Tag Archive for: व्यावहारिक जीवन

सद्भावना – १७

मी दोन अटी नेमून देत आहे. प्रगती करण्याची इच्छा असणे – ही खरोखरच अगदी साधीशी अट आहे. प्रगती करण्याची इच्छा असणे, तसेच अजून प्रत्येक गोष्ट पूर्ण व्हायची आहे, प्रत्येक गोष्टीवर विजय प्राप्त करून घ्यायचा आहे, हे ज्ञात असणे, ही पहिली अट. दुसरी अट अशी की, दररोज कोणतीतरी एखादी अशी कृती, असे एखादे काम, अशी एखादी गोष्ट की जी स्वतःसाठी केलेली नसेल आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, जी सर्वांविषयीच्या सद्भावनेची अभिव्यक्ती असेल …तुम्ही जणू विश्वाच्या केंद्रस्थानी असल्यासारखे आणि सारे विश्व तुमच्या भोवती फिरत असल्यासारखे तुम्ही फक्त स्वतःपुरते जगत नाही, हे ज्यामधून दिसून येईल अशी एखादी कृती केली पाहिजे. आपण विश्वाच्या केंद्रस्थानी आहोत आणि सारे विश्व आपल्याभोवतीच फिरत आहे, अशीच बहुसंख्य लोकांची कल्पना असते आणि इतकेच काय, पण ते त्यांच्या गावीदेखील नसते. प्रत्येकाला याची जाणीव असली पाहिजे. अगदी सहजपणे, व्यक्ती स्वतःला विश्वाच्या केंद्रस्थानी ठेवते आणि सारे काही या ना त्या मार्गाने आपल्याकडेच आले पाहिजे अशी तिची इच्छा असते. परंतु प्रत्येक व्यक्तीने समग्रतेचे अस्तित्व ओळखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, इतकेच. म्हणजे व्यक्तीने स्वतःची चेतना विशाल करण्याचा म्हणजेच स्वतःचा संकुचितपणा कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 315-316)

सद्भावना – १६

आश्रमात येणाऱ्या दर्शनार्थींचे स्वागत करण्याची जबाबदारी ज्या व्यक्तींकडे असते त्या व्यक्तींचे आचरण नेहमीच अतिशय विनम्र आणि मृदु असले पाहिजे, अशी श्रीमाताजींची अपेक्षा असते. कोणी उच्च असू दे वा कनिष्ठ, कोणी तरुण असू देत वा वयस्कर, त्यांनी उत्तमोत्तम पोषाख परिधान केलेला असू दे वा अगदी फाटक्या कपड्यातील असू देत, साऱ्यांचे स्वागत सारख्याच सद्भावनेने आणि सदाचाराने झाले पाहिजे. चांगल्या पोषाखातील व्यक्ती आश्रमातील स्वागतासाठी जास्त सुयोग्य आहेत असे मानण्याची काहीच गरज नाही. एखाद्या भिकाऱ्यासारख्या दिसणाऱ्या सामान्य माणसापेक्षा मोटार गाडीतून आलेल्या माणसांची आपण अधिक काळजी घेत आहोत, असे कदापिही घडता कामा नये. आपल्यासारखीच ती देखील माणसं आहेत हे आपण कदापिही विसरता कामा नये आणि आपण श्रेणीच्या सर्वोच्च स्थानी आहोत, असे समजण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही.
आणि आपली विनम्रता ही केवळ बाह्य स्वरूपाची असता कामा नये, येथे खरीखुरी विनम्रता, अभिप्रेत आहे. जी आतून आलेली असली पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 167)

सद्भावना – १४

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

कोणतेही कर्म हे शांततेमध्ये केल्यास नेहमीच सर्वोत्कृष्ट दर्जाचे होते. काम करण्यासाठीच जर बोलणे आवश्यक असेल तर फक्त त्याचा अपवाद असावा. गप्पागोष्टी फावल्या वेळासाठी राखून ठेवाव्यात. अशावेळी मग काम करत असताना, तुम्ही शांत (गप्पगप्प) असता याबद्दल कोणीही आक्षेप घेता कामा नये.

दुसरे असे की, तुम्ही इतरांबाबत योग्य दृष्टिकोन बाळगला पाहिजे आणि इतर काय म्हणतात किंवा काय करतात यामुळे तुम्ही स्वतःला अस्वस्थ, त्रस्त किंवा नाराज होऊ देऊ नये – वेगळ्या शब्दांत सांगायचे तर ‘समता’ बाळगावी आणि योगसाधकाला साजेशी अशी वैश्विक सद्भावना बाळगावी. तुम्ही तसे केलेत आणि तरीही इतर लोक अस्वस्थ झाले किंवा नाराज झाले तर, तुम्ही ते मनावर घेता कामा नये; कारण (तेव्हा मग) त्यांच्या चुकीच्या प्रतिक्रियांसाठी तुम्ही जबाबदार असणार नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 322-323)

सद्भावना – १२

प्रश्न : सद्भावनेच्या स्पंदनाने व्यक्ती जगाला मदत करू शकते का?

श्रीमाताजी : सद्भावनेच्या साहाय्याने व्यक्ती अनेक गोष्टी बदलू शकते, फक्त ती सद्भावना अत्यंत शुद्ध आणि निर्भेळ असली पाहिजे. हे तर उघडच आहे की, एखादा विचार, एखादी अतिशय शुद्ध आणि सच्ची प्रार्थना जर विश्वात प्रसृत झाली तर ती तिचे कार्य करतेच. परंतु हा अतिशय शुद्ध आणि सच्चा विचार जेव्हा मानवी मेंदूत प्रवेश करतो तेव्हा त्याचे काय होते? त्याचे अवमूल्यन होते. ज्ञान आणि आंतरिक चेतनेच्या प्रयत्नांच्या माध्यमातून, जर तुम्ही तुमच्यातील एखाद्या इच्छेवर खरोखर मात केलीत, म्हणजे ती इच्छा मावळली आणि नाहीशी झाली, आणि जर का आंतरिक सद्भावनेने, चेतनेच्या, प्रकाशाच्या, ज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या इच्छेचा विलय करू शकलात, तर तुम्ही ती इच्छा पूर्ण केली असताना जेवढे समाधानी झाले असता, त्याच्यापेक्षा शतपटीने स्वतःच वैयक्तिकरित्या सर्वप्रथम आनंदी व्हाल आणि नंतर त्याचे अद्भुत परिणाम घडून येतील. तुम्हाला कल्पनाच करता येणार नाही, पण त्याचे जगभरात पडसाद उमटतील. त्याचा परिणाम सर्व जगभरात पसरेल. कारण तुम्ही जी स्पंदने निर्माण केलेली असतील ती पसरत राहतील. या गोष्टी बर्फाच्या गोळ्याप्रमाणे वाढत जातात. तुमच्या चारित्र्यामध्ये जो विजय तुम्ही प्राप्त करून घ्याल, तो किती का लहान असेना, तोच विजय संपूर्ण जगात प्राप्त करून घेणे शक्य असते. मी आत्ता हेच सांगितले : आंतरिक प्रकृतीमध्ये परिवर्तन न करता केलेल्या सर्व गोष्टी – हॉस्पिटल्स, शाळा उभारणे इ. इ. – या एक प्रकारच्या घमेंडीतून केल्या जातात, कारण त्या पाठीमागे ‘मी कोणीतरी थोर असल्या’ची भावना असते, पण स्वतःमधील या छोट्याछोट्या अ-लक्षित गोष्टींवर मात केलेली असेल तर, (त्याचे परिणाम जरी लपलेले असले तरी) त्यामुळे अगणित पटीने अधिक महान विजय प्राप्त करून घेता येतो. तुमच्यामधील प्रत्येक कृती जी मिथ्या असते आणि सत्याच्या विरोधी असते, ती प्रत्येक कृती म्हणजे दिव्य जीवनाला दिलेला नकार असतो. तुमच्या छोट्या प्रयत्नांचे लक्षणीय परिणाम होतात, कदाचित तुम्हाला ते समजण्याचे समाधानही मिळणार नाही, परंतु त्याचा खराखुरा आणि नेमकेपणाने अधिक अ-वैयक्तिक (impersonal) आणि सार्वत्रिक परिणाम घडून येतो.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 19-20)

सद्भावना – ११

प्रत्येक व्यक्ती तिच्याभोवती स्पंदनांनी बनलेले असे एक वातावरण वागवत असते; ही स्पंदने त्या व्यक्तीच्या चारित्र्यातून, तिच्या विचारसरणीतून, तिच्या मनःस्थितीतून, तिच्या भावनांच्या, तिच्या कृती करण्याच्या पद्धतीतून निर्माण होत असतात. प्रत्येकाचे असणारे असे हे वातावरण, संपर्काच्या द्वारे, परस्परांवर क्रिया-प्रतिक्रिया करत असते; ही स्पंदने संसर्गजन्य असतात; म्हणजे असे की, आपण ज्या व्यक्तीला भेटतो त्या व्यक्तीची स्पंदने आपण अगदी सहजगत्या स्वीकारतो, विशेषतः त्या व्यक्तीची स्पंदने शक्तिशाली असतील तर! यावरून एक गोष्ट सहज लक्षात येईल की, एखादी व्यक्ती स्वतःमध्ये आणि स्वतःभोवती शांती आणि सद्भावना वागवीत असेल तर, ती व्यक्ती तिच्या व्यक्तिमत्त्वातील आंशिक का होईना पण शांती आणि सद्भावना यांचे एक प्रकारे प्रक्षेपणच इतरांवर करेल, आणि त्याऐवजी ती व्यक्ती जर तिरस्कार, चिडचिड आणि रागराग या गोष्टी वागवत असेल तर, (तिच्या संपर्कात आलेल्या) इतर व्यक्तींमध्ये देखील तशाच प्रवृत्ती जागृत होतील. याच्या आधारे अनेक घटनांचे स्पष्टीकरण देता येणे शक्य आहे, अर्थात, हे काही एकमेव स्पष्टीकरण नाही.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 32)

सद्भावना – १०

मी अनेकदा लोकांना असे बोलताना ऐकले आहे की, “काय हे? मी आता चांगले वागायचा प्रयत्न करतो आहे आणि प्रत्येकजण माझ्याशी वाईटच वागतोय.” पण हे असे घडते ते तुम्हालाच शिकवण देण्यासाठी असते की, व्यक्तीने कोणतातरी अंतःस्थ हेतू बाळगून चांगले असता कामा नये, म्हणजे असे की, इतरांनी तुमच्याशी चांगले वागावे म्हणून तुम्ही चांगले वागायचे, असे नाही तर, व्यक्तीने चांगले असण्यासाठीच चांगले वागले पाहिजे.

नेहमीसाठी तोच धडा आहे : जितके काही चांगले, जितके उत्तम करता येईल तेवढे करावे, परंतु फळाची अपेक्षा बाळगू नये, परिणाम दिसावेत म्हणून काही करू नये. अगदी ह्या दृष्टिकोनामुळेच, म्हणजे चांगल्या कृतीसाठी, सत्कार्यासाठी काहीतरी बक्षिसाची अपेक्षा बाळगायची, जीवन सुखकर होईल असे वाटते म्हणून चांगले वागायचे, या अशा गोष्टींमुळेच सत्कार्याची किंमत नाहीशी होऊन जाते.

चांगुलपणाच्या प्रेमापोटीच तुम्ही चांगले असले पाहिजेत, न्यायाच्या प्रेमापोटी तुम्ही न्यायी असले पाहिजेत; तुम्ही पावित्र्याच्या, शुद्धतेच्या प्रेमापोटीच पवित्र व शुद्ध असावयास हवे आणि निरपेक्षतेच्या प्रेमापोटीच निरपेक्ष असायला हवे, तरच तुम्ही मार्गावर प्रगत होण्याची खात्री बाळगू शकता.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 264-265)

सद्भावना – ०९

तुमच्यामध्ये समजा एखादा दोष असेल, जो तुम्ही दूर करू इच्छित असाल आणि जर का तो तरीही टिकून राहिला आणि जर तुम्ही म्हणाल की, “मला जेवढे करता येणे शक्य होते तेवढे सगळे मी केले आहे,” तेव्हा तुम्ही निश्चितपणे असे समजा की, जे जे करणे आवश्यक होते ते सारे तुम्ही केलेले नाही. तुम्ही जर तसा प्रयत्न केला असता तर, तुम्हाला नक्कीच विजय प्राप्त झाला असता; कारण तुमच्या वाट्याला ज्या अडचणी येतात त्या अगदी तुमच्या सामर्थ्याच्या प्रमाणातच असतात – तुमच्या चेतनेचा भाग नसलेले असे काहीच तुमच्या बाबतीत घडू शकत नाही आणि जे जे काही तुमच्या चेतनेशी संबंधित असते त्यावर तुम्ही प्रभुत्व मिळवू शकता. ज्या गोष्टी किंवा सूचना बाहेरून येतात, त्यासुद्धा तुमच्या चेतनेने ज्याला संमती दिलेली असते अगदी तेवढ्या प्रमाणातच असतात आणि तुम्ही तुमच्या चेतनेचे स्वामी व्हावे यासाठीच तुमची निर्मिती झालेली असते. तुम्ही जर असे म्हणाल की, ”मला जे करणे शक्य होते ते सारे मी केले आहे आणि सगळ्या गोष्टी करून सुद्धा तो दोष तसाच कायम राहिला, आणि म्हणून मी प्रयत्न करणे सोडून दिले,” तर तुम्ही हे निश्चित समजा की, तुम्हाला जे जे काही करणे शक्य होते ते तुम्ही केलेले नाही. सगळे करून सुद्धा, जेव्हा कोणतीही त्रुटी शिल्लक राहते तेव्हा त्याचा अर्थ असा की, तुमच्या अस्तित्वात दडी मारून बसलेली एखादी गोष्ट (जॅक इन द बॉक्स) या खेळण्यातल्याप्रमाणे अचानक उसळून वर येते आणि तुमच्या जीवनाचा ताबा घेते. म्हणून, करण्यासारखी एकमात्र गोष्ट म्हणजे, तुमच्या आतमध्ये दडी मारून बसलेले सर्व छोटे कोपरे वेचून वेचून काढायचे आणि जर का त्या अंधाऱ्या भागावर सद्भावनेचा एक छोटासा कवडसा जरी तुम्ही टाकलात तर, तो अंधारा कोपरा शरण येईल, तो नाहीसा होऊन जाईल आणि एके काळी जी गोष्ट तुम्हाला अशक्य वाटली होती ती नुसती शक्यच होईल असे नाही, ती केवळ व्यवहारातच उतरेल असे नाही, तर ती पूर्ण झालेली असेल. तुम्हाला अनेक वर्षे सतावणारी अशी एखादी अडचण तुम्ही अशा रीतीने एका क्षणात दूर करू शकता. मी तुम्हाला अगदी खात्री देते. ते फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून असते आणि ती गोष्ट म्हणजे, तुम्हाला त्या दोषापासून, त्या त्रुटीपासून अगदी खरोखर, प्रामाणिकपणे सुटका करून घ्यायची इच्छा असली पाहिजे. आणि हे सर्व बाबतीत सारखेच असते, शारीरिक आजारपणापासून ते सर्वोच्च मानसिक अडचणींपर्यंत ही गोष्ट सारखीच लागू पडते.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 74-75)

सद्भावना – ०८

दयाळूपणा आणि सद्भावना यांमध्ये खरी महानता, खरी श्रेष्ठता सामावलेली असते.

*

एकटा मनुष्य त्याच्या आध्यात्मिक शक्तीच्या साहाय्याने जे साध्य करू शकतो तीच गोष्ट, एखादा समूह सद्भावनेच्या विचाराने संघटित झाला तर साध्य होऊ शकते. एक खाल्डियन (Chaldean) म्हण आहे की, “तुम्ही बारा जणं जेव्हा सदाचरणासाठी एकत्रित याल तेव्हा ‘अनिर्वचनीय’ (सद्वस्तु) प्रकट होईल.”

*

सर्वांबद्दलच्या सद्भावना आणि सर्वांकडून मिळणाऱ्या सद्भावना हा शांती आणि सुसंवादाचा पाया असतो.

*

मानवतेची एकता ही एक आधारभूत आणि विद्यमान वस्तुस्थिती आहे. परंतु मनुष्यजातीचे बाह्य एकत्व हे मात्र मनुष्याच्या सद्भावनांवर आणि त्याच्या प्रामाणिकपणावर अवलंबून असते.

*

जिथे कुठे प्रामाणिकपणा आणि सद्भावना असते, तिथे ईश्वराचे साहाय्यसुद्धा असते.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 21), (CWM 02 : 114), (CWM 13 : 243), (CWM 15 : 66), (CWM 14 : 86)

सद्भावना – ०६

प्रश्न : एखाद्या व्यक्तीच्या सद्भावनेपेक्षा दुसऱ्या व्यक्तीच्या दुरिच्छेची ताकद अधिक मोठी असेल तर ?

श्रीमाताजी : हो, खरे आहे, असे घडू शकते. मूलतः म्हणूनच आपण पुन्हा त्याच गोष्टीपाशी येऊन पोहोचतो – व्यक्तीने स्वतःला शक्य असेल तितके सारे काही, शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने केले पाहिजे आणि ते सारे ‘ईश्वरा’ला अर्पण या भावनेने करायचे आणि मग, जेव्हा ते स्थिरस्थावर आणि सुव्यवस्थित झालेले असेल तेव्हा आणि त्या व्यक्तीमध्ये जर खरोखरच अभीप्सा असेल आणि ती व्यक्ती जर प्रकाशमय अस्तित्व असेल तर, ती व्यक्ती सारे वाईट प्रभाव निष्प्रभ करू शकते. पण एकदा का व्यक्तीने या जगात पाऊल टाकले की, सारे काही अगदी शुद्ध आणि वाईट प्रभावांपासून मुक्त असेल, अशी फारशी आशा बाळगता येत नाही. प्रत्येक वेळी व्यक्ती जेव्हा अन्नग्रहण करते, तेव्हा त्या प्रत्येक घासाबरोबर ते प्रभाव ती ग्रहण करत असते; प्रत्येक श्वासागणिक ते प्रभाव आत शोषून घेत असते. आणि त्यामुळेच, कोणती गोष्ट आवश्यक असेल तर ती म्हणजे, होता होईल तेवढे, हळूहळू, एकेक करून, शुद्धिकरणाचे काम करत राहायचे.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 413)

विचार शलाका – ३१

जेव्हा एखाद्या व्यक्तीची ‘पूर्णयोगा’साठी निवड निश्चित झालेली असते तेव्हा सर्व परिस्थिती, मनाचे आणि जीवनाचे सारे चढउतार हे त्या व्यक्तीला, या ना त्या प्रकारे योगाकडेच घेऊन जाण्यासाठी साहाय्यकारी ठरतात. त्याच्या स्वतःच्या चैत्यपुरुषाकडून आणि ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘ईश्वरी शक्ती’कडून, अशा व्यक्तीच्या बाह्यवर्ती परिस्थितीचे चढउतार आणि मनाचे चढउतार या दोन्हींचा वापर त्या ध्येयाप्रत घेऊन जाण्यासाठी करून घेतला जातो.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 30-31)