ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

कोणत्याही प्रकारे भीतीचा लवलेश नसणे म्हणजे धैर्य.

(CWM 10 : 282)

भीती ही एक अशुद्धता आहे. पृथ्वीवरील दिव्य कृती उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या अ-दिव्य शक्तींपासून अगदी थेटपणे येणाऱ्या अशुद्धतांपैकी ही सर्वात मोठी अशुद्धता आहे. आणि जे खरोखर योगसाधना करू इच्छितात त्यांचे पहिले कर्तव्य हे असले पाहिजे की, त्यांनी त्यांच्या चेतनेमधून, सर्वशक्तिनिशी, संपूर्ण प्रामाणिकतेने, त्यांच्यापाशी आहे नाही तेवढे सगळे धैर्य एकवटून, भीतीचे, किंबहुना भीतीच्या छायेचे देखील निर्मूलन केले पाहिजे. या मार्गावर वाटचाल करायची तर व्यक्तीने निर्भय असले पाहिजे आणि तिने क्षुद्र, क्षुल्लक, चंचल, ओंगळ अशा भीतीमध्ये स्वत:चे अंग चोरून घेता कामा नये.

एक दुर्दम्य धैर्य, अगदी परिपूर्ण अशी प्रामाणिकता, प्रांजळ आत्मदान म्हणजे, ज्यामध्ये व्यक्ती कोणतेही आडाखे बांधत नाही, गणिते करत बसत नाही, किंवा घासाघीसही करत नाही, काहीतरी परत मिळेल या अपेक्षेने काही देऊ करत नाही. विश्वास ठेवते तेदेखील स्वत:ला संरक्षण मिळावे म्हणून नव्हे ! तसेच ही श्रद्धा अशीही नसते की, जी पुरावे मागत बसेल ! ही गोष्ट या मार्गावरील वाटचालीसाठी अत्यावश्यक आहे आणि केवळ ही गोष्टच तुमचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून खऱ्या अर्थाने संरक्षण करते.

(CWM 08 : 260-261)

समग्र धैर्य : क्षेत्र कोणतेही असू दे, धोका कोणताही असू दे, दृष्टिकोन एकच असला पाहिजे – शांत आणि खात्रीचा !

(CWM 14 : 169)

जशी मेणबत्तीची ज्योत इतर अनेक ज्योती प्रज्वलित करू शकते त्याप्रमाणे, ज्या व्यक्तीकडे धैर्य आहे तीच व्यक्ती इतरांना धीर देऊ शकते.

(CWM 14 : 170)

मला आठवते की, आपण एकदा परिपूर्णतेच्या अनेक अंगांपैकी एक अंग या दृष्टीने धैर्याचा विचार केला होता. पण येथे धैर्याचा अर्थ, ‘परमोच्च साहसाची चव चाखणे’ असा आहे. आणि या परमोच्च साहसाची चव तुमचा पूर्णपणे ताबा घेते आणि कोणतेही मोजमाप न करता, काहीही हातचे राखून न ठेवता, आणि परतीचे सारे दोर कापलेले असावेत अशा प्रकारे, तुम्हाला ईश्वरी शोधाच्या परम साहसामध्ये झेप घेण्यास प्रवृत्त करते; ईश्वराच्या भेटीच्या महान साहसासाठी, किंबहुना त्याहूनही अधिक महान अशा, ईश्वरी साक्षात्काराच्या साहसासाठी प्रवृत्त करते. मागचा पुढचा विचार न करता, किंवा ‘पुढे काय होणार आहे?’ ह्याचा क्षणभरही विचार न करता, तुम्ही स्वत:ला त्या साहसामध्ये झोकून देता. कारण पुढे काय होणार आहे, असा जर तुम्ही विचार करत बसलात तर, तुम्ही कधीच प्रारंभ करू शकणार नाही, तुम्ही तिथेच कायमस्वरूपी खिळून राहाल, त्याच जागी चिकटून राहाल, काहीतरी गमावण्याच्या, तुमचा तोल जाण्याच्या भीतीने तिथेच खिळून राहाल.

(CWM 08 : 40-41)

कदाचित प्रगती मंदही असेल, कदाचित वारंवार परागतीही होत असेल, परंतु जर का धीरयुक्त इच्छा कायम राखली तर, व्यक्ती एक ना दिवस विजयी होईल, सत्य-चेतनेच्या प्रभेपुढे तिच्या अडीअडचणी विरघळून नाहीशा झालेल्या असतील हे निश्चित.

(CWM 12 : 07)

स्वत:चे दोष जाणण्यामध्ये उदात्त धैर्य असते.

(CWM 14 : 170)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

मुलांचे संगोपन

(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…

11 hours ago

विजयाची खात्री

जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…

1 day ago

सकारात्मक वृत्तीचा परिणाम

  (लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…

2 days ago

स्वप्नांवर विश्वास ठेवा

उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…

3 days ago

उपयुक्ततावादाचा आजार

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…

4 days ago

शिक्षण आणि संस्कृती

व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…

5 days ago