रूपांतराचे क्षेत्र झाले पाहिजेत, हे सारे घटक म्हणजे माध्यमं झाली पाहिजेत, त्यांनी प्रदीपनामध्ये आणि मानवाच्या दिव्य चेतनेमधील व प्रकृतीमधील परिवर्तनामध्ये सहभागी झालेच पाहिजे. हे ‘पूर्णयोगा’चे स्वरूप आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 358)

साधनेची मुळाक्षरे – ३३

(श्रीअरविंदलिखित पत्रामधून…)

हा ‘योग’ म्हणजे केवळ ‘भक्तियोग’ नाही; हा ‘पूर्णयोग’ आहे किंवा किमान तसा त्याचा दावा तरी आहे, म्हणजे असे की, यामध्ये, संपूर्ण जीवच त्याच्या सर्व अंगांनिशी ‘ईश्वरा’कडे वळणे अभिप्रेत आहे.

याचा अर्थ असा की, तेथे ज्ञान, कर्म तसेच ‘भक्ती’देखील असली पाहिजे. त्यात अधिकची भर म्हणजे, त्यामध्ये प्रकृतीच्या पूर्ण परिवर्तनाचा, परिपूर्णत्वाच्या ध्यासाचा समावेश होतो, ज्यामुळे प्रकृती ही ‘ईश्वरा’च्या प्रकृतीशी एकात्म होईल. केवळ हृदयच ईश्वराकडे वळले आणि त्याचे परिवर्तन झाले, असे होऊन चालणार नाही, तर मनसुद्धा ईश्वराकडे वळले पाहिजे आणि म्हणून ज्ञानसुद्धा गरजेचे आहे; त्याचबरोबर इच्छाशक्ती, कर्मशक्ती आणि सृजनशक्तीसुद्धा ईश्वराकडे वळली पाहिजे म्हणून कर्मसुद्धा आवश्यक आहे.

या ‘योगा’मध्ये इतर ‘योगमार्गां’च्या पद्धतींचाही समावेश करण्यात आला आहे – उदा. ‘पुरुष-प्रकृती’ची पद्धत, परंतु अंतिम उद्दिष्टाबाबत मात्र फरक आहे. ‘पुरुषा’चे ‘प्रकृती’पासून विलगीकरण येथेही आहे, पण ते तिचा त्याग करण्यासाठी नाही तर, पुरुषाने स्वतःला आणि प्रकृतीला जाणावे या हेतूने आहे. पुरुष हा प्रकृतीचे खेळणे म्हणून नव्हे तर प्रकृतीचा ज्ञाता म्हणून, स्वामी म्हणून आणि पालनकर्ता म्हणून असावा, या हेतुने हे विलगीकरण आहे; आणि हे असे घडत असताना किंवा झाल्यानंतर, व्यक्ती स्वतःचे सर्वस्व ईश्वरार्पण करते.

व्यक्ती ज्ञानापासून किंवा कर्मापासून किंवा ‘भक्ती’पासून वा परिपूर्णत्वासाठी (प्रकृतीचे परिवर्तन) आत्म-शुद्धिकरणाच्या ‘तपस्ये’पासून प्रारंभ करू शकते आणि उर्वरित गोष्टी या त्या पाठोपाठ येणाऱ्या प्रक्रिया म्हणून विकसित करू शकते किंवा व्यक्ती या साऱ्या गोष्टी एकाच प्रक्रियेमध्येदेखील समाविष्ट करू शकते. सर्वांसाठी एकच एक असा नियम नाही, ते व्यक्ती आणि तिच्या प्रकृतीवर अवलंबून असते.

समर्पण ही या ‘योगा’ची मुख्य ताकद आहे, परंतु समर्पण हे प्रगमनशील (Progressive) असले पाहिजे, प्रारंभीच संपूर्ण समर्पण शक्य नसते, तर प्रारंभी, त्या संपूर्णतेची जिवामध्ये असलेली ती एक इच्छाच असते – वस्तुतः या साऱ्याला वेळ लागतो. आणि जेव्हा समर्पण परिपूर्ण होते तेव्हाच साधनेचा पूर्ण बहर शक्य असतो. तोपर्यंत, समर्पणाच्या चढत्यावाढत्या वास्तवानिशी वैयक्तिक प्रयत्न असणे देखील आवश्यक असते. व्यक्ती ‘ईश्वरी शक्ती’च्या सामर्थ्याला आवाहन करते आणि एकदा का ती शक्ती त्या जिवामध्ये अवतरित व्हायला सुरुवात झाली की, मग ती सर्वप्रथम व्यक्तीच्या व्यक्तिगत प्रयत्नांना आधार पुरविते, नंतर ती हळूहळू व्यक्तीची समग्र कृतीच हाती घेते, अर्थात यासाठी साधकाची संमती असणे ही बाब नेहमीच गरजेची असते.

एकदा ‘शक्ती’ने कार्य हाती घेतले की, साधकाच्या दृष्टीने ज्या ज्या विभिन्न प्रक्रिया आवश्यक असतात, त्या साऱ्या प्रक्रिया ती घडवून आणते. म्हणजे उदाहरणार्थ, ज्ञानाच्या, ‘भक्ती’च्या, आध्यात्मिक कर्माच्या प्रक्रिया, प्रकृतीच्या रूपांतरणाच्या प्रक्रिया ती घडवून आणते. या साऱ्या प्रक्रिया एकत्र केल्या जाऊ शकत नाहीत, ही कल्पना दोषपूर्ण आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 207-208)

साधनेची मुळाक्षरे – ३२

हृदयाच्या दृष्टीने विचार केला तर, ईश्वरभेटीच्या तळमळीपोटी येणारे भावनावेग, रडू येणे, दुःखीकष्टी होणे, व्याकूळ होणे या गोष्टी ‘पूर्णयोगा’मध्ये गरजेच्या नाहीत. एक दृढ अशी अभीप्सा जरूर असली पाहिजे, त्याबरोबरच एक उत्कट आसदेखील असू शकते, उत्कट प्रेम आणि ऐक्याची इच्छा असली पाहिजे पण दु:ख किंवा अस्वस्थता असण्याचे काही कारण नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 377)

साधनेची मुळाक्षरे – ३१

तुम्ही मनाला शांत करण्याचा थेट प्रयत्न करत असाल, तर तसे करणे ही अवघड गोष्ट आहे, जवळजवळ अशक्यच असे म्हटले तरी चालेल. कारण मनाचा जो सर्वांत भौतिक भाग असतो तो त्याची क्रिया कधीच थांबवत नाही – एखादे न थांबणारे रेकॉर्डिंग मशीन असावे तसा मनाचा तो भाग चालूच राहतो. त्याने ज्या ज्या गोष्टींची नोंद घेतलेली असते, त्या त्या साऱ्या गोष्टी तो पुन्हा पुन्हा पृष्ठभागावर आणत राहतो आणि त्याला थांबविण्यासाठी लागणारे बटण जोपर्यंत आपल्याकडे नसते तोपर्यंत तो थांबत नाही, तो चालूच राहतो, तो अनंतकाळपर्यंत चालूच राहतो. उलट, तुम्ही जर तुमची चेतना ही सामान्य मनाच्या वर असणाऱ्या, उच्चतर क्षेत्रामध्ये नेऊ शकलात तर, ‘प्रकाशा’प्रत झालेल्या या उन्मुखतेमुळेच मन शांतस्थिर होते, मग आता त्यामध्ये कोणतीही खळबळ होत नाही, आणि अशा रीतीने मिळविलेली मानसिक शांतता ही नित्याचीच होऊन जाते. तेथे बाह्यवर्ती मन हे कायमस्वरूपी शांतस्थिर झालेले असते. एकदा का तुम्ही या प्रांतात प्रवेश केलात की मग, तुम्ही कदाचित तिथून कधीच बाहेर येऊ इच्छिणार नाही.

‘उच्चतर प्रकाशाप्रत अभीप्सा’ हाच मन शांत करण्याचा एकमेव उपाय आहे.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 182)