Tag Archive for: प्रामाणिकपणा

प्रामाणिकपणा – ३४

प्रारंभ करण्यासाठी तीन गोष्टी अनिवार्य आहेत.

०१) संपूर्ण अस्तित्वामध्ये आणि त्याच्या सर्व गतिविधींमध्ये परिपूर्ण प्रामाणिकपणा.

०२) हातचे काहीही राखून न ठेवता केलेले संपूर्ण आत्म-समर्पण.

०३) स्वतःवर धीराने काम करायचे आणि त्याच वेळी, पूर्ण अविचल शांती आणि समता यांचा स्थिर विजय प्राप्त करून घ्यायचा.

– श्रीमाताजी [CWM 14 : 41]

प्रामाणिकपणा – ३३

प्रश्न : श्रीअरविंदांच्या शताब्दीवर्षानिमित्त श्रीअरविंदांना मी वैयक्तिकरित्या सर्वोत्तम असे काय अर्पण करू शकेन ?

श्रीमाताजी : संपूर्ण प्रामाणिकपणे तुम्ही तुमचे मन त्यांना अर्पण करा.

प्रश्न : श्रीअरविंदांना संपूर्ण प्रामाणिकपणे माझे मन अर्पण करायचे झाले तर, त्यासाठी एकाग्रतेची शक्ती विकसित करण्याची आवश्यकता आहे ना? तर मग ही मौलिक क्षमता विकसित करण्याची एखादी पद्धत मला सांगाल का?

श्रीमाताजी : तुम्ही दररोज ज्या वेळी शांतचित्त असू शकाल अशी एक वेळ निश्चित करा. श्रीअरविंदांचे कोणतेही एक पुस्तक घ्या आणि त्यातील एक किंवा दोन वाक्यं वाचा. मग शांत राहून, त्या वाक्यांमधील गर्भितार्थ जाणून घेण्यासाठी एकाग्रचित्त व्हा. मानसिक शांतता मिळविण्यासाठी पुरेसे खोलवर जाऊन एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करा आणि जोवर तुम्हाला अपेक्षित परिणाम साध्य होत नाही तोपर्यंत रोज याची नव्याने सुरूवात करा. अर्थातच, (एकाग्रतेचा हा अभ्यास करत असताना) तुम्ही झोपी जाता कामा नये.

– श्रीमाताजी [CWM 12 : 205]

प्रामाणिकपणा – ३२

प्रामाणिकपणा हा जगामधील इतका दुर्मिळ गुण आहे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये तो गुण आढळून येतो तेव्हा त्या व्यक्तीसमोर आपण नतमस्तक झालेच पाहिजे.

आपण ज्याला प्रामाणिकपणा म्हणतो, त्या प्रामाणिकपणामध्ये परिपूर्ण सचोटी आणि पारदर्शकता असते. त्या व्यक्तीमध्ये ढोंगीपणाचा लवलेशही नसतो, ती व्यक्ती कोणतीही लपवाछपवी करत नाही किंवा स्वतः कोणीही नसताना, मी कोणीतरी आहे असे ती व्यक्ती दाखवीत नाही.

*

मानसिक प्रामाणिकपणाचा उदय : या उदयामुळे मनाला हे उमगेल की, मन हे केवळ एक माध्यम आहे, ते स्वयमेव गंतव्य नव्हे.

– श्रीमाताजी [CWM 08 : 73], [CWM 14 : 339]

प्रामाणिकपणा – ३१

प्रामाणिकपणा हा खऱ्या साक्षात्काराचा पाया आहे, तो साक्षात्काराचे साधन आहे, तोच मार्ग आहे आणि प्रामाणिकपणा हेच ध्येय देखील आहे. तुमच्याकडे प्रामाणिकपणा नसेल तर तुम्ही असंख्य घोडचुका करत राहता आणि तुम्ही स्वतःला आणि इतरांना जी हानी पोहोचविलेली असते, त्याचे तुम्हाला सातत्याने निवारण करत बसावे लागते, हे नक्की.

– श्रीमाताजी [CWM 08 : 399]

प्रामाणिकपणा – ३०

तुमच्या साधनेमध्ये काय महत्त्वाचे असते तर, पावलोपावली आवश्यक असणारा प्रामाणिकपणा; तुमच्यापाशी जर असा प्रामाणिकपणा असेल तर चुका झाल्या तरी फारसे काही बिघडत नाही, कारण चुका दुरूस्त केल्या जाऊ शकतात. पण जर थोडासुद्धा अप्रामाणिकपणा असेल तर त्यामुळे साधना एकदम निम्न स्तरावर खेचली जाते. पण, प्रामाणिकपणा अविरत आहे का अथवा कोणत्या एखाद्या क्षणी तुम्ही त्यापासून ढळत आहात हे पाहणे तुमचे तुम्हीच शिकले पाहिजे. त्यासाठी आवश्यक असणारी तळमळ व सातत्यपूर्ण इच्छा जर तुमच्याकडे असेल तर ते पाहण्याची शक्ती तुमच्यामध्ये येईल. इतरांना संतुष्ट करण्यावर किंवा न करण्यावर प्रामाणिकपणा अवलंबून नसतो – ती एक आंतरिक बाब असते….

– श्रीमाताजी [CWM 14 : 68]

प्रामाणिकपणा – २९

हृदयामध्ये प्रामाणिकपणा असेल आणि हेतू निःस्वार्थी असेल आणि वरून (ईश्वरी शक्तीकडून) येणाऱ्या साहाय्याप्रत खुलेपणा असेल तर, कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी त्यांवर मात करता येते किंवा कालांतराने त्यांमध्ये बदल करता येतो.

– श्रीअरविंद [CWSA 35 : 528]

प्रामाणिकपणा – २८

‘ईश्वरा’ला जे अपेक्षित असेल तेच आपल्याला पूर्ण प्रामाणिकपणे हवेसे वाटणे, ही जीवनातील शांती आणि आनंद मिळण्यासाठी आवश्यक अट आहे. माणसांची जवळजवळ नेहमीच अशी खात्री असते की, त्यांना काय हवे आहे आणि जीवनाने त्यांना काय प्रदान करायला हवे, हे त्यांना ‘ईश्वरा’पेक्षादेखील अधिक चांगले समजते, आणि यातूनच बहुतांशी सारी मानवी दुःखे उद्भवतात. इतरांनीसुद्धा आपल्या अपेक्षांची पूर्तता करावी आणि परिस्थितीने देखील आपल्या इच्छावासनांची पूर्ती करावी अशी बहुतेक सगळ्या माणसांची अपेक्षा असते आणि त्यामुळेच त्यांना त्रास सहन करावा लागतो आणि ते दुःखी होतात.

– श्रीमाताजी [CWM 16 : 433]

प्रामाणिकपणा – २७

संपूर्ण प्रामाणिकपणा ही अंतःकरणाच्या शुद्धीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. स्वतःबद्दल कोणतीही बढाई मारता कामा नये, ‘ईश्वरा’पासून, स्वतःपासून किंवा ‘सद्गुरू’पासून काहीही लपवून ठेवता कामा नये, स्वतःच्या वृत्ती-प्रवृत्तींचे थेट निरीक्षण केले पाहिजे आणि त्यांना सुयोग्य करण्याची साधीसरळ इच्छा बाळगली पाहिजे. या गोष्टींना वेळ लागला तरी काही हरकत नाही; पण ‘ईश्वर’प्राप्ती हेच आपले जीवित-कार्य आहे याची व्यक्तीने तयारी ठेवली पाहिजे.

– श्रीअरविंद [CWSA 30 : 43]

प्रामाणिकपणा – २६

तुम्ही प्रगती केल्याशिवाय राहूच शकत नाही म्हणून मार्गावर प्रगत होत राहण्यामध्ये खरी प्रामाणिकता सामावलेली असते. तुम्ही ‘दिव्य जीवना’साठी स्वत:ला समर्पित करता कारण त्याशिवाय तुम्ही राहूच शकत नाही, तुम्ही स्वत:चे रूपांतर करण्यासाठी धडपडता, प्रकाशाला उन्मुख होता कारण त्याविना तुम्ही राहूच शकत नाही, कारण तेच तुमच्या जीवनाचे प्रयोजन असते.

जेव्हा हे असे असते तेव्हा खात्री बाळगा की, तुम्ही योग्य मार्गावर आहात.

– श्रीमाताजी [CWM 03 : 282-283]

प्रामाणिकपणा – २५

प्रश्न : प्रामाणिकपणा म्हणजे खरोखर नक्की काय?

श्रीमाताजी : प्रामाणिकपणाच्या असंख्य श्रेणी आहेत. बोलायचे एक आणि विचार मात्र वेगळाच करायचा, दावा करायचा एका गोष्टीचा आणि हवी असते भलतीच गोष्ट, हे असे नसणे म्हणजे प्रामाणिकपणा; ही झाली प्रामाणिकपणाची अगदी प्राथमिक श्रेणी. म्हणजे असे पाहा की, एखादी व्यक्ती स्वतःमध्ये प्रचंड अभीप्सा आहे, असा जोरकसपणे दावा करत असते, तिला आध्यात्मिक जीवन हवे आहे, असे ती म्हणत असते आणि अगदी त्याच वेळी… अगदी निर्लज्जपणे, आध्यात्मिक जीवनाच्या अगदी विरोधी अशा गोष्टी करत असते.

(प्रामाणिकपणाची आता दुसरी श्रेणी पाहूया.) बरेचदा असे घडते एखादी व्यक्ती असे म्हणते की, “मला प्रगती करायची आहे आणि मला माझ्या दोषांपासून सुटका हवी आहे” आणि अगदी त्याच वेळी, ती व्यक्ती स्वत:च्या चेतनेमध्ये असणाऱ्या दोषांना खतपाणी घालते आणि त्यामध्ये कोणी हस्तक्षेप करून, त्यांना घालवून देऊ नये म्हणून, ते दोष दडवून ठेवण्यासाठी धडपडते.

…या दुसऱ्या श्रेणीमध्ये व्यक्तीमधील एखादा भाग अभीप्सा बाळगून असतो आणि तो म्हणत असतो आणि तसा विचारही करत असतो, त्याला असे वाटत असते की, आपल्यातील सारे दोष, अपूर्णता या गोष्टी निघून गेल्या पाहिजेत; आणि अगदी त्याच वेळी, त्याच व्यक्तीमधील इतर भाग मात्र या दोषांना आणि अपूर्णतांना दडवून ठेवतात. ते दोष आणि त्या अपूर्णता उघड होऊ नयेत, त्यांच्यावर मात करायला त्यांना कोणी भाग पाडू नये, अशा रीतीने ते अशा गोष्टी अगदी काळजीपूर्वक दडवून ठेवतात. हे अगदी सार्वत्रिक आहे.

आणि शेवटी, आपण पुरेसे पुढे गेलो असू, ‘ईश्वरा’बद्दलच्या मध्यवर्ती अभीप्सेला विरोधी असा एखादाही भाग जोपर्यंत आपल्यामध्ये असतो तोपर्यंत आपण पूर्णपणे प्रामाणिक आहोत, असे म्हणता येणार नाही. म्हणजेच सांगायचे झाले तर, परिपूर्ण प्रामाणिकपणा ही अत्यंत दुर्मिळ अशी बाब आहे. आणि बहुधा, अगदी नेहमी, स्वत:च्या प्रकृतीतील, स्वभावातील ज्या गोष्टी व्यक्तीला आवडत नाहीत त्या गोष्टी, स्वतःपासून सुद्धा लपवून ठेवण्याची ती व्यक्ती काळजी घेते, व्यक्ती त्या गोष्टींचे समर्थन करणारी स्पष्टीकरणे देत राहते.

….हा सर्व अप्रामाणिकपणा आहे. जेव्हा अस्तित्वाच्या केंद्रस्थानी दिव्य ‘उपस्थिती’ची चेतना असते, दिव्य ‘संकल्पा’ची चेतना असते आणि जेव्हा व्यक्तीचे संपूर्ण व्यक्तित्वच जणू काही दीप्तीमान, स्वच्छ, शुद्ध, संपूर्ण पारदर्शी असते आणि ते त्या दिव्य ‘अस्तित्वा’चा सर्व तपशिलांसह आविष्कार करत असते, तेव्हा तेथे संपूर्ण प्रामाणिकपणा येतो. तेव्हा तो खराखुरा प्रामाणिकपणा असतो.

कोणत्याही क्षणी, काहीही झाले तरी, जेव्हा व्यक्तीने स्वत:ला ‘ईश्वरा’प्रत समर्पित केलेले असते, आणि फक्त दैवी संकल्पाचीच ती व्यक्ती इच्छा बाळगत असते, मग त्यावेळी व्यक्तीच्या बाबतीत काहीही घडले तरी, कोणत्याही क्षणी, नेहमी, तिच्या पूर्ण अस्तित्वानिशी पूर्ण मतैक्याने ती व्यक्ती ‘ईश्वरा’ला म्हणू शकते, ईश्वराविषयी तिची अशी भावना असते की, “सारेकाही तुझ्याच इच्छेने घडू दे.” जेव्हा हे असे उत्स्फूर्त, संपूर्णपणे, समग्रपणे असते, तेव्हा तुम्ही प्रामाणिक असता.

– श्रीमाताजी [CWM 06 : 397-398]