१. आपल्या सामाजिक, नैतिक, सांस्कृतिक, वंशीय आणि आनुवंशिक बाह्यरूपाच्या पाठीमागील आपले खरे अस्तित्व काय हे जाणून घेण्यासाठी आंतरिक शोध घेणे ही पहिली आवश्यकता आहे.
केंद्रस्थानी मुक्त, विशाल आणि जाणते असे अस्तित्व विद्यमान असते व आपण त्याचा शोध घ्यावा याची ते वाट बघत असते. ते आपल्या जीवाचे, अस्तित्वाचे व ऑरोविलमधील आपल्या जीवनाचे सक्रिय केंद्र बनले पाहिजे.
२. व्यक्ती नैतिक आणि सामाजिक प्रथा-परंपरांपासून, मुक्त होण्यासाठी ऑरोविलमध्ये राहते, परंतु हे स्वातंत्र्य म्हणजे आपल्या वासना आणि महत्त्वाकांक्षेची, अहंकाराची एक नव्या प्रकारची गुलामी बनता कामा नये. व्यक्तीच्या वासनांची तृप्ती आंतरिक संशोधनाच्या मार्गाला अवरूद्ध करते, हा आंतरशोध केवळ शांतीत आणि सुयोग्य, निरपेक्ष अशा पारदर्शीतेतच साध्य करता येतो.
३. ऑरोविलवासीयाने व्यक्तिगत मालकीची भावना पुसून टाकली पाहिजे. कारण जीवाच्या प्रवासामध्ये लौकिक जगत हा एक टप्पा आहे. त्यामध्ये प्रत्येकाचे त्याचे असे एक स्थान असते. त्या त्या स्थानानुसार व्यक्तीला त्याच्या जीवनासाठी व त्याच्या कार्यासाठी जे जे काही आवश्यक आहे, ते येथे पुरविण्यात आलेले आहे. आपण जेवढे अधिक सजगतेने आपल्या अंतरात्म्याच्या संपर्कात येतो, तेवढ्याच प्रमाणात अधिक अचूक साधने आपल्याला पुरविण्यात येतात.
४. काम, मग ते अगदी अंगमेहनतीचे का असेना, आंतरिक शोधकार्यासाठी ते अनिवार्य असते. जर व्यक्ती काम करीत नसेल, जर स्वत:ची चेतना जडामध्ये स्थापित करीत नसेल तर, ते जड द्रव्य कधीच विकसित होणार नाही. एखाद्याच्या देहरूपी माध्यमाद्वारे चैतन्यशक्तीला जडाचा तीळमात्र भाग जरी सुसंघटित करू दिला गेला, तरी ते अधिक चांगले ठरेल. व्यक्तीने स्वत:च्या भोवती जर व्यवस्थितपणा सुस्थापित केला तर, त्यामुळे त्याच्या अंतरंगामध्येही एक प्रकारची सुव्यवस्था निर्माण होण्यास हातभार लागतो.
व्यक्तीने स्वत:च्या जीवनाची आखणी बाह्यवर्ती, कृत्रिम नियमांच्या आधारे न करता, सुसंघटित झालेल्या आंतरिक चेतनेनुसार करावी. कारण, जर व्यक्ती स्वत:च्या जीवनाला उच्चतर चेतनेच्या नियंत्रणाखाली न ठेवता, बेलगामपणे पुढे जाऊ देत असेल तर, ते चंचल, अस्थिर होते आणि आविष्कारासाठी अक्षम बनते. जडद्रव्याचा जाणीवपूर्वक वापर न झाल्याने, जडद्रव्य तसेच शिल्लक राहते; म्हणजे एका अर्थाने, व्यक्तीने स्वत:चा वेळ व्यर्थ वाया घालविण्यासारखे होते.
५. अखिल पृथ्वीने नवीन प्रजातीच्या आगमनासाठी स्वत:ला तयार केले पाहिजे आणि हे आगमन त्वरेने घडून यावे यासाठी ऑरोविल जाणीवपूर्णक कार्य करू इच्छिते.
६. ही नवी प्रजाती कशी असली पाहिजे हे एकेक करून आपल्यापुढे उघड होत जाईल आणि त्या दरम्यानच्या काळात स्वत:ला संपूर्णतया परमेश्वराधीन करणे हाच सर्वोत्तम मार्ग होय.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 207-208)
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…