जेव्हा तुम्ही इतरांसोबत काही काम करत असता त्यावेळी जर तुम्हाला एखादी गोष्ट पटली नाही तर ती दिव्य कृपा आहे, प्रगती करण्यासाठी तुम्हाला देण्यात आलेली ती एक उत्तम संधी आहे असे समजा.

आणि हे सोपे आहे : तुम्ही ह्या बाजूने असण्याऐवजी त्या बाजूने असता. तुम्ही स्वत:कडे पाहण्याऐवजी, तुम्ही त्या दुसऱ्या माणसामध्ये प्रवेश करता आणि तेथून पाहता. त्यासाठी तुमच्यापाशी थोडीशी कल्पनाशक्ती हवी; तुमच्या विचारांवर, तुमच्या कृतीवर थोडेसे अधिक प्रभुत्व हवे. पण हे काही तितकेसे कठीण नाही. जर तुम्ही थोडासाही प्रयत्न करून पाहाल तर, कालांतराने तुम्हाला ते खूप सोपे वाटू लागेल.

तुम्ही केवळ पाहणे आणि “हे असे का आहे? ते तसे का आहे? त्याने तसे का केले? तो तसे का म्हणाला?” असले स्वतःशीच बोलत बसणे, केवळ मानसिक प्रयत्न करणे पुरेसे नाही. त्यातून तुम्हाला काहीच साध्य होणार नाही. असेच करत राहिलात तर तुम्हाला काहीच समजणार नाही. तुम्ही सर्व प्रकारच्या स्पष्टीकरणाची कल्पना करत राहाल, जी अगदीच निरुपयोगी असतील आणि “तो माणूस मूर्ख आहे, दुष्ट आहे.” असे म्हणायला लागण्यापलीकडे त्याचा काहीच उपयोग होणार नाही.

उलट, जर तुम्ही थोडासा प्रयत्न केलात, तुमच्या पासून दूर एखादी दूरस्थ वस्तू असल्याप्रमाणे त्याकडे पाहण्याऐवजी, जर तुम्ही त्याच्या अंतरंगात शिरण्याचा प्रयत्न केलात, तुम्ही आत शिरलात, तुमच्या समोर जो माणूस आहे त्याच्या डोक्यात शिरकाव कारण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही एकाएकी, स्वत:ला दुसऱ्या बाजूला पाहाल; तुम्ही स्वत:कडेच पाहाल आणि आता तुम्हाला व्यवस्थितपणे कळेल की, तो तसे का म्हणत आहे; सर्वकाही सुस्पष्ट असेल, का, कशामुळे, कारण काय, त्या गोष्टीमागची त्याची भावना…सारे सारे काही. तुम्हाला दिवसातून शंभर वेळा असे करण्याची संधी मिळेल असा हा प्रयोग आहे. सुरुवाती सुरुवातीला तुम्हाला त्यात काही फारसे यश येणार नाही पण जर तुम्ही चिकाटीने प्रयत्न करत राहिलात तर तुम्ही लक्षणीयरित्या यशस्वी झालेले असाल; त्यामुळे जीवनात एका मोठेच स्वारस्य निर्माण होते.

ज्यामुळे तुमची खरोखरीच प्रगती होते असे हे कार्य आहे. कारण ज्या क्षुद्र अशा चिखलामध्ये तुम्ही स्वतःला छान रीतीने कोंडून घेतलेले असते आणि ज्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्टीवर अडखळत राहता, त्यामधून हे कार्य तुम्हाला बाहेर काढते.

प्रकाशावर आपटत राहणारे किडे तुम्ही पाहिले आहेत ना? व्यक्तीची जाणीव ही काहीशी तशीच असते, ती प्रत्येक वस्तुवर ठोकर खात राहते, कधी इकडे कधी तिकडे, कारण त्या गोष्टी तिच्यासाठी परक्या असतात. पण ठोकरा खात राहण्याऐवजी व्यक्ती जर अंतरंगात प्रवेश करेल तर ती त्या गोष्टीचा एक हिस्साच बनून जाते. अशा रीतीने व्यक्ती स्वत:ला व्यापक बनविते, मोकळेपणाने श्वास घेते, आतमध्ये वावरायला पुरेशी जागा असते, तेव्हा व्यक्ती कशावर तरी जाऊन धडपडत नाही, ती आत प्रवेश करते, खोलवर जाते आणि तिला सारे काही समजून येते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 220-221)

व्यक्तीने स्वत:शी एकात्म कसे पावायचे हे शिकण्याची ही एक उत्तम पद्धत आहे. उदाहरणार्थ, तुम्ही कोणाबरोबर तरी आहात. ती व्यक्ती तुम्हाला काहीतरी सांगते, तुम्ही त्याच्या अगदी विरुद्ध असे काहीतरी सांगता (विरोध करण्याच्या हिरिरीतून, हे बहुधा नेहमीच घडते) आणि तुम्ही वादविवाद करायला सुरुवात करता. साहजिकच आहे की, तुम्ही कोणत्याच मुद्यापाशी येऊन पोहोचणार नाही; हां, जर तुम्ही भांडकुदळ असाल तर त्यातून भांडणं मात्र होतील.

पण तसे करण्याऐवजी, म्हणजे स्वत:च्या शब्दांमध्येच किंवा स्वत:च्या कल्पनांमध्येच बंदिस्त होऊन राहण्याऐवजी जर तुम्ही स्वत:ला सांगितलेत, “एक मिनिट थांब, मी प्रयत्न करून पाहाते आणि तो मला असे का म्हणाला ते समजावून घेते. हो, तो मला तसे का म्हणाला?” तुम्ही चिंतन करता, “का? का? का?” तुम्ही तिथेच प्रयत्न करत थांबून राहता. दुसरा माणूस बोलतच असतो – परंतु आता तो खूष होतो कारण तुम्ही आता त्याला विरोध करत नसता. तो तावातावाने बोलत राहतो; त्याला वाटते की, त्याने तुम्हाला त्याचे म्हणणे पटवून दिले आहे.

तो काय म्हणत आहे त्यावर तुम्ही अधिकाधिक लक्ष एकवटू लागता; हळूहळू त्याच्या भावनेच्या आणि शब्दांच्या माध्यमातून जणू काही तुम्ही त्याच्या मनात प्रवेश करता. जेव्हा तुम्ही त्याच्या डोक्यात प्रवेश करता, तेव्हा एकदम तुम्ही त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये प्रवेश करता. आणि थोडी कल्पना करा, तो तुमच्याशी तसा का बोलत आहे ह्याचे तुम्हाला आकलन होते.

आणि जर तुमच्याकडे पुरेसे बुद्धिचापल्य असेल आणि जर तुम्ही, तुम्हाला पूर्वज्ञात असलेल्या कल्पनेच्या बरोबरीने ही आत्ताच समजलेली कल्पना शेजारी शेजारी ठेवलीत तर आता तुमच्याकडे एकत्रितपणे दोन विचारसरणी असतील आणि त्या दोहोंना एकवटणारे असे सत्य तुम्ही शोधून काढू शकाल. आणि इथेच तुम्ही खरीखुरी प्रगती केलेली असेल.

स्वत:चे विचार व्यापक करण्याचा हा एक सर्वोत्तम मार्ग आहे.

जर तुम्ही एखाद्या युक्तिवादाला सुरुवात करणार असाल, तर ताबडतोब शांत व्हा. तुम्ही शांत राहिले पाहिजे, काहीही बोलू नका आणि ती दुसरी व्यक्ती गोष्टींकडे ज्या पद्धतीने पाहत आहे त्या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करा. त्याने, तुम्ही तुमची पाहण्याची पद्धतच विसरून जाल, असे काही घडणार नाही. उलट, तुम्ही त्या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे मांडू शकाल.. तेव्हा तुम्ही खरंच प्रगती केलेली असेल, एक खरीखुरी प्रगती!

– श्रीमाताजी
(CWM 05 : 218-219)

परिपूर्ण जाणीव प्राप्त करून घेण्याचा मार्ग म्हणजे तुमची सद्यस्थितीतील जाणीव ही तिच्या सवयी व मर्यादा यांच्या पलीकडे वाढविणे; तिला शिक्षण देणे, तिला दिव्य प्रकाशाच्या दिशेने विकसित करणे, तिच्यामध्ये दिव्य प्रकाशाला त्याचे कार्य मुक्तपणे आणि पूर्णपणे करू देणे.

परंतु तो दिव्य प्रकाश तेव्हाच त्याचे कार्य पूर्णपणे आणि निर्विघ्नपणे पार पाडू शकतो जेव्हा तुम्ही तुमच्या सर्व लालसा आणि भीती यांच्यापासून मुक्त झालेले असता; जेव्हा तुमच्यामध्ये कोणतेही मानसिक पूर्वग्रह नसतात; कोणत्याही प्राणिक आवडीनिवडी नसतात; तुम्हाला बंधनात पाडणारी किंवा पीडा देणारी, कोणतीही शारीरिक भयशंकितता नसते किंवा कसलेही आकर्षण नसते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 101)

प्रश्न : “जेव्हा व्यक्ती अडचणीमध्ये असेल तेव्हा तिने स्वत:ला विशाल, व्यापक करावे,” ह्याचा अर्थ कसा लावावा?

श्रीमाताजी : मी येथे योगमार्गावरील अडचणींविषयी बोलत आहे; आकलन करून घेण्यातल्या अडचणी, मर्यादा, अडथळ्यांसारख्या. मला म्हणावयाचे असते की तुमच्या जाणिवेच्या कक्षा विशाल करा.

अडचणी या नेहमीच अहंकारामधून उद्भवतात. म्हणजे तुम्ही परिस्थितीला, घटनांना, तुमच्या अवतीभवतीच्या माणसांना, किंवा तुमच्या जीवनातील स्थितीला ज्या कमीअधिक अहंजन्य वैयक्तिक प्रतिक्रिया देता, त्यामधून अडचणी उद्भवतात. तुमच्याहून अधिक उन्नत आणि अधिक विशाल अशा वास्तवाशी एकात्म होण्यापासून जेव्हा तुमची जाणीव तुम्हाला रोखते, म्हणजे जेव्हा व्यक्ती एक प्रकारच्या कवचामध्ये, कोशामध्ये जखडून पडल्यासारखी होते तेव्हा त्या भावनेतूनदेखील अडचणी उद्भवतात.

व्यक्ती नक्कीच असा विचार करू शकते की, तिला विशाल व्हावयाचे आहे; तिला विश्वात्मक व्हावयाचे आहे, तिच्यामध्ये अहंकार असता कामा नये; सर्व काही त्या ईश्वराचीच अभिव्यक्ती आहे, अशा तऱ्हेच्या अनेक गोष्टींचा व्यक्ती विचार करू शकते पण हा काही खात्रीशीर उपाय नाही कारण बऱ्याचदा व्यक्तीला तिने काय करावे हे माहीत असते पण या ना त्या कारणामुळे ती ते करत नाही.

पण समजा जर का तुम्हाला क्लेश झाले, दुःखभोग, उद्रेक, वेदना किंवा अगतिकतेची भावना या साऱ्यांना सामोरे जावेच लागले – या मार्गामध्ये आड येणाऱ्या ह्या साऱ्या गोष्टी म्हणजेच तुमच्या अडचणी आहेत – अशा वेळी जर तुम्ही शारीरिक दृष्ट्या म्हणजे, तुमच्या शारीर जाणिवेने स्वत:ला व्यापक करू शकलात, जर तुम्ही स्वत:ला उलगडू शकलात – एखादा कापडाचा तागा असावा आणि घड्यांवर घड्या याप्रमाणे तो बांधलेला असावा त्याप्रमाणे तुम्ही त्या तशा घड्यांमध्ये बंदिस्त झाला आहात अशी तुम्हाला जाणीव झाली तर – तेव्हा तुम्हाला जर बांधल्याप्रमाणे, घुसमटल्याप्रमाणे वाटत असेल, तुम्हाला जर त्रास होत असेल किंवा तुमच्या हालचाली नि:शक्त होऊन जात असतील; एखादा कापडाचा खूप घटट् बांधलेला तागा असावा; एखादे खूप घट्ट, चापूनचोपून बांधलेले गाठोडे असावे अशी तुम्हाला जाणीव होत असेल तर जमिनीवर एखादा कागदाचा वा कापडाचा तुकडा उलगडावा तसे तुम्ही स्वत:वरील घड्या, सुरकुत्या दूर करू शकलात, स्वत:ला दोन्ही बाहू फैलावून ताणू शकलात, आणि जमिनीवर पडून स्वत:ला विशाल, जेवढे शक्य आहे तेवढे विशाल बनविण्याचा प्रयत्न केलात; स्वत:ला खुले करून, ज्याला मी ‘प्रकाशाचे मुख’ म्हणते त्या प्रति पूर्ण निष्क्रियपणाचा भाव राखत, खुले करू शकलात आणि स्वत:च्या अडीअडचणींमध्ये स्वत:ला परत लपेटून घेतले नाहीत, आणि त्या दुप्पट केल्या नाहीत, म्हणजेच त्यामध्ये अडकून पडला नाहीत, म्हणजे स्वत:मध्येच गुंतून पडला नाहीत तर; एवढेच नाही तर, शक्य तितके स्वत:ला उलगडविण्याचा प्रयत्न केलात, तुमची अडचण वरून येणाऱ्या त्या प्रकाशासमोर मांडलीत तर, आणि जर का तुम्ही हे सर्व क्षेत्रांमध्ये करू शकलात, आणि अगदी तुम्ही मानसिकरित्या हे करण्यामध्ये जरी यशस्वी झाला नाहीत तरी – कारण ते बऱ्याचदा अवघड असते – तुम्ही शारीरिकदृष्ट्या, अगदी भौतिक अर्थाने देखील जरी तुम्ही तशी कल्पना करू शकलात, तर जेव्हा तुम्ही स्वत:ला खुले करण्याचे, स्वत:ला ताणण्याचे, पसरविण्याचे काम पूर्ण करता तेव्हा तुमच्या अडचणींपैकी तीनचतुर्थांश अडचणी पळून गेल्या असल्याचे तुम्हाला आढळेल.

आणि त्यानंतर त्या प्रकाशाप्रत स्वत:ला ग्रहणशील बनविण्याचे शिल्लक राहिलेले थोडेसे काम पूर्ण केले की तो एक चतुर्थांश भाग देखील नाहीसा होऊन जाईल.

स्वत:च्या अडीअडचणींशी स्वत:च्या विचारांच्या साहाय्याने झगडत राहण्यापेक्षा हे कितीतरी अधिक पटीने सोपे आहे कारण जर तुम्ही स्वत:शीच चर्चा करू लागलात तर, तुमच्या मताच्या बाजूने आणि विरोधी बाजूनेसुद्धा तुम्हाला पुष्कळ युक्तिवाद आढळतील आणि ते इतके पटण्यासारखे असतील की, उच्चतर प्रकाशाशिवाय त्यांमधून बाहेर पडणेच अशक्य होऊन जाईल.

येथे तुम्ही अडीअडचणीच्या विरोधात झगडत नाही, तुम्ही स्वत:ला पटवून देण्याचा प्रयत्नही करत नाही. सूर्यासमोर सागरकिनारी वाळूमध्ये पडून राहावे त्याप्रमाणे तुम्ही केवळ स्वत:ला प्रकाशाप्रत खुले करता आणि त्या प्रकाशाला तुमच्या मध्ये कार्य करू देता, बस् इतकेच.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 285-287)

श्रीअरविंदांनी जेव्हा बडोद्यामधील प्राध्यापकपदाची नोकरी सोडून दिली तेव्हा साहजिकच त्यांच्या विद्यार्थ्यांना खूप वाईट वाटले. पण एक आनंदही होता की, त्यांचे आवडते शिक्षक हे आता देश पातळीवरील नेते बनलेले होते. श्री. कन्हैयालाल मुन्शी हे या विद्यार्थ्यांमधील एक होते. भारतीय संस्कृतीची पुनस्थापना करण्याच्या हेतूने त्यांनी पुढील काळात भारतीय विद्या भवन’ची स्थापना केली.

मुन्शी विद्यार्थिदशेत असताना त्यांनी, प्राध्यापक श्रीअरविंद घोष यांना एक प्रश्न विचारला होता, “राष्ट्रवादाची भावना कशी विकसित करता येईल?”

श्रीअरविंदांनी भिंतीवरील भारताच्या नकाशाकडे निर्देश करीत म्हटले, “या नकाशाकडे पाहा. यामध्ये भारतमातेचे रूप पाहण्याचा प्रयत्न करा. शहरं, पर्वतराजी, नद्या, जंगले यासाऱ्यांनी मिळून तिचा देह तयार होतो. या देशामध्ये राहणारी माणसं म्हणजे या देहातील जिवंत पेशी आहेत. आपले साहित्य म्हणजे तिची स्मृती व वाणी आहे. तिच्या संस्कृतीचा गाभा हा तिचा आत्मा आहे. मुलांच्या आनंदामध्ये आणि स्वातंत्र्यामध्ये तिची मुक्ती आहे. भारत ही एक जितीजागती माता आहे या भावाने तिच्याकडे पाहा, तिचे ध्यान करा आणि नवविधा भक्तीच्या योगाने तिचे पूजन करा.”

……ह्याच मुन्शीजींनी आपल्या साहित्यातून, वेदकाळातील सरस्वती नदीच्या किनारी वसणाऱ्या आर्यांचे जीवन चित्रित केले आहे. चाळीस वर्षांनंतर मुन्शीर्जीची श्रीअरविंदांशी पुन्हा भेट झाली. तेव्हा मुन्शीर्जीना श्रीअरविंदांचे पूर्णत: वेगळे रूप दिसून आले. ते रूप कसे होते ह्याचे वर्णन त्यांनी केले आहे, ” मी ज्यांचा मनोमन दूरून आदर करत असे ते माझे शिक्षक आता माझ्या समोर नव्हते, किंवा ज्यांच्या शिकवणुकीचा जीवनामध्ये मला वेळोवेळी उपयोग झाला होता ते मुनीवर्यही माझ्या दृष्टीसमोर नव्हते तर समोर एक एकसंध, परिपूर्ण व्यक्तिमत्त्व होते. आसक्ती, प्रकोप, आणि भीती यांचे परिवर्तन शक्ती, सौंदर्य आणि शांतीमध्ये झाले होते. आर्य संस्कृतीची सारभूत कल्पनाच जणू मानवी रूपात मूर्त झाली होती.”

(Mother’s Chronicles, Book Five by Sujata Nahar)

प्रश्न : स्वत:च्या जाणिवेमध्ये बदल कसा करायचा?

श्रीमाताजी : अर्थातच ह्याचे विविध मार्ग आहेत पण प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या आवाक्यातील मार्गाचा अवलंब करावयास हवा. आपल्या मार्गाचा संकेत हा बहुधा उत्स्फूर्तपणे, एखाद्या अनपेक्षित अनुभवाद्वारे मिळून जातो. प्रत्येकाच्या बाबतीत त्यात काही ना काही फरकही आढळून येतो.

उदाहरणार्थ, एखाद्याला पृष्ठभागावर क्षितिजसमांतर पसरलेल्या अशा अगदी सामान्य जाणिवेचे भान असू शकते; ती एकाचवेळी वस्तुमात्रांच्या पृष्ठवर्ती भागामध्ये कार्य करते. त्या व्यक्तीचा वरवरच्या बाह्यवर्ती गोष्टी, माणसे, परिस्थिती यांच्याशी संपर्क असतो आणि कधीतरी, जसे मी म्हटले त्याप्रमाणे, प्रत्येकाबाबत ही गोष्ट भिन्न भिन्न असते – अचानक, या ना त्या कारणाने वस्तुमात्राकडे समपातळीवरून क्षितिजसमांतर पद्धतीने पाहण्याऐवजी व्यक्ती वर उचलली जाते; तुम्ही अकस्मात इतरांवर प्रभुत्व मिळविता, त्यांच्याकडे वरून पाहता; तुमच्या जवळपास असणाऱ्या छोट्या छोट्या असंख्य गोष्टी पाहण्यापेक्षा आता तुम्ही त्या त्यांच्या समग्रतेने पाहता; जणू काही तुम्हाला कोणीतरी वर उचलून घेतलेले असते आणि तुम्ही पर्वतशिखरावरून किंवा विमानातून पाहता. अशा वेळी प्रत्येक छोटेमोठे बारकावे न्याहाळत बसण्यापेक्षा, तुम्ही त्या गोष्टी त्यांच्या त्यांच्या पातळीवरून पाहता, तुम्ही या सर्व गोष्टींकडे एकात्मतेने आणि फार फार उंचावरून पाहता.

हा अनुभव प्राप्त करून घेण्याचे विविध मार्ग आहेत पण बहुधा हा अनुभव एखाद्या दिवशी अचानकपणे योगायोगाने येऊन जातो किंवा कधीकधी असेही होते की, या अनुभवाच्या अगदी विरोधी असाही अनुभव येतो पण आपण तेथेच येऊन पोहोचतो. व्यक्ती अचानकपणे अगदी खोलवर बुडी मारते, आपल्या अवतीभवती दिसणाऱ्या, जाणवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यापासून दूर, खोलवर बुडी मारते; या साऱ्या गोष्टी तिला आता दूरस्थ, वरवरच्या, अगदी किरकोळ अशा भासू लागतात; ती व्यक्ती आंतरिक शांततेमध्ये, आंतरिक शांतीमध्ये, वस्तुमात्रांविषयीच्या आंतरिक दृष्टीमध्ये प्रवेश करते. त्या व्यक्तीला वस्तुमात्राविषयी व आजूबाजूच्या परिस्थितीविषयी अगदी अंतरंगातून आकलन होते आणि त्यामुळे सर्वांचे मूल्यच बदलून जाते. विविध अशा बाह्य रूपांपाठीमागे असलेल्या एका सखोल एकात्मतेची, एकरूपतेची जाणीव मग त्या व्यक्तीला होते. किंवा कधीकधी, अचानकपणे, मर्यादितपणाची जाणीवच नाहीशी होते आणि व्यक्तीचा आदिअंतरहित अशा अनिश्चित काळाच्या, की जो आजवर होता आणि पुढेही कायमच असणार आहे अशा काळाच्या अनुभूतीमध्ये प्रवेश होतो.

तुमच्या आयुष्यात, हे अनुभव अचानकपणे वीजेप्रमाणे क्षणार्धात येतात; तुम्हाला कळतही नाही ते का आणि कसे आले… ते अगणित असतात, ते व्यक्तीव्यक्तीनुसार भिन्न भिन्न असतात, पण ह्या एका निमिषार्धातील अनुभवामुळे तुम्ही त्या गोष्टीचा धागा पकडू शकता.

व्यक्तीने असे लक्षात ठेवले पाहिजे की, तिने त्या अनुभवाच्या तळाशी गेले पाहिजे, ते क्षण पुन्हा जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तो अनुभव पुन्हा आठवून पाहिला पाहिजे, त्याची आस बाळगली पाहिजे, त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हा प्रारंभबिंदू असतो; आणि तुम्हाला तुमचा मार्ग कोणता ते सुचविणारा जो धागा, जो संकेत देण्यात आला होता त्याचे प्रयोजन आता येथे संपलेले असते.

ज्यांच्याबाबतीत त्यांच्या आंतरिक अस्तित्वाचा, त्यांच्या अस्तित्वाच्या सत्याचा त्यांना शोध लागणार हे निर्धारित झालेले असते त्यांच्या जीवनात एखादी तरी अशी वेळा असते की, जेव्हा ते त्यांचे उरत नाहीत, वीज चमकून जावी त्याप्रमाणे एखादा क्षणही पुरेसा असतो. व्यक्तीने कोणता मार्ग अनुसरावा हे सुचविण्यासाठी ते पुरेसे असते; हेच ते द्वार असते की जे या मार्गाकडे उघडले जाते. तेव्हा तुम्ही या द्वारातून प्रवेश करावयास हवा. आणि अधिक खरेखुरे, अधिक समग्र अशा कशाकडे तरी घेऊन जाणारी एक नवीनच स्थिती प्राप्त व्हावी म्हणून अथक चिकाटीने, सातत्याने प्रयत्नशील राहावयास हवे.

नेहमीच अनेकानेक मार्ग सांगण्यात आलेले आहेत पण तुम्हाला आजवर शिकविण्यात आलेले मार्ग, तुम्ही पुस्तकातून वाचलेले मार्ग किंवा एखाद्या शिक्षकाकडून ऐकलेले मार्ग यामध्ये ती परिणामकारकता नसते; जी परिणामकारकता कोणत्याही सुस्पष्ट कारणाविना आलेल्या या उत्स्फूर्त अनुभवामध्ये असते. ते आत्म्याच्या जागृतीचे सहजतेने उमलणे असते; एका क्षणासाठी तुमचा तुमच्या चैत्य पुरुषाशी आलेला तो संपर्क असतो; त्यातून तुमच्या आवाक्यात असलेला, तुमच्यासाठी सर्वोत्तम असा मार्ग कोणता, हे तुम्हाला दर्शविण्यात आलेले असते. ध्येयपूर्तीसाठी त्या मार्गाचे चिकाटीने अनुसरण करणे एवढेच आता तुम्हाला करावयाचे असते – हा एक क्षण असतो जो तुम्हाला कशी व कोठून सुरुवात करावयाची हे दाखवून देतो.

काही जणांना हा अनुभव रात्री स्वप्नामध्ये येतो, एखाद्याला तो कोणत्याही आकस्मिक क्षणी येऊ शकतो; कधीतरी कोणाला असे काहीतरी दिसते की, ज्यामुळे त्याच्यामध्ये एक नवीनच जाणीव उदयास येते. काहीतरी ऐकण्यात येते, एखादे सुंदर निसर्गदृश्य, सुमधुर संगीत, वाचण्यात आलेले काही शब्द, किंवा जीवापाड एकाग्रतेने केलेले प्रयास, त्याची तीव्रता असे ते काहीही असू शकते, हा अनुभव येण्याचे अक्षरश: हजारो मार्ग आणि हजारो कारणे आहेत.

पण मी पुन्हा तेच सांगते, की ज्यांना साक्षात्कार होणार हे निश्चित असते त्यांना त्यांच्या आयुष्यात एकदातरी असा हा अनुभव येतोच येतो. भले तो क्षणिक असेल, भले त्यांना तो अनुभव अगदी बालपणी आलेला असेल पण आयुष्यात एकदा तरी सत्य-चेतना काय ह्याचा अनुभव त्यांना आलेला असतो. कोणता मार्ग अनुसरला पाहिजे हे सूचित करणारा तो सर्वोत्तम संकेत असतो.

व्यक्तीने त्याचा स्वत:च्या अंत:करणात शोध घ्यावा, किंवा तो ध्यानात ठेवावा, वा त्याचे निरीक्षण करावे, व्यक्तीने काय चालू आहे त्याची नोंद घ्यावी, त्याकडे लक्ष पुरवावे, बस्, इतकेच पुरेसे असते.

कधीकधी, व्यक्ती एखादी अगदी उदारतेने केलेली कृती पाहते, जगावेगळे असे काहीतरी कानावर पडते, उदारता, आत्म्याची थोरवी किंवा एखाद्या धाडसी वीराने केलेली कृती व्यक्ती पाहते, कधीकधी काही विशेष प्रतिभासंपन्न अशा गोष्टी पाहते किंवा एखादी गोष्ट अत्यंत असाधारण पद्धतीने, सुंदरतेने केली असल्याचे व्यक्ती पाहते, ते करणाऱ्या व्यक्तीशी तिची गाठभेठ होते; अशा प्रत्येक वेळी व्यक्तीच्या मनामध्ये एक प्रकारचा उत्साह, एक प्रकारचे कौतुक, एक प्रकारची कृतज्ञता अचानकपणे दाटून येते आणि त्यातूनच अभूतपूर्व अशा आनंदाची, एका उबदार, प्रकाशमय, चेतनेच्या एका नव्या स्थितीकडे घेऊन जाणारी द्वारे खुली होतात. हा देखील तो संकेताचा धागा पकडण्याचा एक प्रकार आहे. हजारो मार्ग आहेत, व्यक्तीने फक्त सावधचित्त असले पाहिजे आणि निरीक्षण केले पाहिजे.

ह्यासाठी सर्वप्रथम स्वत:ला या जाणिवेतील परिवर्तनाची निकड भासली पाहिजे; मला माझ्या ध्येयाप्रत घेऊन जाणारा हाच तो मार्ग आहे हे तुम्ही स्वीकारले पाहिजे आणि एकदा का तुम्ही ते तत्त्व स्वीकारले की, मग तुम्ही जागरुक राहिले पाहिजे. तेव्हा तुम्हाला आढळेल की, खरोखरच तुम्हाला ते गवसते. आणि एकदा का ते गवसले की, कोणतीही चलबिचल न होऊ देता, तुम्ही वाटचालीला सुरुवात केली पाहिजे.

व्यक्तीने आत्मनिरीक्षण करावयास हवे, कायम सावध असावयास हवे, हा प्रारंभबिंदू आहे; तिने सदानकदा उदासीन, अनुत्सुक असू नये; सदोदित अनास्था बाळगू नये.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 101)

सर्वसाधारणपणे आपण अज्ञानामध्ये जीवन जगत असतो आणि आपल्याला ईश्वर काय आहे हे माहीत नसते. सामान्य प्रकृतीच्या शक्ती ह्या अदिव्य शक्ती असतात कारण त्या अहंकार, इच्छावासना आणि अचेतनेचा जणू काही एक पडदाच विणतात की, ज्यामुळे ईश्वर आपल्यापासून झाकलेला राहतो.

जी चेतना, ईश्वर काय आहे ते जाणते आणि त्यामध्ये जाणीवपूर्वक अधिवास करते, अशा उच्चतर आणि गाढतर चेतनेमध्ये आपला प्रवेश व्हावयाचा असेल तर, कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तीपासून आपली सुटका झाली पाहिजे आणि दिव्य शक्तीच्या कृतीसाठी आपण स्वतःला खुले केले पाहिजे; जेणेकरून ती दिव्य शक्ती आपल्या जाणिवेचे दिव्य प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवून आणेल. दिव्यत्वाच्या या संकल्पनेपासून आपण प्रारंभ केला पाहिजे. या सत्याचा साक्षात्कार जाणिवेच्या विकसनातून आणि तिच्या परिवर्तनामधूनच होणे शक्य आहे.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 07-08)

चैत्य विश्व किंवा चेतनचे प्रतल हा विश्वाचा असा एका भाग आहे की, जो थेटपणे दिव्य चेतनेच्या प्रभावाखाली असतो. आणि चैत्य पुरुष (Psychic Being) हा अस्तित्वाचा असा एक भाग आहे की, जो थेटपणे दिव्य चेतनेच्या प्रभावाखाली असतो; येथे विरोधी शक्तीची मात्रा तीळमात्रही चालू शकत नाही.

हे सुसंवादाचे विश्व असते आणि येथे प्रत्येक गोष्ट प्रकाशाकडून प्रकाशाकडे आणि प्रगतीकडून अधिक प्रगतीकडे अशी जात असते. चैत्य अस्तित्व हे दिव्य चेतनचे, व्यक्तीमधील दिव्य आत्म्याचे स्थान असते. ते प्रकाश, सत्य, ज्ञान, सौंदर्य आणि सुसंवाद यांचे केंद्र असते. हे असे केंद्र असते जे, तुमच्या प्रत्येकामधील दिव्य आत्म्याने त्याच्या अस्तित्वाने, अंशाअंशाने निर्माण केलेले असते; ज्या दिव्य चेतनेचे ते अविभाज्य भाग असते तिने ते प्रभावित झालेले असते, तिने घडविलेले असते आणि तिने ते संचालित केलेले असते.

तुमच्यामधील दिव्यतेच्या संपर्कात येण्यासाठी तुम्ही प्रत्येकाने आपल्या आंतरिक अस्तित्वामध्ये खोलवर चैत्य अस्तित्वाचा शोध घेतला पाहिजे. चैत्य पुरुष हा दिव्य चेतना आणि तुमची बाह्य जाणीव यांधील दुवा असतो. तो तुमच्या आंतरिक जीवनाचा रचयिता असतो; दिव्य इच्छेचा कायदा आणि सुव्यवस्था या गोष्टी त्याच्याद्वारे बाह्य प्रकृतीमध्ये अभिव्यक्त होत असतात.

जर तुम्ही तुमच्या बाह्य जाणिवेमध्ये तुमच्यामधील ह्या चैत्य पुरुषाविषयी जागृत झालात, तर तुम्हाला शुद्ध शाश्वत चेतना गवसेल आणि तुम्ही त्यात जगू लागाल; सामान्यतः मनुष्यप्राणी ज्या अज्ञानाद्वारे संचालित होत असतो त्याद्वारे संचालित होण्याऐवजी, मग तुम्ही तुमच्या अंतरंगातील शाश्वत प्रकाश आणि ज्ञान यांच्या अस्तित्वाविषयी जागृत होता आणि त्यात तुम्ही समर्पण करता, समग्रतया त्यालाच आत्मनिवेदन करता आणि सर्व बाबींमध्ये त्याच्याद्वारेच संचालित होता.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 62)

पूर्णयोगामध्ये चक्रांचे संकल्पपूर्वक खुले होणे नसते, तर शक्तीच्या अवतरणामुळे ती आपलीआपण खुली होतात. तांत्रिक साधनेमध्ये ती खालून वर खुली होत जातात, म्हणजे मूलाधार प्रथम खुले होते तर आपल्या पूर्णयोगामध्ये, ती वरून खाली खुली होत जातात, परंतु मूलाधारातून शक्तीचे आरोहण निश्चितपणे होते.

पूर्णयोगामध्ये क्वचितच कधीतरी मज्जारज्जूमध्ये प्रवाहाची जाणीव होते, जशी ती इतर नाडीप्रवाहमार्गांमध्ये किंवा शरीराच्या विविध भागांमध्येही होते. पूर्णयोगामध्ये बलपूर्वक किंवा हटातटाने कुंडलिनी जागृती होत नाही.

ह्या योगामध्ये उच्च स्तरीय आध्यात्मिक चेतनेला जाऊन मिळण्यासाठी, कनिष्ठ चक्रांमधून चेतना शांतपणे वर चढत जाते आणि ईश्वरी शक्तीचे वरून अवतरण होते. ती ईश्वरी शक्ती मन आणि शरीरावर तिचे कार्य करते. त्याची पद्धत व त्याच्या पायऱ्या ह्या प्रत्येक साधकामध्ये वेगवेगळ्या असतात.

दिव्य मातेवर पूर्ण ‘विश्वास’ आणि येणाऱ्या सर्व चुकीच्या सूचनांना व प्रभावांना दूर सारण्यासाठी आवश्यक असणारी ‘सतर्कता’ ह्या गोष्टी पूर्णयोगाचे मुख्य नियम आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 460, 462)

मनुष्यप्राण्यामध्ये नेहमीच दोन प्रकारच्या प्रकृती असतात; एक आंतरिक प्रकृती म्हणजे आत्मिक व आध्यात्मिक, जी ईश्वराच्या संपर्कामध्ये असते; आणि दुसरी बाह्य प्रकृती म्हणजे मानसिक, प्राणिक आणि शारीरिक. ह्या बाह्य प्रकृतीचे भरणपोषण अज्ञानामध्ये झालेले असते आणि ही प्रकृती दोष, अपूर्णता, अशुद्धता यांनी भरलेली असते. आणि त्यामुळेच साधनेमध्ये गोष्टी अचानक एका निमिषार्धात बदलू शकत नाहीत.

आंतरिक अनुभूती वाढत जाते, विस्तारत जाते आणि बाह्य प्रकृतीला ती अधिकाधिक व्यापत जाते. पण जोवर ती अनुभूती बाह्य प्रकृतीला पूर्णतया व्यापत नाही तोवर कोठेतरी अपूर्णता शिल्लक राहतेच.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 89-90)