ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

योग आणि मानवी नातेसंबंध – २१

एक प्रकारच्या आत्मीयतेच्या, सहमतीच्या भावनेने एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबरोबर जोडली जाते किंवा त्यामुळे माणसं एकमेकांकडे आकर्षित होतात किंवा एखाद्या व्यक्तीच्या स्वतःच्या प्रकृतीमधील एखाद्या घटकाचे व दुसऱ्या व्यक्तीच्या एखाद्या घटकाचे परस्परांमध्ये आकर्षण असते आणि त्यामुळे दोन व्यक्ती परस्परांशी जोडल्या जातात. सुरुवातीला व्यक्तीला हे फक्त जाणवते; दुसऱ्या व्यक्तीच्या प्रकृतीमधील जे काही सुखद आहे किंवा चांगले आहे ते व्यक्तीला दिसते, तिचे गुण दिसतात; आणि कधीकधी तर त्या व्यक्तीमध्ये नसलेले गुणही दिसतात; किंवा तिला जेवढे ते वाटत असतात तेवढे ते प्रत्यक्षात नसतात. परंतु नंतर मात्र अति-परिचयामुळे, प्रकृतीमधील ज्या घटकांविषयी आत्मीयता नसते असे इतर घटकदेखील जाणवू लागतात. कधीकधी कल्पनांमध्ये संघर्ष असतो किंवा परस्परविरोधी भावना असतात किंवा कधी कधी दोघांच्या अहंकारांमध्ये संघर्ष असतो. शाश्वत गाढ प्रेम किंवा घट्ट मैत्री असेल तर मात्र परस्परसंबंधांतील या अडचणींवर मात करता येते आणि दोघांमध्ये सुसंवाद किंवा सामंजस्य निर्माण होते; पण बहुधा हे असे असत नाही किंवा परस्परांमधील मतभेद इतके विकोपाला गेलेले असतात की, या सामंजस्याच्या वृत्तीला छेद बसतो किंवा कधीकधी अहंकार इतका दुखावला जातो की, त्यामुळे ती सामंजस्याची वृत्ती संकोच पावते. आणि मग अशा वेळी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे अधिकच काटेकोरपणे निरीक्षण करू लागण्याची शक्यता असते आणि दुसऱ्याचे दोष अतिरंजित करण्याची किंवा वस्तुतः दुसरी व्यक्ती दुराचारी नसली वा वाईट चारित्र्याची नसली तरीही तिच्यावर तसे दोषारोप करण्याची शक्यता असते; पूर्ण दृष्टिकोनच बदलून जाण्याची शक्यता असते, सद्भावना या दुर्भावनांमध्ये, दुरावलेपणामध्ये, कधीकधी तर शत्रुत्वामध्ये किंवा हाडवैरामध्येसुद्धा बदलण्याची शक्यता असते. मानवी जीवनात हे नेहमीच घडत असते. याच्या अगदी उलटदेखील घडते, परंतु ते मात्र इतक्या सहजासहजी घडत नाही. म्हणजे वाईट भावनांचे परिवर्तन सद्भावनांमध्ये, किंवा विरोधाचे रूपांतर सुसंवादामध्ये होणे मात्र इतक्या सहजपणाने घडत नाही. अर्थात दुसऱ्या व्यक्तीबद्दलचे वाईट मत किंवा वाईट भावना ही काही या एकाच कारणामुळे निर्माण होते असे नाही. स्वाभाविक तिरस्कार, मत्सर, परस्परांच्या आड येणारे हितसंबंध इ. अनेक कारणांमुळे हे घडून येते.

व्यक्तीने इतरांकडे शांत-स्थिर भावाने बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे; गुण वा दोष यांपैकी कशावरच अतिरिक्त भर देता कामा नये; कोणतीही वाईट भावना नको किंवा कोणता गैरसमज नको वा अन्याय नको; तर एका स्थिर मनाने आणि दृष्टीने बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 299-300)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १८

“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…

2 hours ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७

(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य‌’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…

1 day ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६

पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…

2 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १५

हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…

3 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १४

तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…

4 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १३

आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना‌, परम संकल्पशक्ती‌ हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…

5 days ago