ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

सच्च्या ऑरोविलवासीयाची वैशिष्ट्ये

१. आपल्या सामाजिक, नैतिक, सांस्कृतिक, वंशीय आणि आनुवंशिक बाह्यरूपाच्या पाठीमागील आपले खरे अस्तित्व काय हे जाणून घेण्यासाठी आंतरिक शोध घेणे ही पहिली आवश्यकता आहे.

केंद्रस्थानी मुक्त, विशाल आणि जाणते असे अस्तित्व विद्यमान असते व आपण त्याचा शोध घ्यावा याची ते वाट बघत असते. ते आपल्या जीवाचे, अस्तित्वाचे व ऑरोविलमधील आपल्या जीवनाचे सक्रिय केंद्र बनले पाहिजे.

२. व्यक्ती नैतिक आणि सामाजिक प्रथा-परंपरांपासून, मुक्त होण्यासाठी ऑरोविलमध्ये राहते, परंतु हे स्वातंत्र्य म्हणजे आपल्या वासना आणि महत्त्वाकांक्षेची, अहंकाराची एक नव्या प्रकारची गुलामी बनता कामा नये. व्यक्तीच्या वासनांची तृप्ती आंतरिक संशोधनाच्या मार्गाला अवरूद्ध करते, हा आंतरशोध केवळ शांतीत आणि सुयोग्य, निरपेक्ष अशा पारदर्शीतेतच साध्य करता येतो.

३. ऑरोविलवासीयाने व्यक्तिगत मालकीची भावना पुसून टाकली पाहिजे. कारण जीवाच्या प्रवासामध्ये लौकिक जगत हा एक टप्पा आहे. त्यामध्ये प्रत्येकाचे त्याचे असे एक स्थान असते. त्या त्या स्थानानुसार व्यक्तीला त्याच्या जीवनासाठी व त्याच्या कार्यासाठी जे जे काही आवश्यक आहे, ते येथे पुरविण्यात आलेले आहे. आपण जेवढे अधिक सजगतेने आपल्या अंतरात्म्याच्या संपर्कात येतो, तेवढ्याच प्रमाणात अधिक अचूक साधने आपल्याला पुरविण्यात येतात.

४. काम, मग ते अगदी अंगमेहनतीचे का असेना, आंतरिक शोधकार्यासाठी ते अनिवार्य असते. जर व्यक्ती काम करीत नसेल, जर स्वत:ची चेतना जडामध्ये स्थापित करीत नसेल तर, ते जड द्रव्य कधीच विकसित होणार नाही. एखाद्याच्या देहरूपी माध्यमाद्वारे चैतन्यशक्तीला जडाचा तीळमात्र भाग जरी सुसंघटित करू दिला गेला, तरी ते अधिक चांगले ठरेल. व्यक्तीने स्वत:च्या भोवती जर व्यवस्थितपणा सुस्थापित केला तर, त्यामुळे त्याच्या अंतरंगामध्येही एक प्रकारची सुव्यवस्था निर्माण होण्यास हातभार लागतो.

व्यक्तीने स्वत:च्या जीवनाची आखणी बाह्यवर्ती, कृत्रिम नियमांच्या आधारे न करता, सुसंघटित झालेल्या आंतरिक चेतनेनुसार करावी. कारण, जर व्यक्ती स्वत:च्या जीवनाला उच्चतर चेतनेच्या नियंत्रणाखाली न ठेवता, बेलगामपणे पुढे जाऊ देत असेल तर, ते चंचल, अस्थिर होते आणि आविष्कारासाठी अक्षम बनते. जडद्रव्याचा जाणीवपूर्वक वापर न झाल्याने, जडद्रव्य तसेच शिल्लक राहते; म्हणजे एका अर्थाने, व्यक्तीने स्वत:चा वेळ व्यर्थ वाया घालविण्यासारखे होते.

५. अखिल पृथ्वीने नवीन प्रजातीच्या आगमनासाठी स्वत:ला तयार केले पाहिजे आणि हे आगमन त्वरेने घडून यावे यासाठी ऑरोविल जाणीवपूर्णक कार्य करू इच्छिते.

६. ही नवी प्रजाती कशी असली पाहिजे हे एकेक करून आपल्यापुढे उघड होत जाईल आणि त्या दरम्यानच्या काळात स्वत:ला संपूर्णतया परमेश्वराधीन करणे हाच सर्वोत्तम मार्ग होय.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 207-208)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १८

“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…

44 minutes ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७

(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य‌’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…

1 day ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६

पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…

2 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १५

हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…

3 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १४

तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…

4 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १३

आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना‌, परम संकल्पशक्ती‌ हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…

5 days ago