संकटे येण्याचे कारण

(एखाद्या व्यक्तीमध्ये प्रगती करण्याची प्रामाणिक आस असेल तर तिच्या प्रगतीसाठी, वेळप्रसंगी महाकालीकडून तिच्यावर प्रहारदेखील केले जातात, या बाबतीतले तथ्य श्रीमाताजी येथे उलगडवून दाखवीत आहेत. हा भाग विस्तृत असल्यामुळे क्रमशः देत आहोत.)

श्रीमाताजी : प्रामाणिक असणे खरोखरच खूप कठीण असते… आणि म्हणूनच तुमच्यावर वारंवार आघात होत राहतात. कधीकधी तर ते आघात अधिकच भयानक होतात कारण तुमच्यामधील मूर्खपणा नाहीसा करण्याचा तोच एकमेव मार्ग असतो; संकटे का कोसळतात त्याचे हे कारण आहे. जेव्हा तुम्ही अतीव वेदनादायी अशा परिस्थितीमध्ये सापडलेले असता आणि तुमच्यावर खोलवर परिणाम करेल अशा परिस्थितीला तुम्हाला सामोरे जावे लागते, तेव्हाच तुमच्यातील मूर्खपणा थोड्याफार प्रमाणात तरी नाहीसा होतो. पण तो थोडा नाहीसा झाला तरी, अजूनही आतमध्ये थोडातरी शिल्लक असतोच आणि म्हणूनच दुःखसंकटादी साऱ्या गोष्टी इतक्या दीर्घकाळ चालू राहतात…

आपण म्हणजे कोणीच नाही, आपण काहीच करू शकत नाही, आपले अस्तित्वच नाही, आपण खरोखर अगदी कोणीच नाही, त्या दिव्य चेतनेखेरीज आणि ईश्वरी कृपेखेरीज खरोखर कोणते अस्तित्वच नाही, याची व्यक्तीच्या अंतःकरणात खोलवर जाण येण्यासाठी जीवनामध्ये कितीतरी आघात आवश्यक असतात.

ज्या क्षणी व्यक्तीला या गोष्टीची जाण येते त्या क्षणीच सारे दुःखभोग संपून जातात; सारी संकटे, अडचणी दूर होतात. व्यक्तीला जेव्हा हे पूर्णपणे कळते तेव्हा दिव्य चेतनेला विरोध करणारे तिच्यामध्ये काहीच शिल्लक राहत नाही… अर्थात या गोष्टीला खूप काळ लागतो. (क्रमशः)

• श्रीमाताजी (CWM 06 : 323-324)

श्रीमाताजी