ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

अमर्त्यत्वाचा शोध १५

प्रश्न : एखाद्याने आत्महत्या केल्यामुळे त्याला दु:खयातना का भोगाव्या लागतात?

श्रीमाताजी : एखादा आत्महत्या का करतो ? कारण तो भ्याड असतो, भित्रा असतो… आणि भ्याड लोकांना नेहमीच दु:ख भोगावे लागते.

प्रश्न : पुढील जन्मात देखील त्याला परत दु:खयातना भोगाव्या लागतात का?

श्रीमाताजी : या जगात येण्यामागे, चैत्य पुरुषाचा (Psychic being) एक विशिष्ट हेतू असतो. अनेक प्रकारचे अनुभव घेणे आणि त्यातून काही शिकणे व प्रगती करणे हा तो हेतू होय. त्याचे कार्य पूर्ण होण्याआधीच जर तुम्ही हे जग सोडलेत तर अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी त्याला अधिक अवघड अशा परिस्थितीमध्ये परत यावे लागते. ह्याचाच अर्थ, एका जन्मात तुम्ही जे जे काही टाळण्याचा प्रयत्न केलेला असतो ते पुढच्या जन्मी पुन्हा तुमच्या वाट्याला येते आणि ते आधीपेक्षा अधिकच अवघड असते. आणि अशाप्रकारे (जीवन) सोडून न जाताही, जर आयुष्यात तुम्हाला अडचणींवर मात करावयाची असेल तर ज्याला आपण सहसा ‘परीक्षा देणे’ असे म्हणतो, ती द्यावी लागते, तिच्यामध्ये यशस्वी व्हावयाचे असते, तुम्ही तिच्यात जर यशस्वी झाला नाहीत किंवा तिच्याकडे पाठ फिरविलीत, तिच्यात उत्तीर्ण होण्याऐवजी तुम्ही तिला टाळून तिच्यापासून दूर निघून गेलात तर पुन्हा कधी तरी ही परीक्षा देणे तुम्हाला भाग असते आणि मग ती पूर्वीपेक्षाही अधिक कठीण असते.

आता, तुम्हाला हे माहीतच आहे की, लोक अतिशय अज्ञानी असतात आणि त्यांना असे वाटत असते की, जीवन आहे आणि त्यानंतर मृत्यु आहे; जीवन म्हणजे हालअपेष्टांचा ढीग आणि त्यानंतर येणारा मृत्यू म्हणजे चिरंतन शांती. परंतु असे अजिबात नसते आणि बहुतकरून, एखादा माणूस जेव्हा पूर्णतया निरंकुश, बेताल पद्धतीने, अज्ञानी आणि अंध:कारयुक्त भावावेगापोटी, जीवन संपवून टाकतो, तेव्हा तो थेट वासनांविकारांनी व सर्व प्रकारच्या अज्ञानाने बनलेल्या प्राणिक जगतामध्ये (Vital world) पोहोचतो. आणि मग जे त्रास व हालअपेष्टा त्याला टाळावयाच्या होत्या त्याच परत त्याच्यासमोर उभ्या ठाकतात आणि आता तर शरीररूपी रक्षणकवचही राहिलेले नसते. जर तुम्ही कधी दुःस्वप्न पाहिले असेल, म्हणजेच, तुम्ही अविचारीपणे प्राणिक जगतात फेरफटका मारला असेल तर तो भयानक अनुभव, ते दुःस्वप्न संपविण्याचा उत्तम उपाय म्हणजे स्वत:ला जागे करणे, म्हणजेच वेगळ्या शब्दांत सांगायचे तर, वेगाने आपल्या शरीरात परतून येणे हा असतो. परंतु तुम्ही जेव्हा शरीरालाच नष्ट करून टाकता तेव्हा तुमचे रक्षण करण्यासाठी ते शरीरच राहिलेले नसते. आणि मग ही दुःस्वप्नामुळे भयभीत होण्याची अवस्था तुमच्या कायमचीच वाट्याला येते, आणि हे नक्कीच फारसे सुखावह नसते. दुःस्वप्नातील भयाला टाळावयाचे असेल तर तुम्ही चैत्य चेतनेमध्ये (Psychic Consciousness) असणे गरजेचे आहे आणि ज्यावेळी तुम्ही चैत्य चेतनेमध्ये असता त्यावेळी या गोष्टी तुमचे काहीही बिघडवू शकत नाहीत, याची तुम्हाला खात्री असते. खरोखरीच, ही सगळी अज्ञानयुक्त अंध:काराची आंदोलने असतात आणि मी म्हटले त्याप्रमाणे, असे करणे म्हणजे निरंतर प्रयत्न करण्याऐवजी भ्याडपणाने, घाबरून मोठी माघार घेणे असते.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 23-24)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४५

अधीरता नेहमीच चुकीची असते. ती साधनेला साहाय्य करत नाही तर, ती अडथळे निर्माण करते. अविचल,…

18 hours ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) कोणतीही अडचण आली किंवा कितीही त्रास सहन करावा…

2 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) साधनेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर नेहमीच अडचणी येतात आणि त्यामुळे…

3 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) नामस्मरणाच्या शक्तीचा आणि संरक्षणाचा तुम्हाला अनुभव आला आहे…

4 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१ (मला फक्त ईश्वर दर्शनाचीच आस आहे, पण तरीही तो मला दर्शन…

5 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४०

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४० (उत्तरार्ध) एखादी अशी गोष्ट की, जी अद्यापि आविष्कृत किंवा साध्य झालेली…

6 days ago