Tag Archive for: तत्त्वज्ञान

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ०८

हठयोगाचे उद्दिष्ट

शुद्ध हठयोग हा शरीराच्या माध्यमातून परिपूर्णत्व गाठण्याचे साधन आहे. त्याच्या प्रक्रिया ह्या शारीरिक, तणावयुक्त, अवाढव्य, जटिल आणि अवघड असतात. आसन, प्राणायाम आणि शरीराची शुद्धी या गोष्टी त्याच्या केंद्रस्थानी असतात. आधुनिक किंवा मिश्रित हठयोगामध्ये आसनांची संख्या मर्यादित झाली आहे; पण तरीसुद्धा ती आसने पुष्कळ आणि वेदनादायी आहेत. प्राचीन किंवा शुद्ध हठयोगामध्ये तर त्यांची संख्या अगणित होती आणि पूर्वीचे हठयोगी ती सर्व आसने करत असत. आसन म्हणजे शरीराची एक विशिष्ट अशी स्थिती होय. आणि ती सुयोग्य स्थिती असते किंवा त्यावर विजय मिळविलेली अशी स्थिती असते. तांत्रिक भाषेत बोलावयाचे झाले तर, मनुष्य जेव्हा कितीही तणावयुक्त किंवा वरकरणी पाहता अशक्य अशा एका स्थितीमध्ये, शरीराला त्या ताणाची जाणीव होऊ न देता, हटातटाने काहीही करावे न लागता, जेव्हा अनिश्चित काळपर्यंत राहू शकतो; तेव्हा त्याने त्या आसनावर विजय मिळविला आहे, असे म्हटले जाते. आसनांचे पहिले उद्दिष्ट ‘शरीरजय’ हे असते. कारण शरीर दिव्य बनण्यापूर्वी शरीरावर विजय मिळविणे आवश्यक असते. शरीराने प्रभुत्व गाजविता कामा नये तर, शरीरावर प्रभुत्व गाजविता यायला हवे, ह्या दृष्टीने हा शरीरजय आवश्यक असतो…

– श्रीअरविंद
(CWSA 01 : 504-505)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ०७

विश्व हा भ्रम आहे, विश्व मिथ्या आहे या मताशी मी सहमत नाही. ब्रह्म हे जसे विश्वातीत केवलतत्त्वामध्ये आहे तसेच ते येथेही आहे. जे अज्ञान आपल्याला अंध बनविते आणि आपल्या अस्तित्वाचे सत्य स्वरूप ओळखण्यास तसेच, या विश्वामध्ये असणाऱ्या व विश्वाच्या अतीतही असणाऱ्या ब्रह्माचा साक्षात्कार करून घेण्यास प्रतिरोध करते अशा अज्ञानावर मात केली पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 329)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ०५

 

योग म्हणजे ऐक्य. मानवी आत्म्याचे सर्वोच्च आत्म्याशी ऐक्य आणि मानवजातीच्या सद्यस्थितीतील प्रकृतीचे शाश्वत, परम किंवा ईश्वरी प्रकृतीशी ऐक्य, हे योगाचे समग्र उद्दिष्ट आहे.

जेवढे हे ऐक्य महान, तेवढा तो योग महान आणि जेवढे हे ऐक्य परिपूर्ण, तेवढा तो योग परिपूर्ण.

….जो योग जगतातील ईश्वराचा स्वीकार करतो, जो योग सर्व जीवांमध्ये एकत्व पाहतो, जो योग मानवजातीशी ऐक्य साधतो आणि जो योग हे जीवन आणि अस्तित्व ईश्वरी चेतनेने भरून टाकतो आणि जो योग कोणा एका मनुष्याला व्यक्तिशः नव्हे, तर संपूर्ण मानववंशालाच समग्र परिपूर्णतेच्या दिशेने घेऊन जातो, तो योग ‘पूर्ण योग’ होय.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 334-335)

 

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ०४

योग हे असे एक साधन आहे की, ज्याद्वारे आंतरिक साधनेच्या माध्यमातून व्यक्ती वस्तुमात्रांमागील सत्याशी एकत्व पावण्याप्रत येऊन पोहोचते; त्याद्वारे आपल्याला, बहिर्वर्ती आणि व्यक्त जाणिवेकडून आंतरिक आणि सत्य जाणिवेप्रत घेऊन जाण्यात येते. योग-चेतना (Yoga Consciousness) ही बाह्य, व्यक्त विश्वाचे ज्ञान वगळत नाही तर उलट, ती विश्वाकडे अंतर्दृष्टीने पाहते, ती त्याकडे बाह्य दृष्टीने पाहत नाही किंवा त्याचा बाह्यात्कारी अनुभवही घेत नाही. योग-चेतना आंतरिक सखोल, महत्तर, सत्यतर चेतनेच्या प्रकाशात बाह्य विश्वाला त्याचे योग्य ते मूल्य प्रदान करते, त्यात बदल घडविते. आणि त्याला सदवस्तुचा कायदा लागू करते; प्राणिमात्रांच्या अज्ञानी कायद्याच्या जागी ईश्वरी संकल्प आणि ज्ञानाचा कायदा प्रस्थापित करते. जाणिवेमधील (Consciousness) बदल हाच योगप्रक्रियेचा समग्र अर्थ होय.

*

योग हे एक शास्त्र आहे, ती एक प्रक्रिया आहे; योग हा एक प्रयास आणि कर्म आहे. ज्यायोगे, मनुष्य त्याच्या सामान्य मानसिक जाणिवेच्या मर्यादा उल्लंघून, अधिक विशालतर अशा आध्यात्मिक चेतनेप्रत जाण्याचा प्रयत्न करतो.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 327)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ०३

 

आत्मविलोपन (self-annulment) नव्हे, तर आत्मपरिपूर्णत्व (self-perfection) हेच आपल्या योगाचे उद्दिष्ट आहे.

योग्याला वाटचाल करण्यासाठी दोन मार्ग योजलेले आहेत. एक मार्ग म्हणजे या विश्वापासून सुटका करून घेणे आणि दुसरा मार्ग म्हणजे या विश्वामध्येच परिपूर्णत्व प्राप्त करून घेणे. पहिला मार्ग हा वैराग्याद्वारे येतो आणि दुसरा मार्ग हा तपस्येद्वारे सिद्ध होतो. जेव्हा आपण या जीवनातून ईश्वर गमावतो तेव्हा आपल्याला पहिला मार्ग मिळतो; जेव्हा आपण ईश्वरामध्येच ह्या जीवनाचे परिपूर्णत्व प्राप्त करून घेतो, तेव्हा दुसरा मार्ग साध्य होतो… आपला मार्ग हा परिपूर्णत्वाचा मार्ग असावा, परित्यागाचा नसावा. युद्धामध्ये विजय हे आपले ध्येय असावे, सर्व संघर्षांपासून पलायन हे आपले ध्येय असता कामा नये.

हे जग मूलतः मिथ्या आहे, दुःखी आहे असे बुद्ध आणि शंकराचार्य मानत असत आणि त्यामुळे या जगापासून सुटका हाच त्यांच्या दृष्टीने एकमेव विवेक होता. परंतु हे विश्व म्हणजे ब्रह्म आहे, हे विश्व म्हणजे देव आहे, हे विश्व म्हणजे सत्य आहे, हे विश्व म्हणजे आनंद आहे. आपल्या मानसिक अहंकाराच्या माध्यमातून या विश्वाचे चुकीचे आकलन झाल्याने, आपल्याला विश्व मिथ्या वाटू लागते आणि या विश्वामध्ये देवाशी असणारे आपले नाते चुकीच्या पद्धतीने निर्माण झाल्याने, हे विश्व म्हणजे दु:खभोग आहे असे आपल्याला वाटू लागते. परंतु असे वाटणे यासारखे दुसरे कोणतेही मिथ्यत्व नाही आणि यासारखे दुःखाचे दुसरे कोणते कारणही नाही.

*

आपण भेदाच्या जागी ऐक्य, अहंकाराच्या जागी दिव्य चेतना, अज्ञानाच्या जागी दिव्य प्रज्ञा, विचारांच्या जागी दिव्य ज्ञान आणि दुर्बलता, संघर्ष आणि प्रयास यांच्या जागी आत्मतृप्त दिव्य शक्ती प्रस्थापित करायला हवी. दुःखभोग व खोटी मौजमजा यांच्या जागी दिव्य आनंद प्रस्थापित करायला हवा.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 96,101)

 

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ०२

जो बंधनांपासून मोकळा असतो, तो बंधमुक्त असतो, तो मुक्त असतो. परंतु मुक्तीची आस हेच एक स्वयमेव असे अखेरचे बंधन आहे; जीव परिपूर्णतया मुक्त होण्यापूर्वी त्याने ह्या बंधनाचा देखील त्याग केला पाहिजे. कोणीच बद्ध नसतो, कोणीच मुक्तीचा इच्छुक नसतो, तर आत्मा हा कायमच आणि परिपूर्णपणे मुक्तच असतो, बंधन हा भ्रम आहे आणि बंधनापासून मुक्ती हा सुद्धा एक भ्रमच आहे, याचा साक्षात्कार होणे हेच अंतिम ज्ञान होय.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 06)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ०१

श्रीअरविंदप्रणित पूर्णयोग’ हा सर्व पारंपरिक योगांचा समन्वय आहे आणि त्याहूनही अधिक असे काही त्यामध्ये आहे. हा समन्वय करताना, पारंपरिक योगमार्गांचे स्वतः आधी अनुसरण करून, तसे प्रयोग करून, श्रीअरविंदांनी त्याआधारे प्रत्येक पारंपरिक योगामधील बलस्थानं आणि त्यांच्या मर्यादा स्वतः ज्ञात करून घेतल्या. पारंपरिक योगमार्गांच्या आधारे व्यक्ती आंशिक साक्षात्कारापर्यंत जाऊन पोहोचते, परंतु पूर्ण साक्षात्काराप्रत जाण्यासाठी त्या पारंपरिक योगमार्गांमधील क्रियाप्रकियांना जो नवीन अर्थ, जो नवीन संदर्भ प्राप्त करून द्यावा लागतो, तो नवीन अर्थ, नवीन संदर्भ नेमका कोणता, तो श्रीअरविंदांनी त्यांच्या लेखनातून स्पष्ट केला आहे. विशेषतः त्यांच्या ‘Synthesis of Yoga’ या ग्रंथामध्ये पारंपरिक योग, त्यांची बलस्थाने आणि त्यांच्या मर्यादा यांचा खूप सविस्तर धांडोळा घेण्यात आला आहे. श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या या शिकवणीतील अंशभागाचा समावेश, आजपासून सुरु होणाऱ्या ‘पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग’ या मालिकेत केला आहे.

धन्यवाद
संपादक, अभीप्सा मराठी मासिक

मी आंतरिक सत्य, प्रकाश, सुमेळ आणि शांती यांचे काहीएक तत्त्व, पृथ्वीचेतनेमध्ये आणू पाहत आहे. उर्ध्वस्थित असलेले ते मला दिसत आहे आणि ते काय आहे हे मला माहीत आहे. जाणिवेमध्ये उतरू पाहणारी त्याची तेज:प्रभा मी सातत्याने अनुभवत आहे.

आज मानवाची प्रकृती अर्धप्रकाश, अर्धअंधकार अशा दशेत आहे; त्याने त्याच दशेमध्ये राहण्यापेक्षा, मानवाने समग्र अस्तित्वच, त्या सत्य-तत्त्वाने स्वत:च्या अंगभूत शक्तीमध्ये सामावून घ्यावे आणि त्या सत्य-तत्त्वाला हे शक्य व्हावे म्हणून मी झटत आहे. या पृथ्वीवरील अंतिम उत्क्रांती असे जिला म्हणता येईल, अशी उत्क्रांती म्हणजे दिव्य चेतनेचा विकास; आणि तो विकास घडून येण्यासाठीचा मार्ग या सत्य-तत्त्वाच्या अवतरणाने खुला होईल, अशी मला खात्री आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 35 : 281)

जीवनाकडे आणि योगाकडे योग्य दृष्टिकोनातून पाहिल्यास असे आढळून येते की, सर्व जीवन हे योगच आहे. मग ते पूर्ण जाणीवपुर:सर असो किंवा अर्ध-जाणिवेचे असो. “व्यक्तीमध्ये सुप्त असलेल्या क्षमतांच्या आविष्करणाद्वारे, आत्मपूर्णत्वाच्या दिशेने चाललेला पद्धतशीर प्रयत्न” असा ‘योग’ या संकल्पनेचा आमचा अर्थ आहे.

या प्रयत्नांमध्ये विजय प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक असलेली उच्चतम अट म्हणजे, मानवामध्ये आणि विश्वामध्ये अंशतः आविष्कृत झालेल्या विश्वात्मक आणि विश्वातीत अस्तित्वाशी मानवी व्यक्तीचे ऐक्य, ही होय. जीवनाच्या सर्व दृश्य रुपांच्या पाठीमागे आपण नजर टाकली तर असे दिसून येईल की, हे जीवन म्हणजे प्रकृतीचा एक व्यापक योग आहे. स्वत:मधील विविध शक्ती सतत वाढत्या प्रमाणात प्रकट करत, स्वत:चे पूर्णत्व गाठण्यासाठी आणि स्वत:च्या दिव्य सत्य स्वरूपाशी एकत्व पावण्यासाठी, प्रकृती चेतन आणि अर्ध-चेतनामध्ये हा जीवनरूपी योग अभ्यासत आहे.

मानव हा प्रकृतीचा विचारशील घटक आहे; त्याच्याद्वारे प्रकृतीने, आत्मजाणीवयुक्त साधनांचा आणि कृतींच्या संकल्पयुक्त व योजनाबद्ध व्यवस्थेचा, या पृथ्वीवर प्रथमच वापर केला आहे, जेणेकरून तिचा हा महान हेतू अधिक वेगाने आणि प्रभावीपणे साध्य व्हावा. स्वामी विवेकानंद यांनी म्हटल्याप्रमाणे, व्यक्तीने आपल्या पार्थिव जीवनामध्ये, स्वत:ची विकासप्रक्रिया शीघ्रतेने एकाच जन्मात, किंबहुना काही वर्षांमध्येच, वा काही महिन्यांमध्येच साध्य करून घेण्याचे एक साधन म्हणजे ‘योग’ होय. प्रकृती तिच्या ऊर्ध्वगामी दिशेने चाललेल्या या प्रयासामध्ये ज्या साधारण पद्धती अगदी सैलपणे, विपुलपणे आणि आरामशीर पद्धतीने, रमतगमत, सढळपणे उपयोगात आणत असते, त्यामध्ये वरकरणी पाहता, द्रव्याचा आणि ऊर्जेचा अपव्यय दिसत असला तरी त्यातून ती अधिक परिपूर्ण अशी संगती लावत जात असते, त्याच पद्धती योगामध्ये अधिक आटोपशीरपणे, अधिक तीव्रतेने, अधिक ऊर्जापूर्ण रीतीने उपयोगात आणल्या जातात. योगाची एखादी विशिष्ट प्रणाली म्हणजे त्या पद्धतींपैकी एका पद्धतीची निवड वा दाबयुक्त संकोचन (compression) याशिवाय दुसरे तिसरे काही असत नाही. योगाविषयी हा दृष्टिकोन बाळगला तर आणि तरच, विविध योगपद्धतींच्या तर्कशुद्ध समन्वयास बळकट अधिष्ठान लाभू शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 06)

मानसिक परिपूर्णत्व – १९

 

ईश्वराप्रत जाण्याचा ध्यान हा एक मार्ग आहे, तो महान मार्ग आहे; पण तो जवळचा मार्ग आहे, असे म्हणता येणार नाही. कारण तो खूप उच्च स्तरावर घेऊन जाणारा असला, तरीही तो बहुतेकांसाठी खूप लांबचा आणि अवघड मार्ग असतो. जर त्यामुळे अवतरण घडून आले नाही तर, तो जवळचा मार्ग आहे असे कदापिही म्हणता येणार नाही आणि तेव्हासुद्धा, म्हणजे अवतरण घडून येते तेव्हासुद्धा लवकर होते ती फक्त पायाभरणीच! नंतर त्या पायावर ध्यानाच्या आधारे, मोठ्या परिश्रमाने एक भली मोठी इमारत उभारावी लागते. हे अगदी अनिवार्य आहे, पण ह्याला जवळचा मार्ग असे म्हणता येईल, असे त्यात काही नाही.

कर्म हा तुलनेने बराच साधासरळ मार्ग आहे – परंतु, त्यामध्ये व्यक्तीचे मन ईश्वराला वगळून, फक्त कर्मावरच खिळलेले असता कामा नये. ईश्वर हे साध्य असले पाहिजे आणि कर्म हे केवळ एक साधन असले पाहिजे. काव्यादींचा उपयोग आपल्या आंतरिक अस्तित्वाच्या संपर्कात येण्यासाठी असतो आणि त्या संपर्काचा उपयोग आपल्या आंतरतम अस्तित्वाच्या थेट संपर्कात येण्यासाठी तयारी म्हणून होतो, पण व्यक्तीने तेथेच थांबता कामा नये, व्यक्तीने सद्वस्तुपर्यंत जाऊन पोहोचायला हवे. जर व्यक्ती स्वतःला साहित्यिक किंवा कवी, चित्रकार समजत असेल आणि साहित्य साहित्यासाठी, कला कलेसाठीच असे मानत असेल तर, ही काही योगिक वृत्ती नाही. आणि म्हणूनच मी कधीकधी असे म्हणत असतो की, आपले काम हे योगी बनणे आहे; केवळ कवी, चित्रकार बनणे हे नाही.

प्रेम, भक्ती, समर्पण, चैत्य खुलेपणा हे ईश्वराप्रत पोहोचण्याचे सर्वात जवळचे मार्ग आहेत किंवा असू शकतात. कारण प्रेम आणि भक्ती ह्या गोष्टी जर जास्त प्राणप्रधान असतील तर, हर्षभरित अपेक्षा आणि विरह, अभिमान आणि नैराश्य या गोष्टींमध्ये दोलायमान स्थिती होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे हा मार्ग जवळचा न राहता, दूरवरचा, वळणावळणाचा होतो. ईश्वराकडे धाव घेण्याऐवजी, थेट झेपावण्याऐवजी, एखादा स्वतःच्या अहंकाराच्या भोवती भोवती घोटाळत राहण्याची शक्यता असते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 212)