Tag Archive for: प्रामाणिकपणा

(व्यक्ती बाह्य परिवर्तन [म्हणजे स्वत:च्या मन, प्राण व शरीरात परिवर्तन] करू इच्छित असेल तर, आंतरिक अनुभूती व साक्षात्कार या गोष्टींची त्यास मदत होते का? असा प्रश्न एका साधकाने विचारला आहे; त्याला श्रीमाताजींनी दिलेल्या उत्तरातील हा अंशभाग…)

आपल्यामध्ये परिवर्तन घडावे ही प्रामाणिक इच्छा जर व्यक्तीकडे असेल तर तिला आंतरिक अनुभूती व साक्षात्कार यापासून खूप साहाय्य मिळते; कारण त्यातून व्यक्तीला परिवर्तनासाठी आवश्यक असणारी शक्ती आणि परिवर्तनासाठी आवश्यक असणारा आधार मिळतो. मात्र परिवर्तन घडावे अशी खरी प्रामाणिक इच्छा त्या व्यक्तीकडे असली पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 04 : 349)

साधक : प्रामाणिक असणे आणि निष्ठावान असणे यामध्ये काही फरक आहे का?

श्रीमाताजी : हो, या दोन गोष्टी भिन्न आहेत. अर्थात, मला वाटतं की, प्रामाणिक नसताना निष्ठावान असणे आणि निष्ठावान नसताना प्रामाणिक असणे या दोन्ही गोष्टी अतिशय अवघड असतात. पण मला अशा काही व्यक्ती माहीत आहेत की, ज्या निष्ठावान होत्या पण त्यांच्याकडे प्रामाणिकपणाचा अभाव होता. याच्या उलट म्हणजे प्रामाणिक असूनही निष्ठा नसणे, हे मात्र फारसे दुर्मिळ नाही. एक गुण असेल तर पाठोपाठ दुसरा दुसरा येतोच असे नाही. पण हे उघड आहे की, सचोटी, ऋजुता, निष्ठा आणि प्रामाणिकपणा या गोष्टी एकमेकींशी घनिष्ठपणे संबंधित असतात.

साधक : एखाद्या गोष्टीशी वा व्यक्तीशी संबंधित असणारी निष्ठा ही सीमित भावना असते ना? यापेक्षा प्रामाणिकपणा अधिक व्यापक असतो ना?

श्रीमाताजी : हो, बरोबर आहे. निष्ठेमध्ये एक प्रकारच्या श्रेणीबद्ध संबंधाचा अंतर्भाव होतो, म्हणजे येथे कोणाशी तरी किंवा कोणत्यातरी वस्तुशी निष्ठा असते. त्यामध्ये एक प्रकारचे परस्परावलंबित्व असते. दिलेला शब्द पाळणे, स्वतःचे कर्तव्य अत्यंत काटेकोरपणे बजावणे म्हणजे निष्ठा, अशी सर्वसामान्य समजूत आहे. व्यक्ती अरण्यामध्ये एकटीच जीवन व्यतीत करत असेल तर ती परिपूर्ण प्रामाणिकपणाचे आचरण करू शकते, परंतु निष्ठेचे आचरण मात्र तुम्हाला सामाजिक जीवनातच करता येते, इतर लोकांशी संबंधित असतानाच करता येते. अर्थात, एखादी व्यक्ती ईश्वरी उपस्थितीप्रत आंतरिक श्रद्धायुक्त कृतीने पूर्णपणे समर्पित असेल तर ती त्या उपस्थितीशी एकनिष्ठ असू शकते.

– श्रीमाताजी (CWM 15 : 299-300)

साधेसरळ असणे (Straightforwardness) म्हणजे व्यक्तीने स्वतःशी व ईश्वराशी अगदी प्रामाणिकपणाने, सचोटीने वागणे आणि आचरणामध्ये कुटिलता न बाळगणे.

स्वतःची चूक ओळखण्याची (आणि ती मान्य करण्याची) इच्छा नसणे आणि अमुक एखादी गोष्ट चुकीची आहे असे श्रीमाताजींनी सांगूनदेखील, त्यांच्याशी प्रतिवाद करत, मीच कसा बरोबर आहे हे सिद्ध करण्याचा आटापिटा करणे म्हणजे स्व-समर्थन (Self-justification) करणे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 54)

नुसते बाहेरून चांगले ‘दिसण्यापेक्षा‌’ प्रत्यक्षात तसे ‘असणे‌’ अधिक बरे. आपला प्रामाणिकपणा जर परिपूर्ण असेल, तर आपण चांगले आहोत असे ‘दाखविण्याची’ गरज भासणार नाही. ‘परिपूर्ण प्रामाणिकपणा‌’ याचा आमचा अर्थ असा की, आपले सर्व विचार, भावना, संवेदना आणि कृती यांमधून अन्य काही नाही तर, आपल्या अस्तित्वाचे केंद्रवर्ती सत्‌‍-तत्त्व‌च (central Truth of our being) आविष्कृत झाले पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 12 : 268)

साधक : आध्यात्मिक जीवनासाठी स्वत:ला सज्ज करायचे तर त्यासाठी कोणत्या मूलभूत सद्गुणाची जोपासना केली पाहिजे?

श्रीमाताजी : वास्तविक मी ही गोष्ट अनेकदा सांगितली आहे, पण त्याबद्दल पुनश्च एकदा सांगण्याची ही संधी आहे. तो गुण आहे प्रामाणिकपणा (sincerity). हा प्रामाणिकपणा निरपेक्ष आणि परिपूर्ण असला पाहिजे, कारण प्रामाणिकपणा हेच अध्यात्म-मार्गावरील तुमचे एकमेव संरक्षण असते.

तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर अगदी पुढच्याच पावलावर तुम्ही पडणार व तुमचा कपाळमोक्ष होणार हे निश्चित. आपल्या सभोवार सर्व प्रकारच्या शक्ती, इच्छा, प्रभाव, जीव वावरत असतात आणि तुमच्या प्रामाणिकपणामध्ये एखादी तरी लहानशी फट आढळते का, याच्या ते शोधातच असतात आणि तशी फट दिसताच तिच्यामधून ते झपाट्याने तुमच्यामध्ये शिरकाव करतात आणि तुम्हाला गोंधळात टाकतात.

म्हणून, कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी, कोणत्याही गोष्टीला प्रारंभ करण्यापूर्वी, कोणतीही गोष्ट करून पाहताना सर्वप्रथम याची खात्री करून घ्या की, तुम्ही प्रामाणिक आहात ना? आणि एवढेच नव्हे तर, अधिकाधिक प्रामाणिक बनण्याचा तुम्ही प्रयत्न कराल ना? (तुम्हाला स्वत:बद्दल ही खात्री पटणे आवश्यक आहे.) कारण प्रामाणिकपणा हेच तुमचे एकमेव संरक्षण असते.

– श्रीमाताजी (CWM 08 : 247-248)

तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला आवश्यक गुण आहे विनम्रता!

*

खरी आणि प्रामाणिक विनम्रता हे आपले संरक्षक-कवच असते. अहंकार नाहीसा होणे आवश्यकच असते आणि तो नष्ट करण्याचा सर्वात खात्रीचा मार्ग म्हणजे विनम्रता.

*

विनम्रता आणि प्रामाणिकपणा या गोष्टी सर्वोत्तम संरक्षक-कवचाप्रमाणे असतात. त्यांच्याविना प्रत्येक पावलावर धोका असतो; आणि (साधकामध्ये) या गोष्टी असतील तर विजय निश्चित असतो.

– श्रीमाताजी (CWM 14 : 153)

अंतःकरणाच्या शुद्धीसाठी संपूर्ण प्रामाणिकपणा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. स्वत:च स्वत:ची फसवणूक करता कामा नये. ईश्वरा‌पासून, स्वतःपासून किंवा सद्गुरू‌पासून काहीही लपवून ठेवता कामा नये, स्वतःच्या वृत्ती-प्रवृत्तींचे थेट निरीक्षण केले पाहिजे आणि त्यांना सुयोग्य बनविण्यासाठीची साधीसरळ इच्छा बाळगली पाहिजे. या गोष्टींना वेळ लागला तरी काही हरकत नाही; पण ईश्वर‌प्राप्ती करून घेणे हेच आपले जीवित-कार्य आहे, असे मानण्याची तयारी व्यक्तीने ठेवली पाहिजे.

अंतःकरणाची शुद्धी ही एक बऱ्यापैकी लक्षणीय उपलब्धी आहे आणि म्हणूनच, बदलायला हव्यात अशा अजून काही गोष्टी व्यक्तीला स्वतःमध्ये आढळल्या तर त्यामुळे तिने निराश होण्याचे, हताश होण्याचे काहीच कारण नाही. व्यक्तीने जर योग्य इच्छा व योग्य दृष्टिकोन बाळगला तर, अंतःसूचना व अंतर्ज्ञान या गोष्टी वाढीस लागतील; त्या अधिक स्पष्ट, अधिक नेमक्या व अचूक बनतील आणि त्यांचे अनुसरण करण्याची ताकदसुद्धा वाढत राहील. आणि मग, तुम्ही स्वतःबाबत समाधानी होण्याआधी ईश्वरच तुमच्याबाबत समाधानी होईल. मानवता ज्या सर्वोच्च गोष्टीची आस बाळगू शकते ती गोष्ट (म्हणजे ईश्वर). मात्र साधक अपरिपक्व असताना जर ती गोष्ट त्याच्या हाती लागली तर, ती त्याच्यासाठी धोकादायक ठरू शकते; परंतु असे होऊ नये यासाठी साधक व ईश्वर यांच्यामध्ये जो एक पडदा असतो की, ज्या पडद्याद्वारे ईश्वर स्वतःचे व साधकांचे संरक्षण करत असतो, तो पडदा ईश्वर स्वतःहून हळूहळू दूर करू लागतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 43)

स्वत:चीच फसवणूक करणारा प्राणिक अहंकार, मानसिक उद्धटपणा, अहंगंड, पांडित्य-प्रदर्शन, शारीरिक अस्तित्वामध्ये असणारी तमोमय जडता या गोष्टींपासून सुटका करून घेण्यासाठी अस्तित्वाच्या सर्व अंगांमध्ये संपूर्ण केंद्रवर्ती प्रामाणिकपणा असणे ही एकच अट आहे. आणि त्याचाच अर्थ असा होतो की, ‘परमसत्या‌’चा निरपवाद आग्रह बाळगणे आणि त्याव्यतिरिक्त आता दुसरे काहीही नको असे वाटणे.

तसे झाले तर मग, व्यक्तीमध्ये मिथ्यत्वाचा शिरकाव झालाच तर लगेचच व्यक्तीला एक प्रकारची अस्वस्थता जाणवेल आणि अशा वेळी कोणतेही समर्थन न करता, स्वतःचे कठोर मूल्यमापन (self-criticism) करण्याची व्यक्तीची तयारी झालेली असेल. तिच्यामध्ये प्रकाशाप्रत सतर्क खुलेपणा येईल आणि सरतेशेवटी ही तयारी संपूर्ण अस्तित्वाचेच शुद्धिकरण घडवून आणेल.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 379)

माणसं नेहमीच जटिल असतात आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये गुण व दोष परस्परांमध्ये इतके मिसळलेले असतात की, ते वेगळे करता येणे जवळजवळ अशक्य असते. एखादी व्यक्ती जे बनू इच्छिते किंवा इतरांच्या मनात आपल्याविषयी जी प्रतिमा असावी असे तिला वाटते त्यापेक्षा, ती व्यक्ती वास्तवात पूर्णपणे वेगळी असू शकते. किंवा कधीकधी तिच्या स्वभावाची एक (उजळ) बाजू दिसते, तर कधी तिच्या स्वभावाची दुसरीच (अंधारी) बाजू व्यक्त होते किंवा व्यक्ती काही जणांशी जशी वागते त्यापेक्षा अगदी भिन्नपणे ती इतरांशी वागू शकते.

मानवी प्रकृतीच्या दृष्टीने पाहता, पूर्णपणे प्रामाणिक असणे, सरळमार्गी असणे, खुले असणे ही काही साधीसोपी उपलब्धी नाही. केवळ आध्यात्मिक प्रयत्नांनीच ही गोष्ट साध्य होऊ शकते. त्यासाठी व्यक्तीमध्ये स्वतःकडे कठोरपणे पाहण्याची एक आत्मपरीक्षणात्मक दृष्टी असणे आवश्यक असते. तिच्यामध्ये आत्मनिरीक्षणाची स्वसमर्थन न करणारी चिकित्सा आवश्यक असते. आणि बरेचदा भल्या भल्या साधकांकडे किंवा योग्यांकडेदेखील ही क्षमता नसते. केवळ प्रकाशमान अशा ईश्वरी कृपेमुळेच साधकाला स्वतःचा शोध लागतो आणि त्याच्यामध्ये ज्या कमतरता असतात, त्या भरून काढून, त्यांचे रूपांतरण घडविण्याची क्षमता केवळ त्या ईश्वरी कृपेमध्येच असते. (आणि हे सुद्धा केव्हा शक्य होते?) तर, साधक जेव्हा ईश्वरी कार्यासाठी स्वतःला समर्पित करतो आणि तसे करण्यास तो सहमती दर्शवितो तेव्हाच हे घडून येते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 51)

प्रामाणिक अभीप्सेचा परिणाम होतोच होतो; तुम्ही जर प्रामाणिक असाल तर तुम्ही दिव्य जीवनामध्ये उन्नत होता.

पूर्णपणे प्रामाणिक असणे म्हणजे, फक्त आणि फक्त दिव्य सत्याचीच आस बाळगणे; दिव्य मातेप्रत स्वतःला अधिकाधिक समर्पित करणे; या एकमेव अभीप्सेव्यतिरिक्त असणाऱ्या सर्व वैयक्तिक मागण्या व वासना यांना नकार देणे; जीवनातील प्रत्येक कृती ईश्वरालाच समर्पण करणे आणि हे कार्य ईश्वराने नेमून दिलेले आहे हे जाणून, त्याच्या आड कोणताही अहंकार येऊ न देता, ते कार्य करणे. हाच दिव्य जीवनाचा पाया आहे.

व्यक्तीमध्ये एकदम, एकाएकी असा बदल घडून येऊ शकत नाही. पण जर व्यक्ती सातत्याने तशी अभीप्सा बाळगेल आणि ईश्वरी शक्तीने साहाय्य करावे म्हणून त्या शक्तीचा अगदी अंतःकरणपूर्वक आणि साध्यासरळ, प्रामाणिक इच्छेने नेहमी धावा करत राहील तर, व्यक्ती या चेतनेमध्ये अधिकाधिक उन्नत होत राहते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 51)