Tag Archive for: तत्त्वज्ञान

आपल्या अस्तित्वाची आत्ताची रचना किंवा स्थिती ही अंतिम आहे, असे मानून, विकासक्रमाच्या शक्यतेवर मर्यादा घालण्याचे काहीच कारण नाही. पशुजीवन ही एक अशी प्रयोगशाळा आहे की, ज्या प्रयोगशाळेमध्ये प्रकृतीने मनुष्यजात घडवली. मनुष्यदेखील तशीच एक प्रयोगशाळा बनू शकतो. या मनुष्यरूपी प्रयोगशाळेमध्ये – दिव्य जीवाच्या रूपाने आत्म्याला प्रकट करण्याची व एक दिव्य प्रकृती उदयास आणण्याची आणि अतिमानव घडविण्याचे कार्य करण्याची – प्रकृतीची इच्छा आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 502)

पाश्चिमात्य मनाच्या दृष्टीने, नीति ही बाह्य वर्तनाची गोष्ट आहे; भारतीय मनाच्या दृष्टीने मात्र, बाह्य वर्तन हे आत्मावस्थेच्या अभिव्यक्तीचे केवळ एक साधन आहे, ते आत्मावस्थेचे केवळ एक लक्षण आहे. पालन करण्यासाठी हिंदुधर्माने नैतिक नियमांचा तक्ता, काही आदेश कधीकधी जरुर एकत्रित केलेले आढळतात, पण अधिक भर दिलेला आहे तो मनाच्या आत्मिक, नैतिक शुद्धीवर; येथे वर्तन, कृति ही केवळ आंतरिक शुद्धीचे बाह्य लक्षण आहे असे सांगितले जाते; येथे “तू हिंसा करू नकोस” असे जोरकसपणे सांगितले जाते, खूप स्पष्टपणे सांगितले जाते, पण त्याहून अधिक ठामपणे अशा एका आदेशावर भर दिला जातो की, “तू कोणाचाही द्वेष करू नकोस; लोभ, क्रोध, मत्सर या विकारांना बळी पडू नकोस.” कारण हिंसेचे मूळ या द्वेषादि विकारातच असते.

आणखी एक गोष्ट अशी की, हिंदुधर्मात सापेक्ष आदर्श मान्य करण्यात आले आहेत. परंतु युरोपीय बुद्धीला हे शहाणपण झेपणारे नाही. हिंदुधर्मात सर्वात श्रेष्ठ नियम अहिंसा हा आहे – ‘अहिंसा परमो धर्मः’ तथापि योद्ध्यासाठी मात्र हा नियम ठेवलेला नाही; शारीरिक अहिंसा त्याच्या कर्तव्यात बसत नाही; मात्र योद्ध्याने न लढणारे लोक व दुबळे, नि:शस्त्र, पराभूत झालेले लोक, कैदी, जखमी, पळणारे लोक यांजबददल दया, दाक्षिण्य व समानबुद्धी दाखवलीच पाहिजे असे हिंदुधर्म आग्रहाने सांगतो. याप्रमाणे सर्वांना एकच पूर्ण निरपवाद नियम ठेवण्यात जी अव्यावहारिकता असते, ती अव्यावहारिकता हिंदुधर्म टाळतो.

– श्रीअरविंद
(CWSA 20 : 149)

जो जो कोणी श्रेष्ठता प्रकट करण्याचा संकल्प करील, एकामागून एक डोंगर चढत ईश्वरी शिखर गाठण्यास पुढे सरसावेल तो ‘आर्य’ होय. त्याला भीतीचा लवलेशही कधी स्पर्श करीत नाही. परागती वा अपयश त्याला आपल्या ध्येयमार्गापासून विचलित करू शकत नाहीत. जो कोणी ह्याची निवड करतो, जो कोणी दिव्यत्वाची शिखरे एका पाठोपाठ एक सर करण्याचा यत्न करतो, जो कशासही घाबरत नाही, पिछेहाट किंवा पराजयाने ज्याची गती अवरूद्ध होत नाही, स्वत:च्या बुद्धिमत्तेच्या खूप पलीकडे, अति व्यापक आहे म्हणून त्या व्यापकतेपासून, विशालतेपासून जो अंग चोरून घेत नाही, स्वत:च्या जीवाच्या मानाने एखादी गोष्ट खूप उच्च पातळीवर आहे असे पाहून जो त्या उंचीमुळे दडपून जात नाही, स्वत:च्या शक्तीच्या आणि धैर्याच्या मानाने एखादी गोष्ट खूपच महान आहे म्हणून त्या महानतेपासून जो दूर पळत नाही, तो आर्य होय; तो दिव्य योद्धा आणि विजेता, उदात्त मानव आहे, तो उच्चकुलीन, श्रेष्ठ, गीतेत वर्णिलेला ‘श्रेष्ठ’ आहे.

आर्य ह्या शब्दाचा मूळ अर्थ प्रयत्न, उत्थान आणि विजय असा आहे. मानवी प्रगतीच्या विरूद्ध येणाऱ्या सर्व आंतरिक प्रवृत्ती व बाह्य परिस्थिती ह्यांविरुद्ध लढून त्यांच्यावर जो विजय मिळवतो तो आर्य! ‘आत्मविजय’ हा त्याच्या प्रकृतीचा पहिला कायदा आहे. तो पृथ्वी व शरीर ह्यांवर विजय मिळवितो आणि अन्य सामान्य माणसांप्रमाणे आळस, प्रमाद, चाकोरी इत्यादी तामसिक मर्यादांमध्ये राहण्यास आपल्या शरीरास संमती देत नाही. नाना इच्छा, भुका व अन्य रजोगुणात्मक वासना ह्यांच्या गुलामीत तो आपले जीवन वा जीवनशक्ती जखडू देत नाही. तो मनोविजय प्राप्त करतो. तो मन आणि त्याच्या सवयी यांच्यावर मात करतो. तो अज्ञान, परंपरागत पूर्वग्रह, रुढीबद्ध कल्पना, सुखद मते यांच्या कवचामध्ये राहत नाही; तर ठाम आणि दृढ अशी इच्छाशक्ती स्वत:कडे असूनदेखील, बुद्धि विशाल आणि लवचीक कशी बनेल ह्याचा तो शोध घेत असतो, निवड करीत असतो. प्रत्येक गोष्टीत तो सत्याचा वेध घेत असतो, प्रत्येक गोष्टीतील योग्य, प्रत्येक गोष्टीतील सर्वोच्च आणि स्वातंत्र्य यांचा तो शोध घेत असतो.

आत्मसिद्धी हे त्याच्या आत्मविजयाचे ध्येय असते. तो ज्या ज्या गोष्टीवर विजय संपादन करतो ती ती गोष्ट तो नष्ट करीत नाही; तर तिला उदात्तता व पूर्णता प्राप्त करून देतो. शरीर, प्राण व मन ही साधने आहेत आणि त्या साधनांच्या अतीत असणाऱ्या उच्चतर गोष्टींच्या प्राप्तीसाठी ती आपणास देण्यात आली आहेत, हे तो जाणतो; आणि त्यामुळे त्यांच्यावर मात करून, त्यांच्या अतीत जाणेच आवश्यक आहे, त्यांच्या मर्यादा नाकारणेच आवश्यक आहे, त्यांची पुष्टीतुष्टी करण्यातील मग्नता टाळणेच आवश्यक आहे, हे तो जाणतो. भलेही कनिष्ठ जीवनाने ह्या शोधकावर, साधकावर काही अटी, मर्यादा लादलेल्या असल्या तरी, एकदा का ही परमोच्च अवस्था त्याने प्राप्त करून घेतली की, त्याने काय करणे अपेक्षित आहे हे तो जाणतो.

परमोच्च अवस्था म्हणजे या जगातून निघून जाणे, नाहीसे होणे नव्हे तर, ईश्वरी संकल्प, चेतना, प्रेम, सौंदर्य जे ह्या शोधकाद्वारे, साधकाद्वारे ओसंडून बाहेर पडू पाहते, त्या साऱ्याची चढत्यावाढत्या प्रमाणामध्ये त्याने अभिव्यक्ती करणे; सभोवती असणाऱ्यांपैकी जे कोणी स्वीकारक्षम आहेत त्यांच्यावर त्या साऱ्याचा वर्षाव करणे. आर्य हा त्या परमोच्च शक्तीचा सेवक, भक्त, उपासक व साधक असतो. आत्मसिद्धी प्राप्त झाल्यावर आपल्या सर्व कर्मातून अखिल मानवजातीवर तो प्रेम, आनंद व ज्ञान ह्यांचा वर्षाव करीत राहतो. कारण आर्य हा सदैवच एक कर्मयोगी व योद्धा असतो. परमेश्वराची प्राप्ती व सेवा ह्यांमध्ये कोणत्याही अडचणीस तो जुमानत नाही वा थकल्यामुळे त्याच्या कामात कधी मंदपणा येत नाही. त्याच्या जीवनांत मनाशी व जगाशी अंतर्बाह्य युद्ध करण्याचा प्रसंग सदैवच हजर असतो. तो आपले स्वराज्य व साम्राज्य सदैव स्थापन करीत व वाढवीत असतो. स्वत:च्या आतल्या स्वराज्यासाठी आणि बाहेरील साम्राज्यासाठी तो सदैव झुंज देत राहतो.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 442-443)

जर कोणी आम्हाला असा प्रश्न विचारला की, “हिंदुधर्म म्हणजे काय, तो कसा आहे? हा धर्म काय शिकवतो, कसा आचार करतो, यात सर्वसामान्य घटक कोणते आहेत?” तर उत्तरादाखल आम्ही असे म्हणू शकतो की, सर्वोच्च असूनही, व्यापक अशा तीन आध्यात्मिक अनुभूतींवर, तीन मूलभूत संकल्पनांवर भारतीय धर्म आधारलेला आहे.

‘एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति’
पहिली गोष्ट वेदामध्ये म्हटल्याप्रमाणे, एक अस्तित्व आहे ज्याला सज्जन अनेक नावे देतात. (‘एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति’) उपनिषदात याचे वर्णन एकमेवाद्वितीय ब्रह्म असे केले आहे; हे एकच सर्व काही असून, ते या सर्वांच्या अतीतदेखील आहे. बुद्धधर्मीय या तत्त्वाला ‘चिरंतन तत्त्व’ म्हणतात. मायावादी याला ‘केवल तत्त्व’ म्हणतात; देववादी याला ‘ईश्वर किंवा पुरुष’ म्हणतात. जीव आणि निसर्ग किंवा प्रकृती या ईश्वराच्या आधीन असतात. एका शब्दात या तत्त्वाला ‘शाश्वत, अनंत’ म्हणता येते. हिंदुधर्माचा हा सर्वत्र समान असा पाया आहे; मानवी बुद्धीने या तत्त्वाचे वर्णन अनेक प्रकारे केले आहे. या चिरंतनाचा, अनंताचा शाश्वताचा शोध लावणे, त्याच्या अगदी निकट जाणे, त्यात प्रविष्ट होणे, त्याच्याशी कोणत्या तरी प्रमाणात, कोणत्या तरी प्रकारे एकरूप होणे, हा त्याच्याविषयीच्या आध्यात्मिक अनुभूतीचा कळस होय. हा कळस गाठणे, त्यासाठी अंतिम प्रयत्न करणे ही पहिली सार्वत्रिक श्रद्धा भारताच्या धार्मिक मनात आढळते. हिंदुधर्माचे हे पहिले पायाभूत तत्त्व अनेक सूत्रांनी सांगितले आहे. हे पायाभूत तत्त्व कोण्या एका सूत्ररूपाने माना, हे महान आध्यात्मिक ध्येय, भारतात संमत असलेल्या सहस्त्रावधि मार्गांपैकी कोण्या एका मार्गाने अनुसरा, अथवा त्यातून फुटणाऱ्या एखाद्या नव्याच मार्गाने त्या ध्येयाचा मागोवा घ्या; असे तुम्ही केलेत की, या धर्माच्या हृदयाला तुम्ही गाठले असे होईल.

शाश्वत अनंताकडे जाण्याचे अनंत मार्ग
या धर्माची दुसरी पायाभूत कल्पना हीच आहे की, शाश्वत अनंताकडे जाण्याचे मार्ग अनेक आहेत. अनंत जे मूळ आहे त्यात अनेक अनंते आहेत आणि या अनेक अनंतांपैकी प्रत्येक अनंत शाश्वतच आहे. विश्वाच्या मर्यादांमध्ये ईश्वर स्वत:ला अभिव्यक्त करतो आणि अनेक मार्गांनी या विश्वामध्ये तो स्वत:ची परिपूर्ती अनुभवतो; आणि हा प्रत्येक मार्ग त्या ‘शाश्वता’चा मार्ग असतो. प्रत्येक सान्तामध्ये आपल्याला ‘अनंता’ची भेट होऊ शकते. सर्व गोष्टी ह्या अनंताच्या मूर्ती व प्रतीके असल्याने, कोणत्याही गोष्टीच्या द्वारा आम्ही अनंताकडे जाऊ शकतो. सर्व विश्वशक्ती ह्या ‘एका’चे आविष्कार आहेत. सर्व शक्ती ह्या ‘एका’च्या शक्ती आहेत. प्रकृतीच्या कार्यामागील देवदेवतांकडे, त्या एका ईश्वराच्या विविध शक्ती आहेत, एका ईश्वराची विविध नामे आहेत, एका ईश्वराची विविध व्यक्तित्वे आहेत या भावनेने पाहिले पाहिजे आणि पूजले पाहिजे. सर्व घटनांच्या पाठीमागे, मग त्या घटना चांगल्या दिसोत वा वाईट, ग्राह्य वाटोत वा अग्राह्य वाटोत, भाग्याच्या वाटोत वा दुर्भाग्यपूर्ण वाटोत, त्यांच्या पाठीमागे अनंत जाणीवयुक्त शक्ती आहे, कार्यकारी शक्ती आहे, ‘अनंता’ची इच्छा आहे, कायदा आहे, माया आहे, प्रकृती आहे, शक्ती किंवा कर्म आहे. ‘अनंत’ निर्मिती करतो आणि ब्रह्मा होतो, तो रक्षण करतो आणि विष्णु होतो, संहार करतो किंवा स्वत:मध्ये सामावून घेतो आणि रुद्र वा शिव होतो. सर्वश्रेष्ठ शक्ती ही आधार देणारी, संरक्षण करणारी होते, ती लक्ष्मी किंवा दुर्गा किंवा विश्वमाता म्हटली जाते. अगदी संहारक रूप धारण करूनदेखील, जी कल्याणकारिणीच असते; तिला चंडी, काली, कालीमाता म्हणतात. एकच ईश्वर विविध नामांनी आणि विविध देवदेवतांच्या रूपाने, विभिन्न गुणवैशिष्ट्यांच्या द्वारे अभिव्यक्त होतो. वैष्णवांचा दिव्य प्रेमाचा देव आणि शाक्तांचा दिव्य सामर्थ्याचा देव हे दोन वेगळे देव असल्याचे भासतात, परंतु खरेतर वेगवेगळ्या रूपांमधून अभिव्यक्त होणारी ती एकच अनंत देवता असते. सर्वश्रेष्ठ देवाकडे, अनंत शाश्वताकडे यांपैकी कोणत्याही नामरूपाच्या आधाराने जावे, ज्ञान असता जावे, ज्ञान नसताही जावे; कारण या नामरूपांच्या द्वारा, त्यांच्या पलीकडे, त्यांच्या अतीत असलेल्या सर्वश्रेष्ठ तत्त्वाचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला पुढे जाता येते….

अंत:करणातील ईश्वर
भारतीय धर्माला आधारभूत अशा उच्चतम आध्यात्मिक अनुभवाच्या ज्या तीन गोष्टी आहेत, त्यातील दोन गोष्टींचा विचार आत्तापर्यंत झाला. तिसरी पायाभूत गोष्ट आंतरिक आध्यात्मिक जीवनाला अतिशय गती देणारी आहे. सर्वश्रेष्ठाकडे वा ईश्वराकडे विश्वात्मक जाणिवेच्या द्वारे जाता येते किंवा सर्व आंतरिक व बाह्य प्रकृतीचा भेद करून जाता येते, हे खरे आहे पण तो ईश्वर प्रत्येक व्यक्तिभूत आत्म्याला स्वत:मध्येच, म्हणजे स्वत:च्या आध्यात्मिक भागामध्ये भेटू शकतो, कारण त्यामध्ये असे काहीतरी असते की, जे त्या ईश्वरी अस्तित्वाशी एकत्व पावणारे असते, किमान त्या दिव्य ईश्वरी अस्तित्वाशी संबंधित असते. भारतीय धर्माचे सार हे आहे की, मानवाने आपला विकास करून घ्यावा, आपल्याला अज्ञानातून पार व्हावयाचे आहे, आपल्या मनापासून व जीवनापासून आत्मज्ञान दडवून ठेवणाऱ्या अज्ञानातून आपल्याला पार व्हावयाचे आहे आणि आपल्यातील ईश्वराची ओळख करून घ्यावयाची आहे हे ध्येय मनात ठेवून मानवाने आपले जीवन जगावे; ह्या तीन गोष्टी एकत्र केल्या तर त्यामध्येच हिंदु धर्म सामावलेला आहे, हेच त्याचे मूलभूत सार आहे आणि जर कोणता मार्ग आवश्यक असेल तर तो हाच मार्ग आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 20 : 193-195)

हिंदुधर्माने स्वत:ला कोणतेही नाव देऊ केले नाही कारण त्याने स्वत:वर कोणत्याही पंथाच्या मर्यादा घालून घेतल्या नाहीत; त्याने कोणत्याही एकाच एक गोष्टीला वैश्विक समर्थन दिलेले नाही; त्याने कोणत्याच मतप्रणालीला बिनचूक म्हणून घोषित केलेले नाही; मुक्तीचा कोणताच एकच एक मार्ग वा प्रवेशद्वार असे सांगितलेले नाही; हिंदुधर्म म्हणजे कोणता एकच एक असा पंथ वा संप्रदाय नसून, मानवी आत्म्याने ईश्वराभिमुख राहत, सातत्याने केलेल्या विस्तारित प्रयत्नांची ती परंपरा आहे. आध्यात्मिक आत्मरचना आणि आत्मशोधासाठी, अनेकांगी, आणि अनेक पातळ्यांवरील व्यवस्था यामध्ये आहे; या साऱ्यामुळेच ज्या नावाने हा धर्म ओळखला जातो, शाश्वत धर्म हेच नाव स्वत:ला लावण्याचा त्याला पुरेपूर अधिकार आहे. या धर्माच्या अर्थाची आणि त्याच्या आत्म्याची न्याय्य आणि योग्य समज आपल्याला असेल तर आणि तरच भारतीय संस्कृतीचा खरा अर्थ आणि तिचा आत्मा यांचे आपल्याला आकलन होऊ शकेल.

– श्रीअरविंद
(CWSA 20 : 178-179)

पाश्चिमात्य बुद्धीला परिचित असलेल्या कोणत्याही व्याख्येने ‘भारतीय धर्मा’चे वर्णन करता येत नाही. समग्रतेने विचार केला तर, भारतीय धर्म हा सर्व प्रकारच्या आध्यात्मिक पूजाअर्चा व अनुभूतींचा सहिष्णू व मुक्त असा समन्वय आहे. एकमेव सत्याकडे हा धर्म सर्व बाजूंनी पाहतो आणि सत्याची कोणतीच बाजू तो त्याज्य मानीत नाही.

या धर्माने स्वतःला कोणतेच विशेष नाव दिले नाही, कोणत्याच मर्यादा घालणाऱ्या वैशिष्ट्याने स्वतःला बांधून घेतले नाही. या धर्मामध्ये जे घटक पंथ, विभाग आहेत त्यांना विभिन्न नावे धारण करावयास त्याने संमती दिली पण ज्या ब्रह्माचा युगानुयुगे तो शोध लावू पाहत आहे त्या ब्रह्माप्रमाणेच तो स्वत: मात्र अनाम, निराकार, विश्वव्यापी व अनंत राहिला आहे.

इतर संप्रदायांपासून वेगळेपणाने ओळखू येतील असे ह्या धर्माला पारंपरिक धर्मग्रंथ आहेत, संस्कार आहेत, प्रतीके आहेत, पण मूलत: त्याच्या अवश्यभावी गुणधर्मानुसार तो एक सांप्रदायिक धर्म नसून, ती एक व्यापक, बहुआयामी, नित्य संघटनशील, नित्य प्रगतिशील, आत्मसंवर्धक अशी आध्यात्मिक संस्कृतीची व्यवस्था आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 20 : 193-195)

भविष्यात होणाऱ्या बदलांमध्ये हिंदु समाजाने नवीन विश्वात्मक मानदंडाच्या प्रस्थापनेसाठी पुढाकार घ्यावयास हवा. हिंदु असल्यामुळे आपल्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या माध्यमातूनच आपण तो शोध घेण्याचा प्रयत्न करावयास हवा.

आपला स्वत:चा असा एक मानदंड आहे की, जो एकाचवेळी विश्वात्मक आहे आणि व्यक्तिगत असाही आहे. शाश्वत धर्म, हा नेहमीच भारताचा आधार राहिलेला आहे; तो चिरस्थायी असून भारतामध्ये अंगभूत आहे; अशा परिवर्तनशील आणि बहुरूप धारण करणाऱ्या गोष्टीला आपण हिंदुधर्म म्हणतो.

जिथे तुम्ही एखाद्या खडकामध्ये रुतून बसणाऱ्या शिंपल्यासारखे चिकटून राहता, तो धर्म असत नाही; धर्म म्हणजे काय हे समजून न घेता, न पाहता त्यात उडी मारणे हाही धर्म असू शकत नाही.

शाश्वत धर्म म्हणजे आपल्या आंतरिक जीवनामध्ये आणि आपल्या बाह्य अस्तित्वामध्ये, तसेच व्यक्तीप्रमाणेच समाजातदेखील ईश्वराचा साक्षात्कार करून घेणे होय. ‘एशा धर्म: सनातन:।’

…..ईश्वर जो मूलतः सच्चिदानंद आहे, त्याचे आविष्करण म्हणजे सत्य, प्रेम, शक्ती होय. जे काही सत्याला आणि वस्तुतत्त्वाला धरून आहे, सुसंगत आहे, ज्या कोणत्या गोष्टीमुळे माणसांमधील प्रेम वाढीस लागते, ज्या कोणत्या गोष्टीमुळे व्यक्तीमध्ये, राष्ट्रामध्ये, वंशामध्ये सामर्थ्य निर्माण होते त्या गोष्टी दैवी होत, हा आहे शाश्वत धर्म आणि हे हिंदु शास्त्र आहे.

एवढे मात्र लक्षात घ्यायला हवे की, ईश्वर हा त्रिमुखी सुमेळ आहे, तो एकमुखी नाही. आपल्या प्रेमाने आपल्याला दुबळे, अंध वा अविवेकी बनविता उपयोगी नाही; आपल्या शक्तिसामर्थ्याने आपल्याला कठोर व कोपिष्ट बनविता कामा नये; आपल्या तत्त्वांनी आपल्याला धर्मांध वा भावविवश बनविता कामा नये.

आपण शांतपणे, धीराने, नि:पक्षपातीपणे विचार करूया; आपण पूर्णपणे, तीव्रतेने पण विवेकीपणे प्रेम करूया; आपण सामर्थ्य, उमदेपणा आणि शक्तीनिशी कार्य करूया. असे करूनसुद्धा जर का आपल्याकडून चुका घडल्याच, तरीही ईश्वर मात्र चूक करत नाही. आपण ठरवितो आणि कृती करतो; ईश्वर त्याचे फळ ठरवितो आणि तो जे काही ठरवितो ते कल्याणकारीच असते.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 53-54)

दिव्य पावित्र्य, विशालता, प्रकाश, स्वातंत्र्य, सत्ता, सामर्थ्य, आनंद, प्रेम, मांगल्य, ऐक्य, सौंदर्य या गुणांची आम्हांमध्ये वाढ होण्यास साह्यभूत होणारे जे काही, ते म्हणजे धर्म होय.

या धर्माच्या विरुद्ध त्याची छाया म्हणजे धर्मनिषेध हा सतत उभा असतो. वरील दिव्य गुणांच्या वाढीला विरोध करणारे, या वाढीचा नियम न मानणारे सर्व काही धर्माच्या विरुद्ध उभे असते.

आपल्यातील दिव्य मूल्यांचे रहस्य जी वस्तु स्वत:च्या ठिकाणी दाबून ठेवीत आहे, प्रकट करू इच्छित नाही, जी उलट, विकृतीचे आणि विरोधाचे रूप घेत आहे, अशुद्धता, संकुचितता, दास्य, अंधकार, दुबळेपणा, दुष्टपणा, विसंवाद, दुःख, भेद आणि दुही यांचे रूप घेऊन जी पुढे होत आहे, जी वस्तु किळसवाण्या रानटी स्वरूपाची आहे, थोडक्यात जे काही, प्रगतिशील मानव प्रगती करताना, मागे टाकून देणेच भाग आहे ते सर्व, वर सांगितलेल्या धर्माच्या विरुद्ध उभे असते. धर्माच्या विरुद्ध उभे असणारे जे काही, त्याला अधर्म असे नाव आहे.

अधर्म हा धर्मावर मात करण्याचा प्रयत्न करीत असतो, धर्माला मागे ओढण्याचा, खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतो. अधर्म म्हणजे प्रतिगामी शक्ती होय. पाप, अज्ञान, अंधार यांचा उठाव अधर्मांतून होतो. धर्म आणि अधर्म यांजमध्ये सतत झगडा चालू असतो. कधी अधर्म विजयी होतो, कधी धर्म विजयी होतो. कधी उन्नतीच्या शक्ती सत्ता गाजवतात, कधी अवनतीच्या शक्ती सत्ता गाजवतात.

वेदांमध्ये वरील गोष्टी देव आणि दानव ह्या प्रतिकांद्वारे व्यक्त झाल्या आहेत. प्रकाशाचे व अनंताचे पुत्र आणि अंधाराची व भेदात्मकतेची मुले ह्यांच्यातील हा झगडा आहे.

ह्याच त्या गोष्टी आहेत ज्यामधून, अवतारासाठी आवश्यक अशी परिस्थिती आणि अवताराचे कार्य निर्धारित होते.

– श्रीअरविंद
(CWSA 19 : 171-172)

धर्म ह्या शब्दाला नैतिक व व्यावहारिक, नैसर्गिक व तत्त्वज्ञानात्मक आणि धार्मिक व आध्यात्मिक असे अर्थ आहेत; तसेच, हा शब्द वरील अर्थांपैकी केवळ एकाच अर्थाने, जसे की केवळ नैतिक अर्थाने, केवळ तात्विक अर्थाने किंवा केवळ धार्मिक अर्थानेदेखील वापरला जाऊ शकतो.

उदा. नैतिक दृष्टीने पाहिले असता, ‘सद्वर्तनाचा, नीतिमान वर्तनाचा नियम’ असा धर्म या शब्दाचा अर्थ होतो; किंवा अधिक बाह्य व व्यावहारिक दृष्टीने पाहिले असता, ‘सामाजिक आणि राजकीय न्याय’ किंवा ‘फक्त सामाजिक नियमांचे पालन’ असा धर्म या शब्दाचा अर्थ होतो.

धर्माच्या भारतीय संकल्पनेत केवळ चांगले, योग्य, नैतिक, न्याय्य या बाबींचाच समावेश होतो असे नाही. दिव्य तत्त्वाच्या अंगाने विचार करता, माणसाचे इतर जीवांशी, निसर्गाशी, ईश्वराशी जे सर्व नातेसंबंध असतात, त्या साऱ्यांचे नियमन करणारा धर्म असतो. दिव्य तत्त्वाची अभिव्यक्ती विविध रूपांद्वारे, आंतरिक व बाह्य जीवनाच्या रूपांद्वारे, कृतीच्या कायद्यांच्या माध्यमातून होत असते. जगातील या सर्व प्रकारच्या नातेसंबंधांची सुव्यवस्था लावण्याचे कामदेखील धर्म करीत असतो.

धर्म हा शब्द दोन्ही अर्थाने घेता येतो – एक म्हणजे आपण ज्याला धरून राहतो तो धर्म आणि दुसरा अर्थ आपल्या आंतरिक व बाह्य कृतींची जो धारणा करतो तो धर्म !

धर्म शब्दाचा मूळ अर्थ, आमच्या प्रकृतीचा मूलभूत, पायाभूत नियम; आमच्या सर्व क्रियांचा गुप्त आधार व आलंबन असणारा आमच्या प्रकृतीचा पायाभूत नियम असा आहे. या अर्थाने प्रत्येक भूतमात्राला, प्रत्येक जीवप्रकाराला, जीवजातीला, व्यक्तीला, समूहाला त्याचा त्याचा धर्म असतो.

धर्माचा दुसरा अर्थ, आमच्यात जी दिव्य प्रकृती विकसित व व्यक्त व्हावयाची असते ती, ज्या आंतरिक व्यापारांनी आम्हामध्ये विकसित होते, त्या व्यापारांचा नियम असा आहे.

धर्म म्हणजे असा कायदा होय की, ज्यायोगे आमचे बाह्य विचार, कृती व आमचे परस्परांशी असलेले सर्व संबंध यांचे नियमन केले जाते. ह्या नियमनामुळे दिव्य आदर्शाच्या दिशेने आमचा स्वत:चा विकास आणि आमच्या मानववंशाचा विकास होण्यास साहाय्य होते.

धर्म न बदलणारा असतो, शाश्वत असतो असे सामान्यत: म्हणण्यात येते. धर्माचे मूलतत्त्व, धर्माचा आदर्श ही शाश्वत आणि अपरिवर्तनीय वस्तु आहे हे खरे आहे; पण धर्माचे विशिष्ट विचार व आचार नित्य बदलणारे, नित्य विकास पावणारे असतात. कारण, अद्यापि मानवाला आदर्श धर्म सापडलेला नाही किंवा मानव अद्यापि आदर्श धर्माला धरून वागत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा आदर्श धर्माच्या प्राप्तीसाठी मानव कमीअधिक पूर्णतेने तळमळत आहे, धडपडत आहे. अशा आदर्श धर्माचे त्याला अधिकाधिक ज्ञान होत आहे व तो अशा धर्माचे आचरण अधिकाधिक प्रमाणात पसंत करू लागला आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 19 : 171-172)

ज्याला आपण शाश्वत धर्म असे म्हणतो तो धर्म आहे तरी काय? तो एवढ्यासाठी हिंदु धर्म आहे कारण हेच की हिंदु राष्ट्रामध्ये त्याचे जतन झाले आहे. समुद्र आणि हिमालय ह्यांनी वेढल्यामुळे अलग झालेल्या ह्या द्विपकल्पातच त्याचा उदय झाला आणि त्याचे शतकानुशतके जतन करण्याची जबाबदारी या प्राचीन पुण्यभूमीतच आर्यांकडे देण्यात आली. पण हा शाश्वत धर्म कोणत्याही एका देशापुरताच मर्यादाबद्ध करण्यात आलेला नाही, तो जगातील अमुक एखाद्या नेमक्या ठरावीक भागापुरता व सदा सर्वकाळासाठी बांधला गेलेला नाही.

ज्याला आपण हिंदुधर्म म्हणतो तो खरोखर शाश्वत धर्मच आहे. ह्याचे कारण, तो असा एक विश्वात्मक धर्म आहे की ज्याने इतर सर्वांना कवेत घेतले आहे. जर एखादा धर्म विश्वात्मक नसेल तर तो शाश्वत असूच शकणार नाही. जो धर्म संकुचित आहे, एखाद्या विशिष्ट लोकांचा अगर पंथाचा आहे, जो मर्यादित स्वरूपाचा आहे, असा धर्म मर्यादित कालापर्यंतच टिकेल; व ठरावीक हेतु अगर कार्य या पुरताच अस्तित्वात राहील.

विज्ञानाने लावलेल्या शोधांची आणि तत्त्वज्ञानाच्या भाकितांची अगोदरच अटकळ बांधून, आणि त्यांचा स्वत:मध्ये समावेश करून घेत, जडवादावर मात करू शकेल असा हा एकच धर्म आहे.

ईश्वराचे सान्निध्य मानवजातीवर ठसवू पाहणारा आणि ईश्वराप्रत पोहोचण्याचे मानवाचे जेवढे म्हणून मार्ग आहेत त्या सर्वांना आपल्या कवेत कवळू पाहणारा हा एकच धर्म आहे.

ईश्वर हा सर्व मानवजातीत, वस्तुमात्रांत आहे; ईश्वरातच आपण आपले सर्व व्यवहार करतो व ईश्वराशिवाय आपणास अस्तित्व नाही; हे सत्य सर्व धर्म जाणतात पण हिंदुधर्म हा एकच असा धर्म आहे की जो हरघडी, दरक्षणी केवळ ह्याच सत्यावर भर देतो.

हा असा एकच धर्म आहे की, जो आपल्याला केवळ सत्य समजावून देऊन त्याविषयी विश्वास बाळगण्यासाठीच सक्षम करत नाही तर, त्या सत्याची आमच्या अस्तित्वाच्या सर्व अंगांना साक्षात अनुभूती यावी यासाठीदेखील तो आम्हाला सक्षम करतो.

हा असा एकच धर्म आहे की, जो जगाला, जग काय आहे हे दाखवून देतो, जग ही वासुदेवाची लीला आहे हे तो दाखवून देतो. या लीलेचे सूक्ष्मतम कायदे, त्याचे उदात्त नियम काय आहेत हे तो दाखवतो आणि या लीलेमध्ये आपण आपली भूमिका सर्वोत्तमपणे कशी पार पाडू शकतो हेही तो दाखवतो.

हिंदुधर्म हा असा एकमेव धर्म आहे की, ज्याने जीवनाच्या अगदी लहानात लहान भागाची देखील धर्माशी फारकत होऊ दिलेली नाही. हा धर्म अमरत्व काय आहे हे जाणतो. ह्या धर्माने आमच्यामध्ये असणारी मृत्यूची वास्तविकताच पूर्णत: पुसून टाकली आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 08 : 11-12)