‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
अरविंद घोष – ०३
शिष्यवृत्ती मिळवून अरविंद घोष इ. स. १८९० मध्ये केंब्रिज येथील किंग्ज कॉलेजमध्ये शिकू लागले. तेथे त्यांनी दोन वर्षे शिक्षण घेतले. त्यांचे वडील त्यांना भारतामधून वर्तमानपत्रे पाठवत असत. इंग्रजांनी भारतीयांना दिलेल्या वाईट वागणुकीची उदाहरणे असलेली कात्रणे खुणा करून ते पाठवून देत आणि भारतातील ब्रिटिश शासन हे कसे निर्दयी व हृदयशून्य शासन आहे असे दोषारोप करणारी पत्रेदेखील ते पाठवत असत. काही खळबळजनक आणि महान क्रांतिकारी बदल घडून येतील असा काळ जगाच्या इतिहासात येणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला काही भूमिका पार पाडावी लागणार आहे अशी स्पष्ट जाणीव अरविंदांना वयाच्या अकराव्या वर्षीच झाली होती. आता त्यांचे लक्ष भारताकडे ओढले गेले आणि त्यांची ती संवेदना मातृभूमीच्या स्वातंत्र्याच्या दिशेने प्रवाहित झाली. पण हा ‘ठाम निश्चय’ पूर्णत्वाला जाण्यासाठी मात्र पुढची चार वर्षे जावी लागली. ते केंब्रिजला गेले आणि तिथे ‘इंडियन मजलिस’ या संघटनेचे सदस्य आणि काही काळ सचिव झाले. तेव्हा त्यांनी क्रांतिकारक स्वरूपाची भाषणे दिली होती.
लंडनमधील काही भारतीय विद्यार्थ्यांनी एक गुप्त संघटना स्थापन केली होती, त्या संघटनेचे नाव ‘Lotus and Dagger’ असे होते. त्या संघटनेमध्ये प्रत्येक सदस्य भारताच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करण्याची आणि त्या ध्येयपूर्तीच्या दिशेने काहीतरी विशेष काम पुढे नेण्याची शपथ घेत असे. अरविंदांनी या संघटनेची स्थापना केली नव्हती पण त्यांच्या भावंडांसहित ते या संघटनेचे सदस्य मात्र झाले होते. पण ती संघटना जन्मत:च मृतवत् झाली. इंग्लंडमध्ये वास्तव्यास असणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचा हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग होता.
इ. स. १८९० मध्ये इंडियन सिव्हिल सर्व्हिसच्या खुल्या स्पर्धेत अरविंद घोष उत्तीर्ण झाले पण पुढील दोन वर्षांच्या कालावधीत घोडेस्वारीच्या परीक्षेस ते बसले नाहीत आणि त्यामुळे त्या सेवेसाठी ते बाद ठरले.
अरविंद घोष स्वत:च्या विद्यार्थी-जीवनाविषयीची आठवण सांगताना म्हणतात की, ”मी कादंबऱ्या व कविता वाचत असे. मी फक्त परीक्षेच्या आधी काही काळ थोडा अभ्यास करीत असे. कधीही वेळ मिळाला की मी ग्रीक आणि लॅटिन पद्य लिहीत असे. पुढे जेव्हा मी शिष्यवृत्तीसाठी, केंब्रिजला किंग्ज कॉलेजमध्ये गेलो तेव्हा तेथे मि. ऑस्कर ब्राऊनिंग ह्यांनी माझे पेपर्स पाहिले आणि ‘असे इतके चांगले पेपर्स यापूर्वी मी कधीच पाहिले नव्हते’ असा शेरा त्यांनी दिला.” (क्रमश: …)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…