Tag Archive for: व्यावहारिक जीवन

तुम्हाला जेव्हा एखाद्या गोष्टीचा कंटाळा आलेला असतो, तुम्हाला एखादी गोष्ट वेदनादायी किंवा अगदी अस्वस्थ करणारी वाटत असते, अशा वेळी जर तुम्ही काळाच्या (time) अनंततेचा आणि अवकाशाच्या (space) असीमतेचा विचार करायला सुरुवात केलीत, आजवर जे काही घडून गेले आहे आणि येथून पुढे जे घडणार आहे, त्याचा तुम्ही विचार केलात आणि आत्ताचा क्षण हा अनंत काळामधील खरोखरच एका श्वासाइतकाच आहे असा तुम्ही विचार केलात तर, काळाच्या अनंततेमध्ये असणाऱ्या या एका एवढ्याशा क्षणामुळे अस्वस्थ होणे हे तुम्हाला अगदीच हास्यास्पद वाटू लागेल. …खरोखरच, काळाच्या अनंततेमध्ये एका क्षणाचे मोल ते काय? खरोखरच व्यक्तीला हे प्रत्यक्षात उतरवता आले तर….

डोळ्यांसमोर चित्र आणा की, ज्या इवल्याशा पृथ्वीवर आपण वावरत असतो, ते आपण म्हणजे एक किती किरकोळ व्यक्ती आहोत आणि त्यामध्ये चेतनेचा हा एक चिमुकला कण आहे, एक क्षण आहे, ज्यामुळे आत्ता तुम्ही दुखावल्यासारख्या झाले आहात किंवा तुम्हाला तो दु:खद वाटत आहे तो क्षण डोळ्यांसमोर आणा. वास्तविक, हा क्षण तुमच्या अस्तित्वाचा एक अगदी छोटासा क्षण आहे. आणि खुद्द तुम्हीसुद्धा यापूर्वीच्या अनेक प्रसंगांमधून येथवर आलेला असता आणि यापुढेही अनेक गोष्टी घडायच्या असतात. तेव्हा ज्या गोष्टी आत्ता तुमच्यावर एवढा परिणाम करत आहेत त्या अजून दहा वर्षांनी तुम्ही कदाचित पूर्णपणे विसरून गेलेला असाल किंवा जरी अगदी त्या गोष्टी आठवल्याच तर तुम्ही स्वतःच म्हणाल की, “मी या गोष्टीला इतके का बरे महत्त्व दिले होते?”

तुम्हाला खरोखरच जाणवू लागते की, स्वतःला आणि आपल्याबाबतीत जे घडते आहे त्याला इतके महत्त्व देणे, हे किती हास्यास्पद आहे. तुम्ही जर ही गोष्ट अगदी सुयोग्य रितीने केलीत तर, अगदी तीन मिनिटांमध्ये सारे दुःख नाहीसे होईल. इतकेच काय पण एखादी अगदी तीव्र वेदनासुद्धा अशाच पद्धतीने नाहीशी होईल. त्यासाठी एकाग्रता करायची आणि स्वतःला अनंताच्या व काळाच्या पटलावर ठेवायचे. सर्व अस्वस्थता निघून जाते आणि व्यक्ती तिला भेडसावणाऱ्या त्या त्रासदायक गोष्टीपासून मोकळी होते. ही गोष्ट योग्य पद्धतीने कशी करायची हे माहीत असेल तर, व्यक्ती सर्व आसक्तीपासून आणि अगदी निरतिशय दुःखामधून बाहेर पडू शकते. ही पद्धत तुम्हाला तुमच्या क्षुद्र अहंच्या जाणिवेतून त्वरित बाहेर काढते.

– श्रीमाताजी [CWM 06 : 345-346]

आपण खूपच जटिलतेने भरलेल्या वातावरणात राहत असतो, पण नेहमीच एक अशी जागा असते की, जिथे सारेकाही खुले, साधे, सरळ असते; हे अनुभवलेले सत्य मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही त्याच त्या परिघात गोल गोल फिरत राहता, धडपड करत राहता, त्यावर काम करत राहता आणि मग कुठेतरी कुंठित झाल्यासारखे होते; आणि अशा वेळी तुमच्या आंतरात्मिक दृष्टिकोनातून (psychic attitude) तुम्हाला एखादा मार्ग गवसतो आणि सारे काही मोकळे होते आणि हे अगदी सहजतेने होते. मला असा अनुभव बऱ्याच वेळेला आलेला आहे.

….श्रीअरविंद नेहमी असे म्हणत असत की, “साधे राहावे, साधे असावे. जे तुम्हाला जाणवते ते साधेपणाने व्यक्त करा. साधे असा! साधे असावे!’’ यावर त्यांचा खूप भर असे. म्हटले तर हे केवळ शब्द आहेत. पण पहिल्यांदा जेव्हा हे शब्द त्यांनी उच्चारले, तेव्हा मला माझ्यासमोर जणू एक प्रकाशमार्गच खुला होताना दिसला आणि सारे काही खूप साधे-सोपे होऊन गेले. ‘एकावेळी एकच पाऊल पुढे टाकायचे आहे, मग दुसरे पाऊल. आपल्याला एवढेच तर करायचे आहे,’ असे मला जाणवून गेले. म्हणूनच ते नुसते शब्द नाहीत तर ती वस्तुस्थिती आहे.

श्रीमाताजी (स्वतःच्या कपाळाकडे निर्देश करत) म्हणतात, सारी जटिलता इथे (मनामध्ये) आहे. खूप जटिल आहे ते, त्याच्याशी जुळवून घेणे खूप अवघड आहे. ‘साधेसरळ असावे,’ असे जेव्हा श्रीअरविंद म्हणाले, तेव्हा काय आश्चर्य! तेव्हा जणू काही त्यांच्या डोळ्यांमधून प्रकाश बाहेर पडत होता. अचानकपणे आपण जणू प्रकाशाच्या बागेतच आलो आहोत असे वाटावे असे काहीसे झाले. जणू काही ती बाग प्रकाशात न्हाऊन निघाली होती. साध्या गोष्टीवर केवढा मोठा भर दिला होता त्यांनी! तुम्हाला जे दिसते, तुम्हाला जे माहीत आहे तेच साधेपणाने बोला, सहजपणाने बोला.

… श्रीअरविंद येथे ज्याला ‘साधेसरळ असणे’ असे म्हणत आहेत, ती एक अगदी आनंददायी उत्स्फूर्तता आहे, सहजता आहे. कृतीमध्ये, अभिव्यक्तीमध्ये, प्रत्येक हालचालीमध्ये, जीवनामध्ये साधे असावे, सरळ असावे. एक आनंदी सहजता! उत्क्रांतीमधील सहजस्वाभाविक व आनंदी अवस्था – ज्याला ते ‘दिव्य’ म्हणतात ती अवस्था – आपण पुनर्प्राप्त करून घ्यावी, अशी श्रीअरविंदांची आपल्याकडून अपेक्षा आहे. …आपण एखाद्या उमलत्या गुलाबाच्या फुलाप्रमाणे सहजसाधेपणाने आनंदी असावे, असे त्यांना अभिप्रेत आहे. आणि मी जेव्हा हे ऐकले, मी जेव्हा हे पाहिले, तेव्हा सुवर्ण प्रकाशाचा जणू एक झराच वाहत होता, जणू एक सुगंधित बाग असावी असे काहीसे ते होते. सारे, सारे, सारे काही खुले झाले होते.

– श्रीमाताजी (Conversation with a Disciple, September 16, 1961)

“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, त्या मनुष्यामध्ये स्वामित्व-भावना नसते. म्हणजे वस्तू जेव्हा त्याच्यापाशी येतील तेव्हा तो त्यांचा उपयोग करेल, पण तेव्हासुद्धा त्याला ही जाण असेल की, त्या (माझ्या मालकीच्या नसून) त्या परमेश्वराच्या मालकीच्या आहेत आणि म्हणूनच, अगदी त्या त्याच्यापासून दूर झाल्या तरीही त्याबद्दल तो खंत बाळगणार नाही. ज्या ईश्वराने त्याला त्या वस्तू दिल्या होत्या, त्यांचा इतरांना उपभोग घेता यावा म्हणून त्याच ईश्वराने त्या त्याच्याकडून काढून घेतल्या, ही गोष्ट त्याला अगदी सहजस्वाभाविक वाटते. अशा मनुष्याला वस्तुंचा वापर करत असताना आणि त्यांचा अभाव असतानाही सारखाच हर्ष अनुभवास येतो.

जेव्हा त्या वस्तू तुमच्यापाशी असतात तेव्हा ईश्वरी कृपे‌ची देणगी म्हणून तुम्ही त्या स्वीकारता आणि जेव्हा त्या तुम्हाला सोडून जातात किंवा जेव्हा त्या तुमच्याकडून काढून घेण्यात येतात, तेव्हा तुम्ही अपरिग्रहाचा (destitution) हर्ष अनुभवत जीवन जगता. स्वामित्व-भावनेमुळेच तुम्ही गोष्टींना चिकटून राहता, ती भावनाच तुम्हाला गुलाम बनविते. तसे नसते तर या येणाऱ्या-जाणाऱ्या गोष्टींच्या निरंतर घडामोडींमध्येही तुम्ही नेहमीच हर्षभरित जीवन जगू शकला असतात. त्या गोष्टी त्यांच्यासोबत (कृतार्थतेचा आनंद‌ आणि निर्लिप्ततेचा आनंद‌) दोन्हीही घेऊन येतात म्हणजे, जेव्हा त्या गोष्टी तुमच्यापाशी असतात तेव्हा तुम्ही ‘कृतार्थतेचा आनंद‌’ अनुभवू शकता आणि जेव्हा तुमच्यापाशी त्या नसतात तेव्हा तुम्ही ‘निर्लिप्ततेचा आनंद‌’ अनुभवू शकता. (दोन्हीवेळी तुम्ही आनंदच अनुभवू शकता.)

सत्यामध्ये जीवन जगणे; शाश्वता‌शी, खऱ्याखुऱ्या जीवनाशी सायुज्य पावून जीवन जगणे; जो प्रकाश कधीच मावळत नाही अशा प्रकाशात जीवन जगणे म्हणजे आनदं! मुक्त असणे खऱ्या स्वातंत्र्यासहित मुक्त असणे, ईश्वरी संकल्पा‌शी असलेल्या अविचल, नित्य ऐक्याचे स्वातंत्र्य अनुभवणे म्हणजे आनंद!

…जेव्हा स्वतःच्या मालकीचे असे तुमच्याजवळ काहीच नसते तेव्हा तुम्ही विश्वाएवढे विशाल होऊ शकता.

– श्रीमाताजी (CWM 03 : 253-254)

पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला जीवन समग्रतेने पाहता येईल. म्हणजे व्यक्तीला फक्त सद्यकालीन जीवनच समग्रतेने पाहता आले पाहिजे असे नव्हे तर, भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांच्या समग्रतेमध्ये ते पाहता आले पाहिजे. म्हणजे जीवन पूर्वी कसे होते, ते आत्ता कसे आहे आणि ते कसे असेल या सर्वच गोष्टी व्यक्तीला नजरेच्या एका टप्प्यात पाहता आल्या पाहिजेत. कारण प्रत्येक गोष्ट तिच्या तिच्या योग्य स्थानी ठेवण्याचा हाच एकमेव मार्ग असतो.

कोणतीही गोष्ट वर्ज्य करता येत नाही, कोणतीही गोष्ट वर्ज्य करता कामा नये, तर प्रत्येक गोष्ट उर्वरित सर्व गोष्टींशी पूर्णपणे सुमेळ राखत, तिच्या योग्य स्थानी ठेवता आली पाहिजे. तसे करता आले तर, कर्मठ मनाला आज ज्या गोष्टी इतक्या ‘वाईट‌’, इतक्या ‘निंद्य‌’, इतक्या ‘अस्वीकारार्ह’ वाटतात, त्याच गोष्टी दिव्य जीवनामध्ये पूर्णतया आनंददायी आणि स्वातंत्र्याचा, मुक्ततेचा अनुभव देणाऱ्या ठरतील.

आणि मग, अनंतत्वाने जीवन जगत असताना, परमेश्वर‌ त्याकडे पाहून जो अपार आनंद घेत असतो ते परमेश्वरा‌चे अद्भुत हास्य जाणून घेण्यापासून, समजून घेण्यापासून, ते अनुभवण्यापासून किंवा ते जगण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही. हा आनंद, हे अद्भुत हास्य प्रत्येक सावट, प्रत्येक वेदना, प्रत्येक दुःखभोग नाहीसा करते. (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 10 : 155-156)

(उत्तरार्ध)

स्वत:बद्दल विचार करत राहणे, काय करावे आणि काय करू नये याची चिंता बाळगणे, स्वत:साठी काय चांगले आहे व काय वाईट, कोणत्या गोष्टीला मुरड घालायची आणि कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यायचा, यासारखे विचार सतत करत बसणे या गोष्टी किती थकविणाऱ्या आहेत; किती कंटाळवाण्या, रटाळ, किती अळणी आहेत या! त्यापेक्षा सूर्यप्रकाशात उमलणाऱ्या एखाद्या फुलाप्रमाणे जर व्यक्ती त्या परम चेतनेसमोर, परम प्रज्ञेसमोर, परम प्रकाशासमोर, परम प्रेमासमोर, स्वत:ला पूर्णपणे खुली करू शकली; ज्याला सर्वकाही ज्ञात आहे, जो सारेकाही करू शकतो, जो तुमच्या जीवनाचे संचालन करू शकतो (अशा परमेश्वरासमोर) स्वत:ला पूर्णपणे खुली करू शकली, तर मग अशा व्यक्तीला कोणत्याही चिंता, काळज्या भेडसावणार नाहीत. ही आदर्श स्थिती आहे.

पण मग हे असे का केले जात नाही? कारण व्यक्ती त्याचा विचारच करत नाही, व्यक्ती तसे करायचे विसरून जाते, आणि मग जुन्याच सवयी परत येतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अचेतनामध्ये किंवा अबोध मनामध्ये आत खोलवर कोठेतरी, एक घातक शंका नकळतपणे घर करून बसलेली असते. ती कानात कुजबुजते की, “बघ हं! तू जर काळजी घेतली नाहीस तर तुझ्याबाबतीत काहीतरी दुर्घटना घडेल. जर तू स्वत:कडे लक्ष पुरविले नाहीस तर काय घडेल काही सांगता येत नाही.’’ आणि तुम्ही एवढे मूढ असता, इतके अंध झालेले असता की, तुम्ही तेच ऐकता आणि तुम्ही फक्त स्वत:कडे लक्ष द्यायला लागता आणि मग सगळेच बिघडून जाते. मग तुम्हाला पुन्हा पहिल्यापासून तुमच्या पेशींना थोडेसे शहाणपण, थोडेसे सामान्य ज्ञान पुरवावे लागते आणि ‘चिंता करू नका,’ ही गोष्ट त्यांना पुन्हा शिकवावी लागते.

– श्रीमाताजी (CWM 03 : 256-257)

(पूर्वार्ध)

‘सुजाण व्हा’ असे सांगण्यासाठी सर्वसाधारणपणे जी कारणे सुचविली जातात ती नेहमीच अगदी किरकोळ असतात, असे मला नेहमी वाटत आले आहे. उदाहरणार्थ, “असे करू नका, नाहीतर तुम्हाला दुःख सहन करावे लागेल. तसे करू नका, नाहीतर त्यातून तुमच्या मनात भीती निर्माण होईल.” …परंतु यामुळे चेतना अधिकाधिक शुष्क बनत जाते, कठीण बनत जाते कारण ती दुःख-वेदनेला घाबरत असते.

(म्हणून तसे सांगण्याऐवजी) असे सांगितले गेले पाहिजे की, चेतनेची एक अशी स्थिती असते की, ज्या स्थितीमध्ये निर्भेळ आनंद असतो, छायाविरहित प्रकाश असतो, जेथे भीतीच्या सर्व शक्यताच नाहीशा होतात. अशी स्थिती अभीप्सेद्वारे आणि आंतरिक सातत्यपूर्ण प्रयत्नांनी साध्य करून घेता येते. ही अशी अवस्था असते की, ज्या अवस्थेमध्ये व्यक्ती स्वत:साठी जगत नाही, तर व्यक्ती जे काही करते, जे काही तिला वाटते, तिच्या सर्व कृती या परमेश्वराला अर्पण या भावातून, परिपूर्ण विश्वासातून, स्वत:विषयीच्या चिंता, काळजी यांपासून विनिर्मुक्त होऊन केल्या जातात. या अवस्थेमध्ये स्वत:वरील सर्व प्रकारचे ओझे की, जे आता ओझे वाटतच नाही, ते सारे त्या परमेश्वरावर सोपविलेले असते. (परमेश्वरावर सारे काही सोपविले असल्यामुळे) स्वत:विषयी कोणतीही काळजी नसणे, (परमेश्वराखेरीज अन्य कशाचाही विशेषत:) स्वत:विषयीचा कोणताही विचार मनात नसणे, हा एक अवर्णनीय आनंद असतो.
(उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 03 : 256)

(उत्तरार्ध)

‘भांडणतंटे न करतासुद्धा व्यक्ती जीवन जगू शकते,’ असे म्हणणे कदाचित काहीसे विचित्र वाटेल. कारण, गोष्टी आज जशा आहेत, तशा पाहिल्या तर हे जीवन जणू काही भांडणतंट्यांनीच बनलेले असावे असे दिसते. म्हणजे असे की, जी माणसं एकत्र राहतात त्यांचा मुख्य उद्योग हा जणू भांडणतंटे करणे हाच असतो, असे दिसते. मग ती भांडणे उघड असोत किंवा छुपी असोत. तुम्ही प्रत्येक वेळी अगदी आरडाओरडाच करता असे नाही किंवा अगदी हमरीतुमरीवर येता असेही नाही; मात्र आतून तुम्ही सतत एकसारख्या चिडचिडलेल्या अवस्थेमध्ये वावरत असता. कारण तुम्हाला स्वतःमध्ये जे परिपूर्णत्व आणण्याची इच्छा असते ते तुम्हाला तुमच्या आजूबाजूला दिसत नाही. खरंतर ती गोष्ट प्रत्यक्षात आणणे तुम्हालासुद्धा अवघड असते; परंतु तुम्हाला असे वाटत असते की, इतरांनी मात्र ती प्रत्यक्षात आणलीच पाहिजे. “ते असे कसे काय वागू शकतात?” असे तुम्ही म्हणता. (त्यांनी ‘जसे’ वागता कामा नये असे तुम्हाला वाटते) ‘तसे‌’ वागणे तुम्हालासुद्धा किती कठीण जाते, हे तेव्हा तुम्ही पूर्णपणे विसरून गेलेले असता.

…प्रत्येक गोष्टीकडे हसतमुखाने पाहा. ज्या गोष्टींमुळे तुमची चिडचिड होते त्या गोष्टींकडे तुम्ही एक धडा या दृष्टीने पाहा. तसे कराल तर तुमचे जीवन अधिक शांतिपूर्ण आणि अधिक परिणामकारक होईल. कारण जे परिपूर्णत्व तुम्ही स्वतः प्रत्यक्षात आणू इच्छित असता, ते तुम्हाला इतरांमध्ये दिसले नाही तर, त्यामुळे तुमची जी चिडचिड होते त्यामध्ये तुमच्यातील पुष्कळशी ऊर्जा तुम्ही निश्चितपणे गमावून बसता. परिपूर्णत्व इतरांनी प्रत्यक्षात उतरवले पाहिजे या मुद्द्यापाशीच तुम्ही थांबता आणि वास्तविक जे उद्दिष्ट तुम्ही साध्य करून घेतले पाहिजे त्याविषयी, तुम्ही क्वचितच जागरूक असता. तुम्ही जर त्याविषयी जागरूक असाल तर, तुम्हाला जे कार्य नेमून देण्यात आलेले आहे ते करायला सुरुवात करा. म्हणजे, तुम्ही स्वतः काय केले पाहिजे ते प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न करा आणि इतर काय करतात याची चिंता करणे सोडून द्या. कारण, खरंतर ते तुमचे कामच नाही.

खऱ्याखुऱ्या योग्य दृष्टिकोनाचा मार्ग सांगायचा झाला तर तो हाच आहे की, “जे कोणी तुमच्या अवतीभोवती आहेत, जीवनात जी कोणती परिस्थिती तुमच्या वाट्याला आली आहे, ज्या कोणत्या व्यक्ती तुमच्या जवळ आहेत त्या म्हणजे, तुम्ही कोणती प्रगती केली पाहिजे हे तुम्हाला दाखवून देणारे जणू काही ईश्वरी चेतने‌ने तुमच्यासमोर धरलेले आरसेच असतात. इतरांच्या एखाद्या गोष्टीचा तुम्हाला जर धक्का बसला तर, त्याचा अर्थ हाच की, ‘तुम्ही ते कार्य तुमच्या स्वतःमध्ये करणे आवश्यक आहे.’ व्यक्ती जर स्वतःच्या अंगी खरेखुरे परिपूर्णत्व बाणवेल तर तिला तेच परिपूर्णत्व इतरांमध्येही आढळून येईल.

– श्रीमाताजी (CWM 10 : 22-23)

(पूर्वार्ध)

एखाद्या व्यक्तीमधील एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला अजिबात पटण्यासारखी नसते किंवा ती तुम्हाला अगदी हास्यास्पद वाटते (आणि तुम्ही म्हणता,) “तो असा आहे, तो तसा वागतो, तो असे असे म्हणतो, तो अशा अशा गोष्टी करतो.” अशावेळी तुम्ही स्वतःच्या मनाशी म्हटले पाहिजे, “बरं, ठीक आहे, पण मी देखील कदाचित माझ्या नकळतपणे तशाच गोष्टी करत नसेन कशावरून? टीका करण्यापूर्वी मी स्वतःकडेच नीट लक्षपूर्वक असे पाहिले पाहिजे की, थोड्या वेगळ्या पद्धतीने असेल कदाचित, पण मीसुद्धा तीच गोष्ट तर करत नाहीये ना? याची मला खात्री करून घेतली पाहिजे.’’

प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीच्या वागण्याचा धक्का बसतो तेव्हा तेव्हा, उपरोक्त विचार करण्यासाठी लागणारी चांगली जाणीव आणि बुद्धिमत्ता जर तुमच्यापाशी असेल, तर तुमच्या असे लक्षात येईल की, जीवनामध्ये तुमचे इतरांशी असणारे संबंध हे जणू एखाद्या आरशाप्रमाणे असतात. तुमच्यामध्ये ज्या ज्या अपूर्णता, दुर्बलता आहेत त्या तुम्हाला अगदी सहजतेने आणि अगदी स्पष्टपणे पाहता याव्यात यासाठी, (आरशाच्या माध्यमातून) त्या तुमच्यासमोर मांडण्यात आलेल्या असतात.

सर्वसाधारणपणे आणि जवळजवळ निरपवादपणे सांगायचे झाले तर, तुम्हाला इतरांमधील जी गोष्ट खटकत असते, अगदी नेमकी तीच गोष्ट कमीअधिक झाकलेल्या रूपात, कमीअधिक गुप्त रूपात, कदाचित किंचितशा वेगळ्या वेषात तुम्ही स्वतःमध्ये बाळगून असता. ही तीच गोष्ट असते जिच्यामुळे तुमची फसगत होण्याची शक्यता असते. स्वतःमधील जी गोष्ट तुम्हाला फारशी त्रासदायक वाटत नसते तीच गोष्ट जेव्हा तुम्हाला दुसऱ्यामध्ये दिसते, तेव्हा ती एकदम भयंकर वाटू लागते. याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी तुम्हाला त्याची पुष्कळच मदत होईल. आणि त्यामुळे इतरांबरोबर असणाऱ्या तुमच्या नात्याबाबत तुमच्यामध्ये एक सूर्यप्रकाशवत्‌‍ सहिष्णुता उदयाला येईल; समजूतदारपणातून येणारी सदिच्छा उदयाला येईल आणि मग त्यातून, अगदी निरर्थक असणाऱ्या भांडणतंट्यांचा देखील शेवट होईल.

(उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 10 : 21-22)

लोक तुमच्याविषयी द्वेषपूर्ण उद्गार काढतात, तुम्हाला मूर्खात काढतात त्यामुळे तुम्ही जर चिंताग्रस्त झालात, दुःखी झालात किंवा नाउमेद झालात तर तुम्ही (योग)मार्गावर फार प्रगत होऊ शकणार नाही. अशा गोष्टी तुमच्या वाट्याला येतात याचे कारण तुम्ही दुर्दैवी आहात किंवा तुमच्या नशीबातच सुख नाही असे मुळीच नाही; तर उलट दिव्य चेतने‌ने व दिव्य कृपे‌ने तुमचा संकल्प गांभीर्याने घेतला आहे असा त्याचा अर्थ होतो. तुमचा निश्चय किती प्रामाणिक आहे, मार्गातील अडचणींना सामोरे जाण्यासाठी तुम्ही खंबीर आहात का, याची पारख करण्यासाठी, तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा कसोटीच्या दगडाप्रमाणे (सोन्याची पारख करण्याचा सोनाराकडे असणारा कसोटीचा दगड) दिव्य चेतनेकडून व दिव्य कृपेकडून वापर केला जात असतो, हे त्यामागचे खरे कारण असते.

म्हणून जर कोणी तुमचा उपहास केला किंवा कोणी तुमच्याविषयी निंदाजनक शब्द उच्चारले तर, तुमच्या खऱ्या गुणांची लोकांना कदरच नाही असे वाटून तुम्ही उदास, संतप्त किंवा उद्विग्नही होता कामा नये. उलट, अशावेळी पहिली गोष्ट तुम्ही केली पाहिजे ती अशी की, तुमच्यातील कोणत्या दुर्बलतेमुळे वा कोणत्या अपूर्णतेमुळे तुमच्याविषयी तसे उद्गार काढले गेले ते तुम्ही अंतर्मुख होऊन पाहिले पाहिजे. एवढेच नव्हे तर, तुमच्यातील कोणता दोष, कोणती दुर्बलता वा कोणती विकृती तुम्ही दुरुस्त केली पाहिजे हे दाखवून दिल्याबद्दल, तुम्ही दिव्य कृपे‌विषयी कृतज्ञ असले पाहिजे. दुःखीकष्टी होण्याऐवजी, तुम्ही पूर्णपणे समाधानी झाले पाहिजे आणि तुमचे अहित व्हावे असा जो तुमच्या निंदकांचा हेतू होता, त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ करून घेतला पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 03 : 282)

(उत्तरार्ध)

आपल्या हाती असलेला वेळ मुळातच अगदी कमी असतो आणि तो अधिकच कमी असल्याचे कालांतराने तुमच्या लक्षात येते. जीवनाच्या अखेरीस तुमच्या लक्षात येते की, तुम्हाला मिळालेली संधी तुम्ही तीनचतुर्थांश वेळेला गमावलेली आहे. मग अशा वेळी तुम्ही हाती राहिलेल्या थोड्या वेळातच दुप्पट काम करू पाहता पण त्याचाही काही उपयोग होत नाही. त्यापेक्षा नेमस्तपणे, समतोलपणे, चिकाटीने, शांतपणे कर्म करत राहणे आणि तुम्हाला देण्यात आलेली कोणतीही संधी वाया न दवडणे, म्हणजेच तुम्हाला मिळालेल्या मोकळ्या क्षणाचा वापर खऱ्या उद्दिष्टासाठी व्यतीत करणे हे अधिक उत्तम ठरते.

जेव्हा तुमच्याकडे करण्यासारखे काहीच नसते, तेव्हा तुम्ही अस्वस्थ होता; तुम्ही सैरभैर होता, मित्रमैत्रिणींना भेटता, फिरायला जाता. लक्षात घ्या, मी येथे फक्त त्यातल्या त्यात बऱ्या गोष्टींचाच उल्लेख करत आहे, ज्या गोष्टी करताच कामा नयेत त्यांच्याविषयी तर मी येथे बोलतच नाहीये. अशा गोष्टी करत बसण्यापेक्षा, विस्तीर्ण पसरलेल्या आकाशाखाली वा समुद्रासमोर किंवा झाडांखाली शांतपणे बसा आणि पुढीलपैकी एखादी तरी गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करा – आपण का जगतो हे समजून घ्या, आपण कसे जगायला हवे हे शिका, तुम्हाला जीवनात काय करावेसे वाटते आणि त्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे याचे चिंतन करण्यामध्ये, तसेच ज्यामध्ये तुम्ही जीवन जगत असता त्या गोष्टींपासून म्हणजे अज्ञान, मिथ्यत्व आणि दुःखभोग यांपासून सुटका करून घेण्याचा उत्तम मार्ग कोणता, या साऱ्या गोष्टींचे आकलन करून घेण्यासाठी आणि त्या गोष्टी प्रत्यक्षात उतरविण्यासाठी वेळेचा उपयोग करा.

– श्रीमाताजी (CWM 03 : 250-251)