Tag Archive for: व्यावहारिक जीवन

 

उत्तमरितीने प्रशिक्षित असा रणक्षेत्रातील हत्ती, बाणांच्या भडिमाराने इतस्तत: पळायला सुरुवात करत नाही. तो वेदना सहन करतो. झुंजारपणे प्रतिकार करणाऱ्या वीराच्या वृत्तीने तो पुढे पुढे चालतच राहतो. ज्याला सन्मार्गाचे अनुसरण करायचे असते, त्याला स्वाभाविकपणे सर्व प्रकारच्या दुरिच्छांच्या हल्ल्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. कारण इतर जण त्याला समजून घेऊ शकत नाहीत आणि एवढेच नव्हे तर, त्यांना जे समजत नाही त्याचा ते द्वेष करू लागतात.

सामान्य लोक तुमच्याविषयी जे द्वेषपूर्ण उद्गार काढतात त्यामुळे, जर तुम्ही चिंताग्रस्त, दुःखीकष्टी किंवा नाउमेद झालात तर तुम्ही योगमार्गावर फार प्रगत होऊ शकणार नाही. दुरिच्छादी गोष्टी तुमच्या वाट्याला येतात याचे कारण तुम्ही दुर्दैवी आहात किंवा तुमच्या नशीबातच सुख नाही हे नसते तर, उलट (प्रगतिपथावर वाटचाल करण्याचा) तुमचा संकल्प दिव्य चेतनेने व दिव्य कृपेने गांभीर्याने घेतला आहे आणि तुमचा हा संकल्प, हा निश्चय कितपत प्रामाणिक आहे; मार्गातील अडचणींना सामोरे जाण्यासाठी तुम्ही कितपत खंबीर आहात हे पाहण्यासाठी, (सोन्याचा) कस पाहणाऱ्या दगडाप्रमाणे, कसोटीचा दगड म्हणून आजूबाजूच्या परिस्थितीचा दिव्य चेतनेने उपयोग केलेला असतो. (हे त्याचे खरे कारण असते.)

त्यामुळे कोणी जर तुमचा उपहास केला किंवा कोणी तुमच्याविषयी अपशब्द काढले तर पहिली गोष्ट तुम्ही केली पाहिजे ती अशी की, अंतर्मुख होऊन, आपल्यातील कोणत्या दुर्बलतेमुळे वा कोणत्या अपूर्णतेमुळे असे घडले ते पाहिले पाहिजे. तसेच, तुमची खरी किंमत काय आहे त्याची लोकांना काही कदरच नाहीये असे समजून तुम्ही उदास, संतप्त किंवा उद्विग्न होता कामा नये. त्यापेक्षा तुमचा कोणता दोष, कोणती दुर्बलता वा कोणती विकृती दुरुस्त केली पाहिजे हे दाखवून दिल्याबद्दल, तुम्ही दिव्य कृपेचे ऋणी असले पाहिजे. म्हणून दुःखीकष्टी होण्याऐवजी उलट, तुम्ही समाधानी झाले पाहिजे आणि तुमच्या विरोधात, तुमचे अहित व्हावे म्हणून जो घाट घातला गेला होता त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे.

तुम्हाला जर खरोखरच या मार्गाचे (पूर्णयोगाचे) अनुसरण करायचे असेल आणि योगसाधना करायची असेल, तर तुम्ही ती कोणाकडून कौतुक मिळावे किंवा सन्मान मिळावा यासाठी करता कामा नये; तर तुम्ही साधनेव्यतिरिक्त अन्य कोणत्या मार्गाने आनंदी होऊच शकणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला ती केलीच पाहिजे, अशी आणि इतकी ती तुमच्या जिवाची अनिवार्य निकड असली पाहिजे. लोकांनी तुमची प्रशंसा केली काय किंवा नाही, ती गोष्ट अजिबात महत्त्वाची नाही. तुम्ही आधीच स्वत:ला हे समजावले पाहिजे की, तुम्ही सामान्य माणसांपेक्षा जेवढे अधिक प्रगत व्हाल आणि तुम्ही जसजसे त्यांच्या सामान्य जीवन-पद्धतीपासून दूर जाल, तेवढे लोकं तुमची प्रशंसा कमी करू लागतील; कारण हे उघड आहे की, ते तुम्हाला नीट समजून घेऊ शकणार नाहीत. आणि मी पुन्हा एकदा सांगते की, ते अजिबात महत्त्वाचे नाही.

तुम्ही प्रगती केल्याशिवाय राहूच शकत नाही म्हणून, मार्गावर प्रगत होत राहण्यामध्येच ‘खरा प्रामाणिकपणा’ सामावलेला आहे. तुम्ही दिव्य जीवनासाठी स्वत:ला समर्पित करता कारण त्याशिवाय तुम्ही राहूच शकत नाही; तुम्ही स्वत:चे रूपांतरण करण्यासाठी धडपडता, प्रकाशाला उन्मुख होता कारण त्याविना तुम्ही राहूच शकत नाही, कारण तेच तुमच्या जीवनाचे प्रयोजन असते. जेव्हा हे असे असते तेव्हा खात्री बाळगा की, तुम्ही योग्य मार्गावर आहात.

• श्रीमाताजी [CWM 03 : 281-283]

 

ज्यांच्यापाशी प्रामाणिकपणा आणि तळमळ असते अशा व्यक्तींचा ईश्वर नेहमीच पाठीराखा असतो.

*

तुम्हाला जेव्हा खात्रीपूर्वक असे वाटते की, तुम्ही पूर्णतया प्रामाणिकपणा प्राप्त करून घेतला आहे तेव्हा, निश्चितपणे असे समजा की, तुम्ही मिथ्यत्वामध्ये बुडालेला आहात.

*

जे मुळात अतिशय प्रामाणिक आहेत त्यांनाच, ते पूर्णपणे प्रामाणिक नाहीत याची जाण असते.

– श्रीमाताजी (CWM 14 : 66, 69, 69)

 

ईश्वराची जी इच्छा आहे तीच अगदी पूर्ण प्रामाणिकपणे आपली इच्छा होणे, ही जीवनात शांती आणि आनंद मिळण्यासाठी आवश्यक असणारी अट आहे. आपल्याला काय हवे आहे आणि जीवनाने आपल्याला काय प्रदान करायला हवे, हे ईश्वरापेक्षा आपल्याला जास्त चांगले समजते, अशी माणसांची जवळजवळ नेहमीच खात्री असते आणि यातूनच बहुतांशी सारी मानवी दुःखे उद्भवतात.

इतर व्यक्तींनी आपल्या अपेक्षा पूर्ण कराव्यात आणि परिस्थितीने देखील आपल्याच इच्छावासनांची पूर्ती करावी अशी बहुतेक सर्व माणसांची अपेक्षा असते आणि त्यामुळेच त्यांना त्रास सहन करावा लागतो आणि त्यामुळेच ते दुःखीकष्टी होतात.

– श्रीमाताजी (CWM 16 : 433)

 

तुम्ही जेव्हा पूर्णपणे प्रामाणिक असता तेव्हा, तुम्ही तुमच्या अस्तित्वाच्या सर्वोच्च ध्येयाशी, तुमच्या अस्तित्वाच्या सत्याशी सुसंवाद राखून जगण्याचा सतत प्रयत्न करत असता.

प्रत्येक क्षणी – म्हणजे तुम्ही जो काही विचार करता, जे काही तुम्हाला भावते किंवा जे जे काही तुम्ही करता, त्या प्रत्येक वेळी – शक्य तितक्या संपूर्णपणे, शक्य तितक्या सर्वांगीण रितीने तुमच्या सर्वोच्च ध्येयाशी (highest ideal) सुसंवादी राहण्याचा प्रयत्न जर तुम्ही करत असाल किंवा तुम्ही जर तुमच्या अस्तित्वाच्या सत्याविषयी (truth of your being) जागृत झालेले असाल तर, त्यावेळी खराखुरा प्रामाणिकपणा तुम्ही साध्य केला आहे असे म्हणता येईल.

आणि जर तुम्ही तसे असाल, म्हणजे खरोखरच तुम्ही कधीही अहंभावात्मक वृत्तीने किंवा वैयक्तिक कारणासाठी कोणतीही कृती करत नसाल; तुमच्या आंतरिक सत्याकडून तुम्हाला जे मार्गदर्शन लाभते त्याच्या आधारे तुम्ही कृती करत असाल, म्हणजेच जर तुम्ही संपूर्णत: प्रामाणिक आणि प्रांजळ असाल तर, जगाने तुमच्याबद्दल काहीही म्हटले; तुमच्याबद्दल चांगला, वाईट काहीही ग्रह करून घेतला; काहीही मत बनविले, तरी तुम्हाला त्याबद्दल काहीच वाटणार नाही; तुम्ही त्याविषयी संपूर्ण उदासीन, संपूर्ण समवृत्तीने राहाल. त्या संपूर्ण प्रामाणिकपणाच्या स्थितीत असताना, चांगले ‘दिसण्याची’ किंवा इतरांनी तुम्हाला चांगले म्हणावे याची तुम्हाला आवश्यकता वाटणार नाही. कारण तुमच्या आंतरिक खऱ्या चेतनेशी जेव्हा तुम्ही सुसंवादी असता, तेव्हा पहिली गोष्ट ही घडते की, तुम्ही कसे ‘दिसता’, कसे भासता याची तुम्ही चिंता करत बसत नाही. लोक तुम्हाला काहीही समजत असले; उदासीन, भावनाशून्य, दूरस्थ किंवा अहंकारी म्हणत असले तरी, त्याला तुमच्या दृष्टीने काही महत्त्वच उरत नाही. अर्थात, मी पुन्हा सांगते की, त्यासाठी तुम्ही संपूर्ण प्रामाणिक, प्रांजळ असले पाहिजे. म्हणजेच, तुम्ही तुमचे आंतरिक, मध्यवर्ती सत्य व्यक्त करण्यासाठी, प्रकट करण्यासाठी जीवन जगत आहात, हे तुम्ही कधीही विसरता कामा नये.

– श्रीमाताजी (CWM 04 : 16-17)

 

ईश्वरी कृपा आणि संरक्षण नेहमीच तुमच्यासोबत असते. तुम्ही आंतरिक किंवा बाह्य अशा कोणत्याही अडचणीत किंवा संकटात सापडलेला असलात तरी त्यांना शिरजोर होऊ देऊ नका आणि अशी वेळ येईल तेव्हा, संरक्षण करणाऱ्या दिव्य शक्ती‌चा आश्रय घ्या. तुम्ही नेहमीच असे श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे करत राहाल तर, पृष्ठभागावर दिसणाऱ्या सर्व प्रकारच्या खळबळीमध्ये, गोंधळामध्येसुद्धा जे नेहमीच स्थिर आणि शांतिपूर्ण असते, असे तुमच्या अंतरंगातील काहीतरी खुले होत आहे, असे तुम्हाला आढळून येईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 724-725)

 

(तुम्हाला सत्याची आस असेल तर तुम्हाला सत्य गवसतेच, असे श्रीमाताजी सांगत आहेत. पण त्यासाठी तुम्ही, तुमच्या इच्छाआकांक्षामुळे स्वत:च्या त्रुटींकडे डोळेझाक करता कामा नये किंवा त्यांचे समर्थन करता कामा नये, हेदेखील त्या सांगत आहेत.)

तुमच्यामध्ये जेव्हा प्रामाणिकपणा असतो तेव्हा, तुम्हाला प्रतिसाद देण्यासाठी ईश्वरी कृपा सज्ज असते; तेव्हा तुम्हाला ईश्वरी साहाय्य, मार्गदर्शन लाभतेच हे तुमच्या लक्षात येईल. मग पुढे फार काळ तुमच्याकडून चुका घडत नाहीत.

प्रगतीसाठीच्या तळमळीमध्ये असणारा प्रामाणिकपणा व सत्यशोधनाबाबतच्या संकल्पामध्ये असणारा प्रामाणिकपणा आणि (ज्याला आध्यात्मिकदृष्ट्या विशुद्ध मानले जाते अशा) विशुद्ध असण्याच्या आवश्यकतेमध्ये असणारा प्रामाणिकपणा – हा प्रामाणिकपणा हीच सर्व प्रकारच्या प्रगतीची गुरुकिल्ली असते.

– श्रीमाताजी (CWM 03 : 192)

 

स्वतःशी पूर्ण प्रामाणिक राहा – स्वतःची फसवणूक करू नका.
ईश्वराप्रति प्रामाणिक राहा – समर्पणात सौदेबाजी करू नका; कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा ठेवू नका.
मनुष्यमात्रांशी साधेसरळपणे वागा – त्यामध्ये कोणताही ढोंगीपणा किंवा दिखावा असता कामा नये.

-श्रीमाताजी (CWM 14 : 70)

 

तडजोडविरहित प्रामाणिकपणा हा आध्यात्मिक सिद्धीचा खात्रीशीर मार्ग आहे. (प्रामाणिकपणाचे आचरण करत असताना कोणत्याही प्रलोभनामुळे विचलित न होणे, उद्दिष्टाबाबत कोणतीही तडजोड न करणे हा आध्यात्मिक सिद्धीचा खात्रीशीर मार्ग आहे.)

ढोंग करू नका – प्रामाणिक व्हा.
(नुसती) आश्वासने देऊ नका – कृती करा.
(नुसती) स्वप्ने पाहू नका – ती प्रत्यक्षात उतरवा.

– श्रीमाताजी (CWM 14 : 66)

 

(एका विभागामध्ये काम करणाऱ्या ‘क्ष’ व्यक्तीबाबत तेथील व्यवस्थापकांनी श्रीमाताजींकडे तक्रार केली आहे आणि त्या व्यक्तीच्या कामचुकारपणाबाबत व अप्रामाणिकपणाबाबत त्याला काही समजावून सांगावे अशी विनंती त्यांनी केली आहे. त्यावर श्रीमाताजींनी दिलेले हे उत्तर…)

अप्रामाणिकपणा हा एक असाध्य दोष आहे असे दिसते आणि त्या दोषामुळे व्यक्तीमधील ईश्वरी कृपेचे कार्यसुद्धा नामशेष झाल्यासारखे होते. या अप्रामाणिकपणामुळेच कालीमातेला या जगामध्ये तिच्या रौद्ररूपाद्वारे हस्तक्षेप करणे भाग पडते.

मी ‘क्ष’सारख्या अप्रामाणिक माणसाला काहीही सूचना करणार नाही कारण तो त्याला ढोंगीपणाने प्रतिसाद देईल आणि तो आत्ता ज्या अंधकारामध्ये बुडालेला आहे, तो अंधकार त्याच्या ढोंगीपणामुळे अधिकच वाढेल.

– श्रीमाताजी (CWM 17 : 343)

 

माणसं नेहमीच जटिल असतात आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये गुण व दोष परस्परांमध्ये इतके मिसळलेले असतात की, ते वेगळे करता येणे जवळजवळ अशक्य असते. एखादी व्यक्ती जे बनू इच्छिते किंवा इतरांच्या मनात तिच्याविषयी जी प्रतिमा असावी असे तिला वाटते त्यापेक्षा, ती व्यक्ती वास्तवात पूर्णपणे वेगळी असू शकते. कधीकधी त्या व्यक्तीच्या स्वभावाची एक बाजू दिसते, तर कधी तिच्या स्वभावाची दुसरीच बाजू व्यक्त होते किंवा अमुक एका संदर्भात व्यक्ती जशी वागते त्यापेक्षा अगदी भिन्नपणे ती इतरांच्या बाबतीत वागू शकते.

मानवी प्रकृतीच्या दृष्टीने पाहता, पूर्णपणे प्रामाणिक असणे, सरळमार्गी असणे, खुले असणे ही काही साधीसोपी उपलब्धी नाही. केवळ आध्यात्मिक प्रयत्नांनीच ही गोष्ट साध्य होऊ शकते. त्यासाठी व्यक्तीच्या आत्म-परीक्षणात्मक दृष्टीमध्ये निर्मम-वस्तुनिष्ठता असणे आवश्यक असते. तिच्यामध्ये आत्मनिरीक्षणाची स्वसमर्थन न करणारी चिकित्सा आवश्यक असते. बरेचदा भल्या भल्या साधकांकडे किंवा योग्यांकडेदेखील ही क्षमता नसते. केवळ प्रकाशमान अशा ‘ईश्वरी-कृपे‌’मुळेच, साधकाला स्वतःचा शोध लागतो आणि त्याच्यामध्ये ज्या उणिवा असतात, त्या भरून काढून, त्यांचे रूपांतरण घडविण्याची क्षमता केवळ त्या ‘ईश्वरी-कृपे‌’मध्येच असते. (आणि हे सुद्धा केव्हा शक्य होते?) तर, साधक जेव्हा ईश्वरी कार्यासाठी स्वतःला समर्पित करतो आणि तसे करण्यास तो सहमती दर्शवितो तेव्हाच हे घडून येते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 51)