Tag Archive for: साधना

प्रामाणिक (असणे) हे फक्त एक विशेषण आहे. त्याचा अर्थ असा की, तुमची इच्छा ही खरीखुरी इच्छा असली पाहिजे. “मी अभीप्सा बाळगतो” असा जर तुम्ही नुसताच विचार करत बसाल आणि त्या अभीप्सेशी विसंगत अशा गोष्टी करत राहाल किंवा तुमच्या स्वतःच्या इच्छावासनांचीच पूर्ती करत राहाल किंवा विरोधी प्रभावाप्रत स्वतःला खुले कराल, तर ती इच्छा प्रामाणिक नाही, (असे समजावे).

– श्रीअरविंद (CWSA 29 : 50)

प्रामाणिकपणामध्ये (Sincerity) नुसत्या सचोटीपेक्षा (honesty) बराच अधिक अर्थ सामावलेला आहे. म्हणजे असे की, तुम्ही जे बोलता तेच तुम्हाला अभिप्रेत असते, तुम्ही जे प्रतिपादित करत असता त्याची तुम्हाला जाणीव असते, तसेच तुमच्या इच्छेमध्ये खरेपणा असतो. साधक जेव्हा ईश्वराचे साधन बनण्याची आणि ईश्वराशी एकरूप होण्याची अभीप्सा बाळगत असतो, तेव्हा त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रामाणिकपणाचा अर्थ असा असतो की, तो खरोखरच कळकळीने अभीप्सा बाळगत असतो व ईश्वराव्यतिरिक्तच्या इतर सर्व इच्छांना किंवा आवेगांना तो नकार देत असतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 50)

तुम्हाला योगाभ्यासातून काय अपेक्षित आहे यासंबंधी तुम्हीच तुमच्या स्वतःच्या कल्पनांची एक उभारणी केली आहे आणि तुम्हाला जे अनुभव येऊ लागले आहेत त्याचे मूल्यमापन तुम्ही त्या आधारावरच नेहमी करत आहात आणि ते अनुभव तुमच्या अपेक्षेला धरून नसल्यामुळे किंवा तुम्हाला अपेक्षित असलेल्या तोलामोलाचे ते नसल्याने, तुम्ही एका क्षणानंतर म्हणू लागता की, “ते अनुभव अगदीच किरकोळ स्वरूपाचे आहेत.” आणि या असमाधानामुळेच तुम्ही प्रत्येक पावलागणिक (नकारार्थी) प्रतिक्रिया किंवा अंगचोरपणाकडे (recoil) वळत आहात आणि त्यामुळे सातत्यपूर्ण प्रगतीला खीळ बसत आहे.

ज्या योग्यांना अनुभूती येत असते त्यांना हे माहीत असते की, भलेही सुरुवातीस आलेले अनुभव अगदी किरकोळ असतील पण त्याला खूप महत्त्व असते आणि म्हणून सुरुवातीच्या त्या छोट्या-छोट्या अनुभवांची जोपासना केली पाहिजे आणि त्यांच्या विकसनासाठी पुष्कळ धीर धरला पाहिजे.

उदाहरणार्थ, तटस्थ अविचलता (neutral quiet) ही साधकाच्या प्राणिक अधीरतेला असमाधानकारक वाटू शकते पण तीच अवचिलता ही, सर्व आकलनाच्या अतीत असणाऱ्या शांतीकडे नेणारे पहिले पाऊल असू शकते. आंतरिक आनंदाची एखादी बारीकशी झुळूक किंवा चित्तथरार हा आनंदसागरामधील पहिलावहिला तुषार असू शकतो. (मिटल्या डोळ्यांपुढे चालणारा) प्रकाशाचा किंवा रंगांचा खेळ ही अंतर्दृष्टी आणि आंतरिक अनुभूतींची दालनं खुली करणारी गुरुकिल्ली असू शकते. दिव्य शक्तीच्या अवतरणांमुळे, शरीराचे होणारे स्तंभन आणि त्यातून शरीराचे स्थिरपणाने एकाग्र होणे, म्हणजे ज्याच्या अखेरीस ईश्वराची उपस्थिती आहे, अशा कोणत्यातरी एखाद्या गोष्टीचा पहिला स्पर्श असू शकतो; हे त्या योग्यांना माहीत असते. तो योगी अधीर नसतो. तर सुरू झालेल्या प्रगतीमध्ये कोणतेही विघ्न येऊ नये याची तो काळजी घेत असतो.

निश्चितपणे, काही साधकांना साधनेच्या आरंभिक काळात निर्णायक आणि ठोस अनुभव आलेले असतात पण त्यानंतर दीर्घ परिश्रम करावेच लागतात आणि त्यामध्ये काही कालावधी अनुभवविरहित किंवा संघर्षाचे असतात.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 14-15)

अधिक गहन व आध्यात्मिक अर्थाने सांगायचे झाले तर, ज्या गोष्टीचा साक्षात्कार झाला आहे ती गोष्ट, जेव्हा इतर कोणत्याही भौतिक गोष्टीपेक्षाही अधिक वास्तव व गतिशील आणि चेतनेच्या दृष्टीने अधिक निकट असल्याचे जाणवते, तेव्हा अशा साक्षात्काराला ‘सघन साक्षात्कार’ (concrete realisation) म्हणतात.

अशा प्रकारे सगुण ईश्वराचा (personal Divine) किंवा निर्गुण ब्रह्माचा (impersonal Brahman) किंवा आत्म्याचा (Self) साक्षात्कार हा सहसा, साधनेच्या प्रारंभीच किंवा साधनेच्या पहिल्या काही वर्षांत होत नाही किंवा साधनेला खूप वर्ष झाली तरीही होत नाही. साधनेच्या प्रारंभीच असा साक्षात्कार होणे ही गोष्ट फारच थोड्या जणांच्या बाबतीत घडते. कोणतीही योगसाधना न करतासुद्धा, लंडनमध्ये मला आलेल्या अनुभवानंतर, पंधरा वर्षांनी म्हणजे, मी योगसाधनेला सुरुवात केल्यानंतर, पाचव्या वर्षी मला तो अनुभव आला. आणि तो सुद्धा माझ्या दृष्टीने खूप असाधारणरित्या लवकरच आलेला आहे, जणू जलदगती आगगाडीचा वेगच. अर्थात, यापेक्षाही अधिक लवकर काही उपलब्धी घडून आल्या आहेत, यात शंका नाही.

पण इतक्या लवकर त्याची अपेक्षा बाळगणे आणि त्याची मागणी करणे आणि अनुभव आला नाही म्हणून हताश होणे, तसेच युगा-युगामध्ये दोन तीन व्यक्तींचा अपवाद वगळता, इतरांना हा योग करता येणे अशक्य आहे असे म्हणणे, ही गोष्ट एखाद्या अनुभवी योग्याच्या किंवा साधकाच्या दृष्टीने पाहता, उतावळ्या आणि विकृत अधीरतेमध्ये गणली जाईल. बहुतेक जण हेच सांगतील की, पहिल्या काही वर्षांमध्ये धीम्या गतीने प्रगतीची आशा बाळगणे हे चांगले. आणि जेव्हा प्रकृती तयार होते आणि जेव्हा ती पूर्णपणे ईश्वराभिमुख होते, तेव्हाच असे परिपक्व अनुभव येऊ शकतात.

काही जणांच्या बाबतीत तुलनेने अगदी सुरुवातीच्या काळात देखील, काही पूर्वतयारी करून घेणारे अनुभव अपेक्षेपेक्षा लवकर येऊ शकतात, पण तेथेही चेतनायुक्त परिश्रम करावेच लागतात, त्यापासून त्यांची सुटका नसते; या प्रयत्नांमुळे पुढे अशा अनुभवांची, चिरस्थायी आणि परिपूर्ण अशा साक्षात्कारामध्ये परिणती होते…

वास्तविक, जी माणसं कृतज्ञ असतात, आनंदी असतात; आवश्यकता पडली तर, अगदी छोटी छोटी पावले का असेनात, पण एकेक पाऊल टाकण्याची ज्यांची तयारी असते, अशी माणसंच खरंतर अधिक वेगाने वाटचाल करतात आणि आणि जे प्रत्येक पावलागणिक निराश होतात, कुरकूर करत राहतात अशा अधीर, उतावळ्या लोकांपेक्षा ही माणसं अधिक खात्रीने वाटचाल करतात. मला तरी नेहमी असेच आढळून आले आहे; याला विरोधी अशीही काही उदाहरणे असतील देखील, पण मला एवढेच सांगायचे आहे की, जर तुम्ही ‘आशा, उत्साह आणि श्रद्धा’ कायम बाळगू शकलात तर, अधिक मोठ्या शक्यतेला वाव असेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 112)

अधीरता नेहमीच चुकीची असते. ती साधनेला साहाय्य करत नाही तर, ती अडथळे निर्माण करते. अविचल, प्रसन्न श्रद्धा आणि विश्वास हा साधनेसाठी सर्वोत्तम पाया असतो. उर्वरित गोष्टींसाठी साधकामध्ये अभीप्सेबरोबरच, ग्रहणशीलतेसाठी सातत्यपूर्ण असे संपूर्ण खुलेपण असणे आवश्यक असते. ही अभीप्सा उत्कट असू शकेल पण ती नेहमीच स्थिरशांत आणि अविचल असली पाहिजे. योगाचा संपूर्ण साक्षात्कार अचानक होत नाही. आधाराची (मन, प्राण व शरीर यांची) बरीच तयारी झाली की मग, साक्षात्कार होतो आणि ती तयारी होण्यासाठी कधीकधी खूप दीर्घ कालावधी लागू शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 111-112)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

कोणतीही अडचण आली किंवा कितीही त्रास सहन करावा लागला, तरी न थकता, निराश न होता, नाउमेद न होता किंवा अधीर न होता प्रयत्न करत राहण्याची व्यक्तीच्या अंगी असलेली क्षमता म्हणजे तितिक्षा (endurance). थकवा, निराशा इत्यादी गोष्टी आल्या तरी व्यक्तीने आपले उद्दिष्ट किंवा आपला निर्धार ढासळू देता कामा नये किंवा प्रयत्न करणे सोडून देता कामा नये, हे देखील तितिक्षेमध्ये अभिप्रेत असते.

*

“मी पुन्हा प्रयत्न करीन”, असे नुसते म्हणणे पुरेसे नाही. आवश्यकता आहे ती सतत, अविचलपणे, निराश न होता प्रयत्न करत राहण्याची. गीतेमध्ये म्हटले आहे त्याप्रमाणे ‘अनिर्विण्णचेतसा‌’ प्रयत्न करत राहण्याची आवश्यकता आहे.

तुम्ही जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे त्याच्यासाठी साडेपाच वर्षांचा कालावधी हा खूप मोठा कालावधी आहे, असे तुमचे म्हणणे आहे. पण तुम्ही म्हणताय तेवढ्या कालावधीत, जर एखाद्या योग्याला, स्वतःच्या प्रकृतीमध्ये पूर्णपणे परिवर्तन करता आले आणि त्याला ईश्वराचा अगदी निर्णायक सघन असा अनुभव आला तर, तो योगी आध्यात्मिक मार्गावर वेगाने घोडदौड करणारा आहे, असेच म्हटले पाहिजे. आध्यात्मिक परिवर्तन ही अगदी सोपी गोष्ट आहे, असे आत्तापर्यंत कोणीच कधीही म्हटलेले नाही. सर्व आध्यात्मिक साधक हेच सांगतील की, ती अतिशय अवघड गोष्ट असते पण ती खरोखरच प्रयत्न करण्याजोगी गोष्ट आहे.

ईश्वरप्राप्ती व्हावी अशी एकमेव आस जर एखाद्या व्यक्तीला लागली असेल तर ती व्यक्ती निश्चितच, कोणतीही काचकूच न करता किंवा त्यासाठी किती काळ लागतोय किंवा त्यामध्ये किती अडचणी येत आहेत किंवा त्यासाठी किती कष्ट उपसावे लागत आहेत, याची कोणतीही तक्रार न करता, स्वतःचे संपूर्ण आयुष्य त्यासाठी देऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 117) & (CWSA 30 : 18)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

साधनेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर नेहमीच अडचणी येतात आणि त्यामुळे प्रगतीमध्ये अडथळा येतो. जोपर्यंत व्यक्तीची पुरेशी तयारी झालेली नसते तोपर्यंत त्याची आंतरिक दालनं उघडण्यास विलंब लागतो.

जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता तेव्हा, तुम्हाला जर निश्चलता जाणवत असेल आणि आंतरिक प्रकाश चमकून जात असेल तसेच, आंतरिक ऊर्मी इतकी अधिक वृद्धिंगत होऊ लागली असेल की त्यामुळे तुमची बाह्य गोष्टींबद्दलची आसक्ती कमी होऊ लागली असेल आणि प्राणिक अडचणींमधील जोर कमी होऊ लागला असेल तर, तीच स्वयमेव एक महान प्रगती असते.

योगमार्गाचा प्रवास हा खूप दीर्घ असतो आणि प्रचंड प्रतिकाराच्या विरोधात लढा देऊन, त्या मार्गावरील इंचइंच भूमी जिंकावी लागते. आणि त्यासाठी साधकाकडे धीर आणि एक-लक्ष्यी चिकाटी असणे आवश्यक असते. तसेच, कितीही अडचणी आल्या, विलंब झाला किंवा वरकरणी अपयश येताना दिसले तरीही, त्या सगळ्यामधूनही दृढ राहू शकेल अशी श्रद्धा साधकामध्ये असणे आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 110)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

नामस्मरणाच्या शक्तीचा आणि संरक्षणाचा तुम्हाला अनुभव आला आहे असे दिसते. जो कोणी श्रद्धेने आणि विश्वासाने नामस्मरण करतो त्या प्रत्येकाला जसा अनुभव येतो तसाच तुमचा हा अनुभव आहे. एखादी व्यक्ती संरक्षणासाठी जेव्हा अगदी हृदयापासून धावा करते तेव्हा तो धावा कधीच निष्फळ ठरत नाही.

तुमच्यामध्ये जी श्रद्धा आहे ती कोणत्याही बाह्य परिस्थितीमुळे कधीच विचलित होऊ देऊ नका. कारण सर्व प्रकारच्या प्रसंगांमधून, अडचणींमधून वाट काढत, ध्येयाप्रत घेऊन जाण्याचे सामर्थ्य या श्रद्धेशिवाय अन्य कोणत्याच गोष्टीमध्ये नसते. ज्ञान आणि तपस्येमध्ये कितीही ताकद असली तरीही, ती श्रद्धेपेक्षा काकणभर उणीच ठरते. श्रद्धा ही साधकासाठी त्याच्या योगमार्गावरील वाटचालीसाठी सर्वात मजबूत असा आधार असते.

तुमच्यावर श्रीमाताजींची प्रेममय दृष्टी आहे आणि त्यांचे संरक्षक-छत्र तुमच्यावर आहे. त्यावर भरवसा ठेवा आणि त्याप्रत अधिकाधिक खुले व्हा. तसे केलेत तर ते संरक्षक-छत्र तुमच्यावरील सर्व आघात पळवून लावेल आणि तुम्हाला कवेत घेईल.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 308)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१

(मला फक्त ईश्वर दर्शनाचीच आस आहे, पण तरीही तो मला दर्शन का देत नाहीये? असा प्रश्न एका साधकाने विचारला असावा, असे दिसते. त्याला श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)

तुम्ही असे म्हटले पाहिजे की, “मला फक्त ईश्वरच हवा आहे, त्यामुळे मला यशाची खात्री आहे. मी फक्त त्याकडे पूर्ण विश्वासाने वाटचाल केली पाहिजे म्हणजे मग तो माझ्याही नकळत मला, स्वतःच्या हाताने त्याच्या स्वतःच्या मार्गावर आणि त्याने निर्धारित केलेल्या वेळी निश्चितपणे घेऊन जाईल.” हा तुमचा नित्य-मंत्र असला पाहिजे. आणि खरे तर, करण्यासारखी हीच एकमेव तर्कशुद्ध आणि सयुक्तिक गोष्ट आहे. कारण या व्यक्तिरिक्त कोणतीही गोष्ट करणे म्हणजे लक्षणीय स्वरूपाचा तर्कहीन विरोधाभास असतो.

हे जग म्हणजे कायम मानवसमूहांची युद्धभूमीच राहणार का, त्याव्यतिरिक्त हे जग दुसरे काही असूच शकणार नाही का? यासारख्या इतर कोणत्याही गोष्टींबाबत व्यक्ती शंका उपस्थित करू शकते. कारण या शंका तर्कसंगत असू शकतात. पण जी व्यक्ती केवळ एका ईश्वराचीच आस बाळगते ती व्यक्ती ईश्वरापर्यंत जाऊन पोहोचणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

प्रत्येक साधकाच्या हृदयाच्या तळाशी ही श्रद्धा असणे आवश्यकच आहे. कारण या वाटचालीमध्ये साधक जर समजा अडखळून पडला, त्याला काही आघात सहन करावा लागला, त्याला जर अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागले तर, त्या प्रत्येक वेळी ही श्रद्धाच त्याला साहाय्य करून, तारून नेते.

(पण) तुमच्या मनावर अजूनही मिथ्या संकल्पनाचे सावट आहे आणि त्यामुळे तुमच्यामध्ये श्रद्धा निर्माण होण्यामध्ये अडचण येत आहे. या मिथ्या संकल्पना एकदाच कायमच्या दूर करा आणि या साध्यासरळ आंतरिक सत्याकडे अगदी साधेपणाने व सरळपणाने पाहा, म्हणजे मग, तुमच्या अडचणीच्या मूळ कारणाचाच बिमोड होईल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 97)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४०

(उत्तरार्ध)

एखादी अशी गोष्ट की, जी अद्यापि आविष्कृत किंवा साध्य झालेली नाही किंवा जी अद्यापि प्रत्यक्षात उतरलेली नाही; परंतु ती सत्य आहे आणि अनुसरण्यास किंवा साध्य करून घेण्यास परमयोग्य आहे याची जाणीव आपल्या अंतरंगात वसणाऱ्या ‘ज्ञात्या‌’ला असते. अगदी कोणतेही संकेत मिळालेले नसतानासुद्धा ज्ञात्याला तशी जाणीव असते. त्या गोष्टीबाबत असणारे आत्म्याचे साक्षित्व म्हणजे श्रद्धा! मनामध्ये जरी त्या गोष्टीबाबत अगदी ठाम विश्वास नसला किंवा प्राण जरी त्याविरुद्ध झगडत असला, बंड करत असला किंवा त्या गोष्टीस नकार देत असला तरीसुद्धा आपल्या अंतरंगातील ती गोष्ट तशीच टिकून राहू शकते.

योगसाधना करणाऱ्या प्रत्येकालाच कधी ना कधी निराशेच्या, अपयशाच्या, अविश्वासाच्या आणि अंधकाराच्या प्रदीर्घ कालावधीस सामोरे जावे लागलेले असते. परंतु त्याच्याठायी अशी एक गोष्ट असते की, जी त्याला आधार देते व त्यामुळे तो टिकून राहतो आणि स्वतःबाबत साशंकता असतानासुद्धा, तो मार्गक्रमण करत राहतो. कारण त्याच्या श्रद्धेला असे जाणवत असते, किंबहुना त्याला हे ज्ञात असते की, तो ज्याचे अनुसरण करत आहे ते आजही सत्यच आहे. ईश्वर अस्तित्वात आहे आणि जिचे अनुसरण केले पाहिजे अशी ईश्वर हीच एकमेव गोष्ट आहे, हे त्याला ज्ञात असते. त्या तुलनेत जीवनातील अन्य कोणतीच गोष्ट प्राप्त करून घेण्यायोग्य नाही, जिवामध्ये उपजत असणारी ही श्रद्धाच, योग‌मार्गामधील मूलभूत श्रद्धा असते.

तुमच्या पत्रावरून असे दिसून येते की, या चढत्यावाढत्या श्रद्धेमुळेच तुम्ही या योगा‌कडे वळला आहात आणि तुमच्यामधील ही श्रद्धा अजूनही मृत पावलेली नाही किंवा मंदावलेली नाही. (उलट) ती अधिक दृढ आणि स्थायी झालेली आहे. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीमध्ये ही श्रद्धा टिकून असते, तोपर्यंत ती व्यक्ती आध्यात्मिक जीवनासाठी पात्र असते. मी तर असेही म्हणेन की, त्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये कितीही अडथळे असले, तिची प्रकृती अडीअडचणी व नकारांनी अगदी कितीही ठासून भरलेली असली आणि अनेक वर्षे जरी त्या व्यक्तीला संघर्ष करावा लागलेला असला तरीसुद्धा, तिला आध्यात्मिक जीवनात यश मिळणार हे निश्चित!

– श्रीअरविंद (CWSA 29 : 93)