Tag Archive for: व्यावहारिक जीवन

 

ईश्वरी कृपा आणि संरक्षण नेहमीच तुमच्यासोबत असते. तुम्ही आंतरिक किंवा बाह्य अशा कोणत्याही अडचणीत किंवा संकटात सापडलेला असलात तरी त्यांना शिरजोर होऊ देऊ नका आणि अशी वेळ येईल तेव्हा, संरक्षण करणाऱ्या दिव्य शक्ती‌चा आश्रय घ्या. तुम्ही नेहमीच असे श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे करत राहाल तर, पृष्ठभागावर दिसणाऱ्या सर्व प्रकारच्या खळबळीमध्ये, गोंधळामध्येसुद्धा जे नेहमीच स्थिर आणि शांतिपूर्ण असते, असे तुमच्या अंतरंगातील काहीतरी खुले होत आहे, असे तुम्हाला आढळून येईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 724-725)

 

(तुम्हाला सत्याची आस असेल तर तुम्हाला सत्य गवसतेच, असे श्रीमाताजी सांगत आहेत. पण त्यासाठी तुम्ही, तुमच्या इच्छाआकांक्षामुळे स्वत:च्या त्रुटींकडे डोळेझाक करता कामा नये किंवा त्यांचे समर्थन करता कामा नये, हेदेखील त्या सांगत आहेत.)

तुमच्यामध्ये जेव्हा प्रामाणिकपणा असतो तेव्हा, तुम्हाला प्रतिसाद देण्यासाठी ईश्वरी कृपा सज्ज असते; तेव्हा तुम्हाला ईश्वरी साहाय्य, मार्गदर्शन लाभतेच हे तुमच्या लक्षात येईल. मग पुढे फार काळ तुमच्याकडून चुका घडत नाहीत.

प्रगतीसाठीच्या तळमळीमध्ये असणारा प्रामाणिकपणा व सत्यशोधनाबाबतच्या संकल्पामध्ये असणारा प्रामाणिकपणा आणि (ज्याला आध्यात्मिकदृष्ट्या विशुद्ध मानले जाते अशा) विशुद्ध असण्याच्या आवश्यकतेमध्ये असणारा प्रामाणिकपणा – हा प्रामाणिकपणा हीच सर्व प्रकारच्या प्रगतीची गुरुकिल्ली असते.

– श्रीमाताजी (CWM 03 : 192)

 

स्वतःशी पूर्ण प्रामाणिक राहा – स्वतःची फसवणूक करू नका.
ईश्वराप्रति प्रामाणिक राहा – समर्पणात सौदेबाजी करू नका; कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा ठेवू नका.
मनुष्यमात्रांशी साधेसरळपणे वागा – त्यामध्ये कोणताही ढोंगीपणा किंवा दिखावा असता कामा नये.

-श्रीमाताजी (CWM 14 : 70)

 

तडजोडविरहित प्रामाणिकपणा हा आध्यात्मिक सिद्धीचा खात्रीशीर मार्ग आहे. (प्रामाणिकपणाचे आचरण करत असताना कोणत्याही प्रलोभनामुळे विचलित न होणे, उद्दिष्टाबाबत कोणतीही तडजोड न करणे हा आध्यात्मिक सिद्धीचा खात्रीशीर मार्ग आहे.)

ढोंग करू नका – प्रामाणिक व्हा.
(नुसती) आश्वासने देऊ नका – कृती करा.
(नुसती) स्वप्ने पाहू नका – ती प्रत्यक्षात उतरवा.

– श्रीमाताजी (CWM 14 : 66)

 

(एका विभागामध्ये काम करणाऱ्या ‘क्ष’ व्यक्तीबाबत तेथील व्यवस्थापकांनी श्रीमाताजींकडे तक्रार केली आहे आणि त्या व्यक्तीच्या कामचुकारपणाबाबत व अप्रामाणिकपणाबाबत त्याला काही समजावून सांगावे अशी विनंती त्यांनी केली आहे. त्यावर श्रीमाताजींनी दिलेले हे उत्तर…)

अप्रामाणिकपणा हा एक असाध्य दोष आहे असे दिसते आणि त्या दोषामुळे व्यक्तीमधील ईश्वरी कृपेचे कार्यसुद्धा नामशेष झाल्यासारखे होते. या अप्रामाणिकपणामुळेच कालीमातेला या जगामध्ये तिच्या रौद्ररूपाद्वारे हस्तक्षेप करणे भाग पडते.

मी ‘क्ष’सारख्या अप्रामाणिक माणसाला काहीही सूचना करणार नाही कारण तो त्याला ढोंगीपणाने प्रतिसाद देईल आणि तो आत्ता ज्या अंधकारामध्ये बुडालेला आहे, तो अंधकार त्याच्या ढोंगीपणामुळे अधिकच वाढेल.

– श्रीमाताजी (CWM 17 : 343)

 

माणसं नेहमीच जटिल असतात आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये गुण व दोष परस्परांमध्ये इतके मिसळलेले असतात की, ते वेगळे करता येणे जवळजवळ अशक्य असते. एखादी व्यक्ती जे बनू इच्छिते किंवा इतरांच्या मनात तिच्याविषयी जी प्रतिमा असावी असे तिला वाटते त्यापेक्षा, ती व्यक्ती वास्तवात पूर्णपणे वेगळी असू शकते. कधीकधी त्या व्यक्तीच्या स्वभावाची एक बाजू दिसते, तर कधी तिच्या स्वभावाची दुसरीच बाजू व्यक्त होते किंवा अमुक एका संदर्भात व्यक्ती जशी वागते त्यापेक्षा अगदी भिन्नपणे ती इतरांच्या बाबतीत वागू शकते.

मानवी प्रकृतीच्या दृष्टीने पाहता, पूर्णपणे प्रामाणिक असणे, सरळमार्गी असणे, खुले असणे ही काही साधीसोपी उपलब्धी नाही. केवळ आध्यात्मिक प्रयत्नांनीच ही गोष्ट साध्य होऊ शकते. त्यासाठी व्यक्तीच्या आत्म-परीक्षणात्मक दृष्टीमध्ये निर्मम-वस्तुनिष्ठता असणे आवश्यक असते. तिच्यामध्ये आत्मनिरीक्षणाची स्वसमर्थन न करणारी चिकित्सा आवश्यक असते. बरेचदा भल्या भल्या साधकांकडे किंवा योग्यांकडेदेखील ही क्षमता नसते. केवळ प्रकाशमान अशा ‘ईश्वरी-कृपे‌’मुळेच, साधकाला स्वतःचा शोध लागतो आणि त्याच्यामध्ये ज्या उणिवा असतात, त्या भरून काढून, त्यांचे रूपांतरण घडविण्याची क्षमता केवळ त्या ‘ईश्वरी-कृपे‌’मध्येच असते. (आणि हे सुद्धा केव्हा शक्य होते?) तर, साधक जेव्हा ईश्वरी कार्यासाठी स्वतःला समर्पित करतो आणि तसे करण्यास तो सहमती दर्शवितो तेव्हाच हे घडून येते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 51)

 

…एखाद्या व्यक्तीने तुम्हाला तुमचा एखादा दोष दाखविला तर, त्याने तुम्हाला जणू एखादा खजिनाच दाखविला असे समजावे. म्हणजे याचा अर्थ असा की, जेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये एखादा दोष आढळतो किंवा तुमच्यामध्ये आकलनक्षमतेचा अभाव असल्याचे आढळते; एखादी अक्षमता, दुर्बलता आढळते; अप्रामाणिकपणा किंवा प्रगतीपासून रोखणारे असे काही तुम्हाला तुमच्यामध्ये आढळते, तेव्हा जणू काही एखादा अद्भुत खजिनाच सापडला आहे, असे तुम्हाला वाटले पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 03 : 220-221)

साधक : प्रामाणिक असणे आणि निष्ठावान असणे यामध्ये काही फरक आहे का?

श्रीमाताजी : हो, या दोन गोष्टी भिन्न आहेत. अर्थात, मला वाटतं की, प्रामाणिक नसताना निष्ठावान असणे आणि निष्ठावान नसताना प्रामाणिक असणे या दोन्ही गोष्टी अतिशय अवघड असतात. पण मला अशा काही व्यक्ती माहीत आहेत की, ज्या निष्ठावान होत्या पण त्यांच्याकडे प्रामाणिकपणाचा अभाव होता. याच्या उलट म्हणजे प्रामाणिक असूनही निष्ठा नसणे, हे मात्र फारसे दुर्मिळ नाही. एक गुण असेल तर पाठोपाठ दुसरा दुसरा येतोच असे नाही. पण हे उघड आहे की, सचोटी, ऋजुता, निष्ठा आणि प्रामाणिकपणा या गोष्टी एकमेकींशी घनिष्ठपणे संबंधित असतात.

साधक : एखाद्या गोष्टीशी वा व्यक्तीशी संबंधित असणारी निष्ठा ही सीमित भावना असते ना? यापेक्षा प्रामाणिकपणा अधिक व्यापक असतो ना?

श्रीमाताजी : हो, बरोबर आहे. निष्ठेमध्ये एक प्रकारच्या श्रेणीबद्ध संबंधाचा अंतर्भाव होतो, म्हणजे येथे कोणाशी तरी किंवा कोणत्यातरी वस्तुशी निष्ठा असते. त्यामध्ये एक प्रकारचे परस्परावलंबित्व असते. दिलेला शब्द पाळणे, स्वतःचे कर्तव्य अत्यंत काटेकोरपणे बजावणे म्हणजे निष्ठा, अशी सर्वसामान्य समजूत आहे. व्यक्ती अरण्यामध्ये एकटीच जीवन व्यतीत करत असेल तर ती परिपूर्ण प्रामाणिकपणाचे आचरण करू शकते, परंतु निष्ठेचे आचरण मात्र तुम्हाला सामाजिक जीवनातच करता येते, इतर लोकांशी संबंधित असतानाच करता येते. अर्थात, एखादी व्यक्ती ईश्वरी उपस्थितीप्रत आंतरिक श्रद्धायुक्त कृतीने पूर्णपणे समर्पित असेल तर ती त्या उपस्थितीशी एकनिष्ठ असू शकते.

– श्रीमाताजी (CWM 15 : 299-300)

साधेसरळ असणे (Straightforwardness) म्हणजे व्यक्तीने स्वतःशी व ईश्वराशी अगदी प्रामाणिकपणाने, सचोटीने वागणे आणि आचरणामध्ये कुटिलता न बाळगणे.

स्वतःची चूक ओळखण्याची (आणि ती मान्य करण्याची) इच्छा नसणे आणि अमुक एखादी गोष्ट चुकीची आहे असे श्रीमाताजींनी सांगूनदेखील, त्यांच्याशी प्रतिवाद करत, मीच कसा बरोबर आहे हे सिद्ध करण्याचा आटापिटा करणे म्हणजे स्व-समर्थन (Self-justification) करणे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 54)

नुसते बाहेरून चांगले ‘दिसण्यापेक्षा‌’ प्रत्यक्षात तसे ‘असणे‌’ अधिक बरे. आपला प्रामाणिकपणा जर परिपूर्ण असेल, तर आपण चांगले आहोत असे ‘दाखविण्याची’ गरज भासणार नाही. ‘परिपूर्ण प्रामाणिकपणा‌’ याचा आमचा अर्थ असा की, आपले सर्व विचार, भावना, संवेदना आणि कृती यांमधून अन्य काही नाही तर, आपल्या अस्तित्वाचे केंद्रवर्ती सत्‌‍-तत्त्व‌च (central Truth of our being) आविष्कृत झाले पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 12 : 268)