Tag Archive for: पूर्णयोग

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१०)

केवळ ‘अतिमानव’ बनण्याच्या कल्पनेने या ‘योगा’कडे (पूर्णयोगाकडे) वळणे ही प्राणिक अहंकाराची एक कृती ठरेल आणि ती या योगाचे मूळ उद्दिष्टच निष्फळ करेल. जे कोणी त्यांच्या सर्व जीवनव्यवहारामध्ये असे उद्दिष्ट ठेवतात त्यांना निरपवादपणे आध्यात्मिक आणि अन्य प्रकारची दुःखं सहन करावी लागतात. प्रथम विभक्तकारी अहंकार (separative ego) दिव्य चेतनेमध्ये विलीन करून, त्याद्वारे दिव्य चेतनेमध्ये प्रवेश करणे आणि दुसरे म्हणजे, मन, प्राण आणि शरीर यांचे रूपांतरण करण्यासाठी अतिमानसिक चेतना या पृथ्वीवर अवतरित करणे हे या ‘योगा’चे ध्येय आहे. (अहंकार दिव्य चेतनेमध्ये विलीन करत असताना, त्या अनुषंगाने, व्यक्तीला स्वतःच्या खऱ्या जीवात्म्याचा (individual self) शोध लागतो; हा जीवात्मा म्हणजे मर्यादित, व्यर्थ आणि स्वार्थी मानवी अहंकार नसतो तर तो ‘ईश्वरा’चा अंश असतो.) बाकी सर्व गोष्टी म्हणजे या दोन ध्येयांचे परिणाम असू शकतात, परंतु त्या या ‘योगा’चे प्राथमिक उद्दिष्ट असू शकत नाहीत.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 21)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०९)

‘ईश्वरी उपस्थिती’ आणि ‘दिव्य चेतने’मध्ये प्रवेश करणे आणि त्याने परिव्याप्त होणे हे या योगाचे (पूर्णयोगाचे) उद्दिष्ट आहे; ‘ईश्वरा’वर केवळ ‘ईश्वरा’साठीच प्रेम करणे, आपली प्रकृती ही ‘ईश्वरा’च्या प्रकृतीशी मिळतीजुळती करणे, मेळविणे आणि आपली इच्छा, आपली कर्मे, आपले जीवन हे सारे ‘ईश्वरा’चे साधन बनवणे हे या योगाचे उद्दिष्ट आहे. महान योगी बनणे किंवा अतिमानव (Superman) बनणे (काळाच्या ओघात तसे घडेलही) किंवा अहंकाराच्या शक्तीसाठी, अभिमानासाठी किंवा सुखासाठी ‘ईश्वरा’ला आपलेसे करणे, हे काही या योगाचे उद्दिष्ट नाही. या योगाद्वारे मुक्ती मिळत असली तरीही हा योग ‘मोक्षा’साठी नाही, किंवा यामधून इतरही साऱ्या गोष्टी साध्य होत असल्या तरीपण, त्या गोष्टी हे आपले उद्दिष्ट असता कामा नये. एकमेव ‘ईश्वर’ हेच आपले उद्दिष्ट आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 21)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०८)

(१९३७ च्या सुमारास एक साधक पूर्णयोगाची साधना अंगीकारु इच्छित होता, त्यासाठी तो आश्रमात राहू इच्छित होता. श्रीअरविंद यांनी आपल्या बुद्धीच्या आधारे स्वत:चे आध्यात्मिकीकरण करून घेतले आहे तसेच त्यांनी बुद्धिपूर्वक स्वत:चे दिव्यत्वात रुपांतर करून घेतले आहे, असे त्याचे म्हणणे होते. या विचाराने भारावलेला तो साधक ‘पूर्णयोगा’कडे वळू इच्छित होता. श्रीअरविंद यांनी त्याला त्याच्या इच्छेनुसार तीन महिने आश्रमात राहण्याची परवानगी एका पत्राद्वारे कळवली. मात्र त्याच पत्रात त्यांनी त्याला त्याच्या वरील विचारातील फोलपण दाखवून दिले. बुद्धीच्या आधारे नव्हे, तर तिच्या अतीत होऊन, मनाच्या पूर्ण शांत, निर्विचार अवस्थेत उच्चतर चेतनेचे अवतरण झाले आणि माझे आध्यात्मिकीकरण झाले, असे त्यांनी त्याला लिहिले आहे. त्या साधकाच्या निमित्ताने, ‘पूर्णयोगा’ची साधना कोण करू शकतो यावर श्रीअरविंद यांनी प्रकाश टाकला आहे. त्या पत्रातील हा अंशभाग…)

….मानवी प्रकृती आज जशी आहे तशा त्या प्रकृतीचे पूर्णत्व हे या योगाचे (पूर्णयोगाचे) तत्त्व नाही, तर व्यक्तीच्या सर्व घटकांचे आंतरिक चेतनेच्या कार्याच्या माध्यमातून, आणि नंतर त्या घटकांवर कार्य करणाऱ्या उच्चतर चेतनेच्या कार्याच्या माध्यमातून, आंतरात्मिक आणि आध्यात्मिक रूपांतरण (psychic and spiritual transformation) करणे, त्या घटकांच्या साऱ्या जुन्या गतिविधी टाकून देणे किंवा त्यांचे त्या उच्चतर चेतनेने जणू स्वतःचीच प्रतिमा असावी अशा पद्धतीने परिवर्तन घडविणे आणि अशा प्रकारे कनिष्ठ प्रकृतीचे उच्चतर प्रकृतीमध्ये रूपांतरण करणे, हे या योगाचे (पूर्णयोगाचे) तत्त्व आहे.

….ही सावकाश चालणारी आणि अवघड प्रक्रिया आहे; मार्ग लांबचा आहे आणि अगदी आवश्यक अशा पायाभूत गोष्टी सुस्थिर करणे हे सुद्धा खूप कठीण आहे. विद्यमान असलेली जुनी प्रकृती विरोध करत राहते आणि अडथळे निर्माण करत राहते आणि एका पाठोपाठ एक अडचणी येत राहतात आणि त्यांच्यावर मात केली जात नाही तोवर त्या पुन्हापुन्हा येत राहतात. आणि म्हणूनच, (पूर्णयोगाच्या) या मार्गावरून वाटचाल करण्याचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी, व्यक्तीने खात्री करून घेतली पाहिजे की, आपल्याला ज्या मार्गाची हाक आली आहे तो मार्ग हाच आहे का?

– श्रीअरविंद (CWSA 35 : 585-586)

विचारशलाका २५

 

पूर्णयोगामध्ये चक्रं ही संकल्पपूर्वक, प्रयत्नपूर्वक खुली केली जात नाहीत, तर ‘शक्ती’च्या अवतरणामुळे ती आपलीआपणच स्वत:हून खुली होतात. तांत्रिक साधनेमध्ये ती खालून वर, ऊर्ध्वगामी दिशेने खुली होत जातात, म्हणजे मूलाधार चक्र प्रथम खुले होते तर आपल्या पूर्णयोगामध्ये, चक्रं वरून खाली खुली होत जातात. तरीसुद्धा मूलाधारातून शक्तीचे आरोहण घडून येतेच.

*

‘पूर्णयोगा’मध्ये मज्जारज्जूमध्ये (कुंडलिनीच्या) प्रवाहाची कधीतरी जाणीव होते, जशी ती इतर नाडी-प्रवाहमार्गांमध्ये किंवा शरीराच्या विविध भागांमध्येही होते. परंतु ‘पूर्णयोगा’मध्ये बलपूर्वक किंवा हटातटाने कुंडलिनी जागृती केली जात नाही. या योगामध्ये, उच्च स्तरीय आध्यात्मिक चेतनेला जाऊन मिळण्यासाठी, कनिष्ठ चक्रांमधून चेतना शांतपणे वर चढत जाते आणि ‘ईश्वरी शक्ती’चे वरून अवतरण होते आणि ती ‘ईश्वरी शक्ती’ मन आणि शरीरावर तिचे कार्य करते. त्या कार्याची पद्धत व त्याच्या पायऱ्या प्रत्येक साधकामध्ये वेगवेगळ्या असतात. ‘दिव्य माते’वर पूर्ण ‘विश्वास’ आणि येणाऱ्या सर्व चुकीच्या सूचनांना व प्रभावांना दूर सारण्यासाठी आवश्यक असणारी ‘सतर्कता’ या गोष्टी म्हणजे ‘पूर्णयोगा’चा मुख्य नियम आहे.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 460, 462]

विचारशलाका ०८

‘ईश्वरी प्रभावा’प्रत स्वत:ला खुले करणे, उन्मुख करणे हे ‘पूर्णयोगा’चे समग्रतत्त्व आहे. हा प्रभाव तुमच्या उर्ध्वस्थित असतो आणि तुम्ही जर त्याबाबत सचेत झालात तर, त्याने तुमच्यामध्ये प्रवेश करावा म्हणून तुम्ही त्यास आवाहन करायचे असते. तो ईश्वरी प्रभाव तुमच्या मनामध्ये, शरीरामध्ये ‘शांती’च्या रूपाने, ‘प्रकाशा’च्या रूपाने, कार्यकारी ‘शक्ती’च्या रूपाने अवतरतो; ‘आनंद’रूपाने अवतरतो; तो साकार किंवा निराकार रूपातील ‘ईश्वरी उपस्थिती’ म्हणून अवतरतो.

व्यक्तीला जोपर्यंत ही चेतना लाभत नाही तोपर्यंत तिने श्रद्धा बाळगली पाहिजे आणि खुलेपणासाठी आस बाळगली पाहिजे. अभीप्सा, आवाहन, प्रार्थना या सगळ्या गोष्टी म्हणजे एकाचीच विविध रूपे असतात आणि या साऱ्याच गोष्टी सारख्याच प्रभावी असतात. यांपैकी, तुमच्यापाशी जी कोणती गोष्ट येते किंवा जी तुम्हाला अगदी सहजसोपी, स्वाभाविक वाटते ती गोष्ट तुम्ही अवलंबावी.

दुसरा मार्ग एकाग्रतेचा. तुम्ही तुमची चेतना तुमच्या हृदयामध्ये एकाग्र करायची (काहीजण मस्तकामध्ये वा मस्तकाच्या वर एकाग्र करतात.) आणि अंत:करणामध्ये श्रीमाताजींचे ध्यान करायचे आणि तेथे त्यांना आवाहन करायचे. व्यक्ती यांपैकी कोणतीही गोष्ट करू शकते किंवा वेगवेगळ्या वेळी (आलटून-पालटून) या दोन्ही गोष्टी करू शकते – जी गोष्ट तुम्हाला सहजस्वाभाविक वाटेल किंवा ज्या क्षणी तुम्ही जी गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त व्हाल ती गोष्ट तुम्ही करावी.

विशेषत: सुरुवातीला एक गोष्ट आत्यंतिक निकडीची असते ती म्हणजे, मन निश्चल करायचे आणि ध्यानाच्या वेळी, साधनाबाह्य असे सारे विचार, स्पंदने हद्दपार करायची. अशा शांत मनामध्ये, अनुभूती येण्यासाठीची प्रगतीशील तयारी चालू होते. परंतु हे सारे जरी एकदम जमले नाही तरी त्यामुळे तुम्ही अधीर, अस्वस्थ होता कामा नये. कारण मनामध्ये संपूर्ण निश्चलता येण्यासाठी पुष्कळ काळ लागतो; तुमच्या चेतनेची तयारी होईपर्यंत तुम्हाला वाटचाल करत राहावी लागते.

श्रीअरविंद [CWSA 29 : 106]

आध्यात्मिकता ४८

माणसं बाह्य गोष्टींमध्येच गुंतलेली असतात. म्हणजे असे की, त्यांची चेतना, अधिक गहन सत्य, ईश्वयरी ‘उपस्थिती’ यांच्या शोधासाठी अंतर्मुख होण्याऐवजी, बाह्य गोष्टींकडेच वळलेली असते – म्हणजे व्यक्ती जीवनात ज्या गोष्टी बघते, जाणते, करते त्या गोष्टींकडेच तिची चेतना वळलेली असते. तुम्ही जे काही करत असता त्यामध्ये व्यग्र असता, तुमच्या अवतीभोवती वावरणाऱ्या माणसांमध्ये, तुम्ही ज्या वस्तू वापरता त्या वस्तुंमध्ये, त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये, म्हणजे झोपणे, खाणे, गप्पा मारणे, थोडेसे काम, थोडीशी मौजमजा यांमध्ये व्यग्र असता आणि मग पुन्हा एकदा तीच सुरुवात होते – परत झोपणे, खाणे इ. इ. आणि पुन्हा तेच चालू राहते. आणि मग, हा काय म्हणाला, तो काय म्हणाला, त्याने काय केले पाहिजे, मी बरी आहे ना, माझी तब्येत चांगली आहे ना, इ. इ. अशा गोष्टींचा व्यक्ती सहसा विचार करत असते.

या साऱ्या गोष्टी मागे सोडून द्यायच्या आणि चेतनेसमोर व चेतनेत फक्त एकच गोष्ट येऊ द्यायची आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या अस्तित्वाच्या आणि जीवनाच्या मूळ हेतुचा शोध घेणे, आपण कोण आहोत, आपण का जगतो, या साऱ्याच्या मागे काय आहे याचा शोध घ्यायचा. ही पहिली पायरी असते आणि ती काही इतकी सोपी नसते. प्रत्यक्षात काय आविष्कृत झाले आहे यापेक्षा, त्यामागील कारणामध्ये आणि त्याच्या ध्येयामध्ये असणारे स्वारस्य ही पहिली पायरी असते. म्हणजे, वरकरणी आणि बाह्यवर्ती गोष्टींशी असणाऱ्या पूर्ण तादात्म्यापासून स्वतःची चेतना काढून घेऊन ती आत वळविणे आणि आपल्याला ज्याचा शोध घ्यायचा आहे, जे ‘सत्य’ आपण शोधू पाहत आहोत त्यावर एक प्रकारची आंतरिक एकाग्रता करणे, ही असते पहिली प्रक्रिया.

आणि म्हणून, व्यक्तीने प्रथम स्वत:चा आत्मा आणि त्यावर स्वामित्व असणाऱ्या ईश्वराचा केवळ शोधच घेतला पाहिजे असे नाही तर, व्यक्ती त्याच्याशी तादात्म्य पावली पाहिजे. त्यानंतर मग ती व्यक्ती पुन्हा एकदा बाह्यवर्ती गोष्टींकडे वळण्यास आणि त्यांचे रुपांतर करण्यास आरंभ करू शकते. कारण तेव्हाच त्या गोष्टींना कोणत्या दिशेला वळवायचे आणि त्यांचे रुपांतर कशात करायचे याची व्यक्तीला जाण येते. ही पायरी सोडून एकदम पुढे उडी मारता येत नाही. आपण आधी स्वतःचा आत्मा शोधला पाहिजे, आणि त्याच्याशी एकत्व पावले पाहिजे ही अगदी अपरिहार्य गोष्ट आहे. आणि नंतर मग आपण रूपांतराकडे वळू शकतो.

श्रीअरविंदांनी एके ठिकाणी लिहिले आहे की, “जिथे इतरांच्या योगाची परिसमाप्ती होते तेथे आमच्या योगाचा (पूर्णयोगाचा) प्रारंभ होतो.” सहसा योग हा आत्म्याशी होणाऱ्या सायुज्याप्रत, ईश्वणराशी होणाऱ्या एकत्वाप्रत घेऊन जातो; खरं तर म्हणूनच त्याला ‘योग’ असे म्हणतात. आणि जेव्हा लोकं हे साध्य करतात तेव्हा त्यांच्या दृष्टीने ते मार्गाच्या अखेरीस येऊन पोहोचलेले असतात आणि त्यावरच ते समाधानी असतात. परंतु येथे श्रीअरविंदांनी असे लिहिले आहे की, “जेव्हा इतरांच्या दृष्टीने मार्ग पूर्णत्वाला पोहोचलेला असतो तेव्हा आपला मार्ग सुरू होतो.” तुम्हाला आता ईश्वूराचा शोध लागलेला असतो पण निरुपयोगी झालेल्या देहामधून ईश्वराने तुम्हाला बाहेर काढावे म्हणून वाट पाहत ध्यानाला बसून राहण्याऐवजी, उलट, आता या चेतनेनिशी तुम्ही तुमच्या शरीराकडे, जीवनाकडे वळता आणि रूपांतरणाच्या कार्याला सुरुवात करता, की जे अत्यंत कठीण परिश्रमाचे काम असते. इथेच श्रीअरविंदांनी या कार्याची तुलना, निबिड अरण्यामधून स्वतःचा मार्ग स्वतःच शोधत जाण्याशी केली आहे. कारण अशा प्रकारचे कार्य याआधी इतर कोणीही केलेले नाही, अशावेळी, म्हणजे आजवर ज्या मार्गाने कोणीच वाटचाल केलेली नाही, तो मार्ग प्रत्येकाने स्वतःचा स्वतःच तयार करणे आवश्यक असते.

– श्रीमाताजी [CWM 07 : 349-351]

‘पूर्णयोग’ म्हणजे भौतिक जीवनापासून पलायन नव्हे, की जे त्याला त्याच्या नशिबावर अपरिवर्तनीय रुपात, आहे तसेच सोडून देते; किंवा कोणत्याही निर्णायक बदलाची आशासुद्धा न बाळगता, भौतिक जीवनाचा ते जसे आहे तसाच स्वीकार करणे म्हणजेही ‘पूर्णयोग’ नव्हे, किंवा विश्व हे ‘ईश्वरी इच्छे’चे अंतिम आविष्करण आहे असे मानून, विश्वाचा स्वीकार करणे म्हणजेही ‘पूर्णयोग’ नव्हे.

सामान्य मानसिक चेतनेपासून, अतिमानसिक आणि दिव्य चेतनेपर्यंत असणाऱ्या चेतनेच्या सर्व श्रेणी चढत जाणे आणि जेव्हा हे आरोहण पूर्णत्वाला पोहोचेल तेव्हा या भौतिक विश्वामध्ये पुन्हा परत येणे आणि – पृथ्वी क्रमश: ईश्वरीय आणि अतिमानसिक विश्वामध्ये परिवर्तित व्हावी या हेतुने – प्राप्त करून घेतलेल्या त्या अतिमानसिक शक्तीनिशी व चेतनेनिशी, हे भौतिक विश्व प्रेरित करणे हे ‘पूर्णयोगा’चे उद्दिष्ट आहे.

 

– श्रीमाताजी
(CWM 12 : 98-99)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

आमच्या auromarathi.org या वेबसाईटला आणि AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.

प्रकृतीमध्ये पाषाणातून वनस्पतीकडे, वनस्पतीकडून प्राण्याकडे, प्राण्याकडून मानवाकडे, अशाप्रकारे आरोहण करणारा क्रमविकास आहे. आजवर ज्ञात असलेल्या या विकासक्रमानुसार, सध्यातरी मानव हा सर्वात वरच्या पायरीवर आहे असे दिसून येते. अर्थातच, त्यामुळे आपण या विश्वातील विकासाचा अंतिम टप्पा असून, आपल्यापेक्षा उच्चतर असे या पृथ्वीतलावर काहीही असणे शक्य नाही, असा मनुष्याचा समज झाला आहे. आणि हाच त्याचा फार मोठा गैरसमज आहे. त्याच्या शारीरिक प्रकृतीच्या (physical nature) दृष्टीने तो आजही जवळजवळ पूर्णपणे प्राणीच आहे; विचार करणारा आणि बोलणारा प्राणी आहे इतकेच. मात्र त्याच्या शारीरिक सवयी आणि सहज स्वाभाविक प्रवृत्ती पाहता तो अजूनही प्राणिदशेतच आहे. अर्थातच अशा अपूर्ण निर्मितीत प्रकृती संतुष्ट असू शकत नाही हे निश्चित.

प्रकृती एक नवीन प्रजाती बनविण्याच्या प्रयत्नांत आहे. प्राण्याच्या दृष्टीने जसा मानव, त्याप्रमाणे मानवाच्या दृष्टीने ती प्रजाती असेल. ती प्रजाती बाह्य आकाराने मानवसदृशच असेल; तरीपण तिची चेतना मनाहून कितीतरी उच्च स्तरावरची असेल आणि ती प्रजाती अज्ञानाच्या दास्यत्वातून पूर्णपणे मुक्त झालेली असेल. मनुष्याला हे सत्य अवगत करून देण्यासाठी श्रीअरविंद या पृथ्वीतलावर आले. मानसिक चेतनेमध्ये जगणारा मनुष्य हा केवळ एक संक्रमणशील जीव आहे; परंतु एक नवी चेतना, ‘सत्य-चेतना’ प्राप्त करून घेण्याची क्षमता असणारा आणि एक पूर्णतया सुसंवादपूर्ण, कल्याणकारी, सुंदर, आनंदी आणि पूर्ण जाणीवयुक्त जीवन जगण्याची क्षमता असणारा असा तो जीव आहे, असे त्यांनी सांगितले आहे. ही चेतना, जिला त्यांनी ‘अतिमानस’ (Supermind) असे संबोधले आहे, ती चेतना स्वत:मध्ये (पृथ्वीकरिता) प्रस्थापित करण्यासाठी, आणि त्यांच्या भोवती जमलेल्या साधकांना देखील त्या चेतनेची अनुभूती यावी म्हणून साहाय्य करण्यासाठी, श्रीअरविंदांनी या पृथ्वीतलावर त्यांचा संपूर्ण आयुष्यभराचा वेळ देऊ केला.

– श्रीमाताजी [CWM 12 : 116]

‘कर्म’ आणि ‘साधना’ यांमध्ये विरोध नसतो. योग्य वृत्तीने केलेले कर्म हीच स्वयमेव साधना असते. ध्यान हाच काही साधनेचा एकमेव मार्ग नाही. कर्म हाही एक मार्ग आहे; प्रेम, भक्ती आणि समर्पण हेही साधनेचे इतर मार्ग आहेत.

*

रूपांतरणाच्या प्रक्रियेत बाह्य चेतनेचा समावेश हा ‘पूर्णयोगा’मध्ये आत्यंतिक महत्त्वाचा असतो. ध्यानामुळे हे शक्य होत नाही. कारण ध्यानाचा संबंध हा केवळ आंतरिक अस्तित्वाशी असतो. त्यामुळे ‘कर्म’ हे येथे मूलभूत महत्त्वाचे ठरते. मात्र ते योग्य चेतनेमध्ये आणि योग्य वृत्तीने केले पाहिजे आणि तसे जर ते केले गेले तर, कोणत्याही ध्यानाने जो परिणाम साध्य होतो तोच परिणाम अशा कर्मानेही साध्य होतो.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 209, 221]

जीवन आणि त्यातील अडचणींना धीराने आणि खंबीरपणे तोंड देण्याचे धैर्य ज्याच्याकडे नाही, अशा व्यक्तीला साधनेमधील त्याहून खडतर अशा आंतरिक अडचणींमधून पार होणे शक्य होणार नाही. जीवन आणि त्याच्या अग्नीपरीक्षा यांना शांत मनाने, अत्यंत धैर्याने आणि ‘ईश्वरी शक्ती’वरील संपूर्ण विश्वासाने सामोरे जाता आले पाहिजे, हाच ‘पूर्णयोगा’मधील पहिला धडा आहे.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 111]