भारताचे पुनरुत्थान – १६
‘कर्मयोगिन्’या नियतकालिकामधून…
कलकत्ता : दि. १९ जून १९०९
मानवतेसाठी भारताच्या उभारणीमध्ये साहाय्यभूत होणे हे आमचे ध्येय आहे. हाच आमच्या राष्ट्रीयतेचा आत्मा आहे आणि त्याचेच आम्ही आग्रहाने प्रतिपादन करतो आणि त्याचेच अनुसरण करतो.
मानवतेला आमचे असे सांगणे आहे की, “आता अशी वेळ आली आहे की तुम्ही एक मोठे पाऊल उचलले पाहिजे आणि या भौतिक अस्तित्वातून वर उठून, ज्याकडे आता मानवता वळत आहे अशा अधिक उच्च, अधिक सखोल व अधिक विशाल अशा जीवनाकडे वाटचाल केली पाहिजे. मानवजातीला ज्या समस्या भेडसावत आहेत त्या समस्या, आंतरिक साम्राज्यावर विजय प्राप्त करून घेऊनच सोडविता येतील. निसर्गाच्या शक्तींना आरामदायक सुखसोयींच्या दिमतीस जुंपून या समस्या सुटणार नाहीत; तर बाह्य प्रकृतीवर आंतरिक रितीने विजय मिळवत, मनुष्याचे बाह्य व आंतरिक स्वातंत्र्य सिद्ध करून आणि बुद्धी व आत्म्याच्या शक्तींवर प्रभुत्व मिळवूनच त्या सोडविता येतील. या कार्यासाठी आशिया खंडाचे पुनरुत्थान होणे गरजेचे असल्यामुळेच आशिया खंडाचा उत्कर्ष होत आहे. त्यासाठी भारताचे स्वातंत्र्य व त्याची महानता यांची आवश्यकता असल्यामुळेच, भारत त्याच्या नियत अशा स्वातंत्र्याचा व महानतेचा दावा करत आहे.”
– श्रीअरविंद (CWSA 08 : 26-27)







