प्रश्न : चेतना म्हणजे काय?

श्रीमाताजी : अनेक स्पष्टीकरणांपैकी एकाची निवड करावयाचा मी प्रयत्न करते. गंमतीदाखल म्हणायचे तर, अचेतनेच्या विरोधी जी असते ती चेतना. दुसरे एक स्पष्टीकरण…

विश्वाचे सृजनात्मक सत्त्व म्हणजे चेतना. चेतनेविना हे ब्रह्मांड नाही; कारण चेतना म्हणजे उत्पत्ती. चेतना म्हणजे जे आहे ते सर्व. कारण चेतनेविना काहीच नाही – हे उत्तम स्पष्टीकरण आहे. चेतनेविना जीवन नाही, प्रकाश नाही, उत्पत्ती नाही, सृष्टी नाही, ब्रह्मांड नाही. चेतना ही सर्व निर्मितीचे मूळ आहे. चेतना नाही तर निर्मिती नाही, सृष्टी नाही.

आपण ज्याला ‘जाणीव’ असे संबोधतो तिचा परमोच्च चेतनेशी फारच दूरान्वयाने संबंध आहे, त्यामध्ये कोणताही नेमकेपणा, निश्चितपणा नाही. जर म्हणावयाचेच झाले तर ते प्रतिबिंब आहे असे म्हणता येईल; पण ते मूळ चेतनेचे यथार्थ किंवा शुद्ध प्रतिबिंब नव्हे. ज्याला आपण आपली जाणीव असे म्हणतो ती म्हणजे मूळ चेतनेचे व्यक्तिरूप आरशामध्ये पडलेले धूसर असे प्रतिबिंब आहे. (कधी धूसर तर कधी विरूप.) ह्या प्रतिबिंबाच्या आधारे, सावकाशपणे मागे जात जात, जे प्रतिबिंबित झाले आहे त्याच्या मुळाशी, उगमाशी आपण गेलो तर आपण त्या सत्य चेतनेच्या संपर्कात येऊ शकतो.

आणि एकदा का आपण त्या सत्य-चेतनेच्या संपर्कात आलो की, मग आपल्याला जाणीव होते की, ती सत्य-चेतना सर्वत्र सारखीच आहे, केवळ विरूपीकरणामुळे तिच्यामध्ये भेद उत्पन्न होतात. जर विरूपीकरण नसेल तर सर्वकाही त्या एकाच आणि एकमेव चेतनेमध्ये सामावलेले आहे. म्हणजेच असे की, या विपर्यासातून, विपर्यास करणाऱ्या आरशातील प्रतिबिंबातूनच चेतनेमधील विभिन्नता आणि भेदाभेद निर्माण होतात, अन्यथा ती एकच एक अशी चेतना आहे. पण व्यक्ती ह्या साऱ्या गोष्टी फक्त अनुभवानेच जाणू शकते.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 233-34)

श्रीमाताजी