Tag Archive for: व्यावहारिक जीवन

विचार शलाका – १५

…सर्व दुःखं ही समर्पण परिपूर्ण न झाल्याचे लक्षण असते. मग जेव्हा तुम्हाला तुमच्या आत असा एक ‘आघात’ जाणवतो तेव्हा ‘अरे, हे वाईट झाले किंवा परिस्थिती कठीण आहे’ असे म्हणण्याऐवजी तुम्ही म्हणता, “माझे समर्पण परिपूर्ण नाहीये.” तेव्हा ते म्हणणे योग्य ठरेल. आणि मग तुम्हाला ती ‘कृपा’ जाणवते, जी तुम्हाला मदत करते, मार्गदर्शन करते आणि तुम्ही पुढे मार्गक्रमण करता. आणि एक दिवस तुम्ही अशा शांतीमध्ये प्रवेश करता की जी कशानेही क्षुब्ध होऊ शकत नाही. सर्व विरोधी शक्तींना, विरोधी गतिविधींना, आक्रमणांना, गैरसमजुतींना, दुर्वासनांना अशा स्मितहास्याने उत्तर देता की, जे ईश्वरी कृपेवरील पूर्ण विश्वासामुळे येत असते आणि हाच दु:खांमधून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग असतो, दुसरा कोणताही मार्ग नाही.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 398-399)

विचार शलाका – १४

आपल्या चेतनेचे जेव्हा परिवर्तन होईल तेव्हाच परिवर्तन म्हणजे काय ते आपल्याला कळेल.

*

परिवर्तन…

०१. द्वेषाचे परिवर्तन सुसंवादामध्ये
०२. मत्सराचे परिवर्तन औदार्यामध्ये
०३. अज्ञानाचे परिवर्तन ज्ञानामध्ये
०४. अंधाराचे परिवर्तन प्रकाशामध्ये
०५. असत्याचे परिवर्तन सत्यामध्ये
०६. दुष्टपणाचे परिवर्तन चांगुलपणामध्ये
०७. युद्धाचे परिवर्तन शांततेमध्ये
०८. भीतीचे परिवर्तन निर्भयतेमध्ये
०९. अनिश्चिततेचे परिवर्तन निश्चिततेमध्ये
१०. संशयाचे परिवर्तन श्रद्धेमध्ये
११. गोंधळाचे परिवर्तन व्यवस्थेमध्ये
१२. पराभवाचे परिवर्तन विजयामध्ये.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 223)

विचार शलाका – ०९

अगदी क्षुल्लक गोष्टीनेदेखील असमाधानी होणाऱ्या तुमच्या अहंकाराला, तुमच्या अस्तित्वाची दारे उद्दाम आणि उद्धट अविश्वासाच्या अशुभ वृत्तीकडे उघडण्याची सवयच लागते की ज्यामुळे तो, जे जे पवित्र व सुंदर असते त्यावर, विशेषत: तुमच्या जिवाच्या अभीप्सेवर आणि ‘परमेश्वरी कृपे’कडून मिळणाऱ्या मदतीवर, चिखलफेक करण्यात काळाचा अपव्यय करतो.

हे असेच चालू दिले तर त्याचा शेवट हा महाभयंकर अशा आपत्तीत व विनाशात होतो. हे संपविण्यासाठी अतिशय कठोर अशी पावले उचलली गेली पाहिजेत, आणि त्यासाठी तुमच्या जिवाचे सहकार्य आवश्यक असते. जिवाने सजग झालेच पाहिजे आणि अहंकाराची अशुभ वृत्तीकडे उघडणारी दारे निश्चयपूर्वक बंद करून, अहंकाराशी लढा देण्यासाठी त्याने सहाय्य केले पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 23)

विचार शलाका – ०८

“अमुक एक विचार मी का केला? मला असे का वाटले? किंवा मी असे का केले?”, असे प्रश्न जर तुम्ही स्वत:लाच विचारलेत तर, १०० पैकी ९९ वेळा उत्तर नेहमी सारखेच येते. ते म्हणजे “काय माहीत? घडले खरं असे!” म्हणजेच असे म्हणता येईल की, बहुतेकदा तुम्ही अजिबात भानावर नसता.

तुम्ही जेव्हा इतरांसोबत वावरत असता, तेव्हा तुमच्यामधून कोणती स्पंदने निर्माण झाली आणि इतरांकडून कोणती स्पंदने निर्माण झाली हे तुम्हाला कळू शकते का? त्यांची जीवनशैली, त्यांची विशिष्ट स्पंदने तुमच्यावर कुठवर परिणाम करतात, हे तुम्हाला कळू शकते का? याविषयी तुम्हाला अजिबात कल्पना नसते. तुम्ही एक प्रकारच्या “अस्फुट” अशा चेतनेत जगत असता, अर्ध जागृत, अर्ध निद्रिस्त, खूपशा धूसर, अस्पष्ट अशा अवस्थेत जगत असता, की ज्यामुळे तुम्हाला गोष्टींचा वेध घेण्यासाठी चाचपडावे लागते. पण तुम्हाला तुमच्या अंतरंगात काय चालू आहे, ते तसे का चालू आहे याची निश्चित, स्पष्ट, अचूक कल्पना असते का? आणि कोणती स्पंदने तुमच्यामध्ये बाहेरून येत आहेत आणि कोणती तुमच्या आतून येत आहेत याची कल्पना असते का? जे बाहेरून येऊ शकते, ते तुमच्यातील सारे काही बदलून, त्यांना भलतेच वळण देऊ शकते, याची तुम्हाला पुसटशी तरी कल्पना असते का? तुम्ही एक प्रकारच्या अनिश्चित अशा अस्थिरतेत जगत असता, आणि अचानकपणे काही छोट्या गोष्टी तुमच्या जाणिवेत स्फटिकवत सुस्पष्ट होतात, एक क्षणभरासाठी तुम्ही त्यांना पकडलेले असते आणि त्या पुरेशा सुस्पष्ट होऊन जातात, जणू काही तिथे एखादा प्रोजेक्टर होता, पडद्यावर एक चित्र सरकून गेले, क्षणभरासाठी ते सुस्पष्ट झाले. आणि पुढच्याच क्षणाला परत सारे काही धूसर, अनिश्चित झाले. पण तुम्ही याविषयी जागृत नसता, कारण तुम्ही स्वत:ला कधी तसा प्रश्नदेखील विचारलेला नसतो, कारण तुम्ही अशाच प्रकारे जगत असता.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 336)

विचार शलाका – ०७

अहंकार स्वत:चा अधिकार सोडण्यास नकार देतो त्यामुळेच जीवनात नेहमी सर्व तऱ्हेची कटुता येते.

*

सारे जे काही घडत असते, ते आपल्याला केवळ एकमेव धडा शिकविण्यासाठीच घडत असते; तो म्हणजे, जर आपण अहंकाराचा त्याग केला नाही तर शांती ना आपल्याला मिळेल, ना इतरांना! आणि तेच, जीवन जर अहंकारविरहित असेल तर तो एक अद्भुत चमत्कार ठरतो.

*

अहंकाराच्या लीलेविना कोणतेही संघर्ष झाले नसते. आणि नाटके करण्याची प्राणाची प्रवृत्ती नसती तर जीवनात नाट्यमय घटनाही घडल्या नसत्या.

*

तुमच्या अडचणींच्या प्रमाणावरूनच तुम्हाला किती अहंकार आहे ते तुमचे तुम्हाला कळते.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 257-258)

विचार शलाका – ०५

कण्हणेविव्हळणे, रुदन करणे अशा गोष्टींमध्ये पृष्ठस्तरावरील प्रकृतीला आनंद मिळत नाही – पण तिच्या आत असे काहीतरी असते की जे, हसू आणि आसू, आनंद व दुःख, मौजमजा व वेदना यांच्या लीलेमध्ये – वेगळ्या शब्दांत सांगायचे झाले तर, या अज्ञानाच्या लीलेमध्ये रस घेते. काही माणसांमध्ये ते काही प्रमाणात पृष्ठभागावरच दिसून येते. जीवनातील दु:खभोगापासून संपूर्ण सुटकेचा प्रस्ताव जर तुम्ही त्यांच्यासमोर ठेवलात, तर त्यांच्यातील बहुतेक जण तुमच्याकडे साशंकपणे बघू लागतील. कारण ‘आनंद’, शांती, समाधान यांव्यतिरिक्त जीवनात काहीच नसेल, तर तसे जीवन त्यांना भयंकर कंटाळवाणे वाटेल – अनेकांनी तर तसे बोलूनही दाखविले आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 178-179)

विचार शलाका – ०१

दुःखभोग हे आपल्या पापकर्माची किंवा आपल्यातील वैरभावाची शिक्षा म्हणून आपल्या वाट्याला येतात असे नाही – तसे समजणे ही चुकीची कल्पना आहे. अज्ञानदशेतील जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणून जसे सुख किंवा सुदैव अनुभवास येते त्याप्रमाणेच दुःखभोग देखील वाट्यास येतात. आपल्याला आपल्या सत्यचेतनेपासून आणि परमेश्वरापासून विलग करणाऱ्या अज्ञानाचे अटळ परिणाम म्हणजे हर्ष-वेदना, आनंद-दुःख, सुदैव-दुर्दैव ही द्वंद्वे होत. केवळ परमेश्वराकडे परतण्यानेच दुःखभोगापासून आपली सुटका होऊ शकते. गतजन्मांतील कर्म अस्तित्वात असतात आणि बव्हंशी जे घडते ते त्यामुळेच; पण सर्वच गोष्टी काही त्याचे परिणाम नसतात. कारण आपण आपल्या स्वतःच्या चेतनेने आणि प्रयत्नांनी आपल्या कर्मांमध्ये सुधारणा घडवून आणू शकतो. ज्याप्रमाणे भाजणे हा आगीशी खेळण्याचा स्वाभाविक परिणाम असतो त्याप्रमाणे दुःखभोग हा आपल्या गतकालीन प्रमादांचा निव्वळ स्वाभाविक परिणाम असतो; दुःखभोग ही आपल्या गतकालीन प्रमादांची शिक्षा नसते. अशा काही अनुभवाच्या माध्यमातून, जीव हा त्याच्या साधनांद्वारे शिकत असतो आणि जोपर्यंत तो परमेश्वराकडे वळण्यास तयार होत नाही, तोपर्यंत तो विकसित होत राहतो, वृद्धिंगत होत राहतो.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 670)

सद्भावना – ३०

जोवर तुमच्यामध्ये दुसऱ्यांविषयी आपपर भाव शिल्लक असतो तोवर निश्चितपणे तुम्ही ‘सत्या’च्या परिघाबाहेर असता.

तुम्ही कायमच तुमच्या हृदयात सद्भाव आणि प्रेमभाव जतन केला पाहिजे. आणि प्रगाढ शांतीने आणि समतेने त्यांचा सर्वांवर वर्षाव केला पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 191)

सद्भावना – २९

साधे असणे खूप चांगले असते, फक्त सदिच्छा बाळगायची, आपल्याला करता येणे शक्य असेल ती उत्तमातील उत्तम गोष्ट आपण करायची आणि ती गोष्ट शक्य तेवढ्या सर्वोत्तम रीतीने करायची. त्यासाठी फार वेगळे असे काही करण्याची गरज नाही; फक्त प्रगतीसाठी, प्रकाशासाठी, सद्भावनापूर्ण शांतीसाठी अभीप्सा बाळगायची. आणि आपण काय केले पाहिजे आणि आपण कोण झाले पाहिजे यासंबंधीचा निर्णय, या विश्वातील सारे काही जो जाणतो त्या ‘ईश्वरा’लाच घेऊ द्यायचा, हे किती छान आहे! मग आपल्याला कोणतीच चिंता उरत नाही, आणि मग आपण अगदी पूर्णपणे आनंदी राहू शकतो.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 248)

सद्भावना – २८

एखादी गोष्ट चुकीची आहे हे माहीत नसताना जर ती गोष्ट तुमच्याकडून घडली असेल तर, तेव्हा तुम्ही ती चूक अज्ञानापोटी केलेली असते आणि म्हणून हे साहजिकच आहे की, नंतर जेव्हा तुम्हाला ती गोष्ट चुकीची होती हे समजते, आणि जेव्हा तुमचे अज्ञान नाहीसे झालेले असते तसेच तुमच्यापाशी सद्भाव असतो तेव्हा, तुम्ही तीच चूक परत करत नाही, आणि एवढेच नाही तर, ज्या परिस्थितीत ती चूक पुन्हा घडण्याची शक्यता असते त्या परिस्थितीतूनच तुम्ही बाहेर पडलेले असता.

पण अमुक एक गोष्ट चुकीची आहे हे तुम्हाला माहीत असूनही, जेव्हा तुम्ही ती चूक करता तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, तुमच्यामध्ये कुठेतरी, काहीतरी अशी विकृती आहे की, जिने गोंधळ किंवा दुरिच्छा यांची निवड केलेली असते. किंबहुना, तिने ईश्वर-विरोधी शक्तींच्या बाजूने राहण्याची जाणूनबुजून निवड केलेली असते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 306)