Tag Archive for: भारत

भारताचे पुनरुत्थान – १६

‘कर्मयोगिन्’या नियतकालिकामधून…
कलकत्ता : दि. १९ जून १९०९

मानवतेसाठी भारताच्या उभारणीमध्ये साहाय्यभूत होणे हे आमचे ध्येय आहे. हाच आमच्या राष्ट्रीयतेचा आत्मा आहे आणि त्याचेच आम्ही आग्रहाने प्रतिपादन करतो आणि त्याचेच अनुसरण करतो.

मानवतेला आमचे असे सांगणे आहे की, “आता अशी वेळ आली आहे की तुम्ही एक मोठे पाऊल उचलले पाहिजे आणि या भौतिक अस्तित्वातून वर उठून, ज्याकडे आता मानवता वळत आहे अशा अधिक उच्च, अधिक सखोल व अधिक विशाल अशा जीवनाकडे वाटचाल केली पाहिजे. मानवजातीला ज्या समस्या भेडसावत आहेत त्या समस्या, आंतरिक साम्राज्यावर विजय प्राप्त करून घेऊनच सोडविता येतील. निसर्गाच्या शक्तींना आरामदायक सुखसोयींच्या दिमतीस जुंपून या समस्या सुटणार नाहीत; तर बाह्य प्रकृतीवर आंतरिक रितीने विजय मिळवत, मनुष्याचे बाह्य व आंतरिक स्वातंत्र्य सिद्ध करून आणि बुद्धी व आत्म्याच्या शक्तींवर प्रभुत्व मिळवूनच त्या सोडविता येतील. या कार्यासाठी आशिया खंडाचे पुनरुत्थान होणे गरजेचे असल्यामुळेच आशिया खंडाचा उत्कर्ष होत आहे. त्यासाठी भारताचे स्वातंत्र्य व त्याची महानता यांची आवश्यकता असल्यामुळेच, भारत त्याच्या नियत अशा स्वातंत्र्याचा व महानतेचा दावा करत आहे.”

– श्रीअरविंद (CWSA 08 : 26-27)

भारताचे पुनरुत्थान – ११

‘बन्दे मातरम्’ या नियतकालिकामधून…
कलकत्ता : दि. ०५ मार्च १९०८

भारताला आता जर का एका महान सामाजिक क्रांतीची आवश्यकता असेल तर ती याच कारणासाठी की, भारताचा प्राचीन व अविचल आत्मा ज्यामधून अभिव्यक्त होऊ शकत नाही अशा रूपांशी आपण अजूनही जखडून राहिलो तर, त्यामुळे स्वराज्याचा आदर्श सिद्धीस जाऊ शकणार नाही. भारतमातेने भूतकाळात पांघरलेली जीर्ण वस्त्रं बदलली पाहिजेत म्हणजे तिचे सौंदर्य पुन्हा एकदा उजळून निघेल. तिने तिच्या देहरूपामध्येदेखील बदल केला पाहिजे म्हणजे त्यामधून तिचा आत्मा नव्याने अभिव्यक्त होऊ शकेल. असा बदल केला तर ती युरोपाची नक्कल होईल अशी भीती बाळगण्याचे काही कारण नाही. कारण तिची व्यक्तिविशिष्टता (individuality) इतकी बलशाली आहे की, तिच्याबाबतीत अशा प्रकारचे अवमूल्यन होऊच शकणार नाही. तसेच तिचा आत्मा एवढा स्थिरचित्त आणि स्वयंपूर्ण आहे की, ती अशा तऱ्हेची शरणागती पत्करणेही शक्य नाही.

भारतामध्ये पुन्हा आर्थिक क्रांतीची आवश्यकता असेल तर ती एवढ्यासाठीच की, अन्यथा वाणिज्य-क्षेत्रातील व उद्योग-क्षेत्रातील स्वराज्याला तिच्या जुन्या औद्योगिक जीवनाच्या सुरेख पण अरूंद इमारतीमध्ये वाव मिळणार नाही. स्वतंत्र आणि परिपूर्ण राष्ट्रीय जीवनाच्या औद्योगिक उर्जांना बलशाली क्षेत्राची आणि विशाल जलप्रवाहांची आवश्यकता असते. युरोपने आत्ता ज्याप्रमाणे मानवतेच्या उदात्त भावभावनांची पायमल्ली चालविली आहे, तशाच प्रकारच्या रोगग्रस्त आणि विस्कळीत समाजस्थितीमध्ये आर्थिक क्रांती आपल्याला नेऊन ठेवेल अशी भीती बाळगण्याचेदेखील कारण नाही. जी शिकवण म्हणजे भारतमातेचे जणू जीवनच आहे, जी तिच्या अमरत्वाचे रहस्य आहे अशी शिकवण ही – पाश्चात्त्य देशांमध्ये ‘उद्योगधंद्या’च्या नावाखाली संघटित स्वार्थीपणा, क्रूरपणा आणि लोभ, हाव यांना जी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे – त्याचीच प्रतिकृती ठरण्याइतपत कदापिही विस्मरणात जाऊ शकणार नाही. भारतमाता स्वत:ची परिस्थिती स्वतः निर्माण करेल, समाजामध्ये व्यवस्थेचे रहस्य शोधण्यासाठी समाजवाद जो व्यर्थ आटापिटा करत असतो ते रहस्य भारतमाता शोधून काढेल आणि जग व आत्मा यांच्यामध्ये सुसंवाद कसा प्रस्थापित करायचा असतो हेदेखील ती पृथ्वीवासियांना पुन्हा एकदा शिकवेल.

सध्या जे काही घडत आहे त्यामध्ये एक महान आणि महत्त्वाचे रूपांतर घडून येत आहे, आणि हे रूपांतर केवळ आपल्यासाठीच नव्हे तर अखिल जगासाठी महत्त्वाचे असणार आहे, याचा बोध आपल्याला होऊ शकला आणि त्यामागील सत्य आपल्याला प्रतीत झाले तर येणाऱ्या काळात, कोणतीही भीती वा शंका न बाळगता आपण स्वतःला त्यात झोकून देऊ.

भारत हा राष्ट्रांचा गुरू आहे. मानवी जिवाला गंभीर आजारांमधून बाहेर काढणारा जणू धन्वंतरी म्हणजे भारत आहे. जगत्-जीवनाची पुन्हा एकवार नवरचना करावी आणि मनुष्याला त्याच्या आत्म्याची शांती पुन्हा एकदा प्राप्त करून द्यावी हे भारताचे नियत कार्य आहे.

– श्रीअरविंद (CWSA 06-07 : 905-906)

भारताचे पुनरुत्थान – ०९

‘बन्दे मातरम्’ या नियतकालिकामधून…
कलकत्ता : दि. २१ फेब्रुवारी १९०८

जगाचे भवितव्य हे भारतावर अवलंबून आहे. जेव्हा कधी भारत त्याच्या निद्रेमधून जागा होतो तेव्हा तो झळाळणारे काही अद्भुत प्रकाशकिरण जगाला प्रदान करतो आणि ते प्रकाशकिरण अनेकानेक राष्ट्रांना प्रकाशित करण्यासाठी पुरेसे असतात. भारताला एखादा विचार करण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो मात्र तोच विचार करण्यासाठी इतर राष्ट्रांना शतकानुशतके व्यतीत करावी लागतात.

ईश्वराने भारताच्या हाती प्राचीन वेदविद्येचा ग्रंथ दिला आणि तो ग्रंथ उघडण्याची योग्य वेळ येत नाही तोपर्यंत तो ग्रंथ त्याच्या हृदयामध्ये कुलूपबंद करून ठेवण्याचा आदेशही त्याला दिला. कधीकधी त्यातील एखादे प्रकरण तर कधी एखादे पान उघड करून दिले जात असे, तर कधीकधी अगदी एखादे वाक्यसुद्धा! आणि अशी वाक्यं ही पुढे युगानुयुगांसाठी प्रेरणा बनून राहिली आहेत आणि त्यांनी मानवतेचे शेकडो वर्षे भरणपोषण केले आहे.

– श्रीअरविंद (CWSA 06-07 : 890)

भारताचे पुनरुत्थान – ०४

(भारत मातेविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचे सध्या १५० वे जयंतीवर्ष सुरू आहे. मुळात बंगाली भाषेत असलेल्या या गीताचा पूर्वाश्रमीच्या श्री. अरविंद घोष यांनी इंग्रजीमध्ये गद्यानुवाद केला आहे. त्याचा मराठी भावानुवाद आज प्रस्तुत करत आहोत….)

हे माते, मी तुला वंदन करत आहे.
जलसमृद्ध आणि धनधान्यसमृद्ध असणाऱ्या हे माते,
दक्षिणवाऱ्यांमुळे तू शीतलतनू झाली आहेस;
सुगीच्या पिकांनी घनगर्द झालेल्या हे माते,
मी तुला वंदन करत आहे.
चंद्रप्रकाशाच्या वैभवामध्ये तुझ्या रात्री न्हाऊन निघाल्या आहेत,
विविध फुलांनी बहरलेले वृक्षरूपी सुंदर वस्त्र
तुझ्या भूमीने परिधान केले आहे,
तुझे हास्य मंजुळ आहे आणि तुझी वाणी मधुर आहे,
परमानंदप्रदायिनी, वरदायिनी असणाऱ्या हे माते,
मी तुला वंदन करत आहे.

सप्त कोटी मुखांमधून उठणाऱ्या गर्जनांनी
आणि सप्त कोटी प्रजाजनांच्या दोन्ही हातांमध्ये उगारलेल्या शस्त्रांमुळे
तू रुद्रभीषण दिसत आहेस, तेव्हा हे माते,
तू दुर्बल आहेस असे म्हणण्याचे धारिष्ट्य कोण बरे करेल?
अपरिमित शक्ती धारण करणाऱ्या रक्षणकर्त्या मातेसमोर,
आणि शत्रूंच्या पलटणी पळवून लावणाऱ्या मातेसमोर
मी नतमस्तक आहे. हे माते, मी तुला वंदन करत आहे.

तूच ज्ञान आहेस आणि तूच आमचा स्वधर्म आहेस,
तूच आमच्या हृदयांमध्ये निवास करत आहेस.
तूच आमचा आत्मा आहेस आणि आमच्या देहामधील प्राणही तूच आहेस.
आमच्या बाहुंमधील शक्तिसामर्थ्य तूच आहेस,
आमच्या हृदयामधील प्रेम आणि श्रद्धादेखील तूच आहेस,
आम्ही सर्व मंदिरांमध्ये तुझ्याच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करत असतो.
कारण तू युद्ध-शस्त्रे धारण केलेली दशभुजा दुर्गा आहेस,
आणि कमलपुष्पांमध्ये विहरणारी सौंदर्यदेवतादेखील तूच आहेस.
परावाणीरूप असणाऱ्या, वेदप्रदायिनी देवते,
मी तुला वंदन करत आहे.

हे ऐश्वर्यदेवते,
विशुद्ध व अनुपम जलप्रवाहांनी आणि
फुलाफळांनी समृद्ध असणाऱ्या हे माते,
मी तुला वंदन करत आहे.
श्यामलवर्णी, ऋजुस्वभावी, सुहास्यवदन असणाऱ्या,
आभूषणं परिधान केलेल्या, शृंगाराने विनटलेल्या,
वैभवधारिणी हे माते,
वैविध्यसंपन्न हे माते, मी तुला वंदन करत आहे.

– श्रीअरविंद (CWSA 05 : 467-468)

भारताचे पुनरुत्थान – ०३

‘बंदे मातरम्’ या नियतकालिकामधून
कलकत्ता : दि. १९ फेब्रुवारी १९०८

भारतामध्ये दोन महान मंत्र आहेत, त्यातील एक मंत्र म्हणजे ‘वंदे मातरम्’! हा मंत्र म्हणजे आपल्या मातृभुमीविषयी जागृत झालेल्या प्रेमाची सामूहिक आणि सार्वत्रिक गर्जना आहे. आणखी एक अधिक गुप्त आणि गूढ मंत्रदेखील आहे, पण तो अजूनपर्यंत उघड झालेला नाही. यापूर्वीही एकदा विंध्य पर्वतरांगांमधील संन्याशांनी ‘वंदे मातरम्’ हा मंत्र जगाला दिला होता. परंतु आपल्याच स्वकीयांनी विश्वासघात करून तो गमावला होता. कारण तेव्हा आपले राष्ट्र पुनरुत्थानासाठी परिपक्व झाले नव्हते आणि अकाली झालेली जागृती राष्ट्राला वेगाने अधोगतीकडे घेऊन गेली असती, म्हणून आपण तो मंत्र गमावून बसलो.

परंतु इ. स. १८९७ च्या प्रचंड उलथापालथीमध्ये संन्याशांनी पुन्हा एकदा ती गर्जना ऐकली आणि भारताचे पुनरुत्थान व्हावे ही ‘ईश्वरी’ आज्ञा आहे याची त्यांना जेव्हा जाणीव झाली, तेव्हा पुन्हा एकदा ‘वंदे मातरम्’ हा मंत्र जगासमोर प्रकट करण्यात आला. त्याचा प्रतिध्वनी लोकांच्या अंतःकरणांमध्ये निनादत राहिला आणि जेव्हा काही मोजक्या महान हृदयांमध्ये तो निनाद शांततेमध्ये परिपक्व होत गेला तेव्हा संपूर्ण राष्ट्र त्या मंत्राच्या प्रकटीकरणाविषयी जागृत झाले.

– श्रीअरविंद (CWSA 06-07 : 877)

भारताचे पुनरुत्थान – ०२

१६ एप्रिल १९०७ (दै. बंदे मातरम्) – कलकत्ता

महान आणि प्राचीन भारताच्या गतकालीन गतवैभवाबद्दल अनेक जणं शोक व्यक्त करतात आणि प्राचीन काळातील ऋषी, विचार व सभ्यतेचे प्रेरक निर्माणकर्ते हे जणूकाही आमच्या काळातील वीरयुगाचा एक चमत्कार होते आणि सद्यकालीन क्लेशकारक वातावरणामध्ये आणि अधःपतित माणसांमध्ये अशा लोकांनी पुन्हा जन्मच घेऊ नये, असे म्हणताना आढळतात. परंतु (असे म्हणणे) हा अपराध आहे, त्रिवार अपराध आहे.

आपली भारत भूमी ही शाश्वत भूमी आहे, आपली प्रजा चिरंतन आहे, आपला धर्म सनातन आहे; ज्याचे सामर्थ्य, ज्याची महानता, ज्याचे पावित्र्य हे झाकोळले जाऊ शकेल पण ते कधीच, अगदी एका क्षणभरासाठीसुद्धा पूर्णपणे नष्ट होऊ शकणार नाही. वीरपुरूष, ऋषी, संत हे आपल्या भारत भूमीची नैसर्गिक फलसंपदा आहे आणि भारताच्या इतिहासामध्ये असे एकही युग नव्हते की जेव्हा वीरपुरूष, ऋषी, संत-सत्पुरूष जन्माला आले नव्हते. ज्यामधून नवीन भारत उदयास येत आहे असा, ‘वंदे मातरम्’ हा संजीवक मंत्र ज्यांनी (श्री. बंकिमचंद्र चटर्जी यांनी) आपल्याला दिला, त्यांचे नाव उत्तरकालीन युगातील ऋषींच्या नावामध्ये समाविष्ट केले पाहिजे याची जाणीव, अखेरीस का होईना पण आता आपल्याला झाली आहे.

ऋषी आणि संत यांच्यामध्ये फरक असतो. ऋषींचे जीवन कदाचित त्यांच्या श्रेष्ठ पावित्र्यामुळे किंवा त्यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या आदर्श सौंदर्यामुळे ठळकपणे नजरेत भरणार नाही. ते स्वतः काय होते यामुळे नव्हे तर, त्यांनी जे काही अभिव्यक्त केले होते यामुळे ते महान ठरू शकतात. आपल्या राष्ट्राला आणि अखिल मानवतेला एक महान आणि चैतन्यदायी संदेश देण्याची आवश्यकता होती आणि हा संदेश शब्दरूपात साकार करण्यासाठी ‘ईश्वरा’ने त्यांच्या (बंकिमचंद्रांच्या) मुखाची निवड केली आहे. एका अतिशय महत्त्वपूर्ण अशा दूरदृष्टीचे प्रकटीकरण होण्याची आवश्यकता होती आणि त्या ‘सर्वशक्तिमान ईश्वरा’ने सर्वप्रथम त्यांची दृष्टी उघडली आहे. त्यांना जी दृष्टी प्रदान करण्यात आली होती, त्यांना जो संदेश प्राप्त झाला होता, तो त्यांनी त्यांच्यामध्ये असलेल्या सर्वसामर्थ्यानिशी, अंतःस्फूर्तीच्या एका परमोच्च क्षणी शब्दांमध्ये अभिव्यक्त करून, संपूर्ण जगासमोर घोषित केला होता. माणसांच्या आंतरतम प्रकृतीला हेलावण्यासाठी, त्यांची मने स्वच्छ करण्यासाठी, त्यांच्या अंत:करणाचा ठाव घेण्यासाठी आणि एरवी, माणसांच्या सामान्य क्षणांमध्ये जे करणे त्यांना अशक्य ठरले असते त्या कृती करण्यास त्यांना प्रवृत्त करण्यासाठी त्या संदेशाचा केवळ उच्चार करणेच पुरेसे होते. त्या शब्दांमध्ये मंत्राचे सामर्थ्य होते, त्या मंत्रवत शब्दांच्या प्रकटीकरणासाठी त्यांचा जन्म झाला होता आणि त्या मंत्राचे ते द्रष्टे होते.

– श्रीअरविंद (CWSA 01 : 637)

भारत हाच जगातील असा एकमेव देश आहे…

श्रीअरविंदांच्या जन्मापूर्वी, धर्म आणि आध्यात्मिकता या गोष्टी भूतकाळातील व्यक्तींभोवती केंद्रित झालेल्या होत्या. आणि त्या व्यक्ती ‘पृथ्वीवरील जीवनाला नकार हे (जीवनाचे) उद्दिष्ट’ असले पाहिजे असे सांगत असत. तेव्हा त्याकाळी तुमच्यापुढे दोन पर्याय ठेवले जात :

किरकोळ आनंद किंवा यातना, सुख किंवा दु:ख यांच्या चक्रामध्ये फिरत राहणारे हे इहलोकातील जीवन जगत असताना जर तुम्ही चुकीचे वर्तन केलेत (तुमच्याकडून पापाचरण घडले) तर तुम्हाला नरकाची भीती दाखविली जात असे. हा पहिला पर्याय असे.

दुसरा पर्याय म्हणजे, ऐहिक जीवनाचा त्याग करून स्वर्ग, निर्वाण, मोक्ष इत्यादी गोष्टींच्या प्राप्तीसाठी कोणत्यातरी दुसऱ्याच जगामध्ये पलायन करायचे.

तुम्हाला या दोन्हीपैकी एका पर्यायाची निवड करावी लागत असे, खरंतर त्यामध्ये निवड करण्यासारखे काहीच नसे कारण दोन्ही पर्याय एकसारखेच अयोग्य, सदोष आहेत.

श्रीअरविंदांनी आपल्याला असे सांगितले आहे की, अशा प्रकारचा विचार करणे हीच मूलभूत चूक होती; कारण त्यातूनच भारताची अवनती घडून आली आणि या गोष्टीच भारताच्या दुर्बलतेला कारणीभूत झाल्या…

मात्र, हेही तितकेच खरे आहे की, भारत हाच जगातील असा एकमेव देश आहे की, ज्याला आजही, जडभौतिकाच्या पलीकडेही काही असते याची जाणीव आहे. युरोप, अमेरिका आणि इतर देशांना याचा विसर पडलेला आहे. आणि म्हणूनच जतन करण्यायोग्य आणि विश्वाला देण्यायोग्य एक संदेश आजही भारताकडे आहे.

श्रीअरविंदांनी आम्हाला हे दाखवून दिले की, या भौतिक जीवनापासून पळ काढण्यामध्ये सत्य सामावलेले नाही; तर या भौतिक जीवनात राहूनच, त्याचे रूपांतरण करायचे आहे. या भौतिक जीवनाचे रूपांतरण ‘दिव्यत्वा’मध्ये केल्यामुळे, ‘ईश्वर’ या ‘इथे’च, या ‘जडभौतिक विश्वा’मध्ये आविष्कृत होऊ शकेल.

– श्रीमाताजी (CWM 12 : 210-211)

साधना, योग आणि रूपांतरण – १२४

(उत्तरार्ध)

आध्यात्मिक मुक्तीचे साधन म्हणून भगवद्गीता सातत्याने कर्माचे समर्थन करत आहे. भक्ती आणि ज्ञानमार्गाप्रमाणेच कर्ममार्गाचे महत्त्वही प्रतिपादन करत आहे. कृष्ण कर्माचा एक अधिक उच्चतर अर्थ लावू पाहत आहे. कर्म निरपेक्षपणे केले पाहिजे, बक्षिसाच्या किंवा कर्मफलाच्या आसक्तीविना, निरहंकारी भूमिकेतून वा वृत्तीने, ‘ईश्वरा’प्रत केलेले अर्पण किंवा अर्पण केलेली समिधा या स्वरूपात कर्म केले गेले पाहिजे, असे त्याचे सांगणे आहे. धर्माला अनुसरून आणि योग्य प्रकारे कर्म केल्यास, कोणत्याही प्रकारचे कर्म करण्यास हरकत नाही, अशा कर्माने ‘ईश्वरा’कडे जाण्याच्या मार्गात कोणतीही बाधा येत नाही किंवा आध्यात्मिक ज्ञानाचा आणि आध्यात्मिक जीवनाचा मार्गही त्याने अवरूद्ध (prevent) होत नाही. या गोष्टींकडे पाहण्याचा भारताचा हा दृष्टिकोन पूर्वापार चालत आलेला आहे.

अर्थातच एक संन्यासवादी ध्येयसुद्धा काही जणांसाठी आवश्यक असते आणि आध्यात्मिक व्यवस्थेमध्ये त्यालाही स्थान आहे. मी स्वतःसुद्धा असे म्हणतो की, व्यक्तीला जर एखाद्या तपस्व्याप्रमाणे जीवन जगता आले नाही किंवा एखाद्या एकान्तवासामध्ये राहणाऱ्या व्यक्तीप्रमाणे अगदी किमान गरजांमध्ये जीवन जगता आले नाही तर ती व्यक्ती आध्यात्मिकदृष्ट्या परिपूर्ण होऊ शकत नाही. हे उघडच आहे की, हावरटपणा, किंवा इतर कोणताही लोभ, किंवा अशा प्रकारची कोणतीही आसक्ती ही गोष्ट व्यक्तीच्या चेतनेमधून त्यागणे जितके आवश्यक असते त्याचप्रकारे संपत्तीची हाव आणि नफेखोरी या गोष्टीदेखील त्याच्या प्रकृतीमधून नाहीशा झाल्या पाहिजेत.

परंतु आध्यात्मिक पूर्णतेसाठी संन्यासमार्ग हा अगदी अनिवार्य आहे किंवा संन्यासमार्ग म्हणजेच आध्यात्मिक मार्ग, असे मी मानत नाही. एखाद्या कार्यामध्ये किंवा कोणत्याही कर्मामध्ये, किंवा ‘ईश्वरा’ला आपल्याकडून ज्या कर्माची अपेक्षा आहे त्या सर्व प्रकारच्या कर्मांमध्येसुद्धा अहंकार आणि कर्मफलाच्या इच्छेचा त्याग करून, ‘ईश्वरा’प्रत समर्पण करण्याचा, आध्यात्मिक आत्मदान करण्याचा आणि आध्यात्मिक आत्म-प्रभुत्वाचा आणखी एक मार्गदेखील आहे. तसे नसते तर, भारतामध्ये जनक किंवा विदुरासारख्या थोर आध्यात्मिक व्यक्ती आढळल्या नसत्या; इतकेच काय कृष्णदेखील आढळला नसता; किंवा अगदी असताच तर तो कृष्ण वृंदावन, मथुरा, द्वारका यांचा अधिपती झाला नसता; तो राजपुत्र आणि योद्धा किंवा कुरूक्षेत्रातील सारथी झाला नसता; तर तो फक्त एक थोर तपस्वीच बनून राहिला असता. महाभारतामध्ये किंवा अन्यत्र, भारतीय धर्मशास्त्रामध्ये आणि भारतीय परंपरेमध्ये, जीवनाच्या परित्यागावर आधारित आध्यात्मिकतेला आणि कर्मप्रधान आध्यात्मिक जीवनाला समान स्थान देण्यात आलेले आहे. जीवनाच्या परित्यागावर भर देणारा संन्यासमार्ग हाच तेवढा भारतीय परंपरेतून आलेला आहे, आणि ‘सर्वकर्माणि’, सर्वप्रकारच्या कर्मांचा आणि जीवनाचा स्वीकार हा मार्ग युरोपियन किंवा पाश्चात्त्य आहे, तो आध्यात्मिक नाही, किंवा तो भारतीय नाही असे म्हणता येत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 249-250)

श्रीअरविंद बडोद्यामध्ये प्राध्यापक होते तेव्हा श्री. के. एम. तथा कन्हैयालाल मुन्शी हे त्यांचे विद्यार्थी होते. तेव्हा विद्यार्थीदशेत असताना, मुन्शी यांनी श्रीअरविंदांना प्रश्न विचारला होता, “राष्ट्रवादाची भावना कशी विकसित करता येईल?”

 

श्रीअरविंदांनी भिंतीवरील भारताच्या नकाशाकडे निर्देश करत म्हटले, “या नकाशाकडे पाहा. यामध्ये भारतमातेचे रूप पाहण्याचा प्रयत्न करा. शहरं, पवर्तराजी, नद्या, जंगले या साऱ्यांनी मिळून तिचा देह तयार होतो. या देशामध्ये राहणारी माणसं म्हणजे या देहातील जिवंत पेशी आहेत. आपले साहित्य म्हणजे तिची स्मृती व वाणी आहे. तिच्या संस्कृतीचा गाभा हा तिचा आत्मा आहे. मुलांच्या आनंदामध्ये आणि स्वातंत्र्यामध्ये तिची मुक्ती आहे. भारत ही एक ‘सचेतन माता’ आहे असा भाव ठेवून तिच्याकडे पाहा, तिचे ध्यान करा आणि नवविधा भक्तीच्या योगाने तिचे पूजन करा….

 

पुढील काळात याच कन्हैयालाल मुन्शी यांनी राष्ट्रभावनेतून ‘भारतीय विद्या भवन’ची स्थापना केली.

 

‘भारत  – एक दर्शन’ ही मालिका येथे समाप्त होत आहे.

 

(Mother’s Chronicles, Book Five by Sujata Nahar)

हा असा काळ आहे की जेव्हा, अखिल विश्वाप्रमाणेच भारतासाठीसुद्धा, त्याची भावी नियती आणि त्याच्या पावलांचे वळण हे शतकासाठी म्हणून आत्ता दमदारपणाने निर्धारित केले जात आहे, आणि हे निर्धारण म्हणजे काही कोणत्या एखाद्या सामान्य शतकासाठीचे निर्धारण नव्हे तर, हे शतक स्वतःच मुळात असे एक महान निर्णायक वळण आहे की, ज्या शतकामध्ये मानवसृष्टीच्या आंतरिक आणि बाह्य इतिहासाच्या दृष्टीने प्रचंड उलथापालथी व्हायच्या आहेत.

 

आपण आत्ता ज्या कृती करू त्यानुसार, आपल्या त्या कर्माची मधुर फळे आपल्याला प्रदान केली जाणार आहेत आणि आत्ताच्या या निर्णायक क्षणी देण्यात आलेली अशा प्रकारची प्रत्येक हाक ही आपल्या नागरिकांच्या आत्म्याला देण्यात आलेली एक संधी असणार आहे. तसेच ती एक निवड असणार आहे आणि त्याचबरोबर, ती एक कसोटीदेखील असणार आहे.

 

आपण अशी आशा करूया की, ती हाक प्रत्येकाच्या अस्तित्वाच्या सर्वोच्च उंचीपर्यंत जाऊन पोहोचावी आणि त्याच्या पारड्यात ‘नियतीच्या स्वामी’चे अगदी उघडपणाने झुकते माप पडावे.

 

– श्रीअरविंद [CWSA 01 : 413]

 

*

 

भारताचे भविष्य अगदी सुस्पष्ट आहे. भारत हा जगत्गुरू आहे. जगाची भावी संरचना ही भारतावर अवलंबून असणार आहे. भारत हा एक जिवंत आत्मा आहे. भारत हा जगामध्ये आध्यात्मिक ज्ञानाचे मूर्त रूप साकार करत आहे.

 

भारत सरकारने भारताचा हा अर्थ लक्षात घेतला पाहिजे आणि त्यानुसार त्यांच्या कृति-कार्यक्रमाची आखणी केली पाहिजे.

 

– श्रीमाताजी [CWM 13 : 353]