एकत्व – १०
जागतिक परिस्थितीबद्दल श्रीमाताजी येथे बोलत आहेत. – मला आता खात्रीच पटली आहे की, हा सगळा जो गोंधळ चालू आहे तो, आपण आपले दैनंदिन जीवन कसे जगले पाहिजे हे शिकविण्यासाठीच चाललेला आहे. म्हणजे असे की, काय घडणार आहे, कसे होईल, याविषयी व्यग्र न राहता, व्यक्तिने जे कर्म करावयास हवे त्यामध्ये स्वतःला रोज व्यस्त ठेवले पाहिजे. सगळे विचार, पूर्वनियोजनं, व्यवस्था, सारे सारे काही हे या अव्यवस्थेलाच अनुकूल आहेत.
ऊर्ध्वमुख होत, अभीप्सा बाळगत क्षणाक्षणाला जीवन जगणे, त्या त्या क्षणाला जी गोष्ट करणे आवश्यक आहे, केवळ त्याकडेच लक्ष पुरविणे आणि बाकी सारे काही त्या सर्व-साक्षी चेतनेला ठरवू देणे… कितीही व्यापक दृष्टी असली तरी, ह्या गोष्टी आपल्याला कळू शकत नाहीत. आपण त्या आंशिकरित्याच जाणू शकतो, अगदीच आंशिकपणे जाणू शकतो. त्यामुळे आपले लक्ष इकडे किंवा तिकडे वेधले जाते, आणि आणखीही इतर काही गोष्टी असतातच. भयंकर आणि हानीकारक गोष्टींना जास्त महत्त्व दिल्यामुळे, आपण त्यांना अधिकच बळकटी देत असतो.
जेव्हा तुमच्यावर अशा गोंधळाचा आणि अशा प्रकारच्या अव्यवस्थेचा आघात होतो तेव्हा, तुम्ही फक्त एकच गोष्ट केली पाहिजे. जेथे तुम्हाला केवळ एकमेवाद्वितीयाचेच, एकमेव चेतनेचे, एकमेव शक्तिचे दर्शन घडेल अशा चेतनेमध्ये प्रवेश करावयाचा – तेथे केवळ एकमेव एकात्मता आहे. जे जे सर्व काही घडत आहे ते ह्या एकात्मतेमध्येच घडत आहे. आपली सारी क्षुल्लक दृष्टी, जाणकारी, आपली मते हे सगळं सगळं त्या चेतनेच्या तुलनेमध्ये काहीच नाही, या सर्वाला व्यापून असणाऱ्या चेतनेच्या तुलनेमध्ये हे अगदीच अणुवत आहे. त्यामुळे, ज्या कोणाकडे थोडीशीही तर्कबुद्धी असेल त्याला हे समजून येईल की, स्वतंत्र अस्तित्वं निर्माण का झाली. व्यक्तिला हे कळू शकेल की, अभीप्सा बाळगण्यासाठी, अभीप्सा असावी ह्याचसाठी, आत्मदान, समर्पणप्रक्रिया असावी ह्याचसाठी, विश्वास आणि श्रद्धा बाळगता यावी ह्याचसाठी स्वतंत्र व्यक्तित्वं अस्तित्वात आली. वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांची घडण झाली ती ह्याच कारणासाठी. आणि मग तुम्ही काय करावयास हवे ? तर संपूर्ण सचोटीने, तीव्रतेने तुम्ही तो ईश्वरच व्हावयास हवे.. हेच केवळ आवश्यक आहे.
हीच एकमेव आवश्यक अशी गोष्ट आहे, ही एकच गोष्ट टिकून राहणारी आहे. बाकी सारे काही – स्वप्नातल्याप्रमाणे क्षणभंगुर आहे.
– श्रीमाताजी
(CWM 11 : 184-185)
(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…