Tag Archive for: व्यावहारिक जीवन

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो आजार दिवसेंदिवस अधिक पसरत चाललेला दिसत आहे आणि आता तर आपल्या काळात त्याने उग्र रूप धारण केले आहे; त्याला आपण ‘उपयुक्ततावाद’ (Utilitarianism) म्हणतो. माणसे आणि वस्तू, परिस्थिती आणि कृती, उपक्रम या गोष्टी जणू त्याच दृष्टिकोनातून बघितल्या जातात आणि त्याच दृष्टिकोनातून त्यांची पारख केली जाते, असे दिसते. एखादी गोष्ट जर उपयुक्त नसेल तर तिला काही मोलच नसते. जे अजिबात उपयुक्त नाही त्यापेक्षा जे थोडे का होईना उपयुक्त आहे, ते निश्चितच अधिक चांगले आहे. पण यासाठी उपयुक्त म्हणजे काय यावर आधी आपले एकमत व्हावे लागेल; उपयुक्त कोणासाठी, उपयुक्त काय आणि कशासाठी? याची व्याख्या करावी लागेल.

जे मानववंश स्वत:ला सुसंस्कृत समजतात त्यांची अशी समजूत असते की, ज्या गोष्टीमधून पैसा मिळविता येतो, जे अर्थोत्पादन करू शकते ते ते उपयुक्त असते. प्रत्येक गोष्टीचा निर्णय व मूल्यमापन आर्थिक दृष्टिकोनातूनच केले जाते. यालाच मी ‘उपयुक्ततावाद’ म्हणते. आणि हा आजार अत्यंत संसर्गजन्य आहे; इतका की या रोगापासून अगदी लहान मुलांचासुद्धा बचाव होऊ शकलेला नाही.

ज्या वयात मुलांनी सौंदर्य, महानता, पूर्णत्व यांची स्वप्ने पाहिली पाहिजेत त्या वयात, आजची मुले केवळ पैशाची स्वप्ने पाहू लागली आहेत आणि हा पैसा कसा मिळवायचा याचीच त्यांना चिंता लागली आहे. म्हणून मुले जेव्हा अभ्यासाचा विचार करत असतात तेव्हा, त्यांना काय उपयोगी पडू शकेल; म्हणजे काय केले असता, मोठे झाल्यावर त्यांना त्यातून भरपूर पैसा कमावता येईल; याचाच ती अधिक विचार करत असतात.

त्यांच्या दृष्टीने एकच गोष्टी सर्वाधिक महत्त्वाची ठरते; आणि ती म्हणजे परीक्षेत यशस्वीरित्या उत्तीर्ण होण्यासाठी स्वत:ची तयारी करणे; कारण पदविका, प्रमाणपत्र, विविध पदव्या यांच्या साहाय्यानेच केवळ त्यांना चांगली अधिकार-पदे प्राप्त होऊ शकतील आणि त्यातूनच ते भरपूर पैसा कमावू शकतील. त्यांच्या दृष्टीने अभ्यासाचा इतर कोणताच हेतू नसतो, त्या व्यतिरिक्त त्यांना अभ्यासात काहीही स्वारस्य नसते.

ज्ञानासाठी ज्ञान मिळविणे; प्रकृतीचे आणि जीवनाचे रहस्य जाणून घेण्यासाठी अभ्यास करणे; चेतनेचा विकास घडविण्यासाठी स्वतःला शिक्षित करणे; आत्मप्रभुत्व मिळविण्यासाठी स्वयंशिस्त लावणे; स्वत:च्या दुर्बलता, अक्षमता व अज्ञान यांवर मात करणे; अधिक उदात्त व विशाल, अधिक उदार व अधिक सच्च्या अशा ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी स्वत:ची तयारी करणे…. या साऱ्याचा आजची मुले क्वचितच विचार करतात आणि या साऱ्या गोष्टींना ते फार आदर्शवादी, कल्पनारम्य असे मानतात. व्यावहारिक बनणे, पैसा कसा कमवावयाचा हे शिकणे आणि त्यासाठी स्वत:ला तयार करणे फक्त याच गोष्टी त्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात.

– श्रीमाताजी [CWM 12 : 351-352]

व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने स्वतःची प्रगती केली पाहिजे, गुणांची जोपासना केली पाहिजे, स्वतःच्या दोषांवर मात केली पाहिजे. स्वतःला अज्ञान आणि अक्षमतेमधून बाहेर काढण्यासाठी मिळालेली एक संधी या दृष्टीने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. व्यक्तीने असे केले तर मग जीवन विलक्षण स्वारस्यपूर्ण होईल आणि मग त्यासाठी कष्ट सोसणे अधिक श्रेयस्कर होईल.

*

सर्वसाधारणपणे सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, इंद्रियांना वळण लावणे, शिक्षण घेणे, संस्कृती जोपासणे या सर्व गोष्टी म्हणजे असंस्कृत उपजत प्रेरणा, इच्छावासना आणि कामना यांमध्ये सुधारणा घडविण्याची साधनं असतात. या प्रेरणा, इच्छावासना, कामनादी गोष्टींना नष्ट करणे हा त्यावरचा उपाय नाही; तर त्यांच्यामध्ये सुसंस्कृतता आणली पाहिजे, त्यांची जोपासना विचारपूर्वक केली पाहिजे, त्यांच्यामध्ये उच्च अभिरुची रुजवली पाहिजे. त्यांच्यामध्ये सुधारणा घडविण्याचा हा सर्वात खात्रीचा मार्ग आहे. चेतनेची प्रगती आणि विकास व्हावा या दृष्टिकोनातून त्यांच्या वाढीस जास्तीत जास्त वाव दिला पाहिजे. त्यामुळे त्यांच्यामध्ये सुसंवादाची जाणीव वाढीस लागू शकेल; आकलनात नेमकेपणा येऊ शकेल. तो मानवाच्या शिक्षणाचा आणि संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग असतो.

– श्रीमाताजी (CWM 12 : 124, 120-121)

(‘श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन’ या श्रीअरविंद आश्रमाच्या शाळेमध्ये मुलांच्या आंतरात्मिक आणि आध्यात्मिक विकासाला पोषक असे वातावरण मिळते. येथेच श्रीमाताजींच्या प्रेरणेतून ‘फ्री प्रोग्रेस एज्युकेशन’ या नवीन शिक्षणपद्धतीचा उदय झाला. प्रचलित शिक्षणपद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने शिक्षण देताना या शाळेतील शिक्षकांना काही अडचणी येत असत, त्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागत असे. अशा वेळी श्रीमाताजी त्यांना विविध उपाययोजना सुचवत असत; त्यांना मार्गदर्शन करत असत. त्यापैकीच हा अंशभाग..)

व्यक्तीमधील परिपूर्णतेची क्षमता सर्वोच्च शक्यतेपर्यंत वाढविणे हे (आपल्या) शिक्षणाचे ध्येय आहे; व्यक्तीला जीवनामध्ये किंवा समाजामध्ये केवळ यशस्वी होण्यासाठी तयार करणे हे शिक्षणाचे ध्येय नाही.

*

केवळ यश मिळविणे हे उद्दिष्ट ठेवू नका; आपले ध्येय परिपूर्णत्व हे आहे. तुम्ही एका नूतन जगाच्या उंबरठ्यावर उभे आहात (आणि एवढेच नव्हे तर,) तुम्ही त्याच्या उदयामध्ये सहभागी होत आहात आणि त्याच्या निर्मितीमध्ये तुम्ही साधनभूत होत आहात हे कधीही विसरू नका. रूपांतरणाइतकी (transformation) दुसरी कोणतीच गोष्ट महत्त्वाची नाही. त्याच्या इतकी उपयुक्त अशी इतर कोणतीच गोष्ट नाही.

– श्रीमाताजी (CWM 12 : 120)

(पाँडिचेरी येथील श्रीअरविंद आश्रमात आबालवृद्ध, शाळेचे विद्यार्थी रोज नियमितपणे आश्रमाच्या मैदानावर जातात आणि शारीरिक शिक्षण घेतात. त्याचा संदर्भ येथे आहे.)

विद्यार्थी : मैदानावर रोज खेळण्यापूर्वी आणि त्यानंतर आम्ही एक मिनिटभर एकाग्र होऊन शांत बसतो. त्यावेळी आम्ही काय प्रयत्न केला पाहिजे?

श्रीमाताजी : तुम्ही जी कृती करणार आहात ती कृती प्रथम ईश्वरार्पण करा, म्हणजे तुम्ही जे काही कराल ते तुम्हाला आत्मनिवेदित भावाने (spirit of consecration) करता येईल. नंतर, “ईश्वराची सेवा करण्यासाठी आम्ही अधिकाधिक सुपात्र असे साधन व्हावे यासाठी, आमच्यामध्ये प्रगतीची इच्छा वाढीस लागू दे,” अशी प्रार्थना तुम्ही ईश्वराकडे करा. खेळण्यास सुरुवात करण्यापूर्वी, तुम्ही स्वतःला ईश्वराप्रत शांतपणे अर्पित करू शकता. आणि खेळून झाल्यावर निश्चल-नीरवपणे ईश्वराप्रत कृतज्ञतेने नतमस्तक व्हा. म्हणजे, मनामध्ये नुसते शब्दोच्चारण होत आहे पण त्यामध्ये भाव नाहीत अशी ती कृती असता कामा नये. ती कृती अगदी अंत:करणपूर्वक झाली पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 12 : 354-355)

शिक्षेच्या भीतीने नव्हे तर, आपण खोडसाळ (naughty) आहोत याची जाणीव झाल्यामुळे खजील होऊन, मुलाचा खोडसाळपणा बंद झाला पाहिजे. त्यामुळे त्याची खरी प्रगती होते. भीतीमुळे जर त्याचा खोडसाळपणा बंद होणार असेल तर, त्यामुळे मानवी चेतनेमधून ते मूल एक पायरी खाली घसरते, कारण भीती म्हणजे चेतनेचा ऱ्हास असतो.

• श्रीमाताजी (CWM 12 : 362)

कोणत्याही परिस्थितीमध्ये, म्हणजे मूल काहीही करत असले तरी त्याला पुरेशी झोप मिळालीच पाहिजे. वयानुसार झोपेचे तास कमीअधिक होतील. बाळ पाळण्यात असताना, ते जितका वेळ जागे असते त्याच्यापेक्षा अधिक वेळ त्याने झोपले पाहिजे. जसजसे ते मूल मोठे होत जाईल तसतसे त्याच्या झोपेचे प्रमाण कमीकमी होत जाईल. परंतु मुलाची वाढ पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याने किमान आठ तास तरी झोपलेच पाहिजे. जिथे शांतता आहे आणि जिथे खेळती हवा आहे अशा जागी त्याने झोपले पाहिजे.

लहान मुलांना विनाकारण उशिरापर्यंत जागे राहायला लावता कामा नये. मज्जातंतूंना विश्रांती मिळण्याच्या दृष्टीने मध्यरात्रीपूर्वीचे तास हे सर्वात उत्तम असतात. एवढेच काय पण ज्यांना मज्जागत संतुलन (nervous balance) कायम ठेवायचे आहे त्यांनी दिवसासुद्धा थोडी विश्रांती घेणे आवश्यक असते. मुलं लहान असतात तेव्हाच त्यांना स्नायूंना आणि मज्जातंतूंना आराम कसा द्यायचा याची कला शिकविली पाहिजे.

पण बरेच पालक असेही असतात की, जे मुलांना कोणती ना कोणती तरी कृती करण्यास भाग पाडत असतात. जेव्हा मूल शांत असते तेव्हा पालकांना असे वाटते की, जणू ते आजारी आहे. मुलांना आराम करू न देता किंवा त्यांना थोडीही विश्रांती घेऊ न देता, कामामध्ये गुंतवून ठेवण्याची वाईट खोडसुद्धा काही पालकांना असते. …आपल्या कुटुंबाला मदत करण्याचे जर मुलाने स्वतःहून ठरविले असेल आणि काम करण्याची त्याला आवड असेल तरच त्याला तशा प्रकारचे काम करू दिले पाहिजे. मात्र त्यामध्ये एक खबरदारी घेतली गेली पाहिजे. आणि ती अशी की, त्याच्या शरीराचे कार्य व्यवस्थितपपणे चालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विश्रांतीचे तास त्यामुळे कमी होता कामा नयेत.

* श्रीमाताजी (CWM 12 : 15-16)

शरीर आरोग्यपूर्ण ठेवण्यसाठी आणि सामर्थ्य संपादन करण्यासाठी आपण अन्नग्रहण करतो; आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी नाही, हे व्यक्तीला अगदी लहानपणापासूनच माहीत असले पाहिजे. लहान मुलांना त्यांच्या प्रकृतीस मानवेल असे अन्न दिले पाहिजे. अन्न आरोग्यदायी असेल याची खात्री केली पाहिजे आणि स्वच्छतेची खबरदारी घेऊन ते तयार केलेले असावे. तसेच ते रुचकर असूनही अतिशय साधे, सात्त्विक असले पाहिजे. मुलांचे वय आणि त्यांच्या रोजच्या कृती पाहून, त्यानुसार आणि त्या प्रमाणात आहाराची निवड केली पाहिजे. मुलांच्या शरीराच्या प्रत्येक घटकाच्या संतुलित वाढीसाठी आणि त्यांच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पोषक द्रव्यांचा समावेश त्यांच्या आहारात केला पाहिजे.

मुलं निरोगी राहण्यासाठी आणि त्यांना आवश्यक असणारी ऊर्जा पुरविण्यासाठी साहाय्य व्हावे यासाठी आहार द्यायचा असल्यामुळे, आहाराबाबत त्यांच्यावर सक्ती करता कामा नये किंवा त्या अन्नाचा उपयोग शिक्षा म्हणूनही कधी करता कामा नये. “तू नीट वागला नाहीस त्यामुळे तुला आता मी हा खाऊ देणार नाही,” असे मुलांना कधीही म्हणू नये. ही पालकांची सवय अतिशय घातक असते. असे जर तुम्ही त्याला सांगितलेत तर, शरीर योग्य रितीने कार्यरत राहावे म्हणून अन्न आवश्यक नसून, ते मुख्यत: त्याचे लाड पुरविण्यासाठी त्याला दिले जाते, अशी त्याची समजूत होण्याची शक्यता असते आणि त्याच्या चेतनेमध्ये तीच धारणा पक्की होण्याची शक्यता असते.

• श्रीमाताजी (CWM 12 : 14)

 

(आंतरिक धर्माचे पालन न करणाऱ्या व्यक्तीचे जीवन म्हणजे यातनाघरच कसे असते, ते श्रीमाताजींनी सांगितले. आपण तो मुद्दा कालच्या भागात विचारात घेतला. आता, अशा दुराचारी व्यक्तीच्या बाबतीत प्रामाणिकपणाचा काय उपयोग होतो, ते श्रीमाताजी स्पष्ट करत आहेत.)

आंतरिक धर्माचे पालन न करणारा मनुष्य जी कोणती गोष्ट करू पाहील त्यात त्याला यश मिळणारच नाही, असे नाही. तो ज्या गोष्टीची इच्छा बाळगेल ती गोष्ट संपादन करणे त्याला शक्यच होणार नाही, असेही नाही. पण यदाकदाचित, त्याच्या वाट्याला दुर्दैव आलेच तर, त्याच्या आंतरतम अस्तित्वामध्ये प्रामाणिकपणाची एक धुगधुगी अजूनही कुठेतरी शिल्लक आहे, याचे ते द्योतक असते. (त्या दुर्दैवाच्या माध्यमातून जीवन त्याला जो बोध देऊ पाहत असते त्या बोधास तो त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रामाणिकपणामुळे पात्र ठरतो.) तेव्हा अगोदर त्याला यश, इच्छावासनांची परिपूर्ती इत्यादी गोष्टींचे जे बाह्य लाभ होत होते ते आता मिळेनासे होतात.

आणि म्हणूनच, जेव्हा एखाद्या दुर्वर्तनी मनुष्याच्या वाट्याला दुर्दैव येते आणि त्यामुळे तो जेव्हा दुःखीकष्टी होतो; त्याला जेव्हा पश्चात्ताप होतो तेव्हा, (तुम्ही त्याच्या दुःखकष्टावर उपहासाने न हसता) त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे. त्याच्या अंतरंगातील प्रामाणिकपणाची ज्योत अजून पूर्णपणे विझलेली नाही आणि त्याच्या वाईट कृत्यांबद्दल अजूनही त्याच्या अंतरंगातील कोणीतरी त्याला समज देऊ पाहत आहे, असा त्याच्या वाट्याला आलेल्या दुर्दैवाचा अर्थ होतो. अंतिमतः पुन्हा आपण त्याच मुद्द्यापाशी येतो की, तुम्ही व्यक्तीच्या बाह्य रंगरूपाकडे पाहून, कधीही त्या व्यक्तीविषयीचे अडाखे बांधता कामा नयेत. तुम्ही बाह्य परिस्थिती पाहून काही निष्कर्ष काढाल तर, तुमचा तो अंदाज नेहमीच निश्चितपणे खोटा ठरेल, या निरीक्षणापाशीच आपण येतो.

सत्याची एक झलक मिळण्यासाठी, व्यक्तीने स्वतःच्या चेतनेमध्ये किमान थोडेसे तरी वळले पाहिजे; तिने स्वतःच्या अंतरंगात थोडेतरी डोकावून पहिले पाहिजे आणि वरकरणी दिसणाऱ्या दृश्यांच्या पाठीमागे असणाऱ्या शक्तींच्या खेळाकडे आणि त्या खेळाच्याही पाठीमागे असणाऱ्या ईश्वरी उपस्थितीकडे लक्ष दिले पाहिजे आणि ती समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 03 : 279)

 

(आंतरिक धर्माचे पालन करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनावर त्याचा सकारात्मक परिणाम कसा होतो हे आपण कालच्या भागात पाहिले. श्रीमाताजी आता येथे बौद्धमतामधील ‘निरय’ या शब्दाचा सखोल अर्थ समजावून सांगत आहेत.)

व्यक्तीने केलेल्या दुष्कृत्यांबद्दल, तिला जिथे शिक्षा केली जाते ती जागा म्हणजे एक प्रकारचा नरक, असा बौद्धमतातील ‘निरय‌’ (Niraya) या संकल्पनेचा प्रचलित अर्थ होतो. परंतु त्याचा अन्यही एक अर्थ आहे. प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे असे एक विशिष्ट सत्य असते; खरंतर त्या सत्याकडून तिच्या चेतनेच्या सर्व गतिविधींचे आणि शरीराच्या सर्व कृतींचे संचालन झाले पाहिजे. पण व्यक्ती जेव्हा तिच्या या आंतरिक धर्मानुसार आचरण करत नाही — म्हणजे केवळ बाह्य नीतिनियम किंवा सामाजिक नियमांनुसार आचरण असे नव्हे — तर, जेव्हा ती स्वतःशीच विसंगत अशा रितीने आचरण करते तेव्हा, ती स्वतःभोवती जे एक प्रकारचे (अनिष्ट) वातावरण निर्माण करते त्या वातावरणाला ‘निरय‌’ असे म्हणता येईल. हा निरय या संकल्पनेचा खरा अर्थ आहे.

…जेव्हा एखादा माणूस त्याच्या इच्छावासना, त्याचे भावावेग यांचेच म्हणणे ऐकत असतो, त्याबरोबर वाहवत जात असतो किंवा आत्मपरीक्षण करण्यासाठी ज्याच्यापाशी वेळ नसतो, जो पूर्णपणे निंदानालस्ती करतच जीवन खर्च करतो, त्याच्या जीवनाचे इतरांवर काय परिणाम होतील, त्याच्या वर्तणुकीचे काय बरेवाईट परिणाम होतील याची जो पर्वा करत नाही, तो स्वतःभोवती कुरुपतेचे, स्वार्थीपणाचे, संघर्षाचे आणि दुरिच्छेचे एक वातावरण तयार करतो. आणि स्वाभाविकपणे त्या वातावरणाचा त्याच्या स्वतःच्या चेतनेवर परिणाम होतो आणि त्यातून एकंदरच जीवनाकडे तो कडवटपणे पाहू लागतो. आणि सरतेशेवटी त्याची ही वृत्ती म्हणजे कायमचे यातनाघर होऊन बसते. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 03 : 278-279)

(आपल्या चेतनेमधील वेगवेगळे घटक आणि त्यांच्यामधील विसंवाद याची आपल्याला जाणीव नसते याविषयी श्रीमाताजींनी काही सांगितले आहे. ते कालच्या भागात आपण पाहिले.)

चेतनेचा एक घटक म्हणत असतो की, “नाही, अमुक एक गोष्ट मला नकोय.” पण त्याच्यामागे अनेक घटकांचा एक ढिगाराच जणू काही लपून बसलेला असतो. आणि तो मात्र त्याविषयी काहीच म्हणत नाही, तो ढिगारा स्वतःचे अस्तित्वसुद्धा जाणवू देत नाही. बहुधा अज्ञानामुळे, त्याला गोष्टी जशा आहेत तशाच चालू राहाव्यात असे वाटत असते. त्या घटकांना असे वाटत असते की, जगात जे काही घडते ते चांगल्यासाठीच घडत असते आणि म्हणून अमुक एखाद्या गोष्टीत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, यावर त्यांचा विश्वासच नसतो.

मला पूर्वी एकदा एक स्त्री भेटली होती. तिच्याविषयी मी तुम्हाला सांगितले होते ना? ती नेहमी म्हणायची, “व्यक्ती जेव्हा स्वतःमध्ये बदल करू पाहते, तेव्हा सगळे त्रास सुरू होतात.” एका फ्रेंच लेखकाने याच गोष्टीचा पुनरुच्चार केला आहे आणि त्याने तर त्यापासून त्याचा आवडता सिद्धान्तच तयार केला आहे. “तुम्ही जेव्हा स्वतःला परिपूर्ण बनवायचे अशी इच्छा बाळगता, तेव्हा दुःखसंकटं यायला सुरुवात होते. म्हणून तुम्ही स्वतःला परिपूर्ण बनवण्याचा संकल्प केला नाहीत तर तुम्हाला कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागणार नाही.” हा होता त्याचा सिद्धान्त. हा सिद्धान्त पूर्णपणे चुकीचा आहे. पण त्याच वेळी एक गोष्ट मात्र खरी आहे की, तुमच्यामधील बदलास नाखूष असणारे काही घटक मात्र म्हणत असतात, “काय कटकट आहे? आम्हाला एकटेच राहू द्या.” तुम्ही कोणताही त्रास दिलेला त्यांना चालत नाही, ते जसे आहेत तसेच ते राहावेत अशी त्यांची इच्छा असते.

– श्रीमाताजी (CWM 04 : 74-75)