ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

Categories: संस्मरण

एकाग्रतेतून तादात्म्य

श्रीमाताजी एक आठवण सांगत आहेत : जेव्हा मी पॅरिसमध्ये राहत असे तेव्हा मी सर्व प्रकारच्या स्नेहमेळाव्यांना जात असे; लोक वेगवेगळी संशोधने करत असत; आध्यात्मिक (तथाकथित आध्यात्मिक), गूढवादी संशोधनं इ. जिथे चालत असत तिथे मी जात असे.

एका तरुण स्त्रीला भेटण्यासाठी मला निमंत्रित करण्यात आले होते. मला वाटते ती स्वीडिश तरुणी होती; तिला ज्ञानप्राप्तीची, नेमके सांगावयाचे तर शिकण्याची एक पद्धत सापडली होती. ती तिने आम्हाला समजावून सांगितली. आम्ही तिघीचौघी जणी होतो. तिचे फ्रेंच काही तितकेसे बरे नव्हते; पण ती जे काही सांगत होती त्याविषयी तिला बऱ्यापैकी खात्री होती.

ती म्हणाली, “हे बघा, तुम्ही कोणतीही एक वस्तु घ्या; किंवा फळ्यावर कोणतेही एक चिन्ह काढा किंवा एखादे चित्र काढा. – ते काही तितकेसे महत्त्वाचे नाही – तुम्हाला जे काही सोयीचे आहे ते घ्या. समजा, उदाहरणादाखल मी तुमच्यासाठी हे चित्र काढते.. (तिच्यापाशी फळा होता.) हं तर मी चित्र काढले आहे.”

तिने एक अर्धभौमितिक असे चित्र काढले. ”आता, तुम्ही या चित्रासमोर बसा आणि तुमचे सर्व लक्ष या चित्रावर एकवटा – हे जे चित्र तुमच्यासमोर आहे त्यावर तुमचे लक्ष एकवटा. तुमच्या जाणिवेमध्ये त्या चित्राशिवाय दुसरे काहीही येऊ देऊ नका – केवळ तेच तुमच्या जाणिवेमध्ये असू दे.”

तुमचे डोळे त्या चित्रावरच खिळलेले असतात आणि तुम्ही तुमची नजर अजिबात हटवत नाही. तुम्ही जणू काही त्या चित्राने संमोहित झाल्यासारखे असता. तुम्ही पाहता, तुम्ही पाहता, पाहता, पाहता… काहींना कमी अधिक वेळ लागतो, पण ज्याला त्याची सवय आहे त्याच्याबाबतीत हे काहीसे लगेच घडून येते. तुम्ही पाहत राहता, पाहता, पाहता आणि एकाएकी तुम्ही ज्या चित्राकडे पाहत असता ते चित्रच तुम्ही बनून जाता. त्या चित्राविना या जगामध्ये दुसरे काही जणू शिल्लकच राहात नाही आणि तेव्हा एकाएकी तुम्ही दुसऱ्या बाजूला जाता; आणि जेव्हा तुम्ही त्या दुसऱ्या बाजूला जाता तेव्हा तुमचा एका नवीनच चेतनेमध्ये प्रवेश झालेला असतो आणि तुम्हाला ज्ञान होते. हे सारे अद्भुत होते, त्यामुळे आम्ही खूप हसलो. पण हे काहीसे खरे आहे. सराव करण्याजोगी ही एक चांगली पद्धत आहे.

अर्थात, एखादे चित्र किंवा एखादी वस्तु घेण्याऐवजी तुम्ही एखादी कल्पना, काही शब्द घेऊ शकता. तुम्हाला भेडसावणारी एखादी समस्या असते, आणि तुम्हाला त्या समस्येचे उत्तर माहीत नसते. तुम्ही ती समस्या वस्तुनिष्ठपणे मांडा, ती अगदी नेमकी, अचूक मांडा. शक्य असेल तितक्या संक्षिप्त शब्दांमध्ये मांडा आणि त्यावर लक्ष केंद्रित करा, प्रयत्न करा. तुम्ही केवळ शब्दांवर लक्ष केंद्रित करता पण शक्य असेल तर ते शब्द ज्याचे प्रतिनिधित्व करतात त्या कल्पनेवर लक्ष केंद्रित करा, म्हणजे त्या समस्येवर लक्ष केंद्रित करा. जोवर दुसरे काही शिल्लकच उरणार नाही तोवर त्यावर लक्ष केंद्रित करा. आणि हे खरे आहे, एकाएकी, तुमच्यामध्ये काहीतरी खुलेपणाची भावना निर्माण होईल आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला असाल. दुसरी बाजू पण कशाची?

ह्याचा अर्थ असा की, तुम्ही तुमच्या जाणिवेचे एक द्वार उघडलेले असते. आणि तुम्हाला ताबडतोब तुमच्या समस्येची उकल होते.

‘व्यक्तीने स्वत:शी एकात्म कसे पावावे’ हे शिकण्याची ही एक उत्तम पद्धत आहे.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 218-219)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

चैत्य पुरुष म्हणजे काय?

अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…

9 hours ago

तुमच्या अंतरीचे ईश्वरत्व

ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…

17 hours ago

चैत्य पुरुष खुला होणे

जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…

2 days ago

दिव्य अस्तित्वाचा शोध

  आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…

3 days ago

आत्मनिरीक्षण कसे करावे?

  (उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…

4 days ago

अंतरात्म्याचा शोध

तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…

5 days ago