Tag Archive for: पूर्णयोग

साधना, योग आणि रूपांतरण – ४१

(ध्यानाची उद्दिष्टे काय असतात किंवा काय असावीत यासंबंधीचा विचार आपण येथे समजावून घेत आहोत. त्याचा हा उत्तरार्ध…)

‘योगा’मध्ये एकाग्रतेचा उपयोग अन्य उद्दिष्टासाठीदेखील केला जातो. उदा. आपल्या जाग्रत स्थितीपासून (waking state) म्हणजे चेतनेची जी सीमित आणि पृष्ठवर्ती अवस्था असते त्यापासून निवृत्त होऊन, आपल्या अस्तित्वाच्या अंतरंगामध्ये खोलवर जाण्यासाठीदेखील (‘समाधी’च्या विविध अवस्थांद्वारे ही खोली मोजली जाते) एकाग्रतेचा अवलंब केला जातो. या प्रक्रियेसाठी, विचारमालिकेवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा (ध्यानापेक्षा), कोणत्यातरी एकाच वस्तुवर, संकल्पनेवर किंवा नामावर लक्ष केंद्रित करणे (निदिध्यास) अधिक परिणामकारक असते.

असे असले तरी, ध्यानामुळे ‘पूर्णयोगां’तर्गत अभिप्रेत असलेल्या समाधीची पूर्वतयारी होते. असे ध्यान आपले आपल्या अस्तित्वाच्या खोलवर असणाऱ्या अवस्थांशी अप्रत्यक्षपणे पण जाग्रत सायुज्य (communion) निर्माण करते. काहीही असले तरी, जो विचार ‘पुरुषा’च्या नियंत्रणाखाली (सांख्य तत्त्वज्ञानातील पुरुष) आणला गेला आहे अशा रचनात्मक विचाराची तेजस्वी कृती हा ध्यानाचा वैशिष्ट्यपूर्ण उपयोग असतो. त्याद्वारे उर्वरित सर्व चेतना नियंत्रित केली जाते, ती उच्चतर आणि विशालतर संकल्पनांनी परिपोषित केली जाते आणि त्या संकल्पनांच्या साच्यामध्ये चेतनेचे त्वरेने परिवर्तन केले जाते आणि अशा प्रकारे चेतना पूर्णत्वाला नेली जाते.

ध्यानाचे इतर आणि महत्तर उपयोग याच्याही पलीकडचे असतात पण ते आत्मविकसनाच्या पुढील टप्प्यांशी संबंधित असतात. ‘भक्तियोगा’मध्ये, या दोन्ही प्रक्रिया (ध्यान आणि निदिध्यासन) समग्र अस्तित्व एकाग्र करण्यासाठी, समानतेने उपयोगात आणल्या जातात. किंवा भक्तीविषयाच्या (आराध्य देवतेच्या) चिंतनाने, त्याच्या रूपाने, त्याच्या सत्त्वाने, त्याच्या गुणवैशिष्ट्यांनी आणि त्याच्याबद्दलच्या भक्तिभावाच्या व ऐक्याच्या आनंदाने समग्र प्रकृती न्हाऊन निघावी यासाठी या दोन्ही प्रक्रिया समानतेने उपयोगात आणल्या जातात. तेव्हा विचार हा ‘दिव्य प्रेमा’चा सेवक, ‘कैवल्य-आनंदा’ची तयारी करून घेणारा असा घडविला जातो.

‘ज्ञानयोगा’मध्येदेखील ध्यानाचा उपयोग, वरकरणी दिसणारे रूप आणि सत्य यांमध्ये, तसेच आत्मा आणि त्याची विविध रूपे यांमध्ये सदसद्विवेक करण्यासाठी केला जातो. व्यक्तिगत चेतनेचा ‘ब्रह्मन्’मध्ये प्रवेश व्हावा आणि नंतर सायुज्य घडावे यासाठी एकाग्र निदिध्यासनाचा अवलंब केला जातो. ‘पूर्णयोगा’मध्ये या सर्वच उद्दिष्टांचा सुमेळ साधला जाईल.

– श्रीअरविंद (CWSA 13 : 446-447)

साधना, योग आणि रूपांतरण – २८

सर्वसाधारणपणे (व्यक्तीमधील) चेतना ही सर्वत्र पसरलेली, विखुरलेली असते. ती या किंवा त्या दिशेने, या किंवा त्या वस्तुंच्या वा विषयांच्या मागे बारा वाटांनी धावत असते. जेव्हा एखादी शाश्वत स्वरूपाची गोष्ट करायची असते तेव्हा व्यक्ती प्रथम कोणती गोष्ट करत असेल तर ती म्हणजे – ही सर्वत्र विखुरलेली चेतना अंतरंगामध्ये ओढून घेते आणि एकाग्रता करते. त्यानंतर मग, जर व्यक्ती अधिक बारकाईने निरीक्षण करू लागली तर तिला असे आढळते की तिचे लक्ष एका जागी आणि कोणत्या तरी एका मनोव्यापारावर, एका विषयावर किंवा एखाद्या वस्तुवर केंद्रित झाले आहे – तुम्ही काव्यरचना करत असता किंवा एखादा वनस्पतीशास्त्रज्ञ फुलाचा अभ्यास करत असतो तसेच असते हे. जर तो विचार असेल तर व्यक्तीचे लक्ष तिच्या मेंदूमध्ये कोठेतरी एखाद्या जागी केंद्रित झालेले असते. आणि जर ती भावना असेल तर व्यक्तीचे लक्ष हृदयामध्ये केंद्रित झालेले असते.

योगमार्गातील एकाग्रता (concentration) म्हणजे याच गोष्टीचे विस्तारित आणि घनीभूत रूप असते. त्राटक करताना, व्यक्ती एखाद्या तेजस्वी बिंदुवर लक्ष केंद्रित करते त्याप्रमाणे एखाद्या वस्तुवर एकाग्रता केली जाऊ शकते. तेव्हा व्यक्तीला त्या बिंदुवर, त्या वस्तुवर अशा रीतीने लक्ष केंद्रित करावे लागते की व्यक्तीला फक्त तो बिंदूच दिसतो आणि त्या व्यतिरिक्त अन्य कोणताही विचार तिच्या मनात नसतो. व्यक्ती एखाद्या संकल्पनेवर, एखाद्या शब्दावर किंवा एखाद्या नामावर, (म्हणजे उदाहरणार्थ) ईश्वराच्या संकल्पनेवर, ॐ या शब्दावर किंवा कृष्णाच्या नामावर किंवा संकल्पना व शब्द किंवा संकल्पना व नाम यांच्यावर एकत्रितपणे लक्ष केंद्रित करू शकते. परंतु पुढे व्यक्ती योगामध्ये (भ्रूमध्यासारख्या) एका विशिष्ट स्थानीसुद्धा लक्ष केंद्रित करू शकते.

भ्रूमध्यामध्ये लक्ष केंद्रित करण्याची एक प्रसिद्ध पद्धत आहे. भ्रूमध्य हे आंतरिक मनाचे, गूढ दृष्टीचे आणि संकल्पाचे केंद्र असते. तेथून तुम्ही तुमच्या एकाग्रतेचा जो विषय असतो त्याचा दृढपणे विचार केला पाहिजे किंवा त्या केंद्राच्या ठिकाणी त्या एकाग्रतेचा विषयाची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही जर असे करण्यात यशस्वी झालात तर, काही काळानंतर, तुमची समग्र चेतना त्या स्थानी (अर्थात काही काळासाठी) एकवटली असल्याचे तुम्हाला जाणवेल. काही काळ आणि पुन्हापुन्हा तसे करत राहिल्याने ही प्रक्रिया सहज सुलभ बनते.

पूर्णयोगामध्ये आपण तेच करतो पण त्यामध्ये भ्रूमध्यामधल्या एका विशिष्ट बिंदुवरच लक्ष एकाग्र करावे लागते असे नाही, तर मस्तकामध्ये कोठेही तुम्ही लक्ष एकाग्र करू शकता किंवा शरीर-विज्ञान शास्त्रज्ञांनी जेथे हृदयकेंद्राचे स्थान निश्चित केले आहे तेथे म्हणजे छातीच्या मध्यभागी लक्ष एकाग्र केले जाते.

एखाद्या वस्तुवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, तुम्ही एखादा संकल्प करून मस्तकामध्ये लक्ष एकाग्र करू शकता; वरून तुमच्यामध्ये शांती अवतरित व्हावी म्हणून तिला आवाहन करू शकता किंवा काहीजण करतात त्याप्रमाणे, अदृष्ट (unseen) झाकण उघडावे (अपरा प्रकृती आणि परा प्रकृती यांच्यामध्ये असणारे झाकण, जे आपल्या टाळूच्या ठिकाणी असते.) आणि तेथून त्याच्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या चेतनेप्रत आरोहण करता यावे यासाठी तुम्ही लक्ष एकाग्र करू शकता. हृदयकेंद्रामध्ये तुम्ही (‘ईश्वरी शक्ती’प्रत) खुले होण्यासाठी एक अभीप्सा बाळगून, किंवा तेथे ‘ईश्वरा’ची चैतन्यमय प्रतिमा दिसावी किंवा ‘ईश्वरी’ उपस्थितीची जाणीव व्हावी यासाठी किंवा अन्य कोणत्या एखाद्या उद्दिष्टासाठी लक्ष एकाग्र करू शकता. तेथे तुम्ही नामजप करू शकता, पण तसे असेल तर, तेथे तुम्ही त्या नामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि हृदयकेंद्रामध्ये ते नाम आपोआप चालू राहिले पाहिजे.

तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की, जेव्हा असे एखाद्या विशिष्ट स्थानी लक्ष एकाग्र झालेले असते तेव्हा उर्वरित चेतनेचे काय होते? अशा वेळी, एकतर ती चेतना, इतर एकाग्रतेच्या वेळी जशी शांत होते तशी, ती शांत होऊन जाते किंवा तसे झाले नाही तर, विचार किंवा अन्य गोष्टी जणूकाही (तुमच्या) बाहेर असाव्यात त्याप्रमाणे इतस्ततः हालचाल करत राहतात पण एकाग्र झालेला भाग त्यांच्याकडे लक्ष देत नाही किंवा त्याने विचलितही होत नाही. अशावेळी एकाग्रता बऱ्यापैकी यशस्वी झालेली असते.

परंतु तुम्हाला जर अशा प्रकारे एकाग्रतेची, ध्यानाची सवय नसेल तर तुम्ही दीर्घ काळ ध्यान करून स्वतःला शिणवता कामा नये कारण शिणलेल्या मनाने ध्यान केले तर ध्यानाचे सर्व मोल वा त्याची शक्ती हरवून जाते. अशा वेळी तुम्ही एकाग्रतेच्या (concentration) ऐवजी, ‘विश्रांत’ अवस्थेमध्ये ध्यान (meditation) करू शकता. तुमची एकाग्रता जेव्हा सहजस्वाभाविक होते तेव्हाच तुम्ही अधिकाधिक दीर्घ वेळ ध्यान करू शकता.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 308-309)

साधना, योग आणि रूपांतरण – ०५

तुम्हाला जर खरोखरच या योगमार्गाचे (पूर्णयोगाचे) अनुसरण करायचे असेल आणि योगसाधना करायची असेल, तर ती तुम्ही कोणाकडून कौतुक किंवा मानसन्मान मिळावा यासाठी करता कामा नये; तर योगसाधना ही तुमच्या जिवाची अनिवार्य निकड असल्यामुळे केली पाहिजे, कारण त्याशिवाय अन्य कोणत्याच मार्गाने तुम्ही आनंदी होऊ शकणार नाही. लोकांनी तुमची प्रशंसा केली काय किंवा नाही केली काय, ती गोष्ट अजिबात महत्त्वाची नाही. तुम्ही अगोदरच स्वत:ला समजावले पाहिजे की, जसजसे तुम्ही सामान्य माणसाहून अधिक प्रगत होत जाल, त्यांच्या सामान्य जीवनपद्धतीहून अधिकाधिक दूर जाल, तसतशी लोकं तुमची प्रशंसा कमी प्रमाणात करू लागतील. आणि हे स्वाभाविकच आहे कारण की, ती लोकं तुम्हाला नीट समजून घेऊ शकणार नाहीत. मी पुन्हा एकवार सांगते की, या गोष्टीला अजिबात महत्त्व नाही.

तुम्ही प्रगती केल्याविना राहूच शकत नाही म्हणून (योग) मार्गावर प्रगत होत राहण्यामध्ये ‘खरा प्रामाणिकपणा’ सामावलेला आहे. तुम्ही ‘दिव्य जीवना’साठी स्वत:ला वाहून घेता कारण त्याविना तुम्ही राहूच शकत नाही; तुम्ही स्वत:चे रूपांतर करण्यासाठी धडपडता, प्रकाशाला उन्मुख होता कारण त्याविना तुम्ही राहूच शकत नाही. (हे सारे तुम्ही करता) कारण तेच तुमच्या जीवनाचे प्रयोजन असते.

जेव्हा हे असे असते तेव्हा खात्री बाळगा की, तुम्ही योग्य मार्गावर आहात.

– श्रीमाताजी (CWM 03 : 282-283)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२९)

महत्तर चेतना जर मनाच्या अतीत असेल आणि त्या चेतनेप्रत आपण पोहोचू शकलो तरच आपण त्या ‘परब्रह्मा’ला जाणू शकतो आणि त्यामध्ये प्रवेश करू शकतो. अशा प्रकारची महत्तर चेतना असते किंवा नाही यासंबंधीची कोणतीही बौद्धिक अटकळ, तार्किक विचार यांच्या आधारे आपण प्रगतिपथावर फार दूरवर जाऊन पोहोचू शकत नाही. परब्रह्माची अनुभूती मिळविण्यासाठी, तेथपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यामध्ये प्रवेश करण्यासाठी, आणि त्यामध्येच जीवन जगण्यासाठी आपल्याला एका मार्गाची आवश्यकता असते. आपल्याला जर तो मार्ग सापडला तर, बौद्धिक अटकळ आणि तर्क हे अपरिहार्यपणे अगदी दुय्यम स्थानी जाऊन पडले पाहिजेत आणि (तसे झाल्यास) त्यांच्या असण्याचे प्रयोजनच शिल्लक राहणार नाही. तरीही तत्त्वज्ञान, ‘सत्या’ची बौद्धिक अभिव्यक्ती या गोष्टी शिल्लक राहू शकतील. आणि प्रामुख्याने, या महान शोधाला अभिव्यक्त करण्याचे साधन म्हणूनच त्या गोष्टी असतील आणि ती परब्रह्माची अनुभूती मानसिक परिभाषेमध्ये मांडता येत असेल, आणि शक्य असेल तेवढ्या प्रमाणात ती मांडली तर, आशय तेवढा शिल्लक राहील आणि तोही अशा लोकांसाठी शिल्लक राहील की जे अजूनही मानसिक बौद्धिक स्तरावरच जीवन जगत आहेत.

(बुद्धीच्या आधारे ‘परतत्त्वा’चे, ‘सत्या’चे आकलन करून घेण्याच्या भारतीय किंवा पाश्चात्त्य चिंतनांबद्दल विस्ताराने ऊहापोह करून झाल्यानंतर, हे प्रयत्न कसे अपुरेच ठरतात, यासंबंधी श्रीअरविंद यांनी आधी सांगितले आहे. आणि आता, ‘पूर्णयोगा’च्या परिभाषेत ‘सत्य’ कशाला म्हणायचे हे श्रीअरविंद येथे सांगत आहेत…)

अखिल ब्रह्माचा ‘बुद्धिपूर्वक विचार’ केल्याने नव्हे तर, चेतनेच्या परिवर्तनामुळे व्यक्ती अज्ञानातून ‘ज्ञाना’कडे जाऊ शकते. हे ‘ज्ञान’ अशा प्रकारचे असते की, आपण जे जाणतो ते आपण स्वतः बनतो. बाह्यवर्ती चेतनेमधून थेट आणि सखोल आंतरिक चेतनेमध्ये प्रवेश करणे, अहंकार आणि शरीराच्या कक्षा ओलांडून चेतना विशाल करणे, आंतरिक संकल्प आणि अभीप्सेद्वारा चेतना उन्नत करणे आणि मनाच्या अतीत होईपर्यंत चेतनेचे आरोहण करत करत, तिला ‘प्रकाशा’प्रत खुली करणे, आत्मदान आणि समर्पणाच्या माध्यमातून अतिमानसिक ‘ईश्वरा’चे अवतरण घडविणे आणि परिणामतः मन, प्राण आणि शरीराचे रूपांतर घडविणे हा ‘सत्या’प्रत जाण्याचा ‘पूर्णयोगा’चा मार्ग आहे. याला इथे आम्ही ‘सत्य’ असे संबोधतो आणि आमच्या ‘योगा’मध्ये (‘पूर्णयोगा’मध्ये) तेच आमचे ध्येय असते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 352 and 355)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२४)

माझ्या योगामध्ये (पूर्णयोगामध्ये) खरोखर, इतर जगतांचा – ‘परम आत्म्या’च्या स्तराचा, भौतिक जगताचा आणि दरम्यानच्या सर्व स्तरांचा – तसेच त्यांचा आपल्या जीवनावर व भौतिक जगतावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा आणि त्यांच्या पूर्ण अनुभवांचादेखील समावेश होऊ शकतो. पण हेदेखील शक्य आहे की, आधी केवळ ‘परमपुरुषा’च्या साक्षात्कारावर भर द्यायचा अन्यथा, ‘ईश्वरा’च्या अगदी एखाद्या पैलूवर म्हणजे जगदाधिपती आणि आपला व आपल्या कर्मांचा स्वामी असलेल्या ‘कृष्ण’, ‘शिव’ यांच्या साक्षात्कारावर भर द्यायचा; अन्यथा, विश्वात्मक ‘सच्चिदानंदा’वर भर द्यायचा आणि या ‘योगा’साठी (पूर्णयोगासाठी) आवश्यक असणारे पायाभूत परिणाम साध्य करून घ्यायचे; आणि नंतर त्या परिणामांपासून प्रगत होत, समग्र परिणामांकडे वळायचे. (म्हणजे) जर एखाद्याने ‘दिव्य जीवना’कडे वाटचाल करणे आणि भौतिक जीवनावर आत्म्याचे आधिपत्य निर्माण करणे’ हे ध्येय स्वीकारलेले असेल तर पूर्णयोगाचे पायाभूत परिणाम साध्य करून घेतल्यानंतर, मग त्याच्या समग्र परिणामांकडे वळायचे, हे शक्य आहे.

‘ईश्वरा’चा, ‘परमेश्वरा’चा साक्षात्कार ही निश्चितच आवश्यक गोष्ट आहे. पण प्रेम, श्रद्धा, भक्ती यांसहित त्याच्याकडे वळणे, स्वतःच्या कर्मांद्वारे त्याची सेवा करणे आणि त्याला जाणणे – त्याला ‘बौद्धिक आकलना’द्वारेच जाणले पाहिजे असे नाही तर ‘आध्यात्मिक अनुभूती’च्या माध्यमातून त्याला जाणणे – यादेखील ‘पूर्णयोगा’च्या मार्गावरील आवश्यक गोष्टी आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 375)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२३)

भारतात परतल्यापासूनच, लौकिक किंवा पारलौकिक असा कोणताही भेद मी माझ्या जीवनामध्ये किंवा माझ्या ‘योगा’मध्ये कधीही केला नाही. मला वाटते, माणसांना ज्या गोष्टींमध्ये रस असतो, त्या सर्व गोष्टी बहुधा ऐहिक असतात आणि त्यातील बहुतांशी सर्वच गोष्टींचा माझ्या मानसिक क्षेत्रात प्रवेश झाला होता. उदाहरणार्थ, राजकारण. त्याचा तर माझ्या जीवनातच प्रवेश झाला होता. पण त्याच वेळी, मी मुंबईतील अपोलो बंदरावर, या भारतभूमीवर जेव्हा पहिले पाऊल ठेवले तेव्हा मला आध्यात्मिक अनुभव यायला सुरुवात झाली; पण त्या अनुभवांची या जगापासून कधीच फारकत झालेली नव्हती तर त्यांचा या जगाशी आंतरिक आणि जवळचा संबंध होता. भौतिक क्षेत्राला ‘अनंत’ व्यापून आहे आणि भौतिक वस्तुंमध्ये, देहांमध्ये तो ‘अंतर्यामी’ वास्तव्य करतो, असे मला जाणवत असे. अगदी त्याच वेळी, पारलौकिक जगतांमध्ये आणि स्तरांमध्ये माझा प्रवेश होत आहे आणि त्यांचा प्रभाव व परिणाम या भौतिक जगतावर घडत आहे असे मला दिसत असे. त्यामुळे ज्याला मी ‘अस्तित्वाची दोन टोकं’ (जडभौतिक आणि सच्चिदानंद) असे संबोधतो ती टोकं आणि त्या दोहोंच्या दरम्यान येणारे सर्वकाही यांमध्ये मी कधीच कट्टर विरोध वा फारकत करू शकलो नाही. माझ्यासाठी सर्व काही ‘ब्रह्म’च आहे आणि मला सर्वत्र ‘ईश्वरर’च दिसतो. पण लौकिकाचा त्याग करून, फक्त पारलौकिकाची निवड करण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे आणि एखाद्या व्यक्तीला त्या निवडीमुळे जर शांती लाभत असेल तर त्याने तसे खुशाल करावे. शांती लाभावी म्हणून असे करणे मला स्वत:ला तरी आवश्यसक वाटले नाही.

माझ्या कार्यक्षेत्रामध्ये मी भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही जगतांचा समावेश करावा आणि केवळ स्वत:च्या मुक्तीसाठी नव्हे तर येथील दिव्य जीवनासाठी, दिव्य ‘चेतना’ आणि दिव्य ‘शक्ती’ लोकांच्या हृदयात व या पार्थिव जीवनात स्थापित करण्याचा प्रयत्न करावा, या दिशेने मी माझ्या योगाकडे वळलो, असे मला आढळून आले. हे ध्येय, इतर ध्येयांसारखेच एक ‘आध्यात्मिक’ ध्येय आहे असे मला वाटते आणि या जीवनाने लौकिक, पार्थिव गोष्टींचा, गतिविधींचा मागोवा घेतल्यामुळे आणि त्यांचा आपल्या परिघात समावेश केल्यामुळे, आध्यात्मिकतेला कलंक लागेल किंवा त्याच्या भारतीयत्वाला काही बाधा येईल असे मला वाटत नाही. वास्तव (reality) आणि या विश्वाचे, वस्तुंचे, ‘ईश्वरा’चे स्वरूप, याविषयीचा माझा तरी हा अनुभव व दृष्टिकोन राहिलेला आहे. हे त्यांबाबतचे जवळजवळ संपूर्ण सत्य असल्यासारखे मला वाटते आणि म्हणूनच त्याचे अनुसरण करणे याला मी ’पूर्णयोग’ म्हणतो.

अर्थातच, एखाद्याला पूर्णत्वाची ही संकल्पना मान्य नसेल आणि तो ती नाकारू इच्छित असेल किंवा या लौकिक जीवनाचा पूर्णपणे त्याग करून, समग्रतया पारलौकिक जीवनावर भर देणाऱ्या आध्यात्मिक आवश्यकतेवर तो विश्वा स ठेवत असेल तर तसे करण्यास तो मोकळा आहे पण तसे असेल तर माझा ’योग’ करणे त्याला अशक्य होईल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 374-375)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२१)

…तुम्हाला योगाची हाक आलेली असू शकते आणि तुम्ही योगासाठी पात्रदेखील असू शकता, परंतु योगाचे विविध मार्ग आहेत आणि प्रत्येक मार्गाचे ध्येय व उद्दिष्ट भिन्न भिन्न असते. इच्छा-वासनांवर विजय मिळविणे आणि जीवनातील सामान्य नातेसंबंध बाजूला सारणे तसेच अनिश्चिततेकडून चिरस्थायी निश्चिततेप्रत वाटचाल करण्याचा प्रयत्न करणे या गोष्टी सर्व योगांमध्ये समानच असतात. व्यक्ती स्वप्न व निद्रा, तहान व भूक इत्यादी गोष्टींवर विजय मिळविण्याचाही प्रयत्न करू शकते. परंतु जीवनाविषयी किंवा जगाबद्दल कोणतेही कर्तव्य न बाळगणे किंवा संवेदना मारून टाकणे किंवा त्यांच्या कृतींना पूर्णपणे प्रतिबंध करणे या गोष्टी श्रीअरविंदांच्या योगाचा (पूर्णयोगाचा) भाग असू शकत नाहीत.

दिव्य ‘सत्या’चा ‘प्रकाश’, ‘शक्ती’, ‘परमानंद’ आणि त्याची गतिशील निश्चितता खाली उतरवून, त्यायोगे जीवन रूपांतरित करणे हे श्रीअरविंदांच्या ‘योगा’चे उद्दिष्ट आहे. हा ऐहिकाचा त्याग करणारा संन्यासवादी ‘योग’ नसून, हा दिव्य ‘जीवना’चा ‘योग’ आहे.

– श्रीअरविंद (CWSA 35 : 541-542)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१३)

उच्चतर चेतनेमध्ये उन्नत होणे आणि केवळ सामान्य प्रेरणांनिशी नव्हे तर, त्या उच्चतर चेतनेमध्ये राहून जीवन जगणे हे, येथे (श्रीअरविंद आश्रमामध्ये) आचरल्या जाणाऱ्या योगसाधनेचे उद्दिष्ट आहे. यामध्ये चेतनेच्या परिवर्तनाप्रमाणेच जीवनाचे परिवर्तनही अपेक्षित आहे.

सामान्य जीवनापासून संबंध तोडता येतील अशी परिस्थिती सर्वांनाच उपलब्ध असते असे नाही; आणि म्हणून अनुभवाचे एक क्षेत्र आणि साधनेतील प्राथमिक टप्प्यांवर द्यायचे स्वयं-प्रशिक्षण या भूमिकेतून ती माणसं सामान्य जीवन स्वीकारतात. पण त्यांनी सांसारिक जीवनाकडे ‘अनुभवाचे क्षेत्र’ म्हणून पाहण्याची, तसेच सहसा त्याच्याबरोबरीने ज्या ज्या गोष्टी येतात त्या साऱ्या सामान्य कल्पना, आसक्ती, सामान्य इच्छा यांपासून मुक्त होण्याची काळजी घेतली पाहिजे; अन्यथा असे जीवन म्हणजे एक लोढणे बनते, साधनेमधील तो अडथळा ठरतो. परिस्थितीमुळे व्यक्तीला जर तसे जीवन जगण्यास भाग पाडले नसेल तर, तुम्ही तुमचे सामान्य जीवन आहे तसेच चालू ठेवण्याची कोणतीच आवश्यकता नाही.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 422)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१२)

तुम्ही तुमचे जीवन इतर कोणत्याही गोष्टीसाठी नव्हे तर, ‘दिव्य-सत्य’शोधनाच्या अभीप्सेसाठी आणि त्या ‘सत्या’चे मूर्त स्वरूप बनण्याच्या अभीप्सेसाठी पूर्णतया निष्ठापूर्वक अर्पित करावे, ही या योगाची (पूर्णयोगाची) मागणी आहे. तुमचे जीवन (एकीकडे) ‘ईश्वरा’मध्ये आणि (दुसरीकडे) ज्या गोष्टीचा ‘सत्या’च्या शोधनाशी काहीही संबंध नाही अशा कोणत्यातरी बाह्य ध्येयामध्ये आणि कार्यामध्ये विभागणे या गोष्टीला येथे मान्यता नाही. अशा प्रकारे केलेल्या अगदी छोट्याशा कृतीमुळेदेखील या योगामध्ये यश मिळणे अशक्य होईल.

तुम्ही तुमच्या स्वतःच्या अंतरंगामध्येच प्रवेश केला पाहिजे आणि आध्यात्मिक जीवनाला तुम्ही पूर्णपणे निष्ठापूर्वक वाहून घेतले पाहिजे. या योगामध्ये यश मिळावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर – मानसिक अग्रक्रमांबाबत असलेला तुमचा हट्टाग्रह तुमच्यामधून निघून गेला पाहिजे; प्राणमय आवडीनिवडी, आसक्ती यांबाबतचा आग्रह बाजूला सारलाच पाहिजे; कुटुंब, मित्रपरिवार, देश यांच्याबद्दल असणारी अहंभावात्मक आसक्ती नाहीशी झालीच पाहिजे. बाहेर पडणारी ऊर्जा असेल किंवा जी कोणती कृती असेल, या सर्व गोष्टी, एकदा का तुम्हाला सत्य गवसले की त्या गवसलेल्या ‘सत्या’मधूनच उगम पावल्या पाहिजेत. त्या गोष्टी कोणत्यातरी कनिष्ठ मानसिक किंवा प्राणिक प्रेरणांमधून उत्पन्न झालेल्या असता कामा नयेत; त्या कोणत्याही वैयक्तिक आवडीनिवडीतून किंवा अहंभावात्मक अग्रक्रमातून नव्हे तर, ‘ईश्वराच्या इच्छे’मधून उगम पावल्या पाहिजेत.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 15)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (११)

(आश्रमात राहणाऱ्या एका साधकामधील कनिष्ठ प्राणिक प्रकृती ही ईश्वरी शक्तीच्या प्रभावाला विरोध करत आहे. कधीकधी ईश्वरी-इच्छेचे रूप घेऊन स्वत:च्या प्राणिक इच्छा-वासनांची पूर्ती करू पाहत आहे. आपली घुसमट होत आहे, आपण अडकून पडलो आहोत असे त्या साधकाला वाटत आहे. तेव्हा श्रीअरविंद त्याला त्यामधून बाहेर पडण्याचा उपाय सांगतात, आणि नंतर त्याला पूर्णयोगाचे उद्दिष्ट काय आणि आपण आश्रमात कशासाठी आहोत, हे स्पष्ट करत आहेत.)

येथे (श्रीअरविंद आश्रमात) जर कोणत्या एकमेव कृतीला स्थान असेल ती कृती म्हणजे ते अतिमानस, ते दिव्य ‘सत्य’ या पृथ्वीतलावर उतरवणे ही होय. ते दिव्य ‘सत्य’ केवळ मनामध्ये आणि प्राणामध्येच नाही तर, शरीरामध्ये आणि अगदी ‘जडभौतिका’मध्ये देखील उतरवायचे आहे. अहंच्या फैलावण्यावरील सर्व ‘मर्यादा’ काढून टाकणे किंवा त्याला मुक्त वाव देणे आणि मानवी मनाच्या संकल्पनांच्या परिपूर्तीसाठी किंवा अहं-केंद्रित प्राण-शक्तीच्या इच्छा-वासनांच्या पूर्तीसाठी अमर्याद वाव देणे हे आपले उद्दिष्ट नाही. आपण कोणीच येथे ‘आपल्याला जे वाटते ते करण्यासाठी’ आलेलो नाही, किंवा आपल्याला जे करावेसे वाटते ते ज्या जगामध्ये करता येईल असे जग निर्माण करण्यासाठीसुद्धा आपण येथे आलेलो नाही. तर ‘ईश्वराच्या इच्छे’नुसार वागण्यासाठी आपण इथे आलो आहोत. तसेच ज्या जगामध्ये, ‘ईश्वरी इच्छा’ ही तिचे सत्य – मानवी अज्ञानाने विरूप न होता किंवा प्राणिक इच्छेमुळे विकृत न होता, किंवा चुकीच्या पद्धतीने त्याचे आकलन न होता – आविष्कृत करू शकेल अशा एका जगाची निर्मिती करण्यासाठी आपण इथे आहोत.

अतिमानस योगाच्या साधकाने जे कार्य करायचे आहे ते काही त्याचे स्वतःचे कार्य नव्हे, की जिथे तो त्याच्या स्वतःच्या अटी लादू शकेल; तर हे ‘ईश्वरी’ कार्य आहे आणि ते कार्य ‘ईश्वरा’ने नेमून दिलेल्या अटींनुसारच केले गेले पाहिजे. आपला योग हा आपल्यासाठी नाही तर तो ‘ईश्वरा’साठी आहे. आपल्याला आपले स्वतःचे वैयक्तिक आविष्करण करण्यासाठी धडपडायचे नाही; किंवा सर्व मर्यादांमधून, सर्व बंधनांमधून मुक्त झालेल्या वैयक्तिक अहंच्या आविष्करणासाठी देखील धडपडायचे नाही, तर आपले सारे प्रयत्न हे ‘ईश्वरा’च्या आविष्करणासाठी असले पाहिजेत.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 161-162)