Tag Archive for: संस्मरण

मी जेव्हा प्रथमच भारतात जपानच्या बोटीतून आले, त्या बोटीवर दोन पाद्री होते. ते दोघेही भिन्न पंथांचे होते. रविवारचा धार्मिक कार्यक्रम कोणी करावयाचा ह्यावरून त्या दोघांमध्ये भांडणे सुरु झाली. बऱ्याच वेळाने त्यापैकी एकाने माघार घेतली, दुसऱ्याने कार्यक्रमाला सुरुवात केली. बोटीवर हा कार्यक्रम जिथे होणार होता तिथे जाण्यासाठी खाली उतरून जावयाचे होते. मला वाटते, तेव्हा आम्ही लाल समुद्रातून प्रवास करीत होतो. त्या दिवशी खूप उकाडा होता, पण सर्वांनी जाकीटे घातली होती, टाय लावले होते, चामडी बूट घातले होते, डोक्यावर टोप्या घातल्या होत्या, हातामध्ये बायबल ग्रंथ धरलेला होता. सगळे जण तयार होऊन रांगेने जणू काही मिरवणूकच निघाली असावी अशा रीतीने त्या ठिकाणी गोळा झाले. बोटीवरचे जवळपास सर्व लोक त्यामध्ये मोठ्या धार्मिकतेने सहभागी झाले. प्रार्थना संपली आणि लगेचच कोणी बारमध्ये, कोणी पत्ते खेळण्यामध्ये, कोणी काही तर कोणी काही करण्यामध्ये गुंगून गेले.

नंतर ते पाद्री माझ्यापाशी आले आणि म्हणाले, “तुम्ही प्रार्थनेला आला नाहीत?”

मी म्हटले, “माझा धर्मावर विश्वास नाही.”

ते म्हणाले,”अच्छा! म्हणजे तुम्ही जडवादी आहात तर!”

मी म्हटले,”नाही, अजिबात नाही. मी तुम्हाला काही सांगितले तर तुम्ही नाराज व्हाल, त्यापेक्षा न बोलणेच बरे.”

त्यांनी खूप आग्रह केल्यावर मी त्यांना सांगितले,”तुम्ही आणि इतर लोकही प्रामाणिक आहेत असे मला वाटत नाही. तुम्ही केवळ एक सामाजिक कर्तव्य व सामाजिक प्रथा म्हणून प्रार्थना केलीत, त्यामध्ये ईश्वराशी संपर्क साधण्याचा कोणताही भाव नव्हता.”

ते म्हणाले, “पण ते तर आम्हाला जमत नाही.”

मी म्हणाले, “म्हणूनच तर मी तेथे आले नाही. कारण मला त्यात स्वारस्य वाटत नाही.”

– श्रीमाताजी

(CWM 08:149)

(एका आश्रमवासी साधकाने सांगितलेली ही आठवण.)

मी तेव्हा आश्रमात नुकताच राहिला आलो होतो. दुपारी एका आश्रमवासी साधकाने संभाषणाच्या ओघात मला सांगितले की, “काही लोकांना वाटते की मोठमोठे ग्रंथ वाचणे, प्रवचने ऐकणे, तासनतास ध्यानधारणा करणे म्हणजे साधना. परंतु मी म्हणतो की, जर तुम्हाला श्रीमाताजी काय आहेत हे खरोखरी जाणून घ्यावयाचे असेल, तर त्यांच्यासाठी तुम्ही काम केले पाहिजे, तरच तुम्हाला त्यांच्या शक्तिस्रोताचा प्रत्यय येईल.” त्याच्या या शब्दांचा माझ्या मनावर फारच परिणाम झाला आणि श्रीमाताजींसाठी काम करावयाचे असे मी मनोमन ठरवून टाकले.

नंतर सुमारे एका वर्षानंतरची गोष्ट. माझ्या सोबत एक पगारी कामगार आणि एक मुलगा होता. कामगार होता, तो होता तंत्रज्ञ. आणि मी होतो अगदीच नवीन, मदतनीस मुलाचे काम असावयाचे ते शिडी इकडून तिकडे हलविण्याचे, तो मुलगा बरेच दिवस गैरहजर असायचा. त्याच्या गैरहजेरीत ‘शिडी हलविण्यासारखे क्षुल्लक काम मी का करावे’ या भावनेने तंत्रज्ञ त्याला हातदेखील लावत नसे. अशाने कामाचा खोळंबा होऊ लागला, तेव्हा मी श्रीमाताजींना सुचविले, “आम्हाला दुसरा एक मदतनीस मुलगा देता का?”

त्या म्हणाल्या, “शिडी उचलायला अजून कोणाची मदत कशास पाहिजे? तुम्ही दोघे मिळून एक शिडी उचलू शकत नाही?” नाही म्हटले तरी ‘मी त्यांचा वरिष्ठ आहे’ असा एक भाव माझ्याही मनात होताच. पण श्रीमाताजींचे म्हणणे मान्य करावयाचे मी ठरविले.

दुसऱ्या दिवशी मदतनीसाची वाट न पाहता मी एकटाच शिडी हलवू लागलो. हे पाहून नाईलाजाने का होईना, पण त्या कामगारानेही शिडी उचलण्यास हातभार लावला. अशाप्रकारे, आपल्या सहकाऱ्यांकडून काम कसे करवून घ्यावयाचे ह्याचा धडाच श्रीमाताजींनी मला दिला होता.

(भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला संदेश तिरूचिरापल्लीच्या ऑल इंडिया रेडिओ वरून प्रसारित करण्यात आला. तो येथे देत आहोत.)

१५ ऑगस्ट हा स्वतंत्र भारताचा जन्मदिवस! भारतासाठी हा जुन्या युगाच्या अंताचा आणि नव्या युगाच्या प्रारंभाचा संकेत आहे. ही गोष्ट केवळ आपल्यापुरतीच महत्त्वाची आहे असे नाही, तर त्याचे मोल आशिया आणि अखिल विश्वासाठी देखील आहे. मानवतेचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक भवितव्य निर्धारित करण्यामध्ये ज्या शक्तीचा मोठा वाटा असणार आहे, अशा एका नव्या शक्तीचा, अकथित अशी क्षमता असलेल्या एका नव्या शक्तीचा, राष्ट्रसमूहांमध्ये प्रवेश होत असल्याचे हे द्योतक आहे.

माझ्या जीवनामध्ये ज्या जागतिक घडामोडी पाहता याव्यात अशी माझी मनीषा होती, जरी तेव्हा त्या स्वप्नवत वाटत होत्या तरी, त्या मला आजच्या ह्या दिवशी फळाला येताना दिसत आहेत वा त्यांची सुरुवात तरी झाली आहे किंवा त्या त्यांच्या परिपूर्तीच्या मार्गावरती तरी आहेत. या निमित्ताने, माझ्या बालपणी आणि तरुणपणी, माझ्यामध्ये ज्या ध्येयांची, आदर्शाची रुजवण झाली होती, त्या ध्येयांचा, आदर्शाच्या सार्थकतेचा प्रारंभ झालेला मला दिसत आहे, अशी मी व्यक्तीश: उद्घोषणा करू शकतो; कारण ही ध्येयधोरणं भारताच्या स्वातंत्र्याशी निगडित आहेत. ही ध्येयधोरणं म्हणजे माझ्या दृष्टीने भारताचे भावी कार्य आहे, हे असे कार्य आहे की, जेथे भारताने नेतृत्व स्वीकारणे आवश्यकच आहे.

कारण मला नेहमीच असे वाटत आले आहे आणि तसे मी सांगत आलो आहे की, भारताचा उदय होतो आहे तो केवळ त्याचे स्वत:चे भौतिक हेतू म्हणजे त्याचा विस्तार व्हावा; महानता, शक्तिसामर्थ्य, समृद्धी ह्या गोष्टी त्याला साध्य व्हाव्यात म्हणून नाही, अर्थात त्याकडेही भारताने दुर्लक्ष करता कामा नये, किंवा इतरांप्रमाणे इतरेजनांवर प्रभुत्व संपादन करावे म्हणूनही भारताचा उदय होत नाहीये तर ईश्वरासाठी, या जगतासाठी, अखिल मानवी वंशाला साहाय्य करण्यासाठी, त्यांचे नेतृत्व करण्यासाठी भारताचा उदय होतो आहे.

ही ध्येयं आणि आदर्श त्यांच्या स्वाभाविक क्रमाने अशी आहेत :
१) भारताचे स्वातंत्र्य आणि भारताची एकात्मता ज्यातून साध्य होईल अशी क्रांती.
२) आशिया खंडाची मुक्ती आणि त्याचे पुनरुत्थान, मानवी सभ्यतेच्या प्रगतीमध्ये आशिया खंडाने आजवर जी थोर भूमिका निभावली होती त्याकडे त्याचे परतून येणे.
३) मानवजातीसाठी एका नूतन, अधिक महान, अधिक तेजस्वी आणि उदात्त अशा जीवनाचा उदय की, जे जीवन परिपूर्णतया साकारण्यासाठी बाह्यत: ते पृथगात्म अस्तित्व असणाऱ्या लोकसमूहांच्या आंतरराष्ट्रीय एकीकरणावर आधारित असेल; ते समूह त्यांचे त्यांचे राष्ट्रीय जीवन जतन करतील, त्याचे संरक्षणही करतील पण ते जीवन त्या सर्वांना एकत्रितपणे एका नियंत्रित आणि परम एकात्मतेकडे घेऊन जाणारे असेल.
४) भारताकडे असलेले आध्यात्मिक ज्ञान आणि जीवनाच्या आध्यात्मिकीकरणासाठी वापरण्यात येणारी साधने ही भारताची संपूर्ण मानवजातीला देणगी असेल.

भारत स्वतंत्र झाला आहे पण त्याला एकात्मता साध्य झालेली नाही, एक भंगलेले, विदीर्ण झालेले स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. एकवेळ तर असे वाटून गेले की, भारत पुन्हा एकदा ब्रिटिशांच्या सत्तेपूर्वी जसा विभिन्न राज्याराज्यांमध्ये विभागलेला होता तशाच अराजकतेमध्ये जाऊन पडतो की काय. परंतु सुदैवाने हे विनाशकारी पुनर्पतन टाळता येईल अशी एक दाट शक्यता अलीकडे विकसित झाली आहे. संविधान सभेच्या समजुतदार, मूलगामी धोरणामुळे उपेक्षित वर्गाच्या समस्या ह्या कोणत्याही फाटाफूटीविना वा भेगाळल्याविना दूर होतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.

परंतु हिंदु आणि मुस्लीम यांतील जुने जातीय भेद हे देशाच्या दृष्टीने एका कायमस्वरूपी राजकीय भेदाभेदाची मूर्तीच बनून, दृढमूल झालेले दिसत आहेत. तोडगा निघालेली ही आत्ताची परिस्थिती हा कायमचाच उपाय आहे असे काँग्रेस आणि राष्ट्र धरून चालणार नाहीत किंवा एक तात्पुरता उपाय आहे, ह्या पलीकडे फारसे महत्त्व ते त्याला देणार नाहीत, अशी आशा आहे. कारण असे झाले नाही तर, भारत गंभीररित्या दुर्बल होईल, कदाचित लुळापांगळाही होईल. अंतर्गत कलहाची शक्यता तर कायमच भेडसावत राहील, किंवा कदाचित एखादे नवे आक्रमण वा परकीय सत्तेचा विजय अशा धोक्यांची शक्यताही संभवते.

या देशाची फाळणी नष्ट व्हायलाच पाहिजे. दोन्ही देशांमधील ताणतणाव कमी करून, शांती आणि सद्भाव यांविषयीच्या गरजेबद्दलची चढतीवाढती जाणीव बाळगून, एकत्रित आणि एकदिश होऊन केलेल्या कृतीची वाढती गरज लक्षात घेऊन, किंवा ह्याच हेतूसाठी अस्तित्वात आलेल्या एकात्मतेच्या साधनाद्वारे ही फाळणी नष्ट होईल अशी आशा बाळगता येईल.

कोणत्याही मार्गाने का असेना ही भेदात्मकता, ही फाळणी नाहीशी व्हायलाच पाहिजे आणि ती नाहीशी होईलच. कारण त्याविना भारताचे भवितव्य हे खरोखर दुर्बल आणि निराशाजनक असेल. परंतु ते कदापिही तसे असता कामा नये.

आशिया खंडाचा उदय होत आहे आणि या खंडातील बहुतांशी भाग हे स्वतंत्र झाले आहेत किंवा ह्या घडीला ते स्वतंत्र होत आहेत; त्यातील इतर काही अंकित भाग हे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी झगडत आहेत, लढा देत आहेत. अगदी थोड्याच गोष्टी करण्याची आवश्यकता आहे आणि त्या आज ना उद्या केल्या जातीलच. तेथे भारताला त्याची भूमिका पार पाडावीच लागेल आणि भारताने पूर्ण सामर्थ्यानिशी आणि क्षमतेनिशी ती भूमिका पार पाडायला सुरुवात देखील केली आहे; आणि त्यातून भारताच्या अंगी असणाऱ्या संभाव्यतेच्या मोजमापाचा आणि राष्ट्रसमूहांच्या समितीमध्ये तो जे स्थान प्राप्त करून घेईल त्याचा निर्देश होत आहे.

समग्र मानवजात आज एकात्म होण्याच्या मार्गावर आहे. तिची ही वाटचाल सदोषपूर्ण अशी, अगदी प्रारंभिक अवस्था ह्या स्वरूपात असली तरी, असंख्य अडचणींशी झगडा देत, परंतु सुसंघटितपणे तिची वाटचाल चालू आहे. आणि त्याला चालना मिळालेली दिसत आहे आणि इतिहासाचा अनुभव गाठीशी धरला, त्याला मार्गदर्शक केले तर विजय प्राप्त होत नाही तोवर ती गती अगदी अनिवार्यपणे वाढवत नेली पाहिजे. अगदी येथेसुद्धा भारताने त्याची महत्त्वाची भूमिका बजावयाला सुरुवात केली आहे, आणि केवळ सद्यकालीन तथ्यं आणि नजीकच्या शक्यता एवढ्यापुरतेच स्वत:ला मर्यादित न ठेवता भारत जर, भविष्याचा वेध घेऊ शकला आणि ते भविष्य निकट आणू शकला तर, आणि तसेच, एक व्यापक मुत्सद्देगिरी विकसित करू शकला तर मग, स्वत:च्या निव्वळ अस्तित्वानेही भारत, मंदगती व भित्रे तसेच धाडसी व वेगवान प्रगती करणारे यांच्यामध्येसुद्धा फरक घडवून आणू शकेल. यामध्ये एखादे अरिष्टसुद्धा येऊ शकते, हस्तक्षेप करू शकते वा जे काही घडविण्यात आलेले आहे त्याचा विध्वंसही करू शकते, असे घडले तरीसुद्धा अंतिम परिणामाची निश्चित खात्री आहे.

कोणत्याही परिस्थितीमध्ये, एकत्रीकरण ही प्रकृतीच्या विकासाची एक आवश्यकता आहे, एक अपरिहार्य अशी हालचाल आहे आणि त्याच्या परिणामाविषयी, साध्याविषयी सुरक्षित भाकीत करता येणे शक्य आहे. एकत्रीकरणाची राष्ट्रांसाठी असलेली आवश्यकता पुरेशी स्पष्ट आहे, कारण त्याच्याशिवाय ह्यापुढील काळात छोट्या समूहांचे स्वातंत्र्य कधीच सुरक्षित राहू शकणार नाही आणि अगदी मोठी, शक्तिशाली राष्ट्रदेखील अबाधित राहू शकणार नाहीत. भारत, जर असा विभागलेलाच राहिला तर त्याला त्याच्या सुरक्षिततेची खात्री बाळगता येणार नाही. आणि म्हणूनच सर्वांच्या हितासाठी सुद्धा हे एकीकरण घडून यावयास हवे. केवळ मानवी अल्पमती आणि मूर्ख स्वार्थीपणाच ह्याला आडकाठी करेल.

एक आंतरराष्ट्रीय वृत्ती आणि दृष्टिकोन वाढीला लागावयास हवा; आंतरराष्ट्रीय रचना, संस्था ह्या वाढीस लागावयास हव्यात, राष्ट्रीयत्व तेव्हा स्वत:च परिपूर्ण झालेले असेल; अगदी दुहेरी नागरिकत्व किंवा बहुराष्ट्रीय नागरिकत्वासारख्या घडामोडीदेखील घडून येतील. या परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये संस्कृतींचा ऐच्छिक संगमदेखील दिसू लागेल आणि राष्ट्रीयत्वाच्या भावनेमधील आक्रमकता नाहीशी झाल्याने, ह्या साऱ्या गोष्टी या एकात्मतेच्या स्वत:च्या विचारसरणीशी अगदी पूर्णत: मिळत्याजुळत्या आहेत, असे आढळून येईल. एकतेची ही नवी चेतना संपूर्ण मानवी वंशाचा ताबा घेईल.

ह्या विश्वाला भारताचे जे आध्यात्मिक योगदान आहे ते प्रदान करण्यास त्याने केव्हाच प्रारंभ केला आहे. सतत चढत्यावाढत्या प्रमाणात भारताची आध्यात्मिकता युरोप आणि अमेरिकेमध्ये प्रवेश करत आहे. ही चळवळ वाढतच राहील. काळाच्या आपत्तींमध्ये भारताकडे जगाचे अधिकाधिक डोळे मोठ्या आशेने वळत आहेत. केवळ भारताच्या शिकवणुकीचाच नव्हे तर भारताच्या अंतरात्मिक आणि आध्यात्मिक साधनापद्धतींचाही ते उत्तरोत्तर अधिकाधिक आश्रय घेत आहेत. उर्वरित जे काही आहे ती अजूनतरी वैयक्तिक आशा आहे आणि एक अशी संकल्पना, एक असे उद्दिष्ट आहे की, ज्याने भारतातील आणि पाश्चात्त्य देशांमधील पुरोगामी मनांचा ठाव घ्यायला सुरुवात केली आहे.

कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रयत्न करू लागल्यावर, मार्गामध्ये ज्या अडचणी येतात त्यापेक्षा कितीतरी अधिक भीषण अडचणी या मार्गावर आहेत; परंतु अडचणी ह्या त्यांवर मात करण्यासाठीच असतात आणि जर ईश्वरी इच्छा तेथे असेल तर अडचणींवर मात केली जाईलच. येथे देखील, जर अशा प्रकारचे विकसन होणारच असेल तर ते आत्म्याच्या विकसनातूनच आणि आंतरिक जाणिवेतूनच उदयास यावयास हवे, यांमध्ये भारत पुढाकार घेऊ शकतो. आणि त्याची व्याप्ती वैश्विक असणेच भाग आहे, त्याची केंद्रवर्ती प्रक्रिया भारताचीच असू शकेल.

भारताच्या स्वातंत्र्यदिनी मी हा आशय आपणापुढे मांडू इच्छितो. हा विचारांचा धागा पूर्णत्वास जाईल किंवा नाही, तो किती प्रमाणात पूर्णत्वास जाईल, हे सर्व काही या नूतन आणि स्वतंत्र भारतावर अवलंबून आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 474)

श्रीअरविंदांनी जेव्हा बडोद्यामधील प्राध्यापकपदाची नोकरी सोडून दिली तेव्हा साहजिकच त्यांच्या विद्यार्थ्यांना खूप वाईट वाटले. पण एक आनंदही होता की, त्यांचे आवडते शिक्षक हे आता देश पातळीवरील नेते बनलेले होते. श्री. कन्हैयालाल मुन्शी हे या विद्यार्थ्यांमधील एक होते. भारतीय संस्कृतीची पुनस्थापना करण्याच्या हेतूने त्यांनी पुढील काळात भारतीय विद्या भवन’ची स्थापना केली.

मुन्शी विद्यार्थिदशेत असताना त्यांनी, प्राध्यापक श्रीअरविंद घोष यांना एक प्रश्न विचारला होता, “राष्ट्रवादाची भावना कशी विकसित करता येईल?”

श्रीअरविंदांनी भिंतीवरील भारताच्या नकाशाकडे निर्देश करीत म्हटले, “या नकाशाकडे पाहा. यामध्ये भारतमातेचे रूप पाहण्याचा प्रयत्न करा. शहरं, पर्वतराजी, नद्या, जंगले यासाऱ्यांनी मिळून तिचा देह तयार होतो. या देशामध्ये राहणारी माणसं म्हणजे या देहातील जिवंत पेशी आहेत. आपले साहित्य म्हणजे तिची स्मृती व वाणी आहे. तिच्या संस्कृतीचा गाभा हा तिचा आत्मा आहे. मुलांच्या आनंदामध्ये आणि स्वातंत्र्यामध्ये तिची मुक्ती आहे. भारत ही एक जितीजागती माता आहे या भावाने तिच्याकडे पाहा, तिचे ध्यान करा आणि नवविधा भक्तीच्या योगाने तिचे पूजन करा.”

……ह्याच मुन्शीजींनी आपल्या साहित्यातून, वेदकाळातील सरस्वती नदीच्या किनारी वसणाऱ्या आर्यांचे जीवन चित्रित केले आहे. चाळीस वर्षांनंतर मुन्शीर्जीची श्रीअरविंदांशी पुन्हा भेट झाली. तेव्हा मुन्शीर्जीना श्रीअरविंदांचे पूर्णत: वेगळे रूप दिसून आले. ते रूप कसे होते ह्याचे वर्णन त्यांनी केले आहे, ” मी ज्यांचा मनोमन दूरून आदर करत असे ते माझे शिक्षक आता माझ्या समोर नव्हते, किंवा ज्यांच्या शिकवणुकीचा जीवनामध्ये मला वेळोवेळी उपयोग झाला होता ते मुनीवर्यही माझ्या दृष्टीसमोर नव्हते तर समोर एक एकसंध, परिपूर्ण व्यक्तिमत्त्व होते. आसक्ती, प्रकोप, आणि भीती यांचे परिवर्तन शक्ती, सौंदर्य आणि शांतीमध्ये झाले होते. आर्य संस्कृतीची सारभूत कल्पनाच जणू मानवी रूपात मूर्त झाली होती.”

(Mother’s Chronicles, Book Five by Sujata Nahar)

(आश्रमातील एक साधक श्री.पूजालाल यांच्या आठवणींमधून…)

पहाटेचे पाच वाजले होते. नेहमीप्रमाणे, मी त्या पवित्र वास्तुत गेलो, जेथे श्रीअरविंद आणि श्रीमाताजी रहात. मला त्या घराच्या काही भागाच्या साफसफाईचे काम करण्याची मुभा देण्यात आली होती. मी जेव्हा तेथे कामाला जात असे तेव्हा श्रीमाताजी स्वत: दार उघडायला येत असत आणि माझ्या आनंददायी कामाची सुरुवात होत असे. पण एके दिवशी दार उघडल्यावर, श्रीमाताजी तेथेच उभ्या राहिल्या आणि श्रीअरविंदांचा संदर्भ देत, मला त्यांनी दिवसभर अतिशय काळजीपूर्वक आणि शांतपणे काम करण्यास सांगितले; जेणेकरून मधल्या मोठ्या दरवाजाच्या वरच्या बाजूला विसावलेल्या चिमणीला त्रास होऊ नये.

हा जणु परमेश्वरी आदेशच आहे असे समजून, मी सावधगिरीने वागेन अशी त्यांना हमी दिली. मी आत प्रवेश केला आणि मग श्रीमाताजी निघून गेल्या. कोणताही आवाज न करता, अगदी हलक्या पावलाने मी त्या दरवाजासमोरून गेलो आणि आश्चर्याची व आनंदाची बाब म्हणजे ती चिमणी सर्वात वरच्या बाजूला अगदी शांतपणे, निस्तब्ध बसलेली होती. मी थक्क झालो.

आमचे दिव्य गुरु किती करुणामय आहेत ! ते रात्री त्या हॉलमध्ये फेऱ्या मारीत असत. तेव्हा त्यांनी त्या छोट्या पाखराला नेहमीच शांततामय असणाऱ्या त्या वातावरणात, रात्रीची विश्रांती घेत असलेले पाहिले.
त्यांच्या करुणार्द्र दृष्टीचा लाभ केवळ आम्हा मनुष्यप्राण्यांनाच होत होता असे नव्हे, तर त्यांच्या वैश्विक हृदयामध्ये लहान आणि मोठे अशा साऱ्यांनाच प्रेमाचे स्थान होते. खरोखरीच, आपण सारे भाग्यवान आणि ही पृथ्वीही भाग्यवान की, जिच्यामध्ये दिव्य गुरु, विश्वाचा स्वामी मूर्त रूपात वास करीत आहे; आपल्या उच्च स्थानावरून त्याने आमच्यासाठी कायमस्वरूपी कृपाछत्र धरले आहे आणि आपल्या प्रेममयी हृदयाच्या खोलीमध्ये त्यांनी आम्हाला आसरा दिला आहे.

– श्री.पूजालाल
(Reminiscences of Pujalal : Pg 80)

कोणीतरी मला एका आठ वर्षाच्या मुलीने फ्रेंचमध्ये लिहिलेले पुस्तक आणून दिले.(त्या मुलीचे नाव मिनू डुओट) आठ वर्षाच्या मुलीच्या मानाने ते पुस्तक खरंच खूप विलक्षण आहे. त्या पुस्तकात खूप चांगली चांगली वाक्यं तिने लिहिली आहेत. उदा. चेहऱ्यावर वांग (गोऱ्या रंगावर दिसणारे तपकिरी ठिपके) असलेल्या एका मुलाविषयी ती लिहिते, “तू खूप सुंदर आहेस, तुझ्या चेहऱ्यावरील वांगसुद्धा छान आहेत, जणू काही कोणी देवदूताने तुझ्या चेहऱ्यावर गव्हाचे दाणे पेरले आहेत, ज्यामुळे आकाशातील पक्षी आकर्षित व्हावेत.” खरंच, हे खूप काव्यमय आहे. (श्रीमाताजींनी अशीच उदाहरणे पुढेही दिली.)

ही सारी उदाहरणे पाहून मला मेटरलिंकची (नोबेल पारितोषिक विजेता साहित्यिक) आठवण येते. ज्या प्रतिभावान साहित्यिकांनी त्यांचे सारे आयुष्यच या साहित्यिक कामासाठी वाहिलेले असते, त्यांच्यामध्ये एक सुव्यवस्थित मानसिक अस्तित्व तयार होते, या अस्तित्वाला स्वत:चे असे जीवन असते; असे साहित्यिक जेव्हा निधन पावतात तेव्हाही हे मानसिक अस्तित्व स्वतंत्रपणे, स्वायत्तपणे शिल्लक राहते; त्याला अभिव्यक्त होण्याची सवय असल्याने ते आविष्कारासाठी इतरत्र माध्यम शोधते.

आणि त्याचवेळी जर असे एखादे मूल असेल की, जे अनुकूल अशा परिस्थितीत जन्माला आले असेल, जसे की येथे त्या मुलीची आई कवयित्री आहे; कदाचित तिची अशी इच्छा असेल की, तिचे मूल असे असामान्य असावे; अशावेळी ते मानसिक अस्तित्व या बाळाच्या जन्माच्यावेळी त्यामध्ये प्रवेश करू शकते आणि स्वत:ला अभिव्यक्त करावयाचा प्रयत्न करते. आणि मग अशा वेळी, त्या बालकामध्ये अशी मानसिक परिपक्वता, अशा असामान्य गोष्टी करण्याच्या क्षमता येतात. या मुलीमध्ये मेटरलिंकच्या मानसिक अस्तित्वाचा पुनर्जन्म झाला आहे आणि त्याद्वारे तो अभिव्यक्त होत आहे असे म्हणता येईल.

– श्रीमाताजी (CWM 08:316-318)

श्री अरविंद घोष यांना क्रांतिकार्यासाठी अटक करण्यात आली. तेव्हा ते काहीसे विचलित झाले. पुढील तीन दिवस तसेच निघून गेले; तेव्हा त्यांच्या अंतरंगातून आवाज आला, “थांब आणि काय होते ते पाहा.” मग ते काहीसे शांत, स्थिरचित्त झाले.

त्यांना तेथून अलीपूरच्या तुरुंंगात नेण्यात आले. त्यांना आठवले की, सुमारे महिन्याभरापूर्वीच त्यांना हातातील सर्व कामे बाजूला ठेवून एकांतवासात जाण्याचा आदेश मिळाला होता. पण प्राणप्रिय असलेल्या देशकार्यापासून ते स्वत:ला दूर करू शकले नव्हते. तेव्हा देवाने त्यांना सांगितले, “जी बंधने तोडण्याचे तुझ्यामध्ये सामर्थ्य नव्हते, ती बंधने मी तुझ्यासाठी तोडली आहेत. मला तू काही अन्य कार्य करणे अपेक्षित आहे.” श्रीअरविंदांच्या हाती भगवद्गीता देण्यात आली.

पुढे तुरुंगात फिरण्यासाठी म्हणून त्यांना सकाळी व संध्याकाळी अर्धा तास कोठडीबाहेर सोडण्यात येऊ लागले. ते जेव्हा त्या तुरुंगाच्या उंच भिंतीकडे पाहू लागले तेव्हा, तिच्या जागी त्यांना वासुदेवाचे दर्शन झाले, कोठडीच्या बाहेर ते ज्या झाडाखाली फिरत असत तेथेही त्यांना जाणीव झाली की, ते झाड नसून वासुदेवच आहे. ते झोपत असत त्या कांबळ्यामध्ये तसेच तुरुंगाच्या गजांमध्येदेखील त्यांना वासुदेवाचे दर्शन झाले. तुरुंग, त्यातील चोर, दरोडेखोर, खुनी या साऱ्यासाऱ्यांंमध्येही त्यांना त्याच एकमेवाद्वितीय वासुदेवाचे दर्शन घडले. त्यांच्या खटल्याची सुनावणी करण्यासाठी त्यांना मॅजिस्ट्रेटपुढे उभे करण्यात आले तेव्हा, तेथेही त्यांची तीच जाणीव टिकून होती. त्या मॅजिस्ट्रेटमध्येही त्यांना वासुदेवाचे दर्शन झाले.

भगवान श्रीकृष्ण त्यांना म्हणत होते, “सर्व माणसांमध्ये माझा निवास असतो आणि त्यांच्या कृतीचे नियमन मी करतो. माझे संरक्षण अजूनही तुझ्यासोबत आहे, या खटल्याची सारी जबाबदारी माझ्यावर सोपव.”

…… श्री.अरविंद घोष यांना आलेला ‘वासुदेवः सर्वम् इति’ हा अनुभव त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला.

आधार : (CWSA-08:05)

श्रीमती सविता हिंदोचा नावाच्या एक साधिका तेव्हा केनियामध्ये राहत असत. त्यांच्या घरी श्रीअरविंद आणि श्रीमाताजी ह्यांचे काही साधक एकत्र जमले होते. त्यांनी प्रार्थना, ध्यान आणि वाचन सुरु केले. तेव्हा ते श्रीअरविंदांच्या ‘सावित्री’ या महाकाव्यातील उताऱ्याचे वाचन करत होते.

सविता म्हणतात, “मी भारावून गेले होते आणि मला असे जाणवू लागले की, मला ते काव्य समजावे म्हणून खुद्द माताजीच मला ते वाचून दाखवत आहेत…” आणि ह्या अनुभवानंतर पुढे एके दिवशी हिंदोचा यांनी सर्वसामान्य जीवन मागे सोडून द्यावयाचे असा निश्चय केला. आणि मग सुरु झाली प्रार्थनांची मालिका!

श्रीमाताजींना भेटण्यासाठी त्या व्याकुळ झाल्या. त्यांची खात्री पटली की, संपत्ती, कुटुंब, भौतिक आनंद, समृद्धी ह्या कशाकशातूनच दिव्य शांती आणि समाधान त्यांना मिळू शकणार नाही, आणि मग एक दिवस त्या आश्रमात येऊन दाखल झाल्या. श्रीमाताजींनी त्यांना हुता (सर्वस्व-दान केलेली) असे नाव दिले.

आश्रमात राहू लागल्यावर त्यांनी एकदा श्रीमाताजींना विचारले, “मी कोणत्या वेळी प्रार्थना करू म्हणजे मी तुमच्या सोबत प्रार्थना करू शकेन?” तेव्हा श्रीमाताजींनी त्यांना उत्तर दिले,

“प्रार्थना किंवा ध्यानासाठी माझी ठरावीक अशी कोणती वेळ नाही. वरवर पाहता हा देह काहीतरी काम करताना दिसत असला तरी मी दिवसरात्र सातत्याने परमपुरुषाला आवाहन करत असते. या असत्यमय जगामध्ये ते परमसत्य आणि ह्या बेबनावाने भरलेल्या जगामध्ये परमप्रेम आविष्कृत व्हावे म्हणून प्रार्थना करत असते. तेव्हा तुला जेव्हा प्रार्थना करावीशी वाटेल तेव्हा तू कर; तुला आढळेल की, तुझी प्रार्थना माझ्यासमवेतच झालेली आहे.”

– आधार : (On The Mother by K.R.Srinivasa lyengar)

श्रीअरविंद भारतात आल्यानंतर, त्यांना तत्कालीन काँग्रेसची मवाळ भूमिका मानवली नाही. ‘इंदुप्रकाश’मध्ये त्यावर टीका करणारी “New Lamps for Old” ही लेखमाला त्यांनी लिहिली होती. कोणत्याही भारतीयाने आजवर इतक्या उत्तम इंग्रजीमध्ये, इतके ओजस्वी लिखाण तोपर्यंत केलेले नव्हते; त्यामुळे जेव्हा हे लिखाण प्रकाशित होऊ लागले तेव्हा सर्वांचेच लक्ष त्याकडे वेधले गेले. विशेषतः इंग्रज सरकारचे!

तेव्हा ह्याच पार्श्वभूमीवर तत्कालीन समाजधुरिण न्या. महादेव गोविंद रानडे यांनी “असे जहाल लिखाण लिहू नये,”असे संपादकांना सांगितले. तसे प्रसिद्ध केल्यास लेखकाला अटक होण्याची शक्यता आहे, अशी आशंका त्यांनी व्यक्त केली. तेव्हा श्रीअरविंदांनी राजकारणाच्या तत्त्वज्ञानाविषयी लिखाण करावयास सुरुवात केली. तरीही शासनाची त्यांच्यावर वक्र दृष्टी राहिलीच.

‘वंदे मातरम्’ ह्या वृत्तपत्राच्या लेखनामध्ये श्रीअरविंदांचा हात आहे असा ब्रिटिश सरकारला संशय होता आणि त्यामुळे राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यासाठी ब्रिटिश सरकार अगदी उत्सुक होते. श्रीअरविंदांच्या नावाने अटक वॉरंट निघाले, तेव्हा ते स्वतःच पोलिसांना शरण गेले.

या घटनेने आजवर गुप्तपणे कार्यरत असलेले श्रीअरविंद एका रात्रीत नेते म्हणून प्रसिद्धीस आले. तेव्हा भारतभरातून वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी या घटनेची दखल घेतली. ‘मराठा’ वृत्तपत्रात लो.टिळकांनी लिहिले, “कोणी सांगावे जे कृत्य आज राजद्रोह म्हणून गणले जात आहे, ते उद्या दैवी सत्य म्हणून गणले जाईल.”

दि.०८ सप्टेंबर १९०७ च्या अंकात रवीन्द्रनाथ टागोरांनी श्रीअरविंदांना अभिवादन करणारी कविता बंगालीतून लिहिली.

श्रीअरविंदांच्या विरुद्ध कोणताही आरोप सिद्ध होऊ न शकल्यामुळे पुढे, त्यांची निर्दोष सुटका झाली. तेव्हा रवीन्द्रनाथ टागोर त्यांना भेटण्यास गेले आणि चेष्टेत म्हणाले, “काय हे? तुम्ही तर आम्हाला फसविलेत.”

तेव्हा श्रीअरविंद हसून म्हणाले, “तुम्हाला त्यासाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही.” आणि खरोखर, पुढे लवकरच म्हणजे ०२ मे १९०८ मध्ये श्रीअरविंदांना परत अटक करण्यात आली.

(Sri Aurobindo-a biography and a history by K.R.Srinivasa Iyengar)