Tag Archive for: व्यावहारिक जीवन

 

भाग ०२

(व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक का होऊ शकत नाही हे श्रीमाताजी खुलासेवार सांगत आहेत.)

ज्ञानेंद्रियांची कार्यंसुद्धा अशीच विपर्यस्त होऊन जातात. व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती असते तोपर्यंत गोष्टी वास्तवात जशा असतात, त्यानुसार व्यक्ती त्यांच्याकडे पाहत नाही, ऐकत नाही, त्यांचा आस्वाद घेत नाही किंवा त्या गोष्टी वास्तवात जशा असतात त्यानुसार व्यक्तीला त्या संवेदित होत नाहीत. जोपर्यंत काही गोष्टी तुम्हाला सुखावणाऱ्या आणि काही गोष्टी तुम्हाला न सुखावणाऱ्या वाटतात, जोपर्यंत तुम्ही काही विशिष्ट गोष्टींनी आकर्षित होता आणि इतर काही गोष्टी तुम्हाला नकोशा वाटतात, तोपर्यंत तुम्ही त्यांच्याकडे तुमच्या प्रतिक्रियांच्या, तुमच्या आवडीनिवडीच्या किंवा तिरस्काराच्या दृष्टिकोनातूनच पाहत असता; आणि तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टींमधील सत्य दिसू शकत नाही. ज्ञानेंद्रियं ही साधनं असतात आणि संवेदना, भावना व विचार यांच्याप्रमाणेच तीसुद्धा नीट काम करेनाशी होतात (म्हणजे ती वस्तुंचे सत्य रूप न दाखविता, त्यांचे विपरित रूप प्रस्तुत करतात.)

म्हणून तुम्ही जे काही पाहता, तुम्हाला जे संवेदित होते, तुम्ही जे अनुभवता आणि जो विचार करता त्याविषयी खात्री असण्यासाठी तुम्ही संपूर्णपणे अनासक्त असले पाहिजे. आणि ही गोष्ट काही सोपी नाही, हे अगदी उघड आहे. म्हणून तोपर्यंत (तुम्ही संपूर्णपणे अनासक्त नसाल तर) तुम्हाला झालेले आकलन हे पूर्णत: सत्य असू शकत नाही आणि म्हणून ते प्रामाणिक नसते. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 08 : 398)

 

साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा, शारीरिक प्रामाणिकपणा असा काही फरक असतो का?

श्रीमाताजी : प्रामाणिकपणाचे तत्त्व साहजिकपणे सर्वत्र समान असते, पण व्यक्तीच्या अवस्थेनुसार प्रामाणिकपणाच्या कार्यपद्धतीमध्ये फरक पडतो. ‘संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का?’ या तुमच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल ‘नाही’ असे म्हणावे लागेल. मनुष्य आत्ता जसा आहे तसाच राहिला तर त्याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. मात्र, संपूर्णतया प्रामाणिक होण्यासाठी आवश्यक असणारी, स्वतःमध्ये रूपांतरण घडविण्याची पुरेशी शक्यता मनुष्यामध्ये आहे.

प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की, प्रामाणिकपणा उत्तरोत्तर वाढत जाणारा असतो. ज्याप्रमाणे व्यक्तीचा विकास होतो व तिची प्रगती होते, तसेच, ज्याप्रमाणे विश्व हे त्याच्या निर्मिती-प्रक्रियेदरम्यान उलगडत जाते त्याप्रमाणे प्रामाणिकपणाने देखील स्वत:ला निरंतर परिपूर्ण करत नेले पाहिजे. या विकासातील प्रत्येक थांब्यामुळे, मुक्कामामुळे कालचा प्रामाणिकपणा हा अपरिहार्यपणे उद्याचा अप्रामाणिकपणा ठरतो.

संपूर्णतया प्रामाणिक राहायचे झाले तर, पसंती-नापसंती, वासना, आकर्षण-प्रतिकर्षण, सहानुभूती किंवा द्वेषभावना, आसक्ती वा तिटकारा नसणे ही अत्यावश्यक गोष्ट आहे. व्यक्तीने वस्तुंविषयी समग्र दृष्टिकोन बाळगला पाहिजे, त्या दृष्टिकोनामध्ये प्रत्येक गोष्ट आपापल्या योग्य स्थानी असते आणि सर्व गोष्टींकडे पाहण्याचा व्यक्तीचा दृष्टिकोन समानच म्हणजे, सत्यदर्शनाचा असतो. वर सांगितलेली गोष्ट अंमलात आणणे मनुष्याकरता अत्यंत अवघड आहे हे तर उघडच आहे. एखाद्या व्यक्तीने स्वतःला दिव्यत्वामध्ये रूपांतरित करण्याचा निश्चय केल्याशिवाय, सर्व प्रकारच्या आंतरिक द्वंद्वांपासून मुक्त होणे ही बाब जवळजवळ अशक्यप्राय असते आणि जोपर्यंत मनुष्यामध्ये अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत, तो संपूर्णतया प्रामाणिक होऊ शकत नाही. परिणामतः त्याचे मानसिक, प्राणिक आणि शारीरिक कार्य अप्रामाणिकपणाचे होऊन जाते. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 08 : 397-398)

 

प्रश्न : माताजी, प्रामाणिकपणाचा खरा अर्थ काय?

श्रीमाताजी : प्रामाणिकपणाच्या असंख्य श्रेणी आहेत. विचार करायचा एक आणि बोलायचे वेगळेच, मागायची एक गोष्ट पण हवी असते निराळीच गोष्ट, हे असे नसणे म्हणजे प्रामाणिकपणा; ही झाली प्रामाणिकपणाची अगदी पहिली श्रेणी. म्हणजे असे पाहा की, एखादी व्यक्ती स्वतःमध्ये उत्कट अभीप्सा आहे, आणि तिला आध्यात्मिक जीवन हवे आहे, असे म्हणत असते आणि अगदी त्याच वेळी… अगदी निर्लज्जपणे, आध्यात्मिक जीवनाच्या पूर्णपणे विरोधी वर्तन करत असते.

(प्रामाणिकपणाची आता दुसरी श्रेणी पाहूया.) बरेचदा असे घडते एखादी व्यक्ती असे म्हणते की, “मला प्रगती करायची आहे आणि मला माझ्यातील दोष काढून टाकायचे आहेत,” आणि अगदी त्याच वेळी, ती व्यक्ती स्वत:च्या चेतनेमध्ये असणाऱ्या त्याच दोषांना खतपाणी घालत असते आणि त्यामध्ये कोणी हस्तक्षेप करून, ते काढून टाकू नयेत म्हणून, ते दोष दडवून ठेवण्यासाठी धडपडत असते.

म्हणजे व्यक्तीमधील एखाद्या भागाला असे वाटत असते की, त्याच्यातील सर्व दोष, सर्व अपूर्णता इत्यादी गोष्टी निघून गेल्या पाहिजेत. ती व्यक्ती तसा विचार करत असते, तसे म्हणतही असते आणि तशी अभीप्सादेखील ती बाळगून असते; आणि अगदी त्याच वेळी, त्या व्यक्तीमधील इतर भाग मात्र ते दोष आणि त्या अपूर्णता दडवून ठेवू इच्छित असतात. ते दोष आणि त्या अपूर्णता उघड होऊ नयेत, त्यांच्यावर मात करायला कोणी भाग पाडू नये, अशा रितीने ते अशा गोष्टी अगदी काळजीपूर्वक दडवून ठेवतात. हे अगदी सार्वत्रिक आहे.

आणि हाच मुद्दा आपण अजून विस्ताराने विचारात घेतला तर असे लक्षात येते की, ईश्वराबद्दल असणाऱ्या मध्यवर्ती अभीप्सेला विरोधी असा एखादा भाग जरी आपल्यामध्ये शिल्लक असेल तर तोपर्यंत आपण पूर्णपणे प्रामाणिक आहोत, असे म्हणता येणार नाही. म्हणजेच सांगायचे झाले तर, परिपूर्ण प्रामाणिकपणा ही एक अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. आणि बहुधा, अगदी नेहमी, स्वत:च्या प्रकृतीमधील, स्वभावातील ज्या गोष्टी व्यक्तीला आवडत नाहीत त्या गोष्टी, स्वतःपासून सुद्धा लपवून ठेवण्याची धडपड व्यक्ती करत असते; व्यक्ती त्या गोष्टींचे समर्थन करणारी स्पष्टीकरणे देत राहते.

…या सर्व गोष्टींची गणना अप्रामाणिकपणामध्ये होते. जेव्हा अस्तित्वाच्या केंद्रस्थानी दिव्य उपस्थितीची चेतना असते, दिव्य संकल्पाची चेतना असते आणि व्यक्तीचे संपूर्ण व्यक्तित्वच जेव्हा दीप्तीमान, स्वच्छ, शुद्ध व संपूर्ण पारदर्शी असते आणि ते त्या दिव्य अस्तित्वाचा सर्व तपशिलांसह आविष्कार करत असते, तेव्हा तेथे संपूर्ण प्रामाणिकपणा अस्तित्वात येतो. आणि तेव्हा तो खराखुरा प्रामाणिकपणा असतो.

व्यक्तीने जेव्हा स्वत:ला ईश्वराप्रत समर्पित केलेले असते, जेव्हा ती फक्त ईश्वराच्याच इच्छेने चालण्याची आस बाळगत असते, तेव्हा तिच्याबाबतीत काहीही घडत असले तरी, ती नेहमीच म्हणजे अगदी कोणत्याही क्षणी, स्वत:च्या समग्र अस्तित्वानिशी ईश्वराला म्हणत असते की, “सारेकाही तुझ्याच इच्छेने घडू दे,” आणि खरोखर तशीच तिची भावना असते. आणि हे असे जेव्हा अगदी उत्स्फूर्तपणे, संपूर्णपणे, समग्रपणे घडते, तेव्हा ती व्यक्ती प्रामाणिक असते.

– श्रीमाताजी (CWM 06 : 397-398)

 

उत्तमरितीने प्रशिक्षित असा रणक्षेत्रातील हत्ती, बाणांच्या भडिमाराने इतस्तत: पळायला सुरुवात करत नाही. तो वेदना सहन करतो. झुंजारपणे प्रतिकार करणाऱ्या वीराच्या वृत्तीने तो पुढे पुढे चालतच राहतो. ज्याला सन्मार्गाचे अनुसरण करायचे असते, त्याला स्वाभाविकपणे सर्व प्रकारच्या दुरिच्छांच्या हल्ल्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. कारण इतर जण त्याला समजून घेऊ शकत नाहीत आणि एवढेच नव्हे तर, त्यांना जे समजत नाही त्याचा ते द्वेष करू लागतात.

सामान्य लोक तुमच्याविषयी जे द्वेषपूर्ण उद्गार काढतात त्यामुळे, जर तुम्ही चिंताग्रस्त, दुःखीकष्टी किंवा नाउमेद झालात तर तुम्ही योगमार्गावर फार प्रगत होऊ शकणार नाही. दुरिच्छादी गोष्टी तुमच्या वाट्याला येतात याचे कारण तुम्ही दुर्दैवी आहात किंवा तुमच्या नशीबातच सुख नाही हे नसते तर, उलट (प्रगतिपथावर वाटचाल करण्याचा) तुमचा संकल्प दिव्य चेतनेने व दिव्य कृपेने गांभीर्याने घेतला आहे आणि तुमचा हा संकल्प, हा निश्चय कितपत प्रामाणिक आहे; मार्गातील अडचणींना सामोरे जाण्यासाठी तुम्ही कितपत खंबीर आहात हे पाहण्यासाठी, (सोन्याचा) कस पाहणाऱ्या दगडाप्रमाणे, कसोटीचा दगड म्हणून आजूबाजूच्या परिस्थितीचा दिव्य चेतनेने उपयोग केलेला असतो. (हे त्याचे खरे कारण असते.)

त्यामुळे कोणी जर तुमचा उपहास केला किंवा कोणी तुमच्याविषयी अपशब्द काढले तर पहिली गोष्ट तुम्ही केली पाहिजे ती अशी की, अंतर्मुख होऊन, आपल्यातील कोणत्या दुर्बलतेमुळे वा कोणत्या अपूर्णतेमुळे असे घडले ते पाहिले पाहिजे. तसेच, तुमची खरी किंमत काय आहे त्याची लोकांना काही कदरच नाहीये असे समजून तुम्ही उदास, संतप्त किंवा उद्विग्न होता कामा नये. त्यापेक्षा तुमचा कोणता दोष, कोणती दुर्बलता वा कोणती विकृती दुरुस्त केली पाहिजे हे दाखवून दिल्याबद्दल, तुम्ही दिव्य कृपेचे ऋणी असले पाहिजे. म्हणून दुःखीकष्टी होण्याऐवजी उलट, तुम्ही समाधानी झाले पाहिजे आणि तुमच्या विरोधात, तुमचे अहित व्हावे म्हणून जो घाट घातला गेला होता त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे.

तुम्हाला जर खरोखरच या मार्गाचे (पूर्णयोगाचे) अनुसरण करायचे असेल आणि योगसाधना करायची असेल, तर तुम्ही ती कोणाकडून कौतुक मिळावे किंवा सन्मान मिळावा यासाठी करता कामा नये; तर तुम्ही साधनेव्यतिरिक्त अन्य कोणत्या मार्गाने आनंदी होऊच शकणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला ती केलीच पाहिजे, अशी आणि इतकी ती तुमच्या जिवाची अनिवार्य निकड असली पाहिजे. लोकांनी तुमची प्रशंसा केली काय किंवा नाही, ती गोष्ट अजिबात महत्त्वाची नाही. तुम्ही आधीच स्वत:ला हे समजावले पाहिजे की, तुम्ही सामान्य माणसांपेक्षा जेवढे अधिक प्रगत व्हाल आणि तुम्ही जसजसे त्यांच्या सामान्य जीवन-पद्धतीपासून दूर जाल, तेवढे लोकं तुमची प्रशंसा कमी करू लागतील; कारण हे उघड आहे की, ते तुम्हाला नीट समजून घेऊ शकणार नाहीत. आणि मी पुन्हा एकदा सांगते की, ते अजिबात महत्त्वाचे नाही.

तुम्ही प्रगती केल्याशिवाय राहूच शकत नाही म्हणून, मार्गावर प्रगत होत राहण्यामध्येच ‘खरा प्रामाणिकपणा’ सामावलेला आहे. तुम्ही दिव्य जीवनासाठी स्वत:ला समर्पित करता कारण त्याशिवाय तुम्ही राहूच शकत नाही; तुम्ही स्वत:चे रूपांतरण करण्यासाठी धडपडता, प्रकाशाला उन्मुख होता कारण त्याविना तुम्ही राहूच शकत नाही, कारण तेच तुमच्या जीवनाचे प्रयोजन असते. जेव्हा हे असे असते तेव्हा खात्री बाळगा की, तुम्ही योग्य मार्गावर आहात.

• श्रीमाताजी [CWM 03 : 281-283]

 

ज्यांच्यापाशी प्रामाणिकपणा आणि तळमळ असते अशा व्यक्तींचा ईश्वर नेहमीच पाठीराखा असतो.

*

तुम्हाला जेव्हा खात्रीपूर्वक असे वाटते की, तुम्ही पूर्णतया प्रामाणिकपणा प्राप्त करून घेतला आहे तेव्हा, निश्चितपणे असे समजा की, तुम्ही मिथ्यत्वामध्ये बुडालेला आहात.

*

जे मुळात अतिशय प्रामाणिक आहेत त्यांनाच, ते पूर्णपणे प्रामाणिक नाहीत याची जाण असते.

– श्रीमाताजी (CWM 14 : 66, 69, 69)

 

ईश्वराची जी इच्छा आहे तीच अगदी पूर्ण प्रामाणिकपणे आपली इच्छा होणे, ही जीवनात शांती आणि आनंद मिळण्यासाठी आवश्यक असणारी अट आहे. आपल्याला काय हवे आहे आणि जीवनाने आपल्याला काय प्रदान करायला हवे, हे ईश्वरापेक्षा आपल्याला जास्त चांगले समजते, अशी माणसांची जवळजवळ नेहमीच खात्री असते आणि यातूनच बहुतांशी सारी मानवी दुःखे उद्भवतात.

इतर व्यक्तींनी आपल्या अपेक्षा पूर्ण कराव्यात आणि परिस्थितीने देखील आपल्याच इच्छावासनांची पूर्ती करावी अशी बहुतेक सर्व माणसांची अपेक्षा असते आणि त्यामुळेच त्यांना त्रास सहन करावा लागतो आणि त्यामुळेच ते दुःखीकष्टी होतात.

– श्रीमाताजी (CWM 16 : 433)

 

तुम्ही जेव्हा पूर्णपणे प्रामाणिक असता तेव्हा, तुम्ही तुमच्या अस्तित्वाच्या सर्वोच्च ध्येयाशी, तुमच्या अस्तित्वाच्या सत्याशी सुसंवाद राखून जगण्याचा सतत प्रयत्न करत असता.

प्रत्येक क्षणी – म्हणजे तुम्ही जो काही विचार करता, जे काही तुम्हाला भावते किंवा जे जे काही तुम्ही करता, त्या प्रत्येक वेळी – शक्य तितक्या संपूर्णपणे, शक्य तितक्या सर्वांगीण रितीने तुमच्या सर्वोच्च ध्येयाशी (highest ideal) सुसंवादी राहण्याचा प्रयत्न जर तुम्ही करत असाल किंवा तुम्ही जर तुमच्या अस्तित्वाच्या सत्याविषयी (truth of your being) जागृत झालेले असाल तर, त्यावेळी खराखुरा प्रामाणिकपणा तुम्ही साध्य केला आहे असे म्हणता येईल.

आणि जर तुम्ही तसे असाल, म्हणजे खरोखरच तुम्ही कधीही अहंभावात्मक वृत्तीने किंवा वैयक्तिक कारणासाठी कोणतीही कृती करत नसाल; तुमच्या आंतरिक सत्याकडून तुम्हाला जे मार्गदर्शन लाभते त्याच्या आधारे तुम्ही कृती करत असाल, म्हणजेच जर तुम्ही संपूर्णत: प्रामाणिक आणि प्रांजळ असाल तर, जगाने तुमच्याबद्दल काहीही म्हटले; तुमच्याबद्दल चांगला, वाईट काहीही ग्रह करून घेतला; काहीही मत बनविले, तरी तुम्हाला त्याबद्दल काहीच वाटणार नाही; तुम्ही त्याविषयी संपूर्ण उदासीन, संपूर्ण समवृत्तीने राहाल. त्या संपूर्ण प्रामाणिकपणाच्या स्थितीत असताना, चांगले ‘दिसण्याची’ किंवा इतरांनी तुम्हाला चांगले म्हणावे याची तुम्हाला आवश्यकता वाटणार नाही. कारण तुमच्या आंतरिक खऱ्या चेतनेशी जेव्हा तुम्ही सुसंवादी असता, तेव्हा पहिली गोष्ट ही घडते की, तुम्ही कसे ‘दिसता’, कसे भासता याची तुम्ही चिंता करत बसत नाही. लोक तुम्हाला काहीही समजत असले; उदासीन, भावनाशून्य, दूरस्थ किंवा अहंकारी म्हणत असले तरी, त्याला तुमच्या दृष्टीने काही महत्त्वच उरत नाही. अर्थात, मी पुन्हा सांगते की, त्यासाठी तुम्ही संपूर्ण प्रामाणिक, प्रांजळ असले पाहिजे. म्हणजेच, तुम्ही तुमचे आंतरिक, मध्यवर्ती सत्य व्यक्त करण्यासाठी, प्रकट करण्यासाठी जीवन जगत आहात, हे तुम्ही कधीही विसरता कामा नये.

– श्रीमाताजी (CWM 04 : 16-17)

 

ईश्वरी कृपा आणि संरक्षण नेहमीच तुमच्यासोबत असते. तुम्ही आंतरिक किंवा बाह्य अशा कोणत्याही अडचणीत किंवा संकटात सापडलेला असलात तरी त्यांना शिरजोर होऊ देऊ नका आणि अशी वेळ येईल तेव्हा, संरक्षण करणाऱ्या दिव्य शक्ती‌चा आश्रय घ्या. तुम्ही नेहमीच असे श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे करत राहाल तर, पृष्ठभागावर दिसणाऱ्या सर्व प्रकारच्या खळबळीमध्ये, गोंधळामध्येसुद्धा जे नेहमीच स्थिर आणि शांतिपूर्ण असते, असे तुमच्या अंतरंगातील काहीतरी खुले होत आहे, असे तुम्हाला आढळून येईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 724-725)

 

(तुम्हाला सत्याची आस असेल तर तुम्हाला सत्य गवसतेच, असे श्रीमाताजी सांगत आहेत. पण त्यासाठी तुम्ही, तुमच्या इच्छाआकांक्षामुळे स्वत:च्या त्रुटींकडे डोळेझाक करता कामा नये किंवा त्यांचे समर्थन करता कामा नये, हेदेखील त्या सांगत आहेत.)

तुमच्यामध्ये जेव्हा प्रामाणिकपणा असतो तेव्हा, तुम्हाला प्रतिसाद देण्यासाठी ईश्वरी कृपा सज्ज असते; तेव्हा तुम्हाला ईश्वरी साहाय्य, मार्गदर्शन लाभतेच हे तुमच्या लक्षात येईल. मग पुढे फार काळ तुमच्याकडून चुका घडत नाहीत.

प्रगतीसाठीच्या तळमळीमध्ये असणारा प्रामाणिकपणा व सत्यशोधनाबाबतच्या संकल्पामध्ये असणारा प्रामाणिकपणा आणि (ज्याला आध्यात्मिकदृष्ट्या विशुद्ध मानले जाते अशा) विशुद्ध असण्याच्या आवश्यकतेमध्ये असणारा प्रामाणिकपणा – हा प्रामाणिकपणा हीच सर्व प्रकारच्या प्रगतीची गुरुकिल्ली असते.

– श्रीमाताजी (CWM 03 : 192)

 

स्वतःशी पूर्ण प्रामाणिक राहा – स्वतःची फसवणूक करू नका.
ईश्वराप्रति प्रामाणिक राहा – समर्पणात सौदेबाजी करू नका; कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा ठेवू नका.
मनुष्यमात्रांशी साधेसरळपणे वागा – त्यामध्ये कोणताही ढोंगीपणा किंवा दिखावा असता कामा नये.

-श्रीमाताजी (CWM 14 : 70)