Tag Archive for: रूपांतरण

अमृतवर्षा ०४

 

आपल्याला समग्र रूपांतरण हवे आहे; शरीराचे आणि त्याच्या सर्व क्रियांचे रूपांतरण हवे आहे. पूर्वी जेव्हा रूपांतरणाविषयी बोलले जात असे तेव्हा तेथे केवळ आंतरिक चेतनेचे रूपांतरणच अभिप्रेत असे. ही सखोल चेतना स्वत:मध्ये शोधण्याचा व्यक्ती प्रयत्न करत असे; हे करत असताना, आंतरिक गतिविधींवरच लक्ष केंद्रित करायचे असल्याने, शरीराला आणि त्याच्या क्रियाकलापांना, ती व्यक्ती एक लोढणं समजत असे; आणि निरुपयोगी गोष्ट म्हणून त्यास ती धुडकावून देत असे.

परंतु, हे पुरेसे नसल्याचे श्रीअरविंदांनी स्पष्ट केले. जडभौतिक जगताने देखील या रूपांतरणामध्ये सहभागी व्हावे आणि त्यानेही या गहनतर ‘सत्या’ची अभिव्यक्ती करावी, अशी त्या ‘सत्या’कडून मागणी होत आहे, हे त्यांनी स्पष्ट केले आहे.

परंतु लोकांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना असे वाटले की, अंतरंगामध्ये काय घडत आहे याची अजिबात काळजी न करतादेखील शरीर आणि त्याच्या क्रिया यांचे रूपांतरण घडविणे शक्य आहे, – अर्थात हे खरे नाही.

हे शारीरिक रूपांतरणाचे कार्य हाती घेण्यापूर्वी, – हे कार्य म्हणजे, जे सर्वात अवघड असे कार्य आहे ते हाती घेण्यापूर्वी – तुमची आंतरिक चेतना ही ‘सत्या’मध्ये दृढपणे, सघनपणे प्रस्थापित झालेली असली पाहिजे; म्हणजे मग हे रूपांतरण म्हणजे त्या ‘सत्या’चा चरम आविष्कार असेल – किमान आत्ताच्या घडीपुरता तरी ‘चरम’.

या रूपांतरणाचा प्रारंभबिंदू असतो ग्रहणशीलता! रूपांतरण प्राप्त करून घेण्यासाठीची ही अत्यावश्यक अट आहे. त्यानंतर चेतनेमध्ये परिवर्तन घडून येते.

चेतनेचे हे परिवर्तन आणि त्याची पूर्वतयारी यांची तुलना नेहमी अंड्यातील कोंबडीच्या पिलाच्या घडणीशी केली जाते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अंडे जसेच्या तसे असते, त्यामध्ये काहीही बदल दिसत नाही आणि जेव्हा ते पिल्लू आत पूर्ण विकसित झालेले असते, पूर्णतया जिवंत झालेले असते, तेव्हा ते त्याच्या छोट्याशा चोचीने त्या कवचाला टोचे मारते आणि त्यातून बाहेर पडते.

चेतनेच्या परिवर्तनाच्या क्षणीसुद्धा असेच काहीसे घडून येते. दीर्घ काळपर्यंत काहीच घडत नाही असेच तुम्हाला वाटत असते; तुमची चेतना नेहमीप्रमाणेच आहे, त्यात काहीच बदल नाही असेच तुम्हाला वाटत असते. तुमच्यापाशी जर का तीव्र अभीप्सा असेल तर तुम्हाला कधीकधी विरोधदेखील जाणवतो; जणूकाही तुम्ही एखाद्या भिंतीवर धक्के देत असता पण ती काही ढासळत नाही. पण जेव्हा तुमची अंतरंगातून तयारी झालेली असते तेव्हा एक शेवटचा प्रयत्न – तुमच्या अस्तित्वाच्या कवचाला धक्के देण्याचा एक प्रयत्न पुरेसा ठरतो आणि मग सर्वकाही खुले होते आणि तुम्ही एका आगळ्यावेगळ्या चेतनेमध्ये उन्नत झालेले असता.

 

– श्रीमाताजी [CWM 04 : 18-19]

विचारशलाका १८

 

एकदा का तुम्ही आंतरिक रूपांतरणाच्या दृष्टीने चांगला प्रारंभ केला आणि जर तुम्ही जिवाच्या मुळाशी अवचेतनेपर्यंत (subconscient) प्रवास केलात तर – जे तुमच्यामध्ये तुमच्या पालकांकडून, अनुवंशिकतेतून आलेले असते – ते तुम्हाला दिसू लागते. बहुतांशी या सर्वच अडचणी तेथे आधीपासूनच असतात, जन्मानंतरच्या पहिल्या काही वर्षांमध्ये ज्यांची भर पडते अशा गोष्टी फारच थोड्या असतात.

 

आणि अशा गोष्टी कोणत्याही आकस्मिक क्षणीदेखील घडू शकतात; जर तुम्ही वाईट संगतीमध्ये राहिलात, वाईट पुस्तके वाचलीत, तर ते विष तुमच्यामध्ये शिरेल; अशावेळी या गोष्टींचे अवचेतनामध्ये खोलवर उमटलेले ठसे आणि तुमच्या वाईट सवयी यांच्या विरुद्ध तुम्हाला झगडावे लागते.

 

उदाहरणार्थ, असे काही लोक असतात की ज्यांना खोटे बोलल्याशिवाय तोंडच उघडता येत नाही; ते नेहमीच तसे जाणीवपूर्वक करतात असेही नाही (तसे असेल तर ते जास्तच घातक असते.) किंवा असे काही लोक असतात की, जे इतरांच्या संपर्कात आल्यावर भांडल्याशिवाय राहूच शकत नाहीत, अशा गोष्टी त्यांच्या अवचेतनेमध्ये खोलवर रुजलेल्या असतात.

 

तुम्ही जेव्हा सदिच्छा बाळगता, तेव्हा तुम्ही बाह्यत: या सर्व गोष्टी टाळण्याचा, शक्य असेल तर त्या दुरुस्त करण्याचा हरप्रकारे प्रयत्न करता, त्यावर तुम्ही काम करता, त्यांच्याशी मुकाबला करता; आणि मग तुम्हाला अशी जाणीव होते की, या गोष्टी वारंवार वर येत आहेत, जो भाग तुमच्या नियंत्रणावाचून सुटलेला आहे अशा भागातून त्या वर येत आहेत.

 

पण जर का तुम्ही तुमच्या अवचेतनेमध्ये प्रवेश केलात, तुमच्या चेतनेला त्यामध्ये प्रवेश करू दिलात आणि काळजीपूर्वक पाहू लागलात तर मग तुम्हाला हळूहळू तुमच्या अडचणींचे मूळ, उगम कोठे आहे त्याचा शोध लागतो; तुमचे आईवडील, आजी आजोबा कसे होते हे आता तुम्हाला कळू लागते आणि जेव्हा एखाद्या विशिष्ट क्षणी तुम्ही स्वत:वर नियंत्रण ठेवू शकत नाही, तेव्हा तुम्हाला कळते, ”मी असा आहे कारण ते तसे होते.”

 

तुमच्याकडे लक्ष ठेवून असणारा, तुमची मार्गावर तयारी करून घेणारा असा पुरेसा जागृत चैत्य पुरुष (psychic being) जर तुमच्यामध्ये असेल तर तो तुमच्याकडे तुम्हाला साहाय्यक ठरतील अशा गोष्टी, माणसे, पुस्तके, परिस्थिती खेचून आणू शकतो. कोणा परोपकारी, कृपाळू इच्छेमुळेच जणू घडले असावेत असे छोटे छोटे योगायोग घडून येतात आणि तुम्हाला निर्णय घेण्यासाठी आणि तुम्हाला योग्य दिशेला वळविण्यासाठी एखादा संकेत, कोणती तरी मदत, एखादा आधार पुरविण्यात येतो.

 

पण एकदा का तुम्ही निर्णय घेतला, तुमच्या जिवाचे सत्य शोधून काढायचे एकदा का तुम्ही ठरविलेत, तुम्ही त्या मार्गावरून प्रामाणिकपणे वाटचाल करायला सुरुवात केलीत तर, तुमच्या प्रगतीसाठी मदत व्हावी म्हणून जणू (अज्ञातात) कोणीतरी, सगळेमिळून सर्वकाही घडवत आहेत असे तुम्हाला वाटू लागते. आणि तुम्ही जर काळजीपूर्वक निरीक्षण केलेत तर हळूहळू तुमच्या अडचणींचे मूळदेखील तुम्हाला दिसू लागते : “अरे! हा दोष माझ्या वडिलांमध्ये होता तर’’, “अरेच्चा, ही तर माझ्या आईची सवय आहे’’; “खरंच, माझी आजी अशी होती’’, “माझे आजोबाही असे होते;” असे तुम्हाला जाणवू लागते. किंवा मग तुम्ही लहान असताना जिने तुमची काळजी घेतली होती अशी कोणी तुमची आया असेल, किंवा तुम्ही ज्यांच्याबरोबर खेळलात, बागडलात ती तुमची बहीणभावंडे असतील, तुमचे मित्रमैत्रिणी असतील, यांच्यात किंवा त्यांच्यात काहीतरी असलेले तुम्हाला तुमच्यामध्ये सापडेल.

 

तुम्ही जर प्रामाणिक राहिलात तर या सगळ्या गोष्टी तुम्ही शांतपणे पार करू शकता, असे तुम्हाला आढळून येईल. आणि कालांतराने ज्या बंधांनिशी तुम्ही जन्माला आला होतात ते सारे बंध, त्या बेड्या तुम्ही तोडून टाकाल आणि तुमच्या मार्गावरून तुम्ही अगदी मुक्तपणे पुढे जाल. तुम्हाला जर तुमचे व्यक्तिमत्त्व बदलायचे असेल तर तुम्ही हे केलेच पाहिजे.

 

– श्रीमाताजी [CWM 04 : 261-262]

आध्यात्मिकता ४८

माणसं बाह्य गोष्टींमध्येच गुंतलेली असतात. म्हणजे असे की, त्यांची चेतना, अधिक गहन सत्य, ईश्वयरी ‘उपस्थिती’ यांच्या शोधासाठी अंतर्मुख होण्याऐवजी, बाह्य गोष्टींकडेच वळलेली असते – म्हणजे व्यक्ती जीवनात ज्या गोष्टी बघते, जाणते, करते त्या गोष्टींकडेच तिची चेतना वळलेली असते. तुम्ही जे काही करत असता त्यामध्ये व्यग्र असता, तुमच्या अवतीभोवती वावरणाऱ्या माणसांमध्ये, तुम्ही ज्या वस्तू वापरता त्या वस्तुंमध्ये, त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये, म्हणजे झोपणे, खाणे, गप्पा मारणे, थोडेसे काम, थोडीशी मौजमजा यांमध्ये व्यग्र असता आणि मग पुन्हा एकदा तीच सुरुवात होते – परत झोपणे, खाणे इ. इ. आणि पुन्हा तेच चालू राहते. आणि मग, हा काय म्हणाला, तो काय म्हणाला, त्याने काय केले पाहिजे, मी बरी आहे ना, माझी तब्येत चांगली आहे ना, इ. इ. अशा गोष्टींचा व्यक्ती सहसा विचार करत असते.

या साऱ्या गोष्टी मागे सोडून द्यायच्या आणि चेतनेसमोर व चेतनेत फक्त एकच गोष्ट येऊ द्यायची आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या अस्तित्वाच्या आणि जीवनाच्या मूळ हेतुचा शोध घेणे, आपण कोण आहोत, आपण का जगतो, या साऱ्याच्या मागे काय आहे याचा शोध घ्यायचा. ही पहिली पायरी असते आणि ती काही इतकी सोपी नसते. प्रत्यक्षात काय आविष्कृत झाले आहे यापेक्षा, त्यामागील कारणामध्ये आणि त्याच्या ध्येयामध्ये असणारे स्वारस्य ही पहिली पायरी असते. म्हणजे, वरकरणी आणि बाह्यवर्ती गोष्टींशी असणाऱ्या पूर्ण तादात्म्यापासून स्वतःची चेतना काढून घेऊन ती आत वळविणे आणि आपल्याला ज्याचा शोध घ्यायचा आहे, जे ‘सत्य’ आपण शोधू पाहत आहोत त्यावर एक प्रकारची आंतरिक एकाग्रता करणे, ही असते पहिली प्रक्रिया.

आणि म्हणून, व्यक्तीने प्रथम स्वत:चा आत्मा आणि त्यावर स्वामित्व असणाऱ्या ईश्वराचा केवळ शोधच घेतला पाहिजे असे नाही तर, व्यक्ती त्याच्याशी तादात्म्य पावली पाहिजे. त्यानंतर मग ती व्यक्ती पुन्हा एकदा बाह्यवर्ती गोष्टींकडे वळण्यास आणि त्यांचे रुपांतर करण्यास आरंभ करू शकते. कारण तेव्हाच त्या गोष्टींना कोणत्या दिशेला वळवायचे आणि त्यांचे रुपांतर कशात करायचे याची व्यक्तीला जाण येते. ही पायरी सोडून एकदम पुढे उडी मारता येत नाही. आपण आधी स्वतःचा आत्मा शोधला पाहिजे, आणि त्याच्याशी एकत्व पावले पाहिजे ही अगदी अपरिहार्य गोष्ट आहे. आणि नंतर मग आपण रूपांतराकडे वळू शकतो.

श्रीअरविंदांनी एके ठिकाणी लिहिले आहे की, “जिथे इतरांच्या योगाची परिसमाप्ती होते तेथे आमच्या योगाचा (पूर्णयोगाचा) प्रारंभ होतो.” सहसा योग हा आत्म्याशी होणाऱ्या सायुज्याप्रत, ईश्वणराशी होणाऱ्या एकत्वाप्रत घेऊन जातो; खरं तर म्हणूनच त्याला ‘योग’ असे म्हणतात. आणि जेव्हा लोकं हे साध्य करतात तेव्हा त्यांच्या दृष्टीने ते मार्गाच्या अखेरीस येऊन पोहोचलेले असतात आणि त्यावरच ते समाधानी असतात. परंतु येथे श्रीअरविंदांनी असे लिहिले आहे की, “जेव्हा इतरांच्या दृष्टीने मार्ग पूर्णत्वाला पोहोचलेला असतो तेव्हा आपला मार्ग सुरू होतो.” तुम्हाला आता ईश्वूराचा शोध लागलेला असतो पण निरुपयोगी झालेल्या देहामधून ईश्वराने तुम्हाला बाहेर काढावे म्हणून वाट पाहत ध्यानाला बसून राहण्याऐवजी, उलट, आता या चेतनेनिशी तुम्ही तुमच्या शरीराकडे, जीवनाकडे वळता आणि रूपांतरणाच्या कार्याला सुरुवात करता, की जे अत्यंत कठीण परिश्रमाचे काम असते. इथेच श्रीअरविंदांनी या कार्याची तुलना, निबिड अरण्यामधून स्वतःचा मार्ग स्वतःच शोधत जाण्याशी केली आहे. कारण अशा प्रकारचे कार्य याआधी इतर कोणीही केलेले नाही, अशावेळी, म्हणजे आजवर ज्या मार्गाने कोणीच वाटचाल केलेली नाही, तो मार्ग प्रत्येकाने स्वतःचा स्वतःच तयार करणे आवश्यक असते.

– श्रीमाताजी [CWM 07 : 349-351]

कर्म आराधना – ३२

एक क्षण असा येईल जेव्हा तुम्हाला प्रकर्षाने जाणवू लागेल की, तुम्ही कार्य-कर्ते नसून फक्त एक साधन आहात. सुरुवातीला तुमच्या भक्तीच्या शक्तीने ‘दिव्य माते’बरोबर असलेला तुमचा संपर्क इतका निकटचा होईल की, तिचे मार्गदर्शन मिळावे, तिची थेट आज्ञा किंवा प्रेरणा मिळावी, कोणती गोष्ट केली पाहिजे यासाठीचा खात्रीशीर संकेत मिळावा, ती गोष्ट करण्याचा मार्ग सापडावा आणि त्याचा परिणाम दिसून यावा, म्हणून तुम्ही सदा सर्वकाळ फक्त एकाग्रता करणे आणि सारे काही तिच्या हाती सोपविणे पुरेसे ठरेल.

कालांतराने मग तुमच्या हे लक्षात येईल की, दिव्य ‘शक्ती’ आपल्याला केवळ प्रेरणाच देते, मार्गदर्शन करते असे नाही तर ती आपल्या कर्माचा आरंभही करते, तीच ते कर्म घडवून आणते; तुमच्या साऱ्या गतिविधी, हालचाली, कृती या तिच्यापासूनच उगम पावतात, तुमच्या साऱ्या शक्ती या तिच्याच आहेत; तुमचे मन, प्राण, शरीर यांना तिच्या कार्याचे साधन बनल्याची, तिच्या लीलेचे माध्यम बनल्याची जाणीव असते; जडभौतिक विश्वामध्ये तिच्या आविष्करणाचे साचे बनल्याची जाणीव असते आणि त्याचा आनंदही असतो. एकत्वाच्या आणि अवलंबित्वाच्या (dependence) अवस्थेएवढी दुसरी कोणतीही आनंदी अवस्था असू शकत नाही; कारण ही पायरी तुम्हाला पुन्हा, अज्ञानातील दुःखपूर्ण व तणावपूर्ण जीवनाच्या सीमारेषेच्या पलीकडे, तुमच्या आध्यात्मिक अस्तित्वाच्या सत्यामध्ये, सखोल शांतीमध्ये आणि त्याच्या उत्कट ‘आनंदा’मध्ये घेऊन जाते.

हे रूपांतरण होत असताना, अहंकाराच्या विकृतीच्या सर्व कलंकापासून तुम्ही स्वतःला मुक्त ठेवण्याची अधिकच आवश्यकता असते. आत्मदानाच्या आणि त्यागाच्या शुद्धतेला कलंक लागेल अशी कोणतीही मागणी वा कोणताही आग्रह धरता कामा नये. कर्म किंवा त्याचा परिणाम यासंबंधी कोणतीही आसक्ती असता कामा नये, त्यावर कोणत्याही अटी लादता कामा नयेत, ‘शक्ती’ मिळावी यासाठी कोणताही दावा करता कामा नये, साधन बनल्याचा कोणताही ताठा, घमेंड किंवा अहंकार असता कामा नये. तुमच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या शक्तींच्या महानतेला, मनाच्या किंवा प्राणाच्या किंवा शरीराच्या कोणत्याही भागाने स्वतःच्या वैयक्तिक आणि स्वतंत्र समाधानासाठी किंवा स्वतःच्या वापरासाठी विकृत करता कामा नये. तुमची श्रद्धा, तुमचा प्रामाणिकपणा, तुमच्या अभीप्सेची शुद्धता ही तुमच्या अस्तित्वाच्या साऱ्या स्तरांना, साऱ्या प्रतलांना व्यापणारी आणि निरपेक्ष असली पाहिजे; तेव्हा मग अस्वस्थ करणारा प्रत्येक घटक, विकृत करणारा प्रत्येक प्रभाव हा तुमच्या प्रकृतीमधून एकेक करून निघून जाईल. (क्रमश:)

– श्रीअरविंद
[CWSA 32 : 12-13]

साधनेची मुळाक्षरे – ३८

तुम्ही मानवी प्रकृतीचे रूपांतरण गतिमान दिव्य प्रकृतीमध्ये करू इच्छित असाल तर, कोणतीही कुरकूर न करता, किंवा कोणताही प्रतिकार न करता, स्वत:ला ‘श्रीमाताजीं’च्या व त्यांच्या ‘शक्तीं’च्या हाती सोपवा आणि त्यांना त्यांचे कार्य तुमच्यामध्ये कोणत्याही अडथळ्याविना करू द्या. चेतना, घडणसुलभता (Plasticity) आणि नि:शेष समर्पण ह्या तीन गोष्टी तुमच्याकडे असल्याच पाहिजेत. ‘श्रीमाताजी’ आणि त्यांच्या ‘शक्ती’ व त्यांचे कार्य याविषयी तुमचे मन, आत्मा, हृदय, प्राण इतकेच काय पण, तुमच्या शरीरातील पेशीसुद्धा सजग असल्या पाहिजेत. कारण, ‘श्रीमाताजी’ तुमच्यातील अंधकारामध्ये आणि तुमच्या अजागृत भागांमध्ये, अजागृत क्षणांमध्ये देखील कार्य करू शकतात आणि तशा त्या करतात देखील, परंतु जेव्हा तुम्ही जागृत असता आणि त्यांच्याशी जिवंत संपर्क राखून असता तेव्हाची गोष्ट निराळी असते.

तुमची समग्र प्रकृतीच ‘श्रीमाताजीं’च्या स्पर्शाला घडणसुलभ असली पाहिजे – स्वसंतुष्ट अज्ञानी मन जसे प्रश्न विचारत राहते, शंका घेत राहते, विवाद करत बसते आणि ते जसे प्रबोधनाचे व परिवर्तनाचे शत्रू असते, तशी तुमची प्रकृती असता कामा नये.

माणसातील प्राण ज्याप्रमाणे स्वत:च्याच उर्मींवर भर देत राहतो आणि तो जसा आपल्या हट्टाग्रही इच्छा व दुरिच्छेमुळे, प्रत्येक ईश्वरी प्रभावाला सातत्याने विरोध करत राहतो, तशी तुमची प्रकृती स्वत:च्याच उर्मींवर भर देणारी असता कामा नये.

माणसाची शारीरिक चेतना जशी अडथळा निर्माण करते आणि त्याच्या किरकोळ आणि काळोख्या गोष्टींमधील सुखाला ती जशी चिकटून राहते; शरीराची आत्माविहिन दिनचर्या, आळस किंवा त्याची जी जड निद्रा असते त्याला धक्का पोहोचविणाऱ्या कोणत्याही स्पर्शाने जशी शारीरिक चेतना आक्रंदन करते; तशी तुमची प्रकृती ही अडथळा निर्माण करणारी, स्वत:ची अक्षमता, जडता आणि तामसिकता ह्यांना हटवादीपणे चिकटून राहिलेली असता कामा नये.

नि:शेष समर्पण, तुमच्या आंतरिक व बाह्य अस्तित्वाचे समर्पण तुमच्या प्रकृतीच्या सर्व भागांमध्ये ही घडणसुलभ लवचीकता (Plasticity) आणेल; वरून प्रवाहित होणाऱ्या ‘प्रज्ञा’ आणि ‘प्रकाश’, ‘शक्ती’, ‘सुसंवाद’ आणि ‘सौंदर्य’, ‘परिपूर्णता’ ह्या साऱ्या गोष्टींसाठी सातत्यपूर्ण खुलेपणा राखलात तर, तुमच्यामधील सर्व अंगांमध्ये जाणीव जागृत होईल. इतकेच काय पण तुमचे शरीरसुद्धा जागृत होईल आणि सरतेशेवटी, त्याची चेतना ही अर्धचेतन चेतनेशी संबद्ध न राहता, अतिमानसिक अतिचेतन ‘शक्ती’शी एकत्व पावेल; आणि तिची ऊर्जा ही वरून, खालून, चोहोबाजूंनी शरीराला अनुभवास येईल आणि एका परम ‘प्रेमा’ने व ‘आनंदा’ने ते शरीर पुलकित होऊन जाईल.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 24-25)

साधनेची मुळाक्षरे – १०

चैत्य रूपांतरणामध्ये तीन मुख्य घटक असतात.

१) निगूढ अशा आंतरिक मन, आंतरिक प्राण आणि आंतरिक शरीराच्या खुलेपणामुळे, पृष्ठवर्ती मन, प्राण आणि शरीर यांच्या पाठीमागे असलेल्या साऱ्याची व्यक्तीला जाणीव होते.

२) चैत्य पुरुषाचे किंवा आत्म्याचे खुलेपण, ज्यामुळे ते पुढे येऊन मन, प्राण आणि शरीर यांचे अनुशासन करतात आणि त्या सर्वांना ‘ईश्वरा’कडे वळवितात.

३) समग्र कनिष्ठ अस्तित्वाचे आध्यात्मिक सत्याप्रत खुले होणे – या अंतिम गोष्टीला परिवर्तनाचा आंतर-आध्यात्मिक भाग (the psycho-spiritual part) असे म्हणता येईल.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 332)

‘निसर्गा’मध्ये वनस्पती ज्याप्रमाणे वाढतात त्याप्रमाणे, व्यक्तीने गोष्टींना सहजस्वाभाविकपणे विकसित होऊ द्यावे. त्यांच्या त्यांच्या वेळेपूर्वीच आपण जर त्यांच्यावर अत्यंत काटेकोर आकार किंवा मर्यादा लादण्याचा प्रयत्न केला तर, त्या गोष्टी त्यांचा नैसर्गिक विकास गमावून बसतील आणि आज ना उद्या त्या नष्ट कराव्याच लागतील.

‘निसर्गां’तर्गत ‘ईश्वर’ अंतिम असे काहीच निर्माण करत नाही, प्रत्येक गोष्टच तात्पुरती असते आणि त्याच वेळी ती त्या कालमान-परिस्थितीला अनुसरून जितकी शक्य आहे तितकी परिपूर्ण देखील असते.

*

आपल्या कार्यप्रणालीमध्ये आपण ‘प्रकृती’चे गुलाम असता कामा नये : प्रयत्न करण्याच्या, बदलण्याच्या, काहीतरी करण्याच्या, नाहीसे करण्याच्या, पुन्हापुन्हा करत राहण्याच्या सवयी तसेच, ऊर्जा, श्रम, साधनसंपदा आणि संपत्तीचा अपव्यय करण्याच्या साऱ्या सवयी हा ‘प्रकृती’च्या कार्याचा मार्ग आहे, हा ‘ईश्वरा’चा मार्ग नव्हे. ‘दिव्य-चेतना’ आधी त्या कार्याचे सत्य काय आहे हे पाहते, दिलेल्या परिस्थितीत ते कार्य करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता तेही ती ‘चेतना’ पाहते. आणि जेव्हा ती कार्य करते तेव्हा ते अंतिम असते; एकदा केलेल्या गोष्टीकडे ती कधीच पुन्हा परतून येत नाही, ती पुढे पुढे वाटचाल करते, यश असो की अपयश त्यास ती आपल्या ध्येयाप्रत जाण्याच्या दिशेने प्रगत होण्याचे एक पाऊल म्हणून उपयोगात आणते.

‘प्रकृती’ प्रगती करण्यासाठी विनाश घडविते, तर ‘दिव्य-चेतना’ विकासाला उत्तेजन देते आणि सरतेशेवटी रूपांतरण घडविते.

*

तुम्हाला तुमची जबाबदारी उमगली नाही आणि तुम्ही सदैव सतर्क आणि उद्यमी राहिला नाहीत तर, ‘प्रकृती’ तुमची थट्टा करेल. तुम्हाला ‘प्रकृती’ करते ती थट्टा थांबवायची असेल तर, तुम्ही अगदी अचूकतेने आणि जबाबदारीने तुमचे कर्म केले पाहिजे. काहीतरी करायचेच राहून गेले आहे, असे होता कामा नये. तुम्ही नेहमीच सावधानता बाळगली पाहिजे, सतर्क राहिला पाहिजेत म्हणजे मग तुम्ही सुरक्षित असाल.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 12)

विचार शलाका – २८

आपण ‘देवा’ची प्रतिमूर्तीच बनावे, त्याच्यामध्येच आपण निवास करावा, त्याच्या सन्निध राहावे आणि त्याच्या आनंदाचे व शक्तीचे आपण एक माध्यम बनावे, त्याच्या कार्याचे आपण एक साधन बनावे यासाठीची हाक आपल्याला आलेली आहे. सर्व अशुभापासून शुद्धीकरण करतकरत, ईश्वराच्या स्पर्शाने जीवाचे रूपांतरण होत, आपल्याला दिव्य विद्युत-जनित्राप्रमाणे (dynamos) या जगामध्ये कार्य करायचे आहे आणि ती दिव्य ऊर्जा सर्व मानवजातीमध्ये वितरित करायची आहे. तिच्या प्रकाशाने मानवजात रोमांचित होत, प्रकाशमान होईल अशा रीतीने ती वितरित करायची आहे. त्यामुळे आपल्यापैकी कोणीही एखादा जिथे कोठे उभा असेल, त्याच्या अवतीभोवती असणारे शेकडो लोक ‘देवा’च्या प्रकाशाने, त्याच्या शक्तीने भारले जातील, ते ‘देवा’ने परिपूर्ण आणि आनंदाने परिपूर्ण होऊन जातील.

चर्च, परंपरा, धर्मविद्या, तत्त्वज्ञानं मानवजातीला वाचविण्यामध्ये अपयशी ठरली कारण त्यांनी स्वतःला बौद्धिक पंथ, सिद्धान्त, कर्मकांड, संस्था यांमध्ये, तसेच आचारशुद्धी, दर्शने यांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवले, जणू काही यामुळे मानवजातीचे रक्षण होणार होते. हे करत असताना, जी गोष्ट करणे गरजेचे होते, त्याकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. त्यांनी आत्म्याच्या शक्तीकडे आणि तिच्या शुद्धीकरणाकडे लक्ष पुरविले नाही. आपण त्या आवश्यक गोष्टीकडे परतले पाहिजे. ‘ख्रिस्ता’ची पावित्र्याची आणि मानवजातीच्या परिपूर्णतेची शिकवण, ‘महंमद’च्या (पैगंबर) परिपूर्ण शरणागतीची, आत्मसमर्पणाची आणि ईश्वरसेवेची शिकवण, मानवातील ईश्वराच्या आनंदाची व प्रेमाची ‘चैतन्यां’नी (महाप्रभू) दिलेली शिकवण, सर्व धर्मांच्या एकत्वाची आणि मानवातील ‘देवा’च्या दिव्यत्वाची रामकृष्णांनी (परमहंस) दिलेली शिकवण अंगीकारत, या साऱ्या प्रवाहांचे एका मोठ्या नदीमध्ये एकत्रीकरण करत, ‘गंगे’प्रमाणे विशुद्ध करून घेत, त्यांना उद्धारून घेत आपणही, ‘भगीरथा’ने ज्याप्रमाणे ‘गंगे’चे अवतरण करून घेतले आणि आपल्या पूर्वजांच्या अस्थी त्यामध्ये विसर्जित केल्या, त्याप्रमाणे या भौतिकतावादी मानवतेच्या मृतवत झालेल्या जीवनावर, त्याचा वर्षाव करायला हवा. ज्यामुळे, या मानवजातीमधील आत्मतत्त्वाचे पुनरुत्थान होईल आणि पुन्हा एकदा काही काळासाठी या विश्वामध्ये ‘सत्ययुग’ अवतरेल.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 90)

साधनेची मुळाक्षरे – ०९

(अहंभावात्मक मानसिक कल्पना, धारणा यांची व्यर्थता स्पष्ट करताना श्रीअरविंद एका साधकाला उद्देशून लिहितात…)
दिव्य मातेच्या हाती तुम्ही तुमचे आत्मदान मुक्तपणे आणि सहजसाधेपणाने कधीच केलेले नाही, तुम्ही कधीच खरेखुरे समर्पण केलेले नाही. आणि अतिमानसिक ‘योगा’मध्ये यशस्वी होण्याचा तोच तर एकमेव मार्ग आहे. ‘योगी’ बनणे, ‘संन्यासी’ बनणे किंवा ‘तपस्वी’ बनणे हे येथील योगाचे उद्दिष्ट नाही. रूपांतरण हे उद्दिष्ट आहे, आणि तुमच्या स्वतःपेक्षा अनंतपटीने महान असणाऱ्या शक्तिद्वारेच हे रूपांतरण घडणे शक्य असते; खरोखर ‘दिव्य माते’चे जणू बालक झाल्यानेच केवळ हे रूपांतरण शक्य आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 143)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २३

आमचा योग हा रूपांतरणाचा योग आहे; हे रूपांतरण म्हणजे संपूर्ण चेतनेचे रूपांतर आहे; तसेच ते संपूर्ण प्रकृतीचे, तिच्या मस्तकापासून ते पायापर्यंत, तिच्या अगदी गुप्त आंतरिक घटकांपासून, ते तिच्या अगदी दृश्य बहिर्वर्ती हालचालींपर्यंतच्या प्रत्येक भागाचे रूपांतर आहे. हा बदल काही केवळ नैतिक नाही किंवा ते धार्मिक परिवर्तन नव्हे, किंवा संतत्व वा संन्यासमार्गी संयमदेखील नव्हे, उदात्तीकरण नाही किंवा, जीवनाचे व प्राणिक प्रवृत्तींचे दमनही आम्हाला अभिप्रेत नाही; किंवा ते काही गौरवीकरण नाही, अथवा कठोर असे नियंत्रणदेखील नाही; किंवा भौतिक अस्तित्वालाच नकार देणेही, अभिप्रेत नाही. अल्पतेकडून अधिकतेकडे, कनिष्ठाकडून उच्चतेकडे, पृष्ठवर्ती जाणिवेकडून सखोल चेतनेप्रत होणारा बदल आम्हाला अभिप्रेत आहे. सर्वाधिक महान, सर्वोच्च, सखोलतम असे संभाव्यकोटीतील रूपांतर आम्हाला अभिप्रेत आहे. तसेच समग्र अस्तित्वाचे त्याच्या साधनसामग्रीनिशी संपूर्ण परिवर्तन आणि क्रांती अभिप्रेत आहे; प्रत्येक तपशीलाचे अस्तित्वाच्या आजवर प्रत्यक्षीभूत न झालेल्या दिव्य प्रकृतीमध्ये रूपांतर होणे, हे आम्हाला अभिप्रेत आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 371)