ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

Categories: समर्पण

समर्पण-साधनेचे वेगळेपण

समर्पण – १३

मी जे काही तुम्हाला सांगू इच्छितो ते मन आणि प्राण यांचे आंतरिक समर्पण ! अर्थातच बाह्य समर्पणदेखील असते. व्यक्ती जर त्या योग्यतेला पोहोचली असेल तर मग ते मार्गदर्शन थेट प्राप्त झालेले असेल किंवा व्यक्तीला चैत्य पुरुषाचे किंवा गुरुचे मार्गदर्शन लाभत असेल, त्याचे पालन करणे, आत्म्याच्या किंवा साधनेच्या आवश्यकतेच्या जे विरोधात असेल अशा सर्व गोष्टी सोडून देणे, अर्पण करणे ह्या साऱ्या गोष्टींचा समावेश बाह्य समर्पणामध्ये होतो.

ईश्वरावरील श्रद्धा आणि विश्वास या गोष्टी आंतरिक समर्पणाचा गाभा आहेत. ‘मला दुसरेतिसरे काहीही नको, ईश्वरच हवा,’ असा दृष्टिकोन व्यक्ती अंगीकारते. …”मी ईश्वराला माझे समर्पण करू इच्छितो आणि माझ्या आत्म्याचीच ती मागणी असल्याने, इतर काहीही नाही, तर फक्त तेच ! मी त्याला भेटेन, मी त्याचा साक्षात्कार करून घेईन. मी इतर काहीही मागणार नाही, केवळ हीच माझी मागणी असेल. जेणेकरून, मला त्याच्या सन्निध जाता येईल असे कार्य त्याने माझ्यामध्ये करावे; मग त्याचे ते कार्य गुप्त असेल वा प्रकट असेल, ते झाकलेले असेल वा आविष्कृत झाले असेल, पण ते कोणत्याही प्रकारचे असले तरी हरकत नाही. मी माझ्या स्वतःच्या मार्गासाठी आणि वेळेसाठी आग्रह धरणार नाही; त्याने त्याच्या त्याच्या वेळेनुसार व त्याच्या पद्धतीने सारे काही करावे, मी त्याच्यावर विश्वास ठेवेन, त्याची इच्छा प्रमाण मानेन; त्याच्या प्रकाशाची, त्याच्या उपस्थितीची, त्याच्या आनंदाची, अविचलपणे अभीप्सा बाळगेन; कितीही अडचणी आल्या, कितीही विलंब लागला तरी मी त्याच्यावर पूर्ण विसंबून राहीन आणि कधीही मार्ग सोडणार नाही. माझे मन शांत होऊन, त्याच्याकडे वळू दे आणि ते त्याच्या प्रकाशाप्रत खुले होऊ दे; माझा प्राण शांत होऊ दे आणि केवळ त्याच्याकडेच वळू दे, त्याच्या शांतीप्रत आणि त्याच्या आनंदाप्रत तो खुला होऊ दे. सारे काही त्याच्यासाठीच आणि मी स्वतःसुद्धा त्याच्यासाठीच. काहीही झाले तरी, मी ही अभीप्सा आणि आत्मदान दृढ बाळगेन आणि हे घडून येईलच अशा पूर्ण विश्वासाने वाटचाल करत राहीन.” व्यक्तीने हा दृष्टिकोन चढत्यावाढत्या प्रमाणात बाळगला पाहिजे. कारण ह्या गोष्टी परिपूर्णतया एकदम होणे शक्य नाही; मानसिक व प्राणिक हालचाली आड येत राहतात; पण जर व्यक्ती वरीलप्रमाणे इच्छा बाळगेल, तर त्या गोष्टी व्यक्तीमध्ये विकसित होत राहतात. उर्वरित गोष्टी ह्या (ईश्वरी मार्गदर्शनाच्या) आज्ञापालनाचा भाग असतात; ईश्वरी मार्गदर्शन जेव्हा स्वतःला आविष्कृत करू लागते तेव्हा, व्यक्तीने स्वतःच्या मानसिक किंवा प्राणिक हालचालींना त्यामध्ये लुडबूड करू न देता त्या मार्गदर्शनाबरहुकूम आज्ञापालन केले पाहिजे.

…व्यक्तीने ईश्वराप्रत पोहोचावे यासाठी अनेकानेक मार्ग उपलब्ध आहेत. परंतु मला ज्ञात असलेली ही अशी एकमेव साधना आहे की जिच्यामध्ये, प्रकृतीची तयारी होण्यापूर्वीच, ईश्वराकडून साधना हाती घेतली जाणे, ही गोष्ट एक संवेद्य (sensible) वास्तविकता बनते. इतर साधनापद्धतींमध्ये ईश्वरी कृती आणि तिचे साहाय्य हे वेळोवेळी जाणवू शकते पण बहुतांश वेळा, जोवर सारे काही सिद्ध होत नाही तोपर्यंत ते साहाय्य पडद्याआडच राहते. काही साधनापद्धतींमध्ये ईश्वरी कृती ही ग्राह्य मानली जात नाही; त्या पद्धतीमध्ये सारे काही तपस्येच्या द्वारेच करावे लागते. बहुतेक सर्व पद्धतींमध्ये या दोन्हींचा संकर असतो, तपस्या ईश्वराच्या थेट साहाय्यासाठी आणि मध्यस्थीसाठी अंतिमतः आवाहन करते. ‘ईश्वरच सारे काही करत असतो’ ही संकल्पना आणि त्याची अनुभूती या गोष्टी समर्पणावर आधारित योगसाधनांशीच संबंधित असतात.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 70-71)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

माणूस चिंताग्रस्त का आहे?

  (माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…

19 hours ago

उच्चतर चेतना : प्रस्तावना

  मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…

2 days ago

मराठी विकिपीडियावरील नोंदी

नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…

3 days ago

आपल्याला काय संपादन करायचे आहे?

  असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम‌’ संपादन…

4 days ago

आपले कार्य काय?

आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…

5 days ago

विचार-कणिका

  स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…

6 days ago