ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

प्रश्न : चैत्य पुरुषाचे कार्य काय असते?

श्रीमाताजी : वीजेच्या दिव्याला विद्युतजनित्राला (Power Generator) जोडणाऱ्या विजेच्या तारेप्रमाणे त्याचे कार्य असते, समजले?

श्रोता : ईश्वर म्हणजे विद्युतजनित्र आणि दिवा म्हणजे आपले शरीर, असेच ना?

श्रीमाताजी : शरीर म्हणजे आपले दृश्य अस्तित्व. म्हणजे असे की, जडभौतिकामध्ये जर चैत्य अस्तित्व नसते तर, जडाला ईश्वराशी कोणताही थेट संबंध प्रस्थापित करता आला नसता. जडातील या चैत्य अस्तित्वामुळेच, जडाचा ईश्वराशी थेटपणे, सुखाने संबंध निर्माण होऊ शकतो आणि ते अस्तित्व मानवाला सांगू शकते की, ‘तुझ्या अंतरंगामध्ये ईश्वराचा निवास आहे, तू फक्त आत प्रवेश कर म्हणजे मग तुला तेथे तो गवसेल.’ ही अशी गोष्ट आहे की, जी खासकरून मनुष्याला लागू पडते किंवा खरंतर ती पृथ्वीवासियांना लागू पडते असे म्हणता येईल. हे चैत्य अस्तित्व मनुष्यमात्रांमध्ये अधिक जागृत, अधिक सुघटित, अधिक जागृत आणि अधिक स्वतंत्रदेखील बनते. मनुष्य-प्राण्यामध्ये ते अधिक व्यक्तिभूत (individualised) होते; वास्तविक, ही पृथ्वीचीच खासियत आहे. अगदी अचेतन, अस्पष्ट अशा जडभौतिकामध्ये ते थेटपणे, खासकरून आणि मोक्षद स्वरूपात ओतण्यात आले आहे; जेणेकरून ते पुन्हा एकवार दिव्य चेतना (Divine Consciousness), दिव्य उपस्थिती (The divine Presence) आणि अंतत: स्वत:च दिव्यत्व (The Divine Himself) या स्थितींमधून जागृत होत जाईल; मनुष्यामध्ये असणाऱ्या या चैत्याच्या अस्तित्वामुळेच मनुष्य हा अपवादात्मक जीव ठरतो. …
त्यात तथ्य आहे – इतके की, या विश्वाच्या इतर पातळ्यांवर असे काही जीव असतात, ज्याला काही माणसं देवसदृश्य, किंवा देव असे म्हणतात, किंवा श्रीअरविंदांनी ज्याला ‘अधिमानसिक जीव’ (The Overmind) असे म्हटले आहे, असे जीव चैत्य अस्तित्वाचा अनुभव घेता यावा म्हणून, या पृथ्वीतलावर शरीरधारणा करण्यासाठी अतिशय उत्सुक असतात कारण त्यांना तो अनुभव मिळत नसतो. मानवाकडे नसणारे असे अनेक गुण ह्या जीवांकडे निश्चितपणे असतात पण केवळ या पृथ्वीवरच, अन्यत्र कोठेही न आढळणाऱ्या या अत्यंत खास अशा, दिव्य अस्तित्वाचा मात्र त्यांच्यामध्ये अभाव असतो. उच्चतर मन, अधिमानसिक पातळी व अशा इतर प्रांतांतील, उच्चतर विश्वांमधील या रहिवाशांमध्ये चैत्य अस्तित्व नसते.

अर्थातच, प्राणिक विश्वांमधील (The vital worlds) जीवांमध्येही ते नसते. परंतु त्यांना त्याचे काही सोयरसुतक नसते कारण त्यांना त्याची आवश्यकताच वाटत नाही. त्यातही काही अगदी अपवादात्मक, दुर्मिळ जीव असे असतात की, ज्यांना स्वत:मध्ये बदल घडून यावा असे वाटत असते, आणि त्यासाठी ते त्वरा करतात, ते ताबडतोब प्राकृतिक देह धारण करतात. इतरांना मात्र ते नको असते….परंतु ही वस्तुस्थिती आहे, आणि मला हे सांगणेच भाग आहे की, हे सारे असे असे आहे.

स्वत:मध्ये असे हे चैत्य अस्तित्व बाळगणे हा मनुष्यमात्राचा अगदी अपवादात्मक असा गुणधर्म आहे आणि खरे सांगायचे तर, मनुष्य मात्र त्याचा पूर्ण लाभ घेत नाही. ज्याची वांछा बाळगावी असा हा काही गुणधर्म आहे असे लोकांना वाटतच नाही. त्यांच्या मनातील संकल्पना, त्यांच्या प्राणाच्या इच्छावासना, आणि त्यांच्या शरीराच्या सवयी यांनाच ते प्राधान्य देतात.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 160-161)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

मुलांचे संगोपन

(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…

13 hours ago

विजयाची खात्री

जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…

2 days ago

सकारात्मक वृत्तीचा परिणाम

  (लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…

3 days ago

स्वप्नांवर विश्वास ठेवा

उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…

4 days ago

उपयुक्ततावादाचा आजार

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…

5 days ago

शिक्षण आणि संस्कृती

व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…

6 days ago