उच्च आणि सत्यतर हिंदुधर्मामध्ये ही दोन प्रकार आहेत – सांप्रदायिक आणि असांप्रदायिक, विध्वंसक आणि समन्वयात्मक. एक स्वत:ला कोणत्यातरी एकाच पैलूला जखडून ठेवतो आणि दुसरा ‘सर्वात्मका’ला मिळविण्याची खटपट करतो.
धर्मविषयक सांप्रदायिक संकल्पना
एखादी संकल्पना, एखादा अनुभव, एखादे मत वा मतप्रणाली, एखादी प्रवृत्ती, कल, एक विशिष्ट गुरु, एखादा निवडक अवतार यांच्याबद्दलच्या राजसिक किंवा तामसिक आसक्तीमधून सांप्रदायिक संकल्पनांचा उदय होतो. त्यांविषयी असलेली ही बांधिलकी असहिष्णु, गर्विष्ठ असते. ती आपल्या तोकड्या ज्ञानाविषयी अभिमान बाळगणारी आणि आपल्याकडे नसलेल्या ज्ञानाविषयी कुत्सित भूमिका घेणारी असते. ती दुसऱ्यांचे कुसंस्कार, अंधश्रद्धा याविषयी बडबड करत राहते आणि स्वत:चे कुसंस्कार आणि अंधश्रद्धा यांविषयी अंध असते. किंवा ती संकल्पना म्हणते, ”माझे गुरु हेच तेवढे खरे एकमेव गुरु आहेत आणि इतर एकतर भोंदू आहेत किंवा कनिष्ठ प्रतीचे आहेत,” किंवा “माझी मानसिकताच फक्त योग्य आहे आणि जे माझा मार्ग अनुसरत नाहीत ते मूर्ख आहेत किंवा पढिक वा अप्रामाणिक आहेत,” किंवा ”माझा अवतार हाच खराखुरा ईश्वर आहे आणि इतर सर्व कनिष्ठ आविष्कार आहेत.” किंवा ”माझी इष्ट देवता हीच ईश्वर आहे आणि इतर देवता ह्या केवळ तिची आविष्करणं आहेत.”
धर्मविषयक समन्वयी संकल्पना
जेव्हा जीव अधिकाधिक उन्नत होत जातो, तेव्हाही तो त्याच्या संकल्पना, अनुभव, मते, प्रकृती, गुरु, इष्ट देवता यांचे अग्रक्रमाने अनुसरण करतो, पण आता तो इतरांकडे अज्ञानी आणि वर्जक दृष्टीने पाहत नाही. तो म्हणतो, “ईश्वराकडे जाणारे अनेक मार्ग आहेत आणि सर्वच मार्ग समानतेनेच ईश्वराकडे जाऊन पोहोचतात. सर्व माणसं, मग ती गुन्हेगार असू देत वा नास्तिक असू देत, सर्वच माझे साधनेतील बंधू आहेत आणि तो ईश्वर प्रत्येकाला त्याच्या त्याच्या मार्गाने त्या ‘एकमेवाद्वितीया’कडे घेऊन जात आहे.”
मात्र जेव्हा पूर्ण ज्ञान उदित होते तेव्हा तो स्वत:मध्ये सर्वच अनुभव कवळून घेतो. त्याला उमगते की, सर्वच संकल्पना सत्य आहेत, सर्व मतमतांतरं उपयुक्त आहेत; सर्व अनुभव आणि वृत्तीप्रवृत्ती ह्या वैश्विक अनुभव आणि पूर्णता मिळविण्याची साधने आणि स्तर आहेत; सर्व गुरु हे त्या एका आणि एकमेव गुरुची अपूर्ण माध्यमं वा अवतार आहेत; सर्व इष्टदेवता आणि अवतार हे ईश्वरच आहेत…..
– श्रीअरविंद
(CWSA 01 : 551)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…