Tag Archive for: व्यावहारिक जीवन

 

…एखाद्या व्यक्तीने तुम्हाला तुमचा एखादा दोष दाखविला तर, त्याने तुम्हाला जणू एखादा खजिनाच दाखविला असे समजावे. म्हणजे याचा अर्थ असा की, जेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये एखादा दोष आढळतो किंवा तुमच्यामध्ये आकलनक्षमतेचा अभाव असल्याचे आढळते; एखादी अक्षमता, दुर्बलता आढळते; अप्रामाणिकपणा किंवा प्रगतीपासून रोखणारे असे काही तुम्हाला तुमच्यामध्ये आढळते, तेव्हा जणू काही एखादा अद्भुत खजिनाच सापडला आहे, असे तुम्हाला वाटले पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 03 : 220-221)

साधक : प्रामाणिक असणे आणि निष्ठावान असणे यामध्ये काही फरक आहे का?

श्रीमाताजी : हो, या दोन गोष्टी भिन्न आहेत. अर्थात, मला वाटतं की, प्रामाणिक नसताना निष्ठावान असणे आणि निष्ठावान नसताना प्रामाणिक असणे या दोन्ही गोष्टी अतिशय अवघड असतात. पण मला अशा काही व्यक्ती माहीत आहेत की, ज्या निष्ठावान होत्या पण त्यांच्याकडे प्रामाणिकपणाचा अभाव होता. याच्या उलट म्हणजे प्रामाणिक असूनही निष्ठा नसणे, हे मात्र फारसे दुर्मिळ नाही. एक गुण असेल तर पाठोपाठ दुसरा दुसरा येतोच असे नाही. पण हे उघड आहे की, सचोटी, ऋजुता, निष्ठा आणि प्रामाणिकपणा या गोष्टी एकमेकींशी घनिष्ठपणे संबंधित असतात.

साधक : एखाद्या गोष्टीशी वा व्यक्तीशी संबंधित असणारी निष्ठा ही सीमित भावना असते ना? यापेक्षा प्रामाणिकपणा अधिक व्यापक असतो ना?

श्रीमाताजी : हो, बरोबर आहे. निष्ठेमध्ये एक प्रकारच्या श्रेणीबद्ध संबंधाचा अंतर्भाव होतो, म्हणजे येथे कोणाशी तरी किंवा कोणत्यातरी वस्तुशी निष्ठा असते. त्यामध्ये एक प्रकारचे परस्परावलंबित्व असते. दिलेला शब्द पाळणे, स्वतःचे कर्तव्य अत्यंत काटेकोरपणे बजावणे म्हणजे निष्ठा, अशी सर्वसामान्य समजूत आहे. व्यक्ती अरण्यामध्ये एकटीच जीवन व्यतीत करत असेल तर ती परिपूर्ण प्रामाणिकपणाचे आचरण करू शकते, परंतु निष्ठेचे आचरण मात्र तुम्हाला सामाजिक जीवनातच करता येते, इतर लोकांशी संबंधित असतानाच करता येते. अर्थात, एखादी व्यक्ती ईश्वरी उपस्थितीप्रत आंतरिक श्रद्धायुक्त कृतीने पूर्णपणे समर्पित असेल तर ती त्या उपस्थितीशी एकनिष्ठ असू शकते.

– श्रीमाताजी (CWM 15 : 299-300)

साधेसरळ असणे (Straightforwardness) म्हणजे व्यक्तीने स्वतःशी व ईश्वराशी अगदी प्रामाणिकपणाने, सचोटीने वागणे आणि आचरणामध्ये कुटिलता न बाळगणे.

स्वतःची चूक ओळखण्याची (आणि ती मान्य करण्याची) इच्छा नसणे आणि अमुक एखादी गोष्ट चुकीची आहे असे श्रीमाताजींनी सांगूनदेखील, त्यांच्याशी प्रतिवाद करत, मीच कसा बरोबर आहे हे सिद्ध करण्याचा आटापिटा करणे म्हणजे स्व-समर्थन (Self-justification) करणे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 54)

नुसते बाहेरून चांगले ‘दिसण्यापेक्षा‌’ प्रत्यक्षात तसे ‘असणे‌’ अधिक बरे. आपला प्रामाणिकपणा जर परिपूर्ण असेल, तर आपण चांगले आहोत असे ‘दाखविण्याची’ गरज भासणार नाही. ‘परिपूर्ण प्रामाणिकपणा‌’ याचा आमचा अर्थ असा की, आपले सर्व विचार, भावना, संवेदना आणि कृती यांमधून अन्य काही नाही तर, आपल्या अस्तित्वाचे केंद्रवर्ती सत्‌‍-तत्त्व‌च (central Truth of our being) आविष्कृत झाले पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 12 : 268)

तुम्हाला जेव्हा एखाद्या गोष्टीचा कंटाळा आलेला असतो, तुम्हाला एखादी गोष्ट वेदनादायी किंवा अगदी अस्वस्थ करणारी वाटत असते, अशा वेळी जर तुम्ही काळाच्या (time) अनंततेचा आणि अवकाशाच्या (space) असीमतेचा विचार करायला सुरुवात केलीत, आजवर जे काही घडून गेले आहे आणि येथून पुढे जे घडणार आहे, त्याचा तुम्ही विचार केलात आणि आत्ताचा क्षण हा अनंत काळामधील खरोखरच एका श्वासाइतकाच आहे असा तुम्ही विचार केलात तर, काळाच्या अनंततेमध्ये असणाऱ्या या एका एवढ्याशा क्षणामुळे अस्वस्थ होणे हे तुम्हाला अगदीच हास्यास्पद वाटू लागेल. …खरोखरच, काळाच्या अनंततेमध्ये एका क्षणाचे मोल ते काय? खरोखरच व्यक्तीला हे प्रत्यक्षात उतरवता आले तर….

डोळ्यांसमोर चित्र आणा की, ज्या इवल्याशा पृथ्वीवर आपण वावरत असतो, ते आपण म्हणजे एक किती किरकोळ व्यक्ती आहोत आणि त्यामध्ये चेतनेचा हा एक चिमुकला कण आहे, एक क्षण आहे, ज्यामुळे आत्ता तुम्ही दुखावल्यासारख्या झाले आहात किंवा तुम्हाला तो दु:खद वाटत आहे तो क्षण डोळ्यांसमोर आणा. वास्तविक, हा क्षण तुमच्या अस्तित्वाचा एक अगदी छोटासा क्षण आहे. आणि खुद्द तुम्हीसुद्धा यापूर्वीच्या अनेक प्रसंगांमधून येथवर आलेला असता आणि यापुढेही अनेक गोष्टी घडायच्या असतात. तेव्हा ज्या गोष्टी आत्ता तुमच्यावर एवढा परिणाम करत आहेत त्या अजून दहा वर्षांनी तुम्ही कदाचित पूर्णपणे विसरून गेलेला असाल किंवा जरी अगदी त्या गोष्टी आठवल्याच तर तुम्ही स्वतःच म्हणाल की, “मी या गोष्टीला इतके का बरे महत्त्व दिले होते?”

तुम्हाला खरोखरच जाणवू लागते की, स्वतःला आणि आपल्याबाबतीत जे घडते आहे त्याला इतके महत्त्व देणे, हे किती हास्यास्पद आहे. तुम्ही जर ही गोष्ट अगदी सुयोग्य रितीने केलीत तर, अगदी तीन मिनिटांमध्ये सारे दुःख नाहीसे होईल. इतकेच काय पण एखादी अगदी तीव्र वेदनासुद्धा अशाच पद्धतीने नाहीशी होईल. त्यासाठी एकाग्रता करायची आणि स्वतःला अनंताच्या व काळाच्या पटलावर ठेवायचे. सर्व अस्वस्थता निघून जाते आणि व्यक्ती तिला भेडसावणाऱ्या त्या त्रासदायक गोष्टीपासून मोकळी होते. ही गोष्ट योग्य पद्धतीने कशी करायची हे माहीत असेल तर, व्यक्ती सर्व आसक्तीपासून आणि अगदी निरतिशय दुःखामधून बाहेर पडू शकते. ही पद्धत तुम्हाला तुमच्या क्षुद्र अहंच्या जाणिवेतून त्वरित बाहेर काढते.

– श्रीमाताजी [CWM 06 : 345-346]

आपण खूपच जटिलतेने भरलेल्या वातावरणात राहत असतो, पण नेहमीच एक अशी जागा असते की, जिथे सारेकाही खुले, साधे, सरळ असते; हे अनुभवलेले सत्य मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही त्याच त्या परिघात गोल गोल फिरत राहता, धडपड करत राहता, त्यावर काम करत राहता आणि मग कुठेतरी कुंठित झाल्यासारखे होते; आणि अशा वेळी तुमच्या आंतरात्मिक दृष्टिकोनातून (psychic attitude) तुम्हाला एखादा मार्ग गवसतो आणि सारे काही मोकळे होते आणि हे अगदी सहजतेने होते. मला असा अनुभव बऱ्याच वेळेला आलेला आहे.

….श्रीअरविंद नेहमी असे म्हणत असत की, “साधे राहावे, साधे असावे. जे तुम्हाला जाणवते ते साधेपणाने व्यक्त करा. साधे असा! साधे असावे!’’ यावर त्यांचा खूप भर असे. म्हटले तर हे केवळ शब्द आहेत. पण पहिल्यांदा जेव्हा हे शब्द त्यांनी उच्चारले, तेव्हा मला माझ्यासमोर जणू एक प्रकाशमार्गच खुला होताना दिसला आणि सारे काही खूप साधे-सोपे होऊन गेले. ‘एकावेळी एकच पाऊल पुढे टाकायचे आहे, मग दुसरे पाऊल. आपल्याला एवढेच तर करायचे आहे,’ असे मला जाणवून गेले. म्हणूनच ते नुसते शब्द नाहीत तर ती वस्तुस्थिती आहे.

श्रीमाताजी (स्वतःच्या कपाळाकडे निर्देश करत) म्हणतात, सारी जटिलता इथे (मनामध्ये) आहे. खूप जटिल आहे ते, त्याच्याशी जुळवून घेणे खूप अवघड आहे. ‘साधेसरळ असावे,’ असे जेव्हा श्रीअरविंद म्हणाले, तेव्हा काय आश्चर्य! तेव्हा जणू काही त्यांच्या डोळ्यांमधून प्रकाश बाहेर पडत होता. अचानकपणे आपण जणू प्रकाशाच्या बागेतच आलो आहोत असे वाटावे असे काहीसे झाले. जणू काही ती बाग प्रकाशात न्हाऊन निघाली होती. साध्या गोष्टीवर केवढा मोठा भर दिला होता त्यांनी! तुम्हाला जे दिसते, तुम्हाला जे माहीत आहे तेच साधेपणाने बोला, सहजपणाने बोला.

… श्रीअरविंद येथे ज्याला ‘साधेसरळ असणे’ असे म्हणत आहेत, ती एक अगदी आनंददायी उत्स्फूर्तता आहे, सहजता आहे. कृतीमध्ये, अभिव्यक्तीमध्ये, प्रत्येक हालचालीमध्ये, जीवनामध्ये साधे असावे, सरळ असावे. एक आनंदी सहजता! उत्क्रांतीमधील सहजस्वाभाविक व आनंदी अवस्था – ज्याला ते ‘दिव्य’ म्हणतात ती अवस्था – आपण पुनर्प्राप्त करून घ्यावी, अशी श्रीअरविंदांची आपल्याकडून अपेक्षा आहे. …आपण एखाद्या उमलत्या गुलाबाच्या फुलाप्रमाणे सहजसाधेपणाने आनंदी असावे, असे त्यांना अभिप्रेत आहे. आणि मी जेव्हा हे ऐकले, मी जेव्हा हे पाहिले, तेव्हा सुवर्ण प्रकाशाचा जणू एक झराच वाहत होता, जणू एक सुगंधित बाग असावी असे काहीसे ते होते. सारे, सारे, सारे काही खुले झाले होते.

– श्रीमाताजी (Conversation with a Disciple, September 16, 1961)

“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, त्या मनुष्यामध्ये स्वामित्व-भावना नसते. म्हणजे वस्तू जेव्हा त्याच्यापाशी येतील तेव्हा तो त्यांचा उपयोग करेल, पण तेव्हासुद्धा त्याला ही जाण असेल की, त्या (माझ्या मालकीच्या नसून) त्या परमेश्वराच्या मालकीच्या आहेत आणि म्हणूनच, अगदी त्या त्याच्यापासून दूर झाल्या तरीही त्याबद्दल तो खंत बाळगणार नाही. ज्या ईश्वराने त्याला त्या वस्तू दिल्या होत्या, त्यांचा इतरांना उपभोग घेता यावा म्हणून त्याच ईश्वराने त्या त्याच्याकडून काढून घेतल्या, ही गोष्ट त्याला अगदी सहजस्वाभाविक वाटते. अशा मनुष्याला वस्तुंचा वापर करत असताना आणि त्यांचा अभाव असतानाही सारखाच हर्ष अनुभवास येतो.

जेव्हा त्या वस्तू तुमच्यापाशी असतात तेव्हा ईश्वरी कृपे‌ची देणगी म्हणून तुम्ही त्या स्वीकारता आणि जेव्हा त्या तुम्हाला सोडून जातात किंवा जेव्हा त्या तुमच्याकडून काढून घेण्यात येतात, तेव्हा तुम्ही अपरिग्रहाचा (destitution) हर्ष अनुभवत जीवन जगता. स्वामित्व-भावनेमुळेच तुम्ही गोष्टींना चिकटून राहता, ती भावनाच तुम्हाला गुलाम बनविते. तसे नसते तर या येणाऱ्या-जाणाऱ्या गोष्टींच्या निरंतर घडामोडींमध्येही तुम्ही नेहमीच हर्षभरित जीवन जगू शकला असतात. त्या गोष्टी त्यांच्यासोबत (कृतार्थतेचा आनंद‌ आणि निर्लिप्ततेचा आनंद‌) दोन्हीही घेऊन येतात म्हणजे, जेव्हा त्या गोष्टी तुमच्यापाशी असतात तेव्हा तुम्ही ‘कृतार्थतेचा आनंद‌’ अनुभवू शकता आणि जेव्हा तुमच्यापाशी त्या नसतात तेव्हा तुम्ही ‘निर्लिप्ततेचा आनंद‌’ अनुभवू शकता. (दोन्हीवेळी तुम्ही आनंदच अनुभवू शकता.)

सत्यामध्ये जीवन जगणे; शाश्वता‌शी, खऱ्याखुऱ्या जीवनाशी सायुज्य पावून जीवन जगणे; जो प्रकाश कधीच मावळत नाही अशा प्रकाशात जीवन जगणे म्हणजे आनदं! मुक्त असणे खऱ्या स्वातंत्र्यासहित मुक्त असणे, ईश्वरी संकल्पा‌शी असलेल्या अविचल, नित्य ऐक्याचे स्वातंत्र्य अनुभवणे म्हणजे आनंद!

…जेव्हा स्वतःच्या मालकीचे असे तुमच्याजवळ काहीच नसते तेव्हा तुम्ही विश्वाएवढे विशाल होऊ शकता.

– श्रीमाताजी (CWM 03 : 253-254)

पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला जीवन समग्रतेने पाहता येईल. म्हणजे व्यक्तीला फक्त सद्यकालीन जीवनच समग्रतेने पाहता आले पाहिजे असे नव्हे तर, भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांच्या समग्रतेमध्ये ते पाहता आले पाहिजे. म्हणजे जीवन पूर्वी कसे होते, ते आत्ता कसे आहे आणि ते कसे असेल या सर्वच गोष्टी व्यक्तीला नजरेच्या एका टप्प्यात पाहता आल्या पाहिजेत. कारण प्रत्येक गोष्ट तिच्या तिच्या योग्य स्थानी ठेवण्याचा हाच एकमेव मार्ग असतो.

कोणतीही गोष्ट वर्ज्य करता येत नाही, कोणतीही गोष्ट वर्ज्य करता कामा नये, तर प्रत्येक गोष्ट उर्वरित सर्व गोष्टींशी पूर्णपणे सुमेळ राखत, तिच्या योग्य स्थानी ठेवता आली पाहिजे. तसे करता आले तर, कर्मठ मनाला आज ज्या गोष्टी इतक्या ‘वाईट‌’, इतक्या ‘निंद्य‌’, इतक्या ‘अस्वीकारार्ह’ वाटतात, त्याच गोष्टी दिव्य जीवनामध्ये पूर्णतया आनंददायी आणि स्वातंत्र्याचा, मुक्ततेचा अनुभव देणाऱ्या ठरतील.

आणि मग, अनंतत्वाने जीवन जगत असताना, परमेश्वर‌ त्याकडे पाहून जो अपार आनंद घेत असतो ते परमेश्वरा‌चे अद्भुत हास्य जाणून घेण्यापासून, समजून घेण्यापासून, ते अनुभवण्यापासून किंवा ते जगण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही. हा आनंद, हे अद्भुत हास्य प्रत्येक सावट, प्रत्येक वेदना, प्रत्येक दुःखभोग नाहीसा करते. (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 10 : 155-156)

(उत्तरार्ध)

स्वत:बद्दल विचार करत राहणे, काय करावे आणि काय करू नये याची चिंता बाळगणे, स्वत:साठी काय चांगले आहे व काय वाईट, कोणत्या गोष्टीला मुरड घालायची आणि कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यायचा, यासारखे विचार सतत करत बसणे या गोष्टी किती थकविणाऱ्या आहेत; किती कंटाळवाण्या, रटाळ, किती अळणी आहेत या! त्यापेक्षा सूर्यप्रकाशात उमलणाऱ्या एखाद्या फुलाप्रमाणे जर व्यक्ती त्या परम चेतनेसमोर, परम प्रज्ञेसमोर, परम प्रकाशासमोर, परम प्रेमासमोर, स्वत:ला पूर्णपणे खुली करू शकली; ज्याला सर्वकाही ज्ञात आहे, जो सारेकाही करू शकतो, जो तुमच्या जीवनाचे संचालन करू शकतो (अशा परमेश्वरासमोर) स्वत:ला पूर्णपणे खुली करू शकली, तर मग अशा व्यक्तीला कोणत्याही चिंता, काळज्या भेडसावणार नाहीत. ही आदर्श स्थिती आहे.

पण मग हे असे का केले जात नाही? कारण व्यक्ती त्याचा विचारच करत नाही, व्यक्ती तसे करायचे विसरून जाते, आणि मग जुन्याच सवयी परत येतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अचेतनामध्ये किंवा अबोध मनामध्ये आत खोलवर कोठेतरी, एक घातक शंका नकळतपणे घर करून बसलेली असते. ती कानात कुजबुजते की, “बघ हं! तू जर काळजी घेतली नाहीस तर तुझ्याबाबतीत काहीतरी दुर्घटना घडेल. जर तू स्वत:कडे लक्ष पुरविले नाहीस तर काय घडेल काही सांगता येत नाही.’’ आणि तुम्ही एवढे मूढ असता, इतके अंध झालेले असता की, तुम्ही तेच ऐकता आणि तुम्ही फक्त स्वत:कडे लक्ष द्यायला लागता आणि मग सगळेच बिघडून जाते. मग तुम्हाला पुन्हा पहिल्यापासून तुमच्या पेशींना थोडेसे शहाणपण, थोडेसे सामान्य ज्ञान पुरवावे लागते आणि ‘चिंता करू नका,’ ही गोष्ट त्यांना पुन्हा शिकवावी लागते.

– श्रीमाताजी (CWM 03 : 256-257)

(पूर्वार्ध)

‘सुजाण व्हा’ असे सांगण्यासाठी सर्वसाधारणपणे जी कारणे सुचविली जातात ती नेहमीच अगदी किरकोळ असतात, असे मला नेहमी वाटत आले आहे. उदाहरणार्थ, “असे करू नका, नाहीतर तुम्हाला दुःख सहन करावे लागेल. तसे करू नका, नाहीतर त्यातून तुमच्या मनात भीती निर्माण होईल.” …परंतु यामुळे चेतना अधिकाधिक शुष्क बनत जाते, कठीण बनत जाते कारण ती दुःख-वेदनेला घाबरत असते.

(म्हणून तसे सांगण्याऐवजी) असे सांगितले गेले पाहिजे की, चेतनेची एक अशी स्थिती असते की, ज्या स्थितीमध्ये निर्भेळ आनंद असतो, छायाविरहित प्रकाश असतो, जेथे भीतीच्या सर्व शक्यताच नाहीशा होतात. अशी स्थिती अभीप्सेद्वारे आणि आंतरिक सातत्यपूर्ण प्रयत्नांनी साध्य करून घेता येते. ही अशी अवस्था असते की, ज्या अवस्थेमध्ये व्यक्ती स्वत:साठी जगत नाही, तर व्यक्ती जे काही करते, जे काही तिला वाटते, तिच्या सर्व कृती या परमेश्वराला अर्पण या भावातून, परिपूर्ण विश्वासातून, स्वत:विषयीच्या चिंता, काळजी यांपासून विनिर्मुक्त होऊन केल्या जातात. या अवस्थेमध्ये स्वत:वरील सर्व प्रकारचे ओझे की, जे आता ओझे वाटतच नाही, ते सारे त्या परमेश्वरावर सोपविलेले असते. (परमेश्वरावर सारे काही सोपविले असल्यामुळे) स्वत:विषयी कोणतीही काळजी नसणे, (परमेश्वराखेरीज अन्य कशाचाही विशेषत:) स्वत:विषयीचा कोणताही विचार मनात नसणे, हा एक अवर्णनीय आनंद असतो.
(उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 03 : 256)