Tag Archive for: व्यावहारिक जीवन

ईश्वरी कृपा – ११

मनाच्या पलीकडे, ‘ईश्वरी कृपे’वरील श्रद्धाच आपल्याला सर्व अग्निपरीक्षांमधून बाहेर पडण्याचे, आपल्या सर्व दुर्बलतांवर मात करण्याचे सामर्थ्य देते आणि ती श्रद्धाच आपला दिव्य चेतनेशी संपर्क करून देते, ही ‘दिव्य चेतना’ आपल्याला केवळ शांती आणि आनंदच देत नाही तर, शारीरिक संतुलन आणि उत्तम आरोग्यसुद्धा प्रदान करते, ही सारी शिकवण आपल्याला देण्यासाठीच जीवनातील सर्व परिस्थिती घडविण्यात आलेली असते.

– श्रीमाताजी
(CWM 10 : 320)

ईश्वरी कृपा – ०७

व्यक्ती संपूर्ण समर्पणाच्या स्थितीत असेल आणि तिने स्वत:चे सर्वस्व समर्पित केले असेल, तिने जर त्या ईश्वरी ‘कृपे’स स्वत:ला देऊ केले असेल आणि त्या कृपेला जे योग्य वाटते ते तिने आपल्या बाबतीत करावे अशी त्या व्यक्तिची भावना असेल तर, ते अधिक चांगले! पण त्यानंतर मात्र “ईश्वरी कृपेने हे काय केले, ते का केले” असे प्रश्न तिला विचारता कामा नयेत. व्यक्तिने असे म्हणता कामा नये की, “मला असे होईल असे वाटले होते, म्हणून मी असे असे केले,” कारण व्यक्तिला खरोखरच काहीतरी हवे असेल आणि त्या भावनेने साद घालायची असेल तर जे काही हवे, जसे काही हवे ते अगदी साधेपणाने, प्रामाणिकपणाने शब्दांत मांडणे केव्हाही चांगले. त्यानंतर, ईश्वरी ‘कृपा’ तसे करायचे किंवा नाही ते ठरवेल; पण कोणत्याही परिस्थितित, व्यक्तिने तिला काय अपेक्षित आहे ते स्पष्टपणे मांडणे केव्हाही चांगले ; त्यात काही गैर नाही.

जेव्हा केलेली मागणी मान्य केली जात नाही आणि अशा वेळी व्यक्ती बंड करून उठते तेव्हा मात्र गोष्टी बिघडून जातात. तेव्हा अर्थातच सारे काही बिनसते. आणि हाच तो क्षण असतो जेव्हा व्यक्तिने समजून घेतले पाहिजे की, तिची जी इच्छा असते, अभीप्सा असते, ती नेहमीच प्रबुद्ध असेल असे नाही. तसेच त्या व्यक्तिसाठी जे हितावह होते त्याचीच तिने मागणी केलेली असेल, असेही नाही. अशा वेळी व्यक्तिने थोडेसे समजूतदार झाले पाहिजे आणि म्हटले पाहिजे, “ठीक आहे, जशी तुझी इच्छा.” पण जोवर व्यक्तिला आतून काही आवडीनिवडी आहेत, अग्रक्रम आहेत तेव्हा तिने ते शब्दांमध्ये मांडण्यात गैर काही नाही. ती अगदी स्वाभाविक अशी क्रिया आहे.

उदाहरणार्थ, जर एखाद्याने मूर्खपणा केला असेल, काहीतरी चूक केली असेल आणि त्या व्यक्तिला खरोखर, मनापासून तशी चूक परत होऊ नये असे वाटत असेल, तर तशी विनवणी करण्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. आणि खरंतर, व्यक्तिने अगदी अंत:करणपूर्वक, आंतरिक सचोटीने तशी विनवणी केली तर, तिची ती प्रार्थना मंजूर केली जाण्याची अधिक शक्यता असते.

तुम्हाला विरोध करणे हे ‘ईश्वरा’ला आवडते, असा विचार तुम्ही कधीच करता कामा नये. त्याला तसे करण्यामध्ये कोणताही रस नसतो. तुमच्यासाठी काय हिताचे आहे हे, तुमच्यापेक्षा त्याला अधिक चांगले समजते; परंतु अगदी अनिवार्य असेल तेव्हाच तो तुमच्या इच्छेला विरोध करतो. अन्यथा तुम्ही जे काही मागितले असेल, ते द्यायला तो नेहमीच तत्पर असतो.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 254-255)

ईश्वरी कृपा – ०६

(गूढविद्येचे कोणतेही ज्ञान नसतानादेखील, दूर अंतरावरील एखाद्या गरजू व्यक्तिला मदत किंवा संरक्षण पोहोचविणे शक्य आहे का, असा प्रश्न विचारला असता, श्रीमाताजींनी त्याचा एक मार्ग सांगितला, तो असा…)

व्यक्तिकडे जर (गूढविद्येचे) कोणतेही ज्ञान नसेल; पण तिचा ईश्वरी ‘कृपे’वर विश्वास असेल, – ईश्वरी ‘कृपा’ नावाची काहीतरी एक गोष्ट या विश्वामध्ये आहे, तीच आपल्या प्रार्थनेला, आपल्या अभीप्सेला, आपल्या हाकेला प्रतिसाद देते, अशी त्या व्यक्तिची श्रद्धा असेल आणि त्यावेळी व्यक्तिने मनोमय रचना करून, जर ती त्या ईश्वरी ‘कृपे’ला अर्पण केली आणि त्यावर विश्वास ठेवला, ईश्वरी ‘कृपे’ने हस्तक्षेप करावा म्हणून याचना केली आणि ईश्वरी ‘कृपा’ हस्तक्षेप करेलच अशी श्रद्धा बाळगली तर, ती यशस्वी होण्याची दाट शक्यता असते.

प्रयत्न करून पाहा, तुम्हाला खात्रीने त्याचे परिणाम दिसून येतील.

प्रश्न : ईश्वरी ‘कृपे’ने हस्तक्षेप करावा अशी मनापासून प्रार्थना जेव्हा एखादी व्यक्ती करते तेव्हा, तिला एखादा विशिष्ट असा परिणाम अपेक्षित असतो ना?

श्रीमाताजी : ते प्रार्थनेच्या भावार्थावर अवलंबून असते. जर एखाद्या व्यक्तिने ईश्वराला किंवा ईश्वरी ‘कृपे’ला केवळ साद घातली आणि स्वत:ला त्याच्या हाती सोपवून दिले तर, ती व्यक्ती कोणत्याही विशिष्ट अशा फळाची अपेक्षा करत नसते. जर विशिष्ट परिणाम हवा असेल तर, व्यक्तिने स्वत:ची प्रार्थना स्वत:च शब्दबद्ध केली पाहिजे; व्यक्तिने त्यासाठी मागणी केली पाहिजे. तुम्ही जर ईश्वरी ‘कृपे’विषयी तीव्र आस बाळगत असाल, तिला आवाहन करत असाल, तिची विनवणी करत असाल आणि जर कोणतीही ठरावीक अशी तुमची मागणी नसेल तर, तुमच्या बाबतीत काय करायचे, हे ती ईश्वरी ‘कृपा’च ठरवेल, तुम्ही नाही.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 253-254)

मैत्री किंवा स्नेह या गोष्टी योगामधून वगळण्यात आलेल्या नाहीत. ईश्वराशी असलेले सख्यत्व हे साधनेतील एक मान्यताप्राप्त नाते आहे. (आश्रमातील) साधकांमध्ये मैत्री आहे आणि त्याला श्रीमाताजींकडून प्रोत्साहनही दिले जाते. बहुसंख्य मानवी मैत्री ज्या असुरक्षित पायावर आधारलेली असते त्यापेक्षा अधिक भक्कम पायावर ती आधारलेली असावी, असा आमचा प्रयत्न असतो. हे असे याचसाठी आहे कारण मैत्री, बंधुता, प्रेम या पवित्र गोष्टी आहेत, अशी आमची धारणा आहे. आणि त्यामध्ये आम्हाला तसा बदल अपेक्षित आहे – प्रत्येक क्षणाला अहंकाराच्या क्रियांमुळे त्यांच्यामध्ये वितुष्ट आलेले आम्ही पाहू इच्छित नाही, प्राणाचा ज्या गोष्टींकडे कल असतो अशा आवेग, मत्सर, विश्वासघात या गोष्टींनी मैत्री, बंधुता, प्रेम या गोष्टी बिघडाव्यात, वाया जाव्यात किंवा उद्ध्वस्त व्हाव्यात, हे आम्ही पाहू इच्छित नाही. – त्या गोष्टी खऱ्या अर्थाने पवित्र आणि दृढ व्हाव्यात म्हणून त्यांची पाळेमुळे आत्म्यामध्ये रुजवायची आमची इच्छा आहे, ईश्वरत्वाच्या आधारशिलेवर आम्ही त्यांची उभारणी करू इच्छितो. आमचा योग हा संन्यासी योग नाही; शुद्धता हे त्याचे ध्येय आहे पण कठोर तपस्या हे ध्येय नाही. आम्ही ज्या सुमेळाची आस बाळगतो त्या सुमेळामध्ये मैत्री आणि प्रेम हे अपरिहार्य असे स्वर आहेत. हे काही पोकळ स्वप्न नाही, कारण अगदी अपूर्ण अशा परिस्थितीमध्येसुद्धा, मुळाशी हे अपरिहार्य घटक थोड्या प्रमाणात जरी असतील तरीदेखील ती गोष्ट (सुमेळ) शक्य आहे, हे आमच्या लक्षात आले आहे. ती गोष्ट अवघड आहे आणि जुने अडथळे अजूनही हट्टाने चिकटून आहेत. ध्येयाशी अविचल निष्ठा आणि अविरत प्रयत्न असल्याखेरीज कोणताच विजय प्राप्त होऊ शकत नाही. चिकाटीशिवाय अन्य कोणताही मार्ग नाही.

*

योगामध्ये मैत्री टिकून राहू शकते पण आसक्ती किंवा तत्सम सामान्य जीवनाशी आणि चेतनेशी जखडून ठेवणारी, व्यग्र करणारी स्नेहबंधने मात्र गळून पडली पाहिजेत – मानवी नातेसंबंधांनी अगदी अल्प आणि दुय्यम स्थान घेतले पाहिजे आणि त्यांनी ईश्वराकडे व्यक्तीचा जो कल आहे त्यामध्ये ढवळाढवळ करता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 294-295)

श्रीमाताजी : हे जग म्हणजे संघर्ष, दुःखभोग, अडीअडचणी, ताणतणाव यांचे जग आहे; या सर्व गोष्टींनीच ते बनलेले आहे. ते अजूनपर्यंत बदललेले नाही; त्याला बदलायला अजून काही काळ जावा लागेल. आणि त्यामधून बाहेर पडण्याची एक शक्यता प्रत्येकापाशी असते. तुम्ही ‘परमेश्वरी कृपे’च्या उपस्थितीचा आश्रय घेतलात तर बाहेर पडण्याचा तोच एकमेव मार्ग आहे.

प्रश्न : मग, आता आम्ही काय केले पाहिजे?

श्रीमाताजी : तुम्ही अतिशय उत्कृष्टपणे काम करत आहात. पण मानवी प्रशंसेची अपेक्षा बाळगू नका, कारण एखाद्या गोष्टीची प्रशंसा कशाच्या आधारावर करायची हेच माणसांना माहीत नसते आणि त्यातही, जेव्हा त्यांना त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असे काही आढळते, तेव्हा त्यांना ते आवडत नाही.

प्रश्न : पण मग यासाठी ताकद कुठून मिळवायची?

श्रीमाताजी : तुमच्याच अंतरंगामधून! तुमच्यामध्ये ‘ईश्वराची उपस्थिती’ आहे, ती तुमच्यामध्येच असते. मात्र तुम्ही तिचा शोध बाहेर घेता, आत पाहा. ती तुमच्यामध्येच आहे. त्याची उपस्थिती तेथे आहेच. तुम्हाला सामर्थ्य मिळावे, ताकद मिळावी म्हणून इतरांनी तुमची प्रशंसा करावी, अशी तुमची अपेक्षा असते; पण तशी प्रशंसा तुम्हाला कधीही लाभणार नाही. ती ताकद तुमच्या स्वतःच्या अंतरंगातच आहे. तुमची जर इच्छा असेलच तर, तुम्हाला परमोच्च ध्येय, परमोच्च प्रकाश, परमश्रेष्ठ ज्ञान, परमप्रेम असे जे जे काही भासते त्याची तुम्ही आस बाळगू शकता – अन्यथा तुम्ही त्यांच्याशी कधीच संपर्क साधू शकणार नाही. तुम्ही जर तुमच्या अंतरंगात पुरेसे खोलवर गेलात तर तुम्हाला त्या गोष्टी तेथे आढळतील; तेथे सरळ वर जाणारी एक ज्योत तेवत असलेली तुम्हाला आढळेल.

आणि ही गोष्ट करणे फार अवघड आहे असे समजू नका. ती तशी अवघड वाटते याचे कारण दृष्टी ही कायमच बहिर्मुख असते आणि म्हणून तुम्हाला ईश्वराची उपस्थिती जाणवत नाही. पण, आधार शोधण्यासाठी कोठेतरी बाहेर पाहण्यापेक्षा, तुम्ही जर एकाग्र झालात आणि प्रार्थना केलीत – त्या परमश्रेष्ठ ज्ञानाप्रत आतून प्रार्थना केलीत – प्रत्येक क्षणी काय केले पाहिजे हे जाणण्यासाठी, ते करण्याचा मार्ग शोधण्यासाठी प्रार्थना केलीत आणि पूर्णत्व प्राप्त करून घेण्याच्या हेतुने तुम्ही जे जे काही करता त्या साऱ्या गोष्टी आणि तुमचे सर्वस्व प्रदान केलेत तर, तुम्हाला तो आधार तुमच्या अंतरंगामध्येच असल्याचे, तो सदासर्वदा तुम्हाला मार्गदर्शन करत असल्याचे जाणवेल. आणि जर का काही अडचण उद्भवली तर, झगडा करत बसण्याची इच्छा बाळगण्यापेक्षा, त्या परमश्रेष्ठ प्रज्ञेनेच ती अडचण सोडवावी म्हणून तुम्ही ती अडचण त्या प्रज्ञेकडे सोपवा. जर तुम्ही पूर्णपणे समर्पित झालात तर, मग तो तुमच्या काळजीचा विषय राहत नाही. तर तो ‘परमेश्वरा’चा विषय बनतो, त्याने ती अडचण स्वतःकडे घेतलेली असते आणि त्या अडचणीबाबतीत काय केले पाहिजे हे कोणाहीपेक्षा अधिक चांगल्या रीतीने त्याला कळत असते. हा एकमेव मार्ग आहे, हाच एकमेव मार्ग आहे.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 399-400)

साधक एकमेकांपासून पूर्णतः अलिप्त असले पाहिजेत आणि त्यांच्यात विळ्याभोपळ्याचे नाते असले पाहिजे, ही जी पूर्वापार चालत आलेली कल्पना आहे, तिचा त्याग केलाच पाहिजे. ‘निर्वाण’ हे ध्येय मानणाऱ्या परंपरागत समजुतीमधून ही कल्पना उदयाला आली असावी; परंतु ‘निर्वाण’ हे येथील उद्दिष्ट नाही. संघर्ष नव्हे, तर सुसंवाद हा योगमय जीवनाचा धर्म असतो. जीवनामध्ये ‘ईश्वरा’ची परिपूर्ती हे येथील ध्येय आहे आणि त्यासाठी एकता व ऐक्य या गोष्टी अनिवार्य आहेत…

…सारे काही ‘ईश्वरा’मध्ये आणि ‘ईश्वरा’भोवती केंद्रित झालेले असले पाहिजे आणि साधकांचे जीवन हे त्याच दृढ पायावर आधारलेले असले पाहिजे, साधकांच्या वैयक्तिक नातेसंबंधांच्या केंद्रस्थानीदेखील ‘ईश्वर’च असला पाहिजे. इतकेच नव्हे तर, सारी नाती ही प्राणिक पाया ओलांडून, आध्यात्मिक पायावर उभारली गेली पाहिजेत, ज्यामध्ये प्राण हा आध्यात्मिकतेचे केवळ एक रूप आणि साधन असेल. – याचा अर्थ असा की, परस्परांचे परस्परांशी कोणतेही नातेसंबंध असले तरी त्या नात्यांमधून मत्सर, संघर्ष, तिरस्कार, तिटकारा, द्वेष आणि इतर साऱ्या वाईट प्राणिक भावनांचा त्याग केला पाहिजे कारण त्या भावना आध्यात्मिक जीवनाचा भाग असू शकत नाहीत. त्याचप्रमाणे, जे प्रेम केवळ अहंकारासाठीच प्रेम करते आणि ज्या क्षणी अहंकार दुखावला जातो व असमाधानी होतो तेव्हा, जे प्रेम नाहीसे होते किंवा जे प्रेम द्वेष आणि तिरस्कारांचा परिपोष करते, अशा प्रकारचे अहंकारात्मक प्रेम आणि आसक्ती या साऱ्या गोष्टी नाहीशा झाल्या पाहिजेत. प्रेमामागे एक खरेखुरे जिवंतपण आणि टिकाऊ एकत्व असलेच पाहिजे. अर्थात हे गृहीतच आहे की, लैंगिक अशुद्धीसारख्या गोष्टीसुद्धा नाहीशा झाल्याच पाहिजेत.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 288-289)

(आश्रमात वास्तव्यास येऊ पाहणाऱ्या एका साधकास उद्देशून श्रीअरविंदांनी लिहिलेले पत्र…)

तुम्हाला या योगाचे (पूर्णयोगाचे) तत्त्व समजलेले दिसत नाही. पूर्वीचा योग सर्वस्व त्यागाची अपेक्षा करत असे; त्यामध्ये या भौतिक जीवनाच्या त्यागाचादेखील समावेश असे. हा योग (पूर्णयोग) मात्र त्या ऐवजी एका नवीन आणि रूपांतरित जीवनाला आपले लक्ष्य मानतो. हा योग मन, प्राण आणि शरीर यांमधील इच्छा आणि आसक्ती यांचा अत्यंत कठोरपणे संपूर्ण त्याग करण्यावर भर देतो. चैतन्याच्या सत्यामध्ये जीवनाची पुनर्स्थापना करणे आणि या हेतुसाठी, आपण जे काही आहोत आणि आपण मन, प्राण, शरीर यांद्वारे जे काही करतो त्या साऱ्याची रुजलेली पाळेमुळे, मनाच्याही वर असणाऱ्या महत्तर चेतनेमध्ये रुपांतरित करणे, हे या योगाचे उद्दिष्ट आहे. याचा अर्थ असा की, या नवीन जीवनामध्ये सारे संबंध हे आध्यात्मिक आत्मीयतेवर आणि आपल्या सद्यकालीन संबंधांना आधार पुरविणाऱ्या सत्यापेक्षा एका निराळ्या सत्यावर स्थापित केले पाहिजेत. उच्चतर हाक येताच, ज्यास स्वाभाविक संग (affections) असे संबोधण्यात येते त्या सर्व संगाचा त्याग करण्याची व्यक्तीची तयारी असली पाहिजे. आणि जरी ते तसेच ठेवण्यात आले तर ते त्यांच्यातील बदलांनिशीच ठेवले जाऊ शकतील; की जे बदल त्यांच्यात आमूलाग्र रुपांतर घडवून आणतील. पण त्या संबंधांचा परित्याग करायचा की ते कायम ठेवायचे व परिवर्तित करायचे या गोष्टी व्यक्तिगत इच्छांनुसार ठरविता कामा नयेत, तर ऊर्ध्वस्थित असणाऱ्या सत्याद्वारेच त्या निर्धारित केल्या गेल्या पाहिजेत. सारे काही या ‘योगाच्या परमश्रेष्ठ स्वामी’वर सोपविले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 369)

लोकांमध्ये मिसळणे, हास्यविनोद करणे, चेष्टामस्करी करणे हा एक प्रकारचा प्राणिक विस्तार असतो, ते प्राणिक सामर्थ्य नव्हे – हा विस्तार खर्चिकसुद्धा असतो. कारण जेव्हा अशा प्रकारचे एकमेकांमध्ये मिसळणे घडून येते तेव्हा, प्राणिकदृष्ट्या जे सुदृढ असतात त्यांना त्यापासून बळ मिळते; परंतु प्राणिकदृष्ट्या जे दुर्बल असतात ते त्यांच्यामध्ये असलेले सामर्थ्य खर्च करतात आणि अधिकच दुर्बल बनतात.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 326)

इतरांविषयीची विषमतेची भावना, पसंती-नापसंती या गोष्टी मानवाच्या प्राणिक प्रकृतीमध्ये जणू भिनल्यासारख्या आहेत. याचे कारण काहीजण आपल्या स्वतःच्या प्राणिक स्वभावाशी (vital temperament) सुसंवाद राखतात आणि इतरजण मात्र तसे करत नाहीत; तसेच जेव्हा एखाद्याचा प्राणिक अहंकार (vital ego) दुखावला जातो किंवा माणसांनी कसे वागले पाहिजे याबाबतीत त्याच्या असलेल्या कल्पनांनुसार जेव्हा माणसं वागत नाहीत किंवा गोष्टी त्याच्या पसंतीनुसार घडत नाहीत तेव्हा तो असंतुष्ट होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 312)

काही लोकांच्या प्राणिक प्रकृतीला नेहमीच गोंधळ, विसंवाद, क्षुद्र भांडणं आणि गोंधळगडबड हवाहवासा वाटतो; त्याचप्रमाणे त्यांना बहुधा दु:ख-कष्टाचे एक प्रकारचे खूळ असते आणि त्यांना वाटत असते की, प्रत्येक जण त्यांच्या विरोधात आहे.

यामध्ये सुधारणा करणे खूप अवघड असते आणि त्यासाठी प्रकृतीच्या आमूलाग्र रूपांतरणाची आवश्यकता असते. अशा लोकांशी वागण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांच्या प्रतिक्रिया मनावर घ्यायच्या नाहीत आणि जे करणे आवश्यक आहे ते तुम्ही साधेपणाने आणि प्रामाणिकपणाने करत राहायचे.

*

प्रश्न : माताजी, आमच्यामध्ये दोष असतात म्हणूनच आम्ही ते दुसऱ्यांमध्ये खपवून घेऊ शकत नाही, असेच नां? आम्हाला जो धक्का बसतो त्याचे मूळ कशामध्ये असते?

श्रीमाताजी : हो, सर्वसाधारणपणे, तुमच्यामध्ये जे दोष असतात तेच दोष इतरांमध्ये असल्याचे आढळून आल्यावर तुम्हाला खूप धक्का बसतो. आणि कालांतराने मग तुम्हाला उमगते की, इतर जण म्हणजे तुम्ही जे काही आहात त्याचे प्रतिबिंब दर्शविणारे आरसे आहेत.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 280 & 16 : 297-298)