ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

साधनेची मुळाक्षरे – ३७

आपले पूर्वीचे सर्व संबंध आणि परिस्थिती यांचा सातत्याने परित्याग करत; येणाऱ्या प्रत्येक नवीन क्षणी, आपण जणू काही जीवनाला नव्यानेच सुरुवात करत आहोत असे समजून जीवन जगण्याकडे वाटचाल करणे म्हणजे ‘आध्यात्मिक पुनर्जन्म’ होय.

आपल्या गतकाळातील कृतींचा जो प्रवाह असतो, ज्याला ‘कर्म’ असे म्हटले जाते, त्यापासून मुक्त होणे म्हणजे ‘आध्यात्मिक पुनर्जन्म’ होय; वेगळ्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर, ‘प्रकृती’च्या कार्यकारणाची जी सामान्य गतिविधी असते त्या बंधनापासून सुटका, मुक्तता म्हणजे ‘आध्यात्मिक पुनर्जन्म’ होय. जाणिवेमधून हे भूतकाळाचे बंध जेव्हा अगदी यशस्वीरीत्या तोडून टाकले जातात तेव्हा आपल्यातील सर्व चुका, सर्व गुन्हे, सर्व दोष आणि मूर्खपणाच्या साऱ्या गोष्टी ज्या आपल्या स्मरणामध्ये अजूनही जाग्या असतात; रक्त शोषणाऱ्या जळवांप्रमाणे ज्या आपल्याला अजूनही चिकटून बसलेल्या असतात, त्या सर्व गोष्टी गळून पडतात आणि आपण अत्यंत आनंददायीरीत्या मुक्त व्हावे म्हणून त्या आपल्याला सोडून जातात.

हे स्वातंत्र्य ही काही केवळ विचारगम्य गोष्ट नाही; तर ते अतिशय सघन, व्यावहारिक आणि भौतिक असे वास्तव आहे. आपण खरोखरच मुक्त असतो, आपल्याला कोणतीच गोष्ट बंधनात टाकू शकत नाही, कोणतीच गोष्ट आपल्यावर परिणाम करू शकत नाही, जबाबदारीच्या जाणिवेने आपण ग्रस्त नसतो.

आपल्याला आपल्या भूतकाळाचा प्रतिकार करायचा असेल, तो पुसून टाकायचा असेल किंवा त्याच्यातून बाहेर पडायचे असेल तर, केवळ पश्चात्ताप किंवा तत्सम गोष्टींद्वारे तसे करता येणार नाही; तर अशा प्रकारचा अरूपांतरित भूतकाळ कधी अस्तित्वात होता हेच आपण विसरून गेले पाहिजे आणि आपल्याला जखडून ठेवणाऱ्या बंधनांना तोडणाऱ्या, चेतनेच्या प्रबुद्ध अवस्थेमध्ये आपण प्रवेश केला पाहिजे.

आध्यात्मिक पुनर्जन्म घ्यायचा म्हणजे जेथे आपण ‘ईश्वरा’शी एकत्व पावलेले असतो आणि ‘कर्मा’च्या प्रतिक्रियांपासून शाश्वतपणे मुक्त असतो अशा चैत्य चेतनेमध्ये आपण प्रथम प्रवेश केला पाहिजे. चैत्य पुरुषाविषयी (psychic being) जाग आल्याखेरीज हे करता येणे शक्य नाही; परंतु आत्मा जो सदासर्वदा ‘ईश्वरा’प्रत समर्पित झालेला असतो, त्या आपल्या अंतर्यामी असणाऱ्या आत्म्याविषयी आपण एकदा का निःशंकपणे जागृत झालो की, सर्व बंधने नाहीशी होतात. मग मात्र भूतकाळ आपल्याला जखडून ठेवत नाही आणि जीवन कायमसाठी पुन्हा एकदा नव्याने सुरू होते. आध्यात्मिक पुनर्जन्माच्या अंतिम उच्चावस्थेची तुम्हाला कल्पना यावी म्हणून सांगते की, ‘अखिल विश्व प्रत्यक्षात प्रत्येक क्षणाला नाहीसे होत असते आणि प्रत्येक क्षणाला ते नव्याने निर्माण होत असते,’ असा सदासर्वकाळ अनुभव येऊ शकतो.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 176-177)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

प्रामाणिकपणा आणि चिकाटी

  (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…

11 hours ago

ईश्वराच्या निवासाचे दरवाजे

  अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…

1 day ago

अप्रामाणिकपणाचा अडथळा

  (एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…

2 days ago

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी…

  पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…

3 days ago

योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय

  तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…

4 days ago

योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल

  तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…

5 days ago