ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

अमर्त्यत्वाचा शोध १५

प्रश्न : एखाद्याने आत्महत्या केल्यामुळे त्याला दु:खयातना का भोगाव्या लागतात?

श्रीमाताजी : एखादा आत्महत्या का करतो ? कारण तो भ्याड असतो, भित्रा असतो… आणि भ्याड लोकांना नेहमीच दु:ख भोगावे लागते.

प्रश्न : पुढील जन्मात देखील त्याला परत दु:खयातना भोगाव्या लागतात का?

श्रीमाताजी : या जगात येण्यामागे, चैत्य पुरुषाचा (Psychic being) एक विशिष्ट हेतू असतो. अनेक प्रकारचे अनुभव घेणे आणि त्यातून काही शिकणे व प्रगती करणे हा तो हेतू होय. त्याचे कार्य पूर्ण होण्याआधीच जर तुम्ही हे जग सोडलेत तर अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी त्याला अधिक अवघड अशा परिस्थितीमध्ये परत यावे लागते. ह्याचाच अर्थ, एका जन्मात तुम्ही जे जे काही टाळण्याचा प्रयत्न केलेला असतो ते पुढच्या जन्मी पुन्हा तुमच्या वाट्याला येते आणि ते आधीपेक्षा अधिकच अवघड असते. आणि अशाप्रकारे (जीवन) सोडून न जाताही, जर आयुष्यात तुम्हाला अडचणींवर मात करावयाची असेल तर ज्याला आपण सहसा ‘परीक्षा देणे’ असे म्हणतो, ती द्यावी लागते, तिच्यामध्ये यशस्वी व्हावयाचे असते, तुम्ही तिच्यात जर यशस्वी झाला नाहीत किंवा तिच्याकडे पाठ फिरविलीत, तिच्यात उत्तीर्ण होण्याऐवजी तुम्ही तिला टाळून तिच्यापासून दूर निघून गेलात तर पुन्हा कधी तरी ही परीक्षा देणे तुम्हाला भाग असते आणि मग ती पूर्वीपेक्षाही अधिक कठीण असते.

आता, तुम्हाला हे माहीतच आहे की, लोक अतिशय अज्ञानी असतात आणि त्यांना असे वाटत असते की, जीवन आहे आणि त्यानंतर मृत्यु आहे; जीवन म्हणजे हालअपेष्टांचा ढीग आणि त्यानंतर येणारा मृत्यू म्हणजे चिरंतन शांती. परंतु असे अजिबात नसते आणि बहुतकरून, एखादा माणूस जेव्हा पूर्णतया निरंकुश, बेताल पद्धतीने, अज्ञानी आणि अंध:कारयुक्त भावावेगापोटी, जीवन संपवून टाकतो, तेव्हा तो थेट वासनांविकारांनी व सर्व प्रकारच्या अज्ञानाने बनलेल्या प्राणिक जगतामध्ये (Vital world) पोहोचतो. आणि मग जे त्रास व हालअपेष्टा त्याला टाळावयाच्या होत्या त्याच परत त्याच्यासमोर उभ्या ठाकतात आणि आता तर शरीररूपी रक्षणकवचही राहिलेले नसते. जर तुम्ही कधी दुःस्वप्न पाहिले असेल, म्हणजेच, तुम्ही अविचारीपणे प्राणिक जगतात फेरफटका मारला असेल तर तो भयानक अनुभव, ते दुःस्वप्न संपविण्याचा उत्तम उपाय म्हणजे स्वत:ला जागे करणे, म्हणजेच वेगळ्या शब्दांत सांगायचे तर, वेगाने आपल्या शरीरात परतून येणे हा असतो. परंतु तुम्ही जेव्हा शरीरालाच नष्ट करून टाकता तेव्हा तुमचे रक्षण करण्यासाठी ते शरीरच राहिलेले नसते. आणि मग ही दुःस्वप्नामुळे भयभीत होण्याची अवस्था तुमच्या कायमचीच वाट्याला येते, आणि हे नक्कीच फारसे सुखावह नसते. दुःस्वप्नातील भयाला टाळावयाचे असेल तर तुम्ही चैत्य चेतनेमध्ये (Psychic Consciousness) असणे गरजेचे आहे आणि ज्यावेळी तुम्ही चैत्य चेतनेमध्ये असता त्यावेळी या गोष्टी तुमचे काहीही बिघडवू शकत नाहीत, याची तुम्हाला खात्री असते. खरोखरीच, ही सगळी अज्ञानयुक्त अंध:काराची आंदोलने असतात आणि मी म्हटले त्याप्रमाणे, असे करणे म्हणजे निरंतर प्रयत्न करण्याऐवजी भ्याडपणाने, घाबरून मोठी माघार घेणे असते.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 23-24)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

स्वत:ला न फसविणे अवघड

  व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…

8 hours ago

प्रामाणिकपणा आणि स्व-समर्थन

  आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…

1 day ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०४

  (भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…

2 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०३

  (भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…

3 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०२

  भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…

4 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०१

  साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…

5 days ago