ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

(महाराष्ट्रातील योगगुरूंशी आपली भेट कशी झाली हे अरविंद घोष येथे सांगत आहेत…)

मी सुरत काँग्रेसची परिषद आटोपून जेव्हा बडोद्याला आलो तेव्हा, बारीन्द्रने मला लिहिले की बडोद्यात तो माझी त्याला माहीत असलेल्या एका योग्यांशी गाठ घालून देईल. बारीन्द्रने बडोद्याहून श्री. लेले यांना तार केली आणि ते आले. तेव्हा मी श्री. खासेराव जाधव यांच्या घरी राहत असे. आम्ही सरदार मुजुमदार यांच्या वाड्यात गेलो. तेथे सर्वात वरच्या मजल्यावरच्या एका खोलीत आम्ही तीन दिवस खोली बंद करून बसलो होतो. त्यांनी मला सांगितले की, मनात बाहेरून जे विचार येतात ते फेकून द्यावयाचे, दुसरे काहीच करायचे नाही. आणि मला ते तीन दिवसात साध्य झाले. आम्ही एकत्र ध्यानाला बसलो, मला शांत ब्रह्मचेतनेचा (Silent Brahman Consciousness) साक्षात्कार झाला. तेव्हापासून मी मेंदूच्या वर असलेल्या प्रांतात स्थित राहून विचार करू लागलो आणि करत आलो आहे.

कधीकधी रात्रीच्या वेळी ‘ती शक्ती’ अवतरत असे आणि मी ‘ती शक्ती’ आणि तिच्याबरोबर आलले विचारदेखील ग्रहण करत असे आणि सकाळी प्रत्येक गोष्ट मी शब्दन् शब्द उतरवून काढत असे. त्याच शांतीमध्ये, विचाररहित स्थितीमध्ये आम्ही मुंबईला गेलो. नॅशनल युनियन येथे मला एक व्याख्यान द्यावयाचे होते. म्हणून, श्री. लेले यांना ‘मी काय करावे’ असे विचारले. त्यांनी मला प्रार्थना करायला सांगितली. पण मी शांत ब्रह्मामध्ये गढून गेलो होतो. त्यामुळे मी प्रार्थना करण्याच्या मनस्थितीत नाही असे त्यांना सांगितले. तेव्हा, “मी आणि इतर जणं प्रार्थना करू; तुम्ही फक्त त्या सभेला जा आणि श्रोत्यांना सर्वव्यापी ईश्वर, नारायण समजून, त्यांना वाकून नमस्कार करा; तेव्हा एक आवाज तुमच्या माध्यमातून बोलेल,” असे ते म्हणाले. त्यांनी जसे सांगितले अगदी तसेच मी केले. मी त्या सभेला जात असताना वाटेत मला कोणीतरी एक वर्तमानपत्र वाचायला दिले. त्यातील एका शीर्षकाने माझे लक्ष वेधले गेले आणि माझ्या मनावर त्याचा ठसा उमटला. मी जेव्हा बोलायला उभा राहिलो तेव्हा माझ्या मनात कल्पना चमकून गेली आणि एकदम अचानक बोलायला सुरुवात झाली. श्री. लेले यांच्याकडून मिळालेला हा दुसरा अनुभव होता. दुसऱ्यांना योगिक अनुभव देण्याची शक्ती त्यांच्यामध्ये होती हे यावरून लक्षात आले. (क्रमश:)

अभीप्सा मराठी मासिक

या संकेतस्थळावरील बहुतांश सर्व मजकूर हा श्रीअरविंद व श्रीमाताजी लिखित आहे, त्याचा मराठी अनुवाद अभीप्सा मासिकाने केला आहे. तसेच या मासिकातर्फेच, आकलनाच्या सोयीसाठी काही ठिकाणी चित्रे, तक्ते, आकृत्या यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Recent Posts

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४०

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४० (उत्तरार्ध) एखादी अशी गोष्ट की, जी अद्यापि आविष्कृत किंवा साध्य झालेली…

2 hours ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…

1 day ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा‌ या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…

2 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…

3 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…

4 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…

5 days ago