ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

प्रार्थना आणि त्याचा परिणाम

ईश्वरी कृपा – ०७

व्यक्ती संपूर्ण समर्पणाच्या स्थितीत असेल आणि तिने स्वत:चे सर्वस्व समर्पित केले असेल, तिने जर त्या ईश्वरी ‘कृपे’स स्वत:ला देऊ केले असेल आणि त्या कृपेला जे योग्य वाटते ते तिने आपल्या बाबतीत करावे अशी त्या व्यक्तिची भावना असेल तर, ते अधिक चांगले! पण त्यानंतर मात्र “ईश्वरी कृपेने हे काय केले, ते का केले” असे प्रश्न तिला विचारता कामा नयेत. व्यक्तिने असे म्हणता कामा नये की, “मला असे होईल असे वाटले होते, म्हणून मी असे असे केले,” कारण व्यक्तिला खरोखरच काहीतरी हवे असेल आणि त्या भावनेने साद घालायची असेल तर जे काही हवे, जसे काही हवे ते अगदी साधेपणाने, प्रामाणिकपणाने शब्दांत मांडणे केव्हाही चांगले. त्यानंतर, ईश्वरी ‘कृपा’ तसे करायचे किंवा नाही ते ठरवेल; पण कोणत्याही परिस्थितित, व्यक्तिने तिला काय अपेक्षित आहे ते स्पष्टपणे मांडणे केव्हाही चांगले ; त्यात काही गैर नाही.

जेव्हा केलेली मागणी मान्य केली जात नाही आणि अशा वेळी व्यक्ती बंड करून उठते तेव्हा मात्र गोष्टी बिघडून जातात. तेव्हा अर्थातच सारे काही बिनसते. आणि हाच तो क्षण असतो जेव्हा व्यक्तिने समजून घेतले पाहिजे की, तिची जी इच्छा असते, अभीप्सा असते, ती नेहमीच प्रबुद्ध असेल असे नाही. तसेच त्या व्यक्तिसाठी जे हितावह होते त्याचीच तिने मागणी केलेली असेल, असेही नाही. अशा वेळी व्यक्तिने थोडेसे समजूतदार झाले पाहिजे आणि म्हटले पाहिजे, “ठीक आहे, जशी तुझी इच्छा.” पण जोवर व्यक्तिला आतून काही आवडीनिवडी आहेत, अग्रक्रम आहेत तेव्हा तिने ते शब्दांमध्ये मांडण्यात गैर काही नाही. ती अगदी स्वाभाविक अशी क्रिया आहे.

उदाहरणार्थ, जर एखाद्याने मूर्खपणा केला असेल, काहीतरी चूक केली असेल आणि त्या व्यक्तिला खरोखर, मनापासून तशी चूक परत होऊ नये असे वाटत असेल, तर तशी विनवणी करण्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. आणि खरंतर, व्यक्तिने अगदी अंत:करणपूर्वक, आंतरिक सचोटीने तशी विनवणी केली तर, तिची ती प्रार्थना मंजूर केली जाण्याची अधिक शक्यता असते.

तुम्हाला विरोध करणे हे ‘ईश्वरा’ला आवडते, असा विचार तुम्ही कधीच करता कामा नये. त्याला तसे करण्यामध्ये कोणताही रस नसतो. तुमच्यासाठी काय हिताचे आहे हे, तुमच्यापेक्षा त्याला अधिक चांगले समजते; परंतु अगदी अनिवार्य असेल तेव्हाच तो तुमच्या इच्छेला विरोध करतो. अन्यथा तुम्ही जे काही मागितले असेल, ते द्यायला तो नेहमीच तत्पर असतो.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 254-255)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

मुलांचे संगोपन

(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…

15 hours ago

विजयाची खात्री

जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…

2 days ago

सकारात्मक वृत्तीचा परिणाम

  (लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…

3 days ago

स्वप्नांवर विश्वास ठेवा

उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…

4 days ago

उपयुक्ततावादाचा आजार

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…

5 days ago

शिक्षण आणि संस्कृती

व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…

6 days ago