Tag Archive for: साधना

(श्रीमाताजी जाणीव विशाल कशी करावी ह्या संबंधीचे मार्गदर्शन करत आहेत..)
अजून एक मार्ग आहे. तो म्हणजे पृथ्वीवरील सर्व गोष्टींशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणे. उदाहरणार्थ, जेव्हा एखाद्या गोष्टीविषयीचा तुमचा दृष्टिकोन संकुचित असतो आणि दुसऱ्यांचा दृष्टिकोन आणि त्यांची धारणा यामुळे तुम्ही दुखावले जाता, तेव्हा तुम्ही तुमची जाणीव बदलून ती दुसऱ्याच्या ठिकाणी केंद्रित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि इतरांच्या विचार करण्याच्या भिन्नभिन्न पद्धतींशी एकरूप होण्याचा हळूहळू प्रयत्न केला पाहिजे.

पण हा मार्ग… काहीसा धोक्याचा आहे. कारण दुसऱ्यांच्या विचारांशी आणि इच्छांशी एकरूप होणे म्हणजे त्यांच्या ढीगभर मूर्खपणाशी व वाईट इच्छांशी एकरूप होण्यासारखे आहे. (श्रीमाताजी हसतात.) आणि त्याचे असे काही परिणाम होऊ शकतात की, जे तितकेसे इष्ट नसतात. तरीसुद्धा काही लोक हे सहजपणे करत असतात. उदाहरणार्थ, ज्यावेळी त्यांचा दुसऱ्यांशी मतभेद होतो, तेव्हा ते आपली जाणीव विशाल करण्यासाठी दुसऱ्यांच्या ठिकाणी आपण आहोत असे समजण्याचा प्रयत्न करतात आणि त्या गोष्टींकडे स्वत:च्या दृष्टिकोनातून नव्हे, तर दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून पाहाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांची जाणीव विशाल होते; पण मी आधी सांगितलेल्या पद्धतींमुळे जाणीव जेवढी विशाल होते, तेवढी ती या पद्धतीमुळे होत नाही. त्या पद्धती अधिक निरुपद्रवी असतात. त्या पद्धतींनी तुम्हाला काही अपाय होत नाही, तर त्यांचा तुम्हाला लाभच अधिक होतो. त्या पद्धती तुम्हाला अधिक शांत करतात.

जाणीव व्यापक करण्याचे बौद्धिक मार्गही बरेच आहेत. जेव्हा तुम्ही कशाने तरी कंटाळला असाल, जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला दुःखदायक किंवा अत्यंत अप्रिय वाटत असेल, तेव्हा जर तुम्ही कालाच्या अनंततेचा किंवा अवकाशाच्या असीमतेचा विचार करायला लागलात, जे काही आत्तापर्यंत घडून गेलेले आहे व जे काही पुढे घडणार आहे त्या सगळ्याचा विचार करायला लागलात आणि अनंत काळातील हा क्षण म्हणजे जणू काही ‘आला क्षण, गेला क्षण’ असा आहे हे जर तुम्हाला जाणवले तर मग या अनंत काळाच्या तुलनेत, अशा एखाद्या गोष्टीने अस्वस्थ होणे हे तुम्हाला अगदीच किरकोळ, हास्यास्पद वाटू लागते. अशी गोष्ट इतकी नगण्य ठरते की, तिची जाणीव होण्याइतका सुद्धा वेळ नसतो, तिला काही स्थान नसते, महत्त्व नसते कारण खरोखर अनंत काळाच्या अनंततेमध्ये एक क्षण तो काय?… तुमच्या जर हे लक्षात येऊ शकले आणि ते जर तुम्ही डोळ्यासमोर आणू शकलात, तुम्ही जर असे चित्र रंगवू शकलात की, आपण किती लहानशी व्यक्ती आहोत, आपण ज्या पृथ्वीवर आहोत ती सुद्धा किती लहान आहे आणि जाणिवेतील एक क्षण, जो तुम्हाला आत्ता दुखावतो आहे किंवा अप्रिय वाटतो आहे, तो सुद्धा तुमच्या जीवनातील एक लहानसा क्षण आहे; तसेच तुम्ही पूर्वी काय काय होतात आणि पुढे काय काय व्हाल ते आणि आत्ता जी गोष्ट तुमच्या मनावर परिणाम करत आहे ती, कदाचित दहा वर्षानंतर तुम्ही पूर्णपणे विसरूनही जाल किंवा तुम्हाला त्याची आठवण झाली तर तुम्ही म्हणाल, ‘मी त्या गोष्टीला इतके महत्त्व कसे दिले?”… हे सगळे मुळात जर तुम्हाला जाणवू शकले आणि नंतर तुम्हाला तुमच्या खुज्या व्यक्तित्वाची जाणीव झाली तर.. आणि हे व्यक्तित्वसुद्धा कसे? तर अनंत काळांतील जणू एखादा क्षण. नाही नाही, क्षणाइतकेही नाही, कळणारही नाही इतका क्षणाचाही अंशभाग म्हणावे असे तुमचे व्यक्तित्व आहे, ह्याची जाणीव तुम्हाला झाली तर?

जर तुम्हाला अशीही जाणीव झाली की, हे सबंध जग यापूर्वीही आविष्कृत झाले आहे आणि यापुढेही अनंत काळपर्यंत आविष्कृत होत राहणार आहे; समोर, पाठीमागे, सर्व बाजूंनी… तर तुम्हाला एकदम असे वाटू लागेल की तुमच्या बाबतीत जे काय घडले आहे, त्याला इतके महत्त्व देणे हे किती हास्यास्पद आहे!… खरोखरीच तुम्हाला असे वाटू लागेल, की तुम्ही तुमच्या स्वत:ला, तुमच्या जीवनाला आणि तुमच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टींना जे महत्त्व देत आहात ते किती असमंजसपणाचे आहे.

जर तुम्ही असे योग्य प्रकारे केलेत तर केवळ तीन मिनिटांच्या अवधीत सर्व अप्रियपणा एकदम झटकला जाईल, अगदी खोलवर गेलेले दुःख देखील झटकून टाकता येईल. अशा रीतीने फक्त एकाग्रता करायला पाहिजे, आपण अनंतत्वात आणि शाश्वततेत आहोत अशी कल्पना केली पाहिजे. तर मग सर्वकाही निघून जाईल. त्यातून तुम्ही स्वच्छ होऊन बाहेर पडाल. हे सर्व योग्य रीतीने कसे करायचे हे जर तुम्हाला कळले तर तुम्ही सर्व आसक्तीपासून मुक्त होऊ शकाल, एवढेच नव्हे तर, मी सांगते की, अगदी खोलवर गेलेल्या दु:खापासूनसुद्धा तुम्ही मुक्त होऊ शकाल आणि त्यामुळे तुम्ही लगेच तुमच्या क्षुद्र अहंकारातूनही बाहेर याल.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 344-346)

प्रश्न : श्रीमाताजी, आम्ही आमची जाणीव व्यापक कशी करावी?

श्रीमाताजी : जाणीव व्यापक करण्याचे अनेक मार्ग आहेत. सर्वात सोपा मार्ग म्हणजे, कोणत्यातरी व्यापक, विशाल गोष्टीशी स्वत:ला एकरूप करणे. उदाहरणार्थ, अगदी संकुचित व मर्यादित असा एखादा विचार, एखादी इच्छा, जाणीव यांत तुम्ही पूर्णपणे बंदिस्त झाले आहात असे जेव्हा तुम्हाला वाटते, आणि जणुकाही एखाद्या कवचात तुम्ही कोंडले गेले आहात असे जेव्हा तुम्हाला वाटते, अशा वेळी जर कोणत्या तरी विशाल गोष्टीबद्दल विचार करण्यास तुम्ही सुरुवात केलीत तर तुमची जाणीव तुम्ही काहीशी व्यापक करू शकाल…

उदाहरणार्थ, महासागराच्या पाण्याचा अफाट विस्तार. तुम्ही जर खरोखरच अशा महासागराचा विचार करू लागलात आणि तो किती दूर दूर दूर दूरवर, सर्व बाजूंनी असा पसरला आहे असा विचार केलात तर, तुमच्या मानाने तो इतका विशाल, इतका अथांग आहे, की तुम्हाला त्याचा किनारा दिसू शकत नाही, तुमची दृष्टी त्याच्या कोणत्याच टोकापर्यंत पोहोचू शकत नाही, मागे नाही, पुढे नाही, उजव्या बाजूला नाही, डाव्या बाजूला नाही… तो विशाल, खूप विशाल, खूप खूप विशाल आहे… तुम्ही असा विचार केलात, तर तुम्हाला असे वाटू लागते, की आपण अशा महासागरावर तरंगत आहोत की, ज्याला कोणती मर्यादाच नाही. अशी कल्पना करणे सोपे आहे. असे केले म्हणजे तुमची जाणीव तुम्ही काहीशी व्यापक करू शकाल.

काहीजण आकाशाकडे पाहायला लागतात आणि नंतर ते त्या तारकांच्या मधल्या अवकाशाची कल्पना करतात… त्या अनंत विस्तारामध्ये पृथ्वी अगदी एखाद्या ठिपक्याप्रमाणे आहे आणि तुम्ही तर या पृथ्वीवर त्याहूनही लहानशा ठिपक्याप्रमाणे, मुंगीपेक्षाही लहानशा ठिपक्याप्रमाणे आहात असे तुम्हाला वाटते. अशा आकाशाकडे पाहता पाहता तुम्हाला असे वाटू लागते की, आपण या अनंत अवकाशात, तारका, ग्रह यांच्या मधील अवकाशात तरंगत आहोत. पुढे पुढे जाण्यासाठी तुम्ही अधिकाधिक विशाल होत जाता. काही जण अशा रीतीने व्यापक होण्यात यशस्वी होतात.
(उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी
(CWM 06 : 344-45)

एखादा पाण्याचा कालवा असावा तसे आपण असतो. मुक्तपणे प्रवाहित करण्यासाठी आपल्याला जे मिळाले आहे ते प्रवाहित करण्यास आपण संमती दिली नाही तर ते कुंठित होऊन जाते; ते मिळेनासेदेखील होते. एवढेच नाही, तर त्यात जे जे भरलेले आहे तेही बिघडून जाते.

यापेक्षा जर, प्राणिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक शक्तींचा ओघ आपण मुक्तपणे वाहू दिला; स्वत:ला व्यक्तिनिरपेक्ष बनवीत, आपल्या किरकोळ व्यक्तित्वाने त्या महान वैश्विक प्रवाहाशी स्वत:ला कसे जोडून घ्यावयाचे हे जर त्याला माहीत झाले तर, आपण जे काही देतो ते आपल्याकडे हजारपटीने परत येते.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 102)

जर तुम्हाला साधना करावयाची असेल तर, साहजिकच थोडा वेळ तरी तुम्ही निरपेक्ष, नि:स्वार्थी कामासाठी, म्हणजेच फक्त स्वत:साठीच नसलेल्या कामासाठी दिला पाहिजे. अभ्यास करणे तर चांगलेच; त्याची अत्यंत गरजदेखील आहे, एवढेच नव्हे तर ते अनिवार्यसुद्धा आहे. मगाशी मी सांगितले त्याप्रमाणे, तुम्ही लहानपणीच काही गोष्टी शिकल्या पाहिजेत; नाहीतर मोठेपणी त्या साधणे अधिकच कठीण होते.

असे एक वय असते की जेव्हा या अभ्यासाचा एक भक्कम पाया तयार झालेला असतो, मग अशा वेळी तुमचा स्वत:चा असा कोणताही हेतू ज्यामध्ये नाही असे काहीतरी तुम्ही केले पाहिजे. कारण जर एखादी व्यक्ती स्वत:मध्येच मग्न राहत असेल तर ती जणूकाही एखाद्या कवचात बंदिस्त झाल्याप्रमाणे होते आणि तेव्हा ती वैश्विक शक्तींना खुली होऊ शकत नाही.

एखादी लहानशी नि:स्वार्थी कृती, अहंकारविरहित एखादी छोटीशी कृती ही व्यक्तीच्या क्षुद्र व अतिशय खुज्या अशा व्यक्तिमत्त्वापलीकडील आगळ्यावेगळ्या अशा गोष्टींसाठीची दालने व्यक्तीला खुली करून देते. व्यक्ती सामान्यत: स्वत:ला एका कवचात बंदिस्त करून घेते आणि जेव्हा एखादा धक्का तिला बसतो किंवा काही संघर्ष होतो तेव्हाच त्या व्यक्तीला इतर कवचांची जाणीव होते.

परंतु सर्वांच्यामध्ये प्रवाहित असलेल्या एका महान शक्तीची जाणीव होणे, मानवी जीवनाच्या व विश्वातील प्रत्येक जीवाच्या परस्परावलंबी स्वरूपाची जाणीव होणे ही एक दुर्मिळ बाब आहे आणि साधनेतील अपरिहार्य अशा अवस्थांपैकी ही एक अवस्था आहे.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 153)

प्रश्न : योग करण्याची पात्रता येण्यासाठी आम्ही काय केले पाहिजे?

श्रीमाताजी : प्रथमतः आपण जागृत झालो पाहिजे. आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या अगदीच अल्प अंशाची जाणीव असते. उरलेला बहुतेक सर्व भाग आपल्याला अज्ञात असतो. आपण त्याविषयी अजागृत असतो. या अजागृतीमुळेच आपण आपल्या असंस्कारित प्रकृतीला चिकटून राहतो आणि या अजागृतीमुळेच प्रकृतीमध्ये काही बदल किंवा रूपांतरण घडून आणण्यामध्ये अडसर निर्माण होतो. या अजागृतीच्या माध्यमातूनच अदिव्य शक्ती आपणामध्ये प्रवेश करतात आणि आपल्याला त्यांचे गुलाम बनवून टाकतात.

तुम्ही स्वत:विषयी जागृत झाले पाहिजे, तुमची प्रकृती व तुमच्यामध्ये निर्माण होणारी आंदोलने यांविषयी तुम्ही जागृत झाले पाहिजे. तुम्ही काही गोष्टी का करता व कशा करता, त्याविषयी तुमच्या भावना कशा प्रकारच्या आहेत व त्या तशा का आहेत, त्या गोष्टीसंबंधी तुमचे विचार काय आहेत व ते तसे का आहेत ह्याचे ज्ञान तुम्ही करून घेतले पाहिजे. जे हेतु व ज्या उर्मी, ज्या प्रकट वा अप्रकट शक्ती तुम्हाला कृतिप्रवण करतात त्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत.

सारांश असा की, तुम्ही आपल्या अस्तित्वरूपी यंत्राचे भाग सुटे सुटे करून निरखून पारखून पाहिले पाहिजेत. अशा रीतीने तुम्ही एकदा का जागृत झालात की, तुम्हाला वस्तुस्थिती ओळखता येईल, तिचे पृथक्करण करता येईल. तुम्हाला खाली खेचणाऱ्या शक्ती कोणत्या व तुम्हाला साह्यभूत होणाऱ्या शक्ती कोणत्या, हे तुम्हाला ओळखता येईल. योग्य काय नि अयोग्य काय, सत्य काय नि असत्य काय, दिव्य काय नि अदिव्य काय हे एकदा का तुम्हाला समजू लागले की जे योग्य, सत्य, दिव्य असेल त्याला धरूनच तुम्ही अगदी काटेकोरपणे आचरण केले पाहिजे.

म्हणजेच जे योग्य व दिव्य त्याचा निश्चयपूर्वक स्वीकार करून, तद्विरोधी सर्वांचा त्याग केला पाहिजे. पदोपदी हे द्वंद्व तुमच्यापुढे उभे राहील आणि पदोपदी तुम्हाला निवड करावी लागेल. तुम्हाला धीर धरावा लागेल, चिकाटीने व सावधगिरीने प्रयत्न करावा लागेल. जणू डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागेल. संतसत्पुरुष सांगतात त्याप्रमाणे, दिव्यत्वाच्या विरोधी असणाऱ्या अदिव्याला कोणतीच संधी मिळू नये यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी अदिव्याला नकार दिला पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 01-02)

“पूर्णत्वप्राप्तीसाठी पहिली पायरी म्हणजे स्वत:विषयी जागृत होणे. आपल्या अस्तित्वाचे भिन्न भिन्न भाग व त्या प्रत्येकाची निरनिराळी कार्ये यांविषयी जागृत होणे. हे भाग एकमेकांपासून अलगपणे पाहण्यास तुम्ही शिकले पाहिजे; तेव्हाच तुम्हाला तुमच्या ठिकाणी घडणाऱ्या क्रिया व तुम्हाला कृतिप्रवण करणारे अनेक आवेग, प्रतिक्रिया आणि परस्परविरोधी इच्छा यांचा उगम कोठे आहे हे स्पष्टपणे सापडू शकेल… या क्रियांचे विशेष काळजीपूर्वक निरीक्षण करून, त्यांना उच्चतम ध्येय-न्यायासनासमोर आणून, आपण त्याने दिलेला निर्णय मानण्याची मनापासून खरी इच्छा बाळगली असेल, तरच आपल्यामधील अप्रमादशील विवेकशक्ती जागृत होण्याची आशा आपण बाळगू शकू.” श्रीमाताजींनी ‘जीवनाचे शास्त्र’ या लेखमालिकेमध्ये वरील विचार मांडले होते.

त्यावर भाष्य करताना त्या म्हणतात – आपल्यामधील ह्या आंतरिक हालचालींचा कोठे, कसा उगम होतो यासंबंधी आपल्याला स्पष्ट कल्पना आली पाहिजे. कारण आपल्या अस्तित्वामध्ये परस्परविरोधी प्रवृत्ती असतात. काही प्रवृत्ती तुम्हाला एका बाजूस खेचतात, दुसऱ्या प्रवृत्ती तुम्हाला दुसऱ्या बाजूस खेचतात आणि त्यामुळे जीवनामध्ये सगळा गोंधळ माजतो.

तुम्ही स्वत:चे नीट निरीक्षण केलेत तर असे दिसून येईल की, अस्वस्थ होण्याजोगे तुमच्याकडून काही घडले तर, लगेचच तुमच्या त्या कृतीचे समर्थन करण्यासाठी मन अनुकूल कारणे देऊ लागते. हे मन कोणत्याही गोष्टीला मुलामा देण्यासाठी तयारच असते. आणि त्यामुळेच अशा परिस्थितीमध्ये स्वत:ला जाणणे कठीण होऊन बसते. मनोमय अस्तित्वाच्या या छोट्या छोट्या खोटेपणाकडे स्पष्टपणे पाहण्यासाठी आणि स्वत:ला खऱ्या अर्थाने जाणण्यासाठी व्यक्ती पूर्ण प्रामाणिकच असावी लागते.

सबंध दिवसातील तुमच्या हालचाली, क्रियाप्रतिक्रिया तुम्ही एकामागून एक यंत्रवत अखंडपणे नुसत्या न्याहाळत बसलात, तर त्याने तुमची प्रगती होऊ शकणार नाही. या निरीक्षणातून तुम्हाला प्रगती करून घ्यावयाची असेल, तर तुमच्या अंतरंगांतील असे काहीतरी, असा एखादा उत्तम भाग तुम्ही शोधून काढला पाहिजे की, जो प्रकाशयुक्त असेल, सदिच्छायुक्त असेल आणि प्रगतीसाठी अत्यंत उत्सुक असेल; आणि त्यामुळे त्याच्या प्रकाशात तुम्ही स्वत:ला तपासू शकाल. तो प्रकाशयुक्त भाग समोर ठेवून, चित्रपटात जशी एकामागून एक चित्रे सरकतात, त्याप्रमाणे दिवसभरातील तुमच्या सर्व कृती, सर्व भावना, सर्व आवेग, उर्मी, विचार त्याच्या समोरून सरकत जाऊ देत. त्यानंतर त्यामध्ये सुसंगती लावण्याचा प्रयत्न करा; म्हणजेच असे पाहा की, अमुक एका गोष्टीनंतरच दुसरी गोष्ट का घडली?

तुमच्यासमोरील प्रकाशमय पडद्याकडे निरखून पाहा. काही गोष्टी त्याच्या समोरून जातात, सहज सरळ जातात. दुसऱ्या काही गोष्टींची थोडीशी छाया पडते आणि काही गोष्टी अशा असतात की, त्यांची अतिशय काळीकुट्ट आणि आपल्याला आवडणार नाही अशी छाया पडते. तुम्ही या बाबतीत अत्यंत प्रामाणिक, प्रांजळ असले पाहिजे. एखादा खेळ खेळत असल्याप्रमाणे अगदी प्रामाणिकपणे हे काम करा.

”अमुक परिस्थितीमध्ये मी अशी एक कृती केली, माझ्या मनात अशा अशा भावना होत्या, मी अमुक एका रीतीने त्यावेळी विचार केला. खरेतर, माझे ध्येय आहे आत्मज्ञान आणि आत्मप्रभुत्व! पण आत्ता माझी कृती या ध्येयाला धरून होती की नाही?” असा विचार करा. जर ती कृती तुमच्या ध्येयाला धरून घडली असेल, तर त्या प्रकाशमय पडद्यावर तिची काळी छाया पडणार नाही; ती कृती पारदर्शक असेल. मग त्या कृतीविषयी चिंता करण्याचे तुम्हाला कारण नाही.

ती कृती तुमच्या ध्येयाशी सुसंगत नसेल तर मात्र तिची छाया पडेल. मग तुम्ही विचार करा – “का बरे ही अशी छाया पडली? आत्मज्ञान आणि आत्मप्रभुत्व यांविषयीच्या माझ्या संकल्पाच्या विरोधी असे या कृतीमध्ये काय होते?” बहुतेक वेळा तिचा संबंध अचेतनेशी, बेसावधपणाशी असल्याचे तुम्हाला आढळून येईल. तेव्हा मग आपण केलेल्या बेसावध गोष्टींमध्ये तिची नोंद करा आणि ठरवा की, पुढच्या वेळेस अशी एखादी गोष्ट करण्यापूर्वीच मी सावध राहण्याचा प्रयत्न करीन.

इतर काही बाबतीत तुम्हाला असे आढळून येईल की, ज्याची छाया पडली ती गोष्ट म्हणजे तुमचा क्षुद्र घृणास्पद अहंकार होता, अगदी काळा; आणि तुमची कृती, तुमचे विचार विकृत करावयास तो आला होता. नंतर हा अहंकार तुम्ही तुमच्या प्रकाशकेंद्रासमोर ठेवा आणि स्वत:ला विचारा, ‘मला अशी कृती, असे विचार करावयास लावण्यास, ह्या अहंकाराला काय बरे अधिकार आहे?’

त्यासंबंधीचे कोणतेही विसंगत असे समर्थन ग्राह्य न मानता, तुम्ही शोध घेतला पाहिजे आणि मग तुम्हाला तुमच्या अस्तित्वाचा एक असा भाग एका कोपऱ्यामध्ये दिसेल की, जो विचार करत असतो, म्हणत असतो, “नाही, नाही, मला इतर काहीही चालेल पण हे मात्र नाही.”

तुम्हाला असे स्पष्ट दिसेल की, तो भाग म्हणजे क्षुद्र अभिमान, आत्मप्रीती असते. कुठेतरी दडून असलेली अहंकाराची एक छुपी भावना असते, अशा शेकडो गोष्टी असतात.

या सर्व गोष्टी तुमच्या ध्येयप्रकाशात बघा. ”ह्या अमुक एका वृत्तीची जोपासना करणे हे माझ्या आत्मशोधाशी, ध्येयप्राप्तीशी मिळतेजुळते आहे का? मी हा काळा कोपरा प्रकाशासमोर ठेवीत आहे. प्रकाश त्यामध्ये शिरून तो काळा भाग नाहीसा होईपर्यंत मी हे करणार आहे.” तुम्ही हे केल्यानंतर खरोखरी हे नाटक संपते. मात्र तुमच्या सबंध दिवसाचे नाटक एवढ्याने संपत नाही, हे तर स्पष्टच आहे. कारण त्या प्रकाशासमोरून तुम्हाला आणखी कित्येक गोष्टी न्यावयाच्या राहिलेल्या असतात.

मात्र हा खेळ, तुम्ही पुढे चालू ठेवलात आणि अत्यंत मनःपूर्वकतेने तुम्ही हा खेळ पुन्हा पुन्हा खेळत राहिलात तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगते की, त्यानंतर सहा महिन्यांनी तुम्ही तुम्हालाच ओळखू शकणार नाही. तुम्ही स्वत:शीच म्हणाल, ”काय? मी अशी होते? अवघडच होते माझे सारे.”

– श्रीमाताजी
(CWM 04 : 38-39)

आपली मने आणि हृदये, आपले सर्व विचार, आपल्या सर्व कृती या ईश्वराने पूर्णत: व्यापल्या जाव्यात आणि त्या ‘त्याच्या’ महान अशा तेजोमयतेने प्रकाशमान व्हाव्यात या हेतूने एक उत्कट अभीप्सा बाळगून, पूर्ण प्रामाणिकता बाळगून, शुभसंकल्प करत, रोज स्वत:ला सत्यसूर्याप्रत, परमप्रकाशाप्रत, या विश्वाच्या उगमाप्रत आणि विश्वाच्या बौद्धिक जीवनाप्रत उन्नत करण्याचा एक निश्चय आपण सर्वांनी केला पाहिजे असे मला वाटते.

तेव्हाच खऱ्या अर्थाने गतकाळातील थोर सत्पुरुषाच्या उपदेशाचे अनुसरण करण्याचा लाभ आणि अधिकार आपण प्राप्त करून घेऊ शकू. त्यांनी असे सांगितले आहे की : ”तुमची हृदये करूणेने भरून जाऊ देत, आणि त्यानंतर, दुःखपीडेने छिन्नविछिन्न झालेल्या या जगाकडे वळा, प्रशिक्षक व्हा, आणि जिथे कोठे अज्ञानांधकार सत्ता गाजवीत असेल तेथे प्रकाशदीप पेटवा.”

– श्रीमाताजी
(CWM 02 : 29)

आपल्या अंतरंगातील देवता कधीही सक्ती करत नाही. कोणतीही मागणी करत नाही किंवा भयदेखील दाखवीत नाही; ती स्वत:चेच आत्मदान करते, प्राणिमात्र आणि वस्तुजात यांच्या हृदयांमध्ये ती दडून बसते; आणि ती स्वत:चेच विस्मरण करविते.

ती कोणाला दोष देत नाही, की गुणदोषांचे मापन करत बसत नाही. कोणास शाप देत नाही की कोणाची निंदाही करत नाही. तर ती कोणत्याही प्रतिबंधाविना पूर्णत्व आणण्याचे कार्य अथकपणे करत राहते; कानउघडणी न करता सुधारणा घडवून आणण्याचे, उतावीळपणा न करता प्रोत्साहित करत राहण्याचे कार्य अथकपणे करत राहते. व्यक्तीच्या ग्रहणशीलतेनुसार प्रत्येकाला वैभवसंपन्न करण्यासाठी ती अथकपणे झटत राहते.

ती माऊली आहे. तिच्या प्रेमरूपी फळांकरवी ती भरणपोषण करते; सांभाळ करते आणि रक्षण करते; सल्ला देते व सांत्वन करते; कारण ती सर्वकाही जाणते, ती सर्वकाही सहन करू शकते, ती सर्वांच्या चुका पदरात घेते व क्षमा करते; सर्वांविषयी आशा बाळगते आणि सर्वांना सर्व गोष्टींसाठी सुसज्ज करते.

तिने सर्वकाही तिच्या स्वत:मध्येच धारण केलेले असल्यामुळे, जी सर्वांसाठी असू शकत नाही अशी कोणतीच गोष्ट तिच्या मालकीची नसते. तिची सत्ता सर्वत्रांवर चालत असल्यामुळेच ती सर्वांची सेवकही असते. याच कारणासाठी लहान अथवा थोर, जे कोणी तिच्या बरोबर सत्ताधीश होण्याची किंवा तिच्यामधील देवपद मिळविण्याची इच्छा करतात, ते तिच्याप्रमाणे सर्व बांधवांचे सेवक बनून जातात; जुलमी सत्ताधीश बनत नाहीत.

सेवकाची ही विनम्र भूमिका खरोखर किती सुंदर आहे! सर्वांच्या अंतर्यामी असलेल्या परमेशाचे संदेशदूत होणे आणि सर्व वस्तूंना जीवन देणाऱ्या दिव्य प्रेमाची अभिव्यक्ती करणे हे ज्यांचे जीवितकार्य आहे त्या सर्वांचीच अशा प्रकारची सेवकाची भूमिका असते.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 42-43)

सद्यकालीन विश्वात, सामान्य मानवी जीवन हे मनाच्या सत्तेने चालते; त्यामुळे मनावर ताबा मिळविणे, संयम मिळविणे ही सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट आहे; म्हणून आपले मन विकसित करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आपण पुढील साधनामार्गाचे क्रमश: अनुसरण करू.

एका पाठीमागून एक येणाऱ्या अशा चार प्रक्रिया आहेत, परंतु शेवटी त्या एकाच वेळीही घडून येऊ शकतात. स्वत:च्या विचारांचे निरीक्षण करणे ही पहिली, त्या विचारांवर बारकाईने लक्ष ठेवून राहणे ही दुसरी, विचार नियंत्रित करणे ही तिसरी आणि विचारांवर प्रभुत्व मिळविणे ही चौथी प्रक्रिया होय. निरीक्षण, पाळत, नियंत्रण व प्रभुत्व ह्या त्या चार प्रक्रिया आहेत. दुष्प्रवृत्त मनापासून सुटका करून घेण्यासाठी हे सारे करावयाचे असते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 183)

तुम्ही कोणत्यातरी अगदी क्रियाशील कृतीमध्ये गुंतलेले असाल उदा. बास्केटबॉल खेळणे, ज्यामध्ये खूप वेगवान हालचाली कराव्या लागतात. असे असतानादेखील, तुम्ही ईश्वरावरच्या आंतरिक ध्यानाचा आणि एकाग्रतेचा तुमचा भाव ढळू देता कामा नये.

आणि जर तुम्ही तसे करू शकलात तर तुम्हाला दिसेल की, तुम्ही जे काही करत असता त्याच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा झाली आहे; ती गोष्ट तुम्ही फक्त उत्तमच करता असे नाही, तर तुम्ही ती अगदी अपेक्षेपेक्षाही अधिक सामर्थ्यानिशी करता.

आणि त्याचवेळी तुम्ही तुमची चेतना इतक्या उंचीवर नेऊन ठेवता, इतकी शुद्ध राखता की, तुम्हाला तेथून पुढे कोणीच धक्का लावू शकत नाही. आणि लक्षात घ्या की हे इथपर्यंत होते की, एखादी दुर्घटना जरी घडली तरी ती तुम्हाला कोणतीही बाधा पोहोचवू शकत नाही.

अर्थातच, हे अत्युच्च शिखर आहे. ज्याची व्यक्तीने आस बाळगावी असे हे शिखर आहे.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 121)